Sunday, July 24, 2011

For here or to go?







बरेच दिवसांपासून वाचेन म्हणत होते ते शेवटी काल संपवलं वाचून.

इथे लिहितेय म्हणजे पुस्तक खूप महत्वाचं वाटतंय मला असं काही नाही. रादर अजिबातच नाही वाटत म्हणून हा प्रपंच.  तुम्ही स्वतः किंवा जवळपासचं कोणी अमेरिकेत असेल, कधीतरी अमेरिकेत राहून आला असेल तर हे पुस्तक तुमचा इंटरेस्ट टिकवून ठेवेल अन्यथा शक्यता कमी.

लेखिकेने केलेल्या मेहनतीचे कौतुक. ३०-४० वर्षांच्याही बरंच आधी अमेरिकेत स्थलांतर केलेल्यांच्या अजिबात माहित नसलेल्या कहाण्या आणि त्यांची पाय रोवायची धडपड याबद्दल काहीच माहिती नव्हती. ती माहिती खरंच इंटरेस्टिंग आहे. इथे माझ्यादृष्टीने या पुस्तकाचे प्लस पॉइंटस संपले.

पुस्तकात अमेरिकेबद्दल वाईट लिहिले हो म्हणून ज्यांच्याबद्दल रडले गेलेय त्या रमेश मंत्री, सुभाष भेण्डे आणि बाळ सामंत यांचंही काही वाचलं नाही. रमेश मंत्री आणि सुभाष भेण्डे दोघांची अमेरिकेबद्दलची जी पुस्तकं होती त्याची मुखपृष्ठ आवाज-जत्रा टाइपची चावट असल्याचं आठवतंय (हा समजुतीचा घोटाळा असू शकतो) त्यावरून त्या पुस्तकांना हात लावायची गरज वाटली नाही. अमेरिकेतील सर्वांनी ह्या लेखकांना सिरीयसली घेऊन फार दु:ख करून घेतले हे लेखिकेचे म्हणणे थोडे जास्त बढाचढाकेच वाटते.

एकुणात रिपिटेशन प्रचंड आहे. काही अंशी भारतात राह्यलेल्यांना धडा शिकवायला अधोरेखित केलेले मुद्दे असल्यासारखे वाटले.

३०-४० वर्षांपूर्वी अमेरिकेत गेलेल्या पिढीच्या धाडसाबद्दल जे लिहिलेय त्याचे कौतुक आहे निश्चित पण ज्यांच्यात धाडस होते ते अमेरिकेत गेले आणि ज्यांच्यात धाडस नव्हतं ते भारतात राहून नुसतेच टोमणे मारत राह्यले अश्या प्रकारचे ठोकताळे पटले नाहीत. त्या बाबतीत हे पुस्तक प्रचंड एकांगी होते.

काही मुद्दे तर अगदी डोक्यात जाणारे. देशात आल्यावर हक्काने उकडीचे मोदक खायला आत्याकडे जायचं असेल तर आत्याने मुलीसाठी स्थळ बघ म्हणलेलं का खटकावं बुवा? किंवा तिने विकतचे मोदक वाढले तर आत्यापण आता थकलीये आणि काळ बदललाय याची जाणीव न होता हृदय का भळभळावं?
एकुणातच भारतात महिन्याभराच्या सुट्टीसाठी आल्यावर झालेल्या बदलांनी केलेले अपेक्षाभंग फारसे पचनी न पडलेले सगळ्या अनुभवांच्यात लक्षात येतं. पण भारतातल्या आपल्या घरांमधे बदल होणारच यातली अपरिहार्यता का कळत नाही? किंवा का समजून घेता आली नाही? ते बदल म्हणजे जखम असल्यासारखं उराशी का बाळगलं गेलं हा प्रश्न सतत पडत होता. भारतात आल्यावर सतत प्रत्येक गोष्टीला नावं ठेवत आमच्याकडे असं नाहीये असं म्हणण्याबद्दल 'आपल्या लोकांना वाईट वाटू नये म्हणून खरी परिस्थिती लपवली' हे जरा जास्तच उगाच सारवासारव केल्यासारखं होतं. नाहीच पटलं. इथल्यांच्या प्रत्येक कुजक्या शेर्‍याटोमण्यांनी घायाळ होणार्‍यांना आपल्याकडून असे शेरेटोमणे जात नाहीयेत ना याचं भान का उरलं नाही म्हणे?

मात्र यासंदर्भात अमान मोमीनांचा पुस्तकात आलेला दृष्टीकोन एकदम रिफ्रेशिंग आणि जास्त प्रॅक्टिकल वाटला मलातरी.

शेवटाला येताना इकडचे-तिकडचे हा वाद संपवायच्या गोष्टी करत करत लेखिका परत इकडचे-तिकडचेची पाचर मारूनच ठेवते.

एकुणात ठराविक अजेंड्यासाठी 'लिहून घेतलंय' की काय पुस्तक अशी शंका आल्याशिवाय रहात नाही.

ज्यांनी वाचले नसेल त्यांनी नाही वाचले तरी आयुष्यात काही बिघडणार नाही. अर्थात भेळेचा कागदही वाचून काढण्याइतके वाचन अंगी मुरले असेल तर घ्या बापडे...

- नी

Thursday, July 21, 2011

संस्कार १ - येतोच... आलोच...

अतिशय लगबगीने मी घर आवरत होते. आलेल्या माणसाला उगाच नस्ता पसारा दिसायला नको. सगळ्या घरात व्यक्ती फिरणार तर उगाच कुठली बाहेर पडलेली वस्तू दिसायला नको. पटपटा आवरून मग माझं आवरून तयार रहायचं होतं. सगळीकडचं जागच्याजागी करून अगदीच दिसत होती तिथली सगळी धूळ पुसून मी हुश्श केलं. घाईने अंघोळीला पळाले. सांगितल्या वेळेच्या १५ मिनिटं अगोदर माझ्यासकट माझं घर तीटपावडर लावून तयार होतं.
आता सुरू झाली प्रतिक्षा. हॉलमधे बाकी भारतीय बैठक आहे आणि एखादीच खुर्ची. भारतीय बैठकीवर बसले असते तर परत चादर उस्कडली असती. मी खुर्चीवरच बसून रहायचं ठरवलं. सांगितल्या वेळेला अगदी आतूरतेने मी बेल वाजण्याची वाट बघत होते. नाही वाजली. भारतीय प्रमाण वेळेनुसार अजून अर्धा तास शिल्लक होताच म्हणा. पण एव्हाना सगळं आवरण्यात ब्रेकफास्टला फाटा मारल्यामुळे पोटात कावळे कोकलायला लागले होते. आता किचनमधे जाऊन काहीतरी करून घ्यायचं म्हणजे परत पसारा. परत तो आवरा आणि तेवढ्यात बेल वाजली म्हणजे? असा विचार करत मी चुळबुळत खुर्चीवर बसून होते.
खूप वाजून गेले आणि बेल वाजलीच नाही. भुकेने आणि वाट बघण्याने डोकं तडकलंच होतं. पोटातल्या कावळ्यांना न्याय द्यायचं ठरवलं शेवटी. त्या आणि बाकी कामांना लागले. हे असं सलग आठवडाभर चाललं. आता माझा संताप आणि वैताग उतू जाऊन जाऊन संपायला आला होता. फोनवर फोन करणे, संताप व्यक्त करणे याचाही कंटाळा आला होता. पण अडला हरी.... करणार काय.
असेच सीन्स आयुष्यात वारंवार घडत होते. घडतायत. बेल वाजवणारा माणूस वेगळा एवढाच काय तो फरक.
गैरसमज करून घेऊ नका हो एवढी लफडी नाही करत मी. केलीच तर त्या लोकांची एवढी वाट नाही बघणार. मी त्यांची वाट बघावी हे भाग्य ज्यांच्या नशिबी ते म्हणजे विविध फिटिंग्ज करणारे लोक. केबल, गॅस, फोन इत्यादी. दर वेळेला मी घर बदलल्यावर या लोकांच्या नशिबात मी त्यांची वाट बघणं असतं. फोनवर अमुक दिवशी येतो, अर्ध्या तासात येतोच असं सांगून हे कधीच येत नाहीत. आपल्याला कुठलीतरी सर्व्हिस हवीये आणि ती जोडून देऊन हे आपल्यावर डोंगराएवढे उपकार करणारेत हे त्यांचं ठरलेलं असतं. सर्व्हिस चार्ज आणि बक्षिस असं दोन्ही आपल्याकडून उपटूनही उपकारच असतात ते. त्यामुळे त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसणं हे आपलं जिवितकार्यच आहे असं हे लोक समजतात. आपल्याला बाकीची कामे, पोटापाण्याचे व्यवसाय काहीही असत नाहीत (तरीही आपण सर्व्हिस जोडून घेणार असतो आणि बिलंही भरणार असतो ते राहूद्या).

आठवडाभर तंगवल्यावर यांची हृदये द्रवतात. मग अचानक एक दिवस आपलं घर तिटपावडरविरहित असताना, आपण बाहेर निघालो असताना हे उगवतात. ते आल्या वेळेला काम करून घेतलं नाही तर आपलाच गुन्हा असतो. मग आपली अतिप्रचंड महत्वाची मिटींग का असेना. या लोकांच्यापुढे ते झ्याडम्याडच ना हे त्यांचं पक्कं ठरलेलं असतं.
तर असं सध्या चालू आहे माझ्या आयुष्यात. कधी चुकून फोन करून वेळच्या वेळेला एखादा माणूस आलाच तर धक्का बसेल मला.
आपल्याला गरज असते त्यामुळे आपल्याकडे हे झेलण्याशिवाय पर्याय नसतोच पण कधी कधी समोरच्याची गरज असूनही समोरचा असंच वागतो ते मात्र मला आश्चर्याचं वाटतं. नवर्‍याला दहादा फोन करून असिस्ट करायला येऊ पाहणारे स्ट्रग्लर्स, मला असिस्ट करायला इच्छुक असलेले माझेच काही विद्यार्थी, मला या क्षेत्रात काही करायचंय तर मदत कराल का अश्या आर्जवासकट फोन करणारे ओळखीपाळखीचे लोक हे पण जेव्हा भेटायची वेळ ठरवून त्या वेळेला गायब असतात, येत नाहीये/ उशीरा येतोय असं काही कळवण्याची जरूरही समजत नाहीत तेव्हा अश्यांना कोणी का काम द्यावे हा विचार अर्थातच केला जातोच. त्या माणसावर फुली मारली जाते. आणि आपला खलनायक होतो ते वेगळंच.
दिलेली वेळ न पाळणे, येऊ शकत नसू तर कळवायचेही कष्ट न घेणे, कामासाठी फोन न करताच टपकणे ही सगळी वृत्ती नक्की काय दाखवते? समोरच्याचा/ त्याच्या वेळेचा अनादर? की स्वतःच्याच कामाबद्दल अनादर? की अजून काही?
हे संस्कार उत्तम असण्यातलं हे एक कलम नसावं का?
-------------------------
संस्कार हा शब्द इतक्या सहजपणे वापरतो आपण. त्याची नक्की व्याख्या काय करायची? काय काय असतं या संस्कारांच्यात? इत्यादीचा शोध घ्यायचा प्रयत्न. सध्यातरी केवळ माझ्या अनुभवातून.


- नी

Search This Blog