Thursday, November 22, 2007

बोट सुटलं...



















त्या दिवशी तुला शांत निजलेलं पाह्यलं
तुझा वेदनारहित चेहरा
इतकं शांत कधीच नसायचीस तू
तुझ्याकडे बघत बसले होते मी
वाटलं म्हणशील
"नुसती बसू नको,
उठ, काही काम कर!"
खूप वाट पाह्यली तू म्हणशील म्हणून..

आत कुणीतरी चहा केला,
कप वेगळे काढले
"ह्यातले कप नकोत,
गेल्यावर्षीचे नवीन आहेत त्यातले वापरा."
असं काहीच तू म्हणाली नाहीस

कोणी म्हणालं १५ वा अध्याय म्हणूया
म्हणला!
तुला रामरक्षा आवडायची
ती पण म्हणालो आम्ही!

अवघड उच्चार मुद्दाम चुकवले.
"असं नाही गं सोने!
त्याचा संधी असा असा होतो..
त्यामुळे उच्चार असा असायला हवा"
असं नाही म्हणालीस तू!
तू तशीच शांत निजून होतीस.

तेव्हा कळलं..
नव्हे अंगावरच आलं..
बाळपणी कधीतरी धरलेलं तुझं बोट
आज सुटलंय
कायमचं

--- नीरजा पटवर्धन

Friday, November 16, 2007

ठकूनी लिहिलेलं...

ठकूचा पहिला हक्काचा वाचक होती आई. लिहिलं म्हणून कौतुक करत लिखाणावर मात्र सडेतोड प्रतिक्रिया देणारी तिची आई. आवडलं की "लोक म्हणतात माझ्यातून आलंय लिखाण तुझ्याकडे पण माझ्यापेक्षा फारच चांगलं लिहितेस!" असंही म्हणणारी आई.
ठकूनं कथा लिहिली तर स्पर्धेला पाठव गं म्हणून असं सीसीयू च्या बेडवर आडवं पडून ठकूला बजावणारी ठकूची आई. कथास्पर्धेत बक्षिस मिळवल्यावर ठकूपेक्षा डोंगराएवढा आनंद झालेली आई. आपलं आजारपण विसरून तिच्या बक्षिससमारंभाला आलेली आणि लहान मुलीसारखी खुश झालेली आई. आई खूप नाजूक झालीये, घट्ट मिठी मारली तरी तिला दुखेल कुठेतरी, मांडीवर डोकं ठेवलं तर तिला पेलणार नाही म्हणून नुसताच आईचा हात धरून बसलेली ठकू. "आता लिहिन मी आई!" आईच्या डोळ्यातलं चमचम चांदणं पाहून ठकूनी आईला सांगितलं.
ठकू नंतर कसलासा प्रवास करून आली आणि त्याबद्दल भारावून गेली. आईला फोनवरून सांगितलं थोडंसं आणि बाकीचं आले की सांगते म्हणाली. ठकूनी सगळ्या प्रवासाबद्दल लिहिलं आणि पाठवून दिलं दिवाळी अंकासाठी. आलं छापून की आईला सरप्राईज देऊ म्हणून..
पण... आई गेली सोडून ठकूला त्याआधीच. ते लिखाण दाखवलं असतं तर गेली नसती ती ठकूला सतत वाटतंय...
तेच हे लिखाण
http://www.maayboli.com/node/602

Wednesday, November 7, 2007

ठकूचा ताल चुकलाय

ठकूला तिच्या सगळ्या सगळ्याचा अभिमान होता. आणि तिला तशी घडवणार्‍या आपल्या आईबाबांचाही. पण ठकूची आई निघून गेली प्रकाशाची झाडं शोधत (ही पण ठकूच्या आईची उपमा) वेगळ्या जगात. कधी परत न येण्यासाठी. ठकूसाठी बरीचशी प्रश्नचिन्ह तशीच ठेवून. आता ठकू पावलंही टाकू शकत नाहीये. ताल तर सोडाच....

Friday, October 26, 2007

ठकू आणि लच्छी

एकदाची ठकू लिहायला बसली तिनं ठरवलं आपल्या सगळ्यात आवडत्या मैत्रिणीवर, नाचर्‍या लच्छीवर लिहायचं. ठकू लिहायला बसली आणि लच्छी काही नाचून दाखवायला तयार नाही. कंटाळून ठकी तिथून उठायला लागली आणि लच्छी समोर येऊन बसली. "अशी कशी गं तू? लच्छी सापडायची तर लच्छी बनायला नको? ये चल टाक पावलं माझ्याबरोबर.." ठकूचा हात धरून लच्छी घेऊन गेली.

ही लच्छी आहे पु. शि. रेग्यांच्या 'सावित्री' मधे, त्यातल्या एका गोष्टीत. लच्छी आणि मोराच्या गोष्टीत. कांदबरीच्या सुरूवातीलाच ही गोष्ट येते आणि मग पुर्ण कांदंबरीतली सगळी पत्रे म्हणजे लच्छीचा मोर नाचताना पडलेली मोरपिसं व्हायला लागतात.

"... माझ्या नाचण्याचा ताल आता बरा जमायला लागलाय...."

गोष्टीत आहे एक म्हातारी आणि तिची नात लच्छी. त्यांच्या झोपडीशी एकदा मोर येतो. त्याला बघून लच्छी नाचायला लागते मग मोरही नाचायला लागतो. लच्छी हट्ट धरते की ह्याला इथंच बांधून ठेवावं. पण घरात मोराला घालायला काही दाणापाणी नसतो म्हणून म्हातारी नको म्हणते. शेवटी मोरच म्हणतो मी इथंच राहीन, मला दाणापाणी काही नको पण एक अट आहे. मी येईन तेव्हा लच्छीनं नाचलं पाहिजे. ती नाचायची थांबेल तेव्हापासून मी येणार नाही. लच्छी कबूल होते. पण असं हुकुमी नाचायचं म्हणजे सोपी गोष्ट नव्हे. मनही तसंच आनंदी हवं तेव्हापासून लच्छी आनंदीच राहू लागली. मोर कधी केव्हा येईल याचा नेम नसे. पुढे पुढे मोर येऊन गेला की काय याचं तिला भान रहात नसे.

पूर्ण कादंबरी पत्ररूपात आहे. कुण्या एका सावूने कुण्या एका सुहृदाला लिहिलेली पत्रे. यामधे तो सुहृद काहीच बोलत नाही. बोलताना, व्यक्त होताना दिसते ती सावित्रीच. त्यामुळे कादंबरीच्या सुरूवातीलाच आलेल्या या गोष्टीचं प्रयोजन उमजूनच जातं.

".... कसं करतेस तू लच्छी? आधी डावा की आधी उजवा?.. "

लच्छी मोरासाठी नाचत रहाते. मोर येतो आणि जातोही पण ती नाचतच रहाते. हे नाचणंच महत्वाचं होऊन जातं मोर येण्यापेक्षा. मोर यायलाच हवा याची गरज वाटेनाशी होते कारण नाचता नाचता ती स्वत:च मोर होते. हेच तर सावू सांगते कादंबरीत.. 'मोर हवा तर आपणंच मोर व्हायचं. जे जे हवं ते आपणंच व्हायचं. मोराला आपल्यातंच कुठेतरी ठेवून द्यायचं मग तो जाईलच कुठे? पण मोर आत भिनायला हवा तर मग आनंदी राह्यलंच पाहिजे.

".. छे मला जमतच नाहीये हा तुझा पदन्यास.."
" माझ्या हातात हात दे.. जमेल.."

ही लच्छी आनंदभाविनी (रेग्यांचाच शब्द पण किती चपखल). मोरासाठी का होईना पण कायम आनंदात असणं हेच तिचं प्राक्तन. आणि मोर हवासा झाला की त्या आनंदातच आपणच नाचून आपल्यातल्या मोराचा पिसारा फुलवणं हे ही. हे तिचं आनंदभाविनीपण खूप काही सांगून जातं. सुंदर आयुष्याच्या सुंदर तालावर डौलात पावलं टाकत जगणं हे खरं जगणं. असं जगता यायला हवं. असं सगळ्यांनीच जगायला हवं हेच तर लच्छी सांगत रहाते. अर्थात यासाठी खूप मोठं बळ लागतं. लच्छी हे बळ मिळवते मोराच्या आशेमधे. पण नंतर या बळाला, आशेला कसलाच अर्थ उरत नाही. एकदा नाचायची, तालाची सवय होण्यापुरतं हे बळ. मग नाचण्याची नशाच तुम्हाला पुढे घेऊन जाते. यामधे नशा आहे पण ती उन्मत्त नाही. काहीही जिंकण्याची ओढ, मिळवण्याची लसलस नाही. जी काय आशा आहे ती आपल्या मोराची जी पुढे गळून जाते. असं जगणं जमलं पाहिजे.

".. अशी सुंदर लवलवते लच्छी. मला कधी जमेल?.."
"थांबू नकोस! पावलं टाकत रहा... "

"आयुष्याला सुंदर नाच म्हणणं सोपं आहे गं बये पण ताल बिघडायला काय वेळ?"
"तुमचा ताल तुम्हीच ठरवायचा, मग इतर कोण कशाला बिघडवेल तो?"

आपलं जगणं हे काही सतत सुंदर कुठे असतं? ते तसं करणं हे आपल्या हातात असतं. या जगण्याला कसं सामोरं जायचं हे महत्वाचं. शेवटी ताल कधीच सुटता कामा नये.

"... पावलामागून पावलं.. कित्ती मज्जा!!.."

माझा माझा मीच ठरवलेला ताल तो जपत मापत नाचत रहायचं. सतत तालाकडे लक्ष. काळाचा एक ठराविक तुकडा संपला की मगच पाय पडला पाहिजे. आधी नाही आणि नंतरही नाही. किती लक्षपूर्वक केलं तरी चुकतोच, सटकतोच ताल, तुटतेच लय. मग लयीचे तुटलेले छोटे छोटे तुकडेच आयुष्यात उरतात.

"..पावलांच्या या उचलण्याला नी परत टाकण्याला पदन्यास म्हणतात का?.."
"जास्त विचार करू नकोस मार एक गिरकी. नको करू काळाच्या तुकड्यांची काळजी!.."

जगण्याची लय शोधायची नाही, आपणच बनवायची आणि मग सोडून द्यायचं स्वत:ला त्या लयीबरोबर. लयीचं ओझं नाही होऊ द्यायचं. ते भान सुटलं पाहिजे. भान विसरता आलं पाहिजे तरंच लय सुटणार नाही. आयुष्याचा ताल चुकणार नाही. म्हणजे भान सुटलं तरी नाचत रहायचं..

".. जमायला लागलंय का गं मला?.."
"विचारतेस म्हणजे नसावंच जमत अजून!"
"..मग कसं करू आता?.."
"मी कसं सांगणार? तुला लच्छी व्हावं लागेल त्यासाठी."
"............."
"अगं नाचाकडे का लक्ष तुझं?"
"..मग?.."
"कुठे आलीस बघ तरी तू! कसं वाटतंय आता?"
"... अरे हो!.."
"आनंदभाविनी हा तुलाच आवडणारा शब्द ना?"

तसं पाह्यलं तर खुद्द मोराला तरी नाचता कुठे येतं. एक पाय उचलला की तोल जातो. तो सावरायला म्हणून तो लगेच पाय खाली टेकतो आणि दुसरा पाय उचलतो. पुन्हा तीच तर्‍हा... असं add infinitum. बघणारे त्यालाच नाच म्हणतात...

Wednesday, October 24, 2007

ठकूच्या ब्लॊगची चम्मतग!

एक होती ठकू. तिच्या मैत्रिणी होत्या शकू, बकू आणि मकू. चौघीजणी भेटल्या की त्यांच्या गप्पा व्हायच्या. पण हल्ली हल्ली या तिघी फार ब्लॊग ब्लॊग करू लागल्या होत्या. आणि आपापसातच हसत होत्या. शेवटी ठकूनं ठरवलं ’मला पण हवा ब्लॊग!’
मैत्रिणींकडून ब्लॊगचं व्रत समजावून घेतलं. नेटवर गेली आणि ब्लॊग काढला आपला. त्याला छानसं नाव दिलं. आपला फोटो लावला. त्याचं रूपडं सजवलं. अगदी तीट पण लावली इवलीशी.
एवढं करून झाल्यावर लिहायला घेतलं. ’त्यात काय रोजची बडबड करतेस तीच तिथे लिही.’ शकू म्हणाली होती. ’दैनंदिनी गं दैनंदीनी!!’ बकूनी चष्मा सावरत सांगितलं होतं. ’माझी चित्रं असतात तिथे.’ मकू हळूच म्हणाली होती. हे सगळं ऐकल्यावर ठकूला सोप्पच वाटलं होतं. पण ठकिनं लिहायला घेतलं आणि झाला की हो घोळ. काहीच सुचेना तिला.
इतकं छान रूपडं सजलंय माझ्या ब्लॊगचं. जे लिहिन ते चांगलंच असायला हवं. कशावर बरं लिहावं? ऒर्कुटवर झालेल्या भांडणाबद्दल लिहावं की गेल्या आठवड्यातल्या ट्रिपबद्दल लिहावं हेच तिला समजेना. सजवलेल्या ब्लॊगला कुरूप करायला तिचं मन घेईना..
मग काय अजूनतरी ब्लॊग तिचा तसाच सजलेल्या मखरात कोराच्या कोरा बसलाय. वाट बघत ठकीची...

Search This Blog