Sunday, May 16, 2010

ब्लॉग, ब्लॉगर्स आणि ब्लॉगिंग २

गेल्या रविवारी म्हणजे ९ मे २०१० ला मुंबईत दादर सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात ब्लॉगर्स मेळावा दणक्यात पार पडला.

कांचन कराई, महेंद्र कुलकर्णी आणि रोहन चौधरी या तिघांनी अतिशय उत्तमपणे या मेळाव्याचे संयोजन (आर्थिक बाजूसकट) उत्कृष्टरित्या पार पाडले. त्यांचे आभार. या सगळ्याबद्दल वेगवेगळ्या ब्लॉगर्सनी लिहिलंच आहे. कोण कोण आले होते पासून काय काय खाल्ले इथपर्यंत सगळंच बहुतेक ब्लॉगपोस्टस मधे आलेलं आहे. तेव्हा मी त्यावर काय बोलणार अजून!

मेळाव्यानंतर घरी गेल्यावर लगेच लिहिले गेले असते तर नक्कीच सरळसोट वृत्तांतापलिकडे मीही लिहिलं नसतं आणि कदाचित ज्यांनी लिहिलंय त्यांच्याइतकं चांगलं मला लिहिताही आलं नसतं. आणि माझा आळशीपणाही होताच त्यामुळे मेळावा झाल्या झाल्या लिहायचं राहूनच गेलं. तेव्हा आता वृत्तांतापलिकडे जाऊन मेळाव्यासंदर्भाने पुढे आलेल्या आणि मला महत्वाच्या वाटलेल्या काही गोष्टींबद्दलच मी लिहेन म्हणते.

मेळावा छान पार पाडण्यासाठी संयोजकांचे कष्ट होतेच यात वाद नाही पण त्यांनी जे ठरवलंय ते योग्य रितीने पार पडावं याची जबाबदारी आपली सगळ्यांची म्हणजे जमलेल्या सगळ्या ब्लॉगर्सची आहे. हे अर्थातच ब्लॉगर्स मेळावाच नव्हे तर कुठल्याही सभासंमेलनाच्या बाबतीत खरं आहे. या मेळाव्याच्या ठिकाणी आणि इतरत्रही आपण ते पाळतो का? संयोजकांनी मेळाव्याची एक रूपरेषा ठरवलेली आहे. ती इमेलमधून पाठवलेलीही आहे तर त्या रूपरेषेनुसार कार्यक्रम व्हावा ही जबाबदारी उपस्थित असलेल्या प्रत्येकाची नाही का? जर पहिलं सेशन, पहिला कार्यक्रम हा केवळ ब्लॉगर्सनी स्वतःची थोडक्यात ओळख करून देण्याचा आहे तर आपण किती वेळ बोलायचं याला मर्यादा आपण घालायला नको का? की थोडक्यात या शब्दाची व्याख्या/ अर्थ आपल्याला माहीत नाहीयेत? जे सगळे विस्ताराने बोलले त्यांचं म्हणणं महत्वाचं होतं हे निश्चित. पण थोडक्यात ओळख च्या ऐवजी नंतरच्या सेशनमधे ते केलं गेलं असतं तर विस्तृत भाषणांनंतर ज्या ब्लॉगर्सच्या ओळखी झाल्या त्यांच्या ओळखींमधे आणि नंतरच्या सेशनमधेही लोकांना इंटरेस्ट राह्यला नसता का? संयोजकांनी ठरवलेल्या रूपरेषेला धाब्यावर बसवण्यात आपल्याला काय भूषण वाटतं? की हा पण एक मराठी बाणा आहे?

देवनागरी लिखाणाचे तंत्र यावर आपण सगळ्यांनी भरपूर किंवा सगळ्यात जास्त उहापोह केला. काहींना मुळाक्षरांच्या सेटसप्रमाणे किबोर्ड असल्यामुले लिखाण सोपे वाटत होते. काहींनी फोनेटिक किबोर्ड जवळ केला होता. स्पेलचेक, शुद्धलेखन इत्यादींच्या अनुषंगाने काही मुद्दे मिळाले. ते जामच तांत्रिक असल्याने माझ्या अर्थातच लक्षात राह्यले नाहीत. आणि मुळात ओळख प्रकरणांमधे खूप वेळ गेलेला असल्याने तोवर काही ऐकण्याचा पेशन्स बहुतेक संपला होता. तिथे दिली गेलेली तांत्रिक माहिती कुणी एकगठ्ठा आपल्या ब्लॉगमधे टाकली तर नीट समजून घ्यायला फार आवडेल.

पुढचा मुद्दा कॉपीराइट इश्यूचा. आपण आपल्या लेखात फोटोग्राफ्स कुठून उचलून वापरत असू तर ते तसे वापरणे हे मुळात violation आहे. तसे करणे चुकीचे आहे हीच गोष्ट बहुसंख्य ब्लॉगर्स किंवा इतरांच्या गावी नसते. फॉरवर्ड पाठवणारे किंवा काही ब्लॉगर्स हे केवळ मला आवडलं मी शेअर केलं असा सूर लावतात, त्यापुढे जाऊन आम्ही प्रसिद्धी देतोय या गोष्टींना अशी शेखीही मिरवतात. ही वृत्ती मोडण्यासाठी मुळात काहीतरी करायची गरज आहे. मराठी ब्लॉगर्स म्हणून आपण आपलं अस्तित्व उभं करत असताना या काही मुद्द्यांकडे आपण जायला हवे. कॉपीराइट संदर्भातले तांत्रिक ज्ञान महत्वाचे आहेच पण अ‍ॅटिट्यूड, वृत्ती याबद्दल पण आपण जबाबदार मराठी ब्लॉगर्स म्हणून आपल्या ब्लॉग्जमधून भाष्य करायला हवे. निदान काही ढापू लोक जे अनभिज्ञ आहेत ते तरी सुधारतील. स्मित

अर्थात ह्या झाल्या तांत्रिक गोष्टी. संपूर्ण कार्यक्रमात या तांत्रिक गोष्टींपलिकडे कोणी बोलायलाच तयार नाही की काय असं वाटलं. ब्लॉग्ज मधून येणारे विषय, लिखाण यांचा मर्यादित स्कोप यावर प्रसन्न जोशीने खूप महत्वाचे मुद्दे मांडले. मराठी ब्लॉग्ज मधे मराठीपण हे ज्ञानेश्वर-तुकाराम, वपु-पुलं, गणपती-दिवाळी, वडापाव यापलिकडे जातच नाही. मराठी ब्लॉग्जमधे या पलिकडचे विषय फारसे येत नाहीत. मराठी बाहेरचं इतर साहित्य मराठीत आणलं जाणं असं फारसं काही घडत नाही. ब्लॉगला मराठी शब्द शोधण्यापुरताच आपला मराठीचा अभिमान असतो. हा असा अट्टाहास योग्य आहे का? असं काहीसं त्याचं म्हणणं होतं. मुद्दा महत्वाचा होता. पण कदाचित खूप वेळ भाषणबाजी झाल्यामुळे असेल त्या मुद्द्याला सोयीस्कर बगल दिली गेली आपण सगळ्यांकडूनच. माझ्या आसपासच्या खुर्चीवरून कशासाठी जायचं या पलिकडे? कशासाठी पहायचं यापलिकडे? अशी कूपमंडूक प्रतिक्रियाही खुसखुसताना मी ऐकली.

मुद्दा मला महत्वाचा वाटला. मराठीपण हे खूपच मर्यादित मुद्द्यांपुरतं दिसून येतंय ब्लॉग्जमधे. कुठे ब्लॉग किंवा तत्सम अनेक गोष्टींना मराठी प्रतिशब्द शोधण्याच्या अट्टाहासापुरतंच रहातंय तर कुठे आमचे सण आणि आमची संस्कृती याबद्दल प्रचंड भावनांनी ओथंबून जात आंधळेपणाने जुनं ते सोनंचाच जप करताना दिसतंय तर कुठे वापरून गुळगुळीत झालेल्या शब्द आणि संकल्पनांना घेऊन run of the mill प्रकारची तथाकथित साहित्यनिर्मिती करताना दिसतंय इत्यादी. मराठी भाषेबाहेरचं काहीतरी मराठीत आणणं सोडाच महाराष्ट्रातल्याच आयुष्याबद्दल बरंच काही आपल्यापर्यंत सर्वांगाने पोचत नाहीये. आपल्याला ते शोधावसं, लिहावसं वाटत नाहीये. मराठीपणाच्या कक्षा आपल्या बुद्धीत रूंदावत नाहीयेत आणि त्यामुळे मराठीपणाचे बरेचसे पैलू आपल्याला दिसतच नाहीयेत.

आता याची कारणं म्हणायची तर मला सापडलेली ही काही कारणं...
१. इंटरनेट हा प्रकार उपलब्ध असणं, तेही अश्या प्रकारच्या लिखाणासाठी मुक्तपणे उपलब्ध असणं हे अजूनही ठराविक व्यवसायांपुरतंच आणि शहरांपुरतंच मर्यादित आहे.
२. उपलब्धता असली तरी कॉम्प्युटर आणि इंटरनेट या संदर्भातली भीड चेपली जायला अजून वेळ आहे. हे इतर व्यवसाय आणि लहान गावे यांच्यासंदर्भात
या दोन कारणांमुळे खूप ठराविक लोकच लिहिणारे आहेत आणि त्यामुळे निश्चितच वैविध्याची कमतरता आहे.
३. आपली (माझ्यासकट आपली सगळ्यांची) कवाडं अजून बर्‍याच अंशी बंद आहेत. यापलिकडे आहेच काय/ गरजच काय याप्रकारची मानसिकता आपली सगळ्यांचीच आहे कमी अधिक प्रमाणात.
४. ब्लॉग लिहिणे हे अजूनही आपल्या ओळखीच्यांपुरते लिखाण, गंमत म्हणून लिखाण इतपतच आहे. त्याचे ते स्वरूप जोवर बदलत नाही (आपल्याकडून आणि इतर अनेक तांत्रिक पातळ्यांवर सुद्धा) तोवर त्यात गांभीर्याने दखल घ्यावी असे थोडेसेच असणार.
अर्थात ही सगळी 'कारणे' झाली. स्वतःच्या, स्वतःच्या मराठीपणाच्या मर्यादा मोडायची, कक्षा रूंदावायची वेळ झाली आहे हे आपलं आपल्यापुरतं आपल्याला टोचलं तरी खूप झालं की!!

या मर्यादित विषयांच्या पार्श्वभूमीवर मला काही जणांचं लिखाण महत्वाचं वाटतं. त्यातले आत्ता आठवणारे हे दोन.
१. झुलेलाल उर्फ दिनेश गुणे http://zulelal.blogspot.com - दर वेळेला महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या जगण्याबद्दल, वेगवेगळ्या प्रकारच्या जगण्याबद्दल एक काहीतरी नवीन अनुभवायला मिळतं. एखादा प्रश्न, समस्या, नवी वाटचाल, एखादा तिढा असं काहीतरी नेहमीच्या चक्कीपेक्षा वेगळं, काहीतरी खूप महत्वाचं आणि आपल्या आयुष्यांशी अप्रत्यक्षपणे का होईना निगडीत असणारं प्रामाणिक लिखाण. परत भाषाशैली अप्रतिम आहेच.
२. मधुकर रामटेके http://mdramteke.blogspot.com - सुरूवातीला मायबोलीवर याचं काही वाचलं तेव्हा ब्राह्मणविरोधी/ ब्राह्मणद्वेष्ट्या विचारांपलिकडे काही दिसलं नाही. रागही आला. पण मग त्याने त्याच्या भामरागडबद्दल, त्याच्या भाषेबद्दल, तिथल्या चालीरितींबद्दल लिहायला सुरूवात केली तेव्हा सुखद धक्का होता. सहज, उस्फूर्त आणि वेगळ्या आयुष्याबद्दलचं लिखाण. पण तरी मराठीपणातलंच(भाषा वेगळी असली तरी ते मराठीपणच), महाराष्ट्रातलंच. आपल्यापेक्षा वेगळा समाज आपल्यापुढे उभा करणारं आणि पर्यायाने आपल्याला विचारात पाडणारं.

अजूनही बरेच आहेत पण सध्या पटकन हे दोन आठवतायत.

तर असो.. मर्यादा तोडण्याच्या नावाने चांगभलं करून सध्यापुरती माझ्या किबोर्डाला विश्रांती देते. तुम्हीही थकला असाल तर उतारा म्हणून वरचे दोन ब्लॉग्ज नक्की वाचा. याला आमच्या मायबोलीवर रिक्षा फिरवणे म्हणतात. म्हणोत म्हणतात तर. मेरेको क्या!!
- नी

13 comments:

Kanchan Karai (Mogaraafulalaa) said...

धन्यवाद निरजा. तू एकमेव उपस्थित ब्लॉगर आहेस जिने हे मुद्दे लक्षात आल्यानंतर त्यावर लिहिलंदेखील! मला हेच लिहिताना थोडी अडचण वाटत होती की आपल्या वृत्तांताला कुठे आढ्यतेची किनार न लाभो. असो. पुढच्या ब्लॉगर मेळाव्यामधे या सर्व मुद्दयांवर विचार करून लिहिते झालेले ब्लॉगर्सही सामील असतील अशी अपेक्षा करू या. तू उल्लेख केलेले हे दोन ब्लॉग मी एखाद्या वेळेसच वाचले असतील पण आता फीड घेते म्हणजे वाचता येतील. पुन्हा एकदा धन्यवाद.

नीरजा पटवर्धन said...

Thanks Kanchan!
Mala hech mudde satavat hote. mhanun mi pan barech divas jaude mhanun sodun dila lihayacha...

Suhas Diwakar Zele said...

अभिनंदन नीरजा..
कांचन म्हणाली तसाच खूप चांगले मुद्दे मांडलेस. शुभेच्छा

Unknown said...

प्रिय नीरजा,

ब्लॉगर मेळाव्याला येण्याची खूप इच्छा असूनही येता आलं नाही. पण त्या संबंधित अनेक वृत्तांत वाचले आणि आता तुझा विश्लेषणात्मक पोस्टही वाचला. कॉपीराइटबद्दल तू मांडलेला मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. तू म्हटलं आहेस त्याचा गांभीर्याने विचार लोकांनी केला तर ब्लॉगवरचं लिखाणही अधिक सकस आणि ओरिजिनल होईल असा विश्वास वाटतो.

Rahul Ranade said...

alshipana zatkun regular blog kasa lihava yabaddal margadarshan kara please!

नीरजा पटवर्धन said...

Thanks Suhas.
Thanks Kaushal..
RaRa..... alashipana zatakanyabaddal ata tuch margadarshan kar mala... :)

Gangadhar Mute said...

<< स्वतःच्या मराठीपणाच्या मर्यादा मोडायची, कक्षा रूंदावायची वेळ झाली आहे हे आपलं आपल्यापुरतं आपल्याला टोचलं तरी खूप झालं की!! >>

अगदी बरोबर.
छान मुद्दे मांडलेत तुम्ही. पटलेत.

davbindu said...

छान..अगदि सडेतोड लिहलत..मलाही त्या ब्लॉगर्सच्या ओळखीच्या सत्रातील दिर्घ ओळखी खटकल्या होत्या...

Anonymous said...

निव्वळ वृत्तांत लिहीण्यापेक्षा विश्लेषण केल्याबद्दल आभार...
नियम वगैरे दुसर्‍यासाठी ही प्रवृत्ती संस्कृती म्हणावी इतक्या जोरावर आहे. असो. त्यांच्या दिर्घ ओळखींमुळेच मला निवांतपणे वडा कटलेट चहा खातापिता आलं...
run of the mill मान्य. पण मुळात ब्लॉग हे वैयक्तिक मतं/विचार मांडण्याचं साधन म्हणून पाहील्या गेल्याने (साहित्यनिर्मितीचं किंवा समाजप्रबोधनाचं साधन म्हणून न बघता) ब्लॉगकर्त्याच्या विचारकक्षेच्या चौकटीतच ब्लॉग्ज अडकलेत![नंदा प्रधानमधे ओझरता येऊन जाणारा गिरगावाच्या चाळीतल्या कादंबरीकाराचा उल्लेख आठवला...] त्यामुळे सगळा झोल होतोय असं नाही का वाटत?
कॉपीराईटचा मुद्दा मान्य. मी मेळाव्यात म्हटल्याप्रमाणे फार नाही पण एखादा फोटो कुठून/कोणाकडून उचलला हे जाहीर जरी केलं तरी खूप!

Anonymous said...

मुद्देसूद पोस्ट आहे. बऱ्याच गोष्टी ज्या बोलतांना थोडी अडचण वाटते, त्या इथे अगदी कुणालाही न दुखावता मोजक्या शब्दात मांडल्या आहेत.
बरं वाटलं, कोणीतरी मनातलं लिहिलं म्हणून.
धन्यवाद.

तृप्ती said...

नी, तुझे मुद्दे चांगले आहेत. संयोजनाविषयी आणि वेळखाऊ ओळखीविषयी तिथे उपस्थित असलेले बोलु शकतील.

प्रताधिकाराविषयी तुझं आणि चिनूक्सचं म्हणणं पटलं. प्रताधिकार न नोंदवलेल्या चित्रांविषयी काय करावं असा मला पण प्रश्न पडला होता. कारण मी माझ्या ब्लॉगवर अशी काही प्रकाशचित्रे वापरली आहेत. तसेच खास 'प्राधिकारमुक्त' प्रकाशचित्र किंवा कार्टून्स मिळतात त्या चित्रांखाली 'प्रताधिकार अज्ञात' अथवा 'प्रताधिकारमुक्त' असे काही लिहावे काय ?

बाकी मराठी भाषा, संस्कृती वगैरे विषयी>>>>>> अनेकानेक ब्लॉगर्सना आपले लिखाण प्रसिद्ध करायची खूप घाई असते/असावी. मुद्रितशोधन, शुद्धलेखन ह्या गोष्टी सरळ-सरळ धाब्यावर बसवलेल्या असतात. प्रथितरश ब्लॉगर्स स्वतःच्या मनाने शब्दांची वाट्टेल ती तोडफोड करताना दिसतात. ह्या लोकांकडून तू मराठी भाषेसाठी काही करण्याची अपेक्षा करते आहेस का ?

At the same time, ब्लॉग हा प्रकारच मुळी वैयक्तिक डायरीची पुढची पायरी आहे. तिथे शक्यतो स्वानुभवच लिहिले जाणार असे मला तरी वाटते. मधुकर भामरागडला लहानाचे मोठे झाले त्यामुळे त्यांच्याकडे अनेक सुरस (शहरी भागात वाढलेल्यांना interesting वाटतील असे) अनुभव आहेत. पण शेवटी ते वैयक्तिक अनुभव. झुलेलाल ह्यांच्या पेशामुळे त्यांच्याकडे असे अनुभव गोळा होतात. तसे प्रत्येकाकडे असतीलच असे नाही. भटकंती करणारे अनेक ब्लॉगर्स नवीन नवीन स्थळांची माहिती देतातच.

आणि तसेही हे लोक काही पूर्ण वेळ लिखाण करत नाहीत. मोठे मोठे साहित्यीक केवळ आपल्या साह्त्य कृती निर्माण करुन गेले, त्यांनी तर इतर भाषांतील साहित्य मराठीत आणण्याचे प्रयत्न केले नाहीत. मग अतिशय मर्यादित/तोकडी प्रतिभा असलेल्या ब्लॉगर्सकडून ती अपेक्षा कशी काय करणार ? हां आता ह्यातुनही तुम्ही क्रीम वेगळे काढणार असाल तर तसे त्या 'capable' ब्लॉगर्सना तसे वेगळे कळवले पाहिजे.

तुझा लेख वाचून जे मनात आले ते लिहिले आहे. बरेच विस्कळीत आहे. थोड्यावेळाने लिहिते अजून.

*** मधुकर आणि झुलेलाल ह्या दोघांचे लेखन मी आवर्जुन वाचते. कृपया गैरसमज नसावा :)

Abhijeet Ranadivé said...

आपले मुद्दे पटले. एका महत्त्वाच्या मुद्द्याला हात घातल्याबद्दल धन्यवाद. विशिष्ट विषयाला वाहिलेला एक ब्लॉग माझ्या परीने मी काही दिवस चालवत आहे. आपली प्रतिक्रिया जाणून घ्यायला आवडेल.
http://drishtiad.blogspot.com/

नागेश देशपांडे said...

नमस्कार,

आपण मराठी ब्लॉगर मेळाव्यात भेटलो होतो.
थोडा उशिर झाला सपंर्क करण्यास मात्र खरंच खुप छान वाटले त्यादिवशी भेटुन.
मी तुमचा ब्लॉगचे नाव लिहुन घेतले होते.
कृपया सपंर्कात राहावे.

नागेश देशपांडे
blogmaajha@gmail.com
blogmajha.blogspot.com

Search This Blog