Tuesday, February 19, 2013

संस्कार २ - ऐका ऐका हो शंकरा, बोलाचा अर्थ करा ||

हा लेख मायबोली.कॊम या संकेतस्थळाच्या २०११ च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला आहे.
------------------------------------------------------------------------------------------------
प्रयोगाची तारीख चार दिवसांवर आली होती. तालमी जोरदार चालू होत्या. यावर्षी आमचंच कॉलेज जिंकणार ह्याची खात्रीच होती आम्हाला सगळ्यांना. सॉलिड विषय, तुफान स्क्रिप्ट आणि आमच्या मते एकदम हिट्ट अभिनय करणारं पब्लिक होतं आमच्या ग्रुपात. आऊचा काऊ असा दुवा जोडत एका मोठ्या नाट्यकर्मीला तालमीच्या इथे बोलावलं होतं आमच्या दिग्दर्शकाने. त्या नाट्यकर्मीने तालीम पाह्यली. आता आम्ही प्रशंसेचा आणि कौतुकाचा मारा झेलायला अगदी तयार, असे त्यांच्यासमोर उभे राह्यलो प्रतिक्रियांसाठी. "बरं करताय. पण तुम्ही नटमंडळी ऐकत नाही का रे एकमेकांचं? नुसती वाक्यावर वाक्यं चाललीयेत. आधी ऐका बरोबरचा नट काय बोलतो ते आणि मग तुमचं बोला." त्यांनी कौतुक केले नसल्याने आम्ही त्यांचं ऐकायच्या वगैरे भानगडीत पडलो नाही आणि स्पर्धेत वाजले बारा.

आता आपला अभिनय घासूनपुसून नीट केला पाहिजे तर वर्कशॉप बिर्कशॉप करायला हवं असं वाटायला आणि दुबेजींच्या वर्कशॉपची जाहिरात पेपरात यायला एकच गाठ पडली. अस्मादिक वर्कशॉपमधे रुजू झाले. सगळ्यांना पार ठार इम्प्रेसच करून सोडायचं असा निश्चयच होता माझा. एक दिवस वर्कशॉपमधे काहीतरी एक प्रश्नार्थक वाक्य कानावर पडलं आणि मी तेव्हाच्या पद्धतीप्रमाणे स्मार्ट, चौकस आणि हुशार मुलगी असल्याने उत्तर द्यायला लग्गेच तोंड उघडलं. काही बोलणार त्या अगोदरच कानफडात मारल्यासारखं दुसरं वाक्य आलं. "डोन्ट आन्सर राइट अवे बाई, लर्न टू लिसन फर्स्ट. विचाSSर कर मग उत्तर दे." स्पर्धेच्या जोषात त्या नाट्यकर्मीच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केलं होतं पण इथे दुर्लक्ष करणं काही शक्य नव्हतं. कंपलसरी विचार सुरू झाला की 'हे ऐकण्याचं काये?'

दोन माणसांच्यातला साधा संवाद असतो.
- जेवलास?
- हो
- भूक भागली?
- हो
पहिल्या प्रश्नानंतरच उत्तरादाखल हो येतो. पहिला प्रश्न कानावर पडतो, मेंदूपर्यंत जातो, तिथे त्याचा अर्थ स्पष्ट होतो, मेंदू उत्तर ठरवतो, बोलण्याच्या उर्जेसकट ते उत्तर स्वरयंत्राकडे, तोंडाच्या स्नायूंकडे पाठवतो आणि मगच आपण 'हो' असं उत्तर देतो. ह्या मधल्या प्रक्रियेसाठी अगदी किंचित किंवा खूप जास्त असा काळ जाऊ शकतो. किती काळ जावा ते प्रश्नोत्तरे करणार्‍या दोघांच्या नात्यावर, त्यांच्यात आधी काय घडून गेलंय, सद्य परिस्थिती काय आहे या सगळ्यावर अवलंबून असतं. साध्या 'हो' च्या मागे पुढे बरंच काही असू काही शकतं. मात्र रंगमंचावर होतं काय की आपण सगळे संवाद इतके चोख पाठ केलेले असतात की या कश्शाकश्शाचा विचार न होता धडाधड एकानंतर एक पल्लेदार वाक्यं बोलली जातात. नट आपापली भाषणं पाठ म्हणत असतात आणि दोन व्यक्तिरेखांचं एकमेकांच्यातलं नातं, एकमेकांच्यातला दुवा गायब असतो. रंगमंचावर 'ऐकून बोला' हा विविध लोकांनी केलेला उपदेश कशासाठी हे आता कुठेतरी थोडं थोडं उमगायला लागलं.

पण दुबेजी रंगमंचापुरतं नव्हते सांगत. ते एरवीच ऐकायला सांगत होते. विचारलेला प्रश्न किंवा समोरच्याचं म्हणणं काय आहे? कुठे आहे त्याचा रोख? बोलणारा कशाबद्दल आणि काय बोलतोय नक्की? हे सगळं समजून घेतल्याशिवाय रिअ‍ॅक्ट होऊ नका, उत्तर द्यायची घाई करू नका असं सांगत होते. 'कान आहेत, ऐकू येतंय तर आता वेगळं ऐकायला शिकायची गरज काय?' असा प्रश्न माझ्यातल्या स्मार्ट, चौकस आणि हुशार मुलीला पडलाच. तसंही इतर बाजूंनी म्हणजे 'व्यक्तिमत्व विकास' करून देणारी ४ दिवसांची शिबिरे, विविध आखीव ग्रुप डिस्कशन्स अशा ठिकाणी पटकन उत्तरं देणे, पटकन रिअ‍ॅक्ट होणे हे भयानक हुशारीचं लक्षण मानलं जात होतं. तरीही भरपूर कानपिचक्यांच्यानंतर का होईना 'ऐकल्याशिवाय' लगेच रिअ‍ॅक्ट न होणे, प्रश्न समजून घेऊन मगच उत्तर देणे हळूहळू अंगवळणी पडायला लागले. आणि मग अनेक ठिकाणची संवादांची दारे सहजगत्या उघडायला लागली. 'लर्न टू लिसन!' या मंत्राची महती चांगलीच पटली.

आता हल्ली माझे विद्यार्थी मी शिकवत असताना माझं वाक्य संपूर्णपणे वेगळ्याच दिशेने पुरं करू पहातात तेव्हा मूळचा विषय बाजूला ठेवून 'लर्न टू लिसन!' चा एक वळसा दिल्याशिवाय मला चैन पडत नाही. कामाच्या इथल्या सहकार्‍यांशी चर्चा करताना, मित्रमैत्रिणींशी गप्पा मारताना कुणी एकाचं वाक्य मधेच तोडून आपलं गाडं पुढे घुसवतो तेव्हा मनातल्या मी जोराजोरात 'लर्न टू लिसन!' ओरडत असते.

पहिलं वाक्य बोलत असलेला लिंक तोडली गेल्याने वैतागलेला असतोच. कधीतरी त्याचा फ्यूज उडतो आणि तो चिडचिडू लागतो.
- मला माझा मुद्दा पुरा करू देत, मधे बोलू नकोस
- तू कोण मला सांगणारा
- माझं वाक्य तरी पूर्ण होऊ देत
- काय बोलणार होतास असं अमुक तमुक आणि ढमुक हेच ना.
- नाही माझं म्हणणं वेगळंच होतं.
- होक्का? मग सांग बरं काय ते?
- जाऊ दे मरू देत. आता नाही इंटरेस्ट.
- आता बोलायलो सांगतोय तर ते नाही.
- तू म्हणशील तेव्हाच बोलायचं का मी? कोण समजतोस स्वतःला?
- असं म्हणलंय का मी? उगाच खुसपटं!
- तू च्यायला दर वेळेला माझी मुस्कटदाबी कर आणि वर मलाच म्हणतो खुसपटं बिसपटं.

असं काहीतरी, छोट्या किंवा खूप मोठ्या तीव्रतेचं होतं. दुसर्‍याने आपला मुद्दा ऐकला पाहिजे ही गोष्ट महत्त्वाची होऊन बसते. विषय संपला तरी इगो दुखावलेले असतात. समोरच्याने आपलं वाक्य पण ऐकून घेऊ नये किंवा आपल्याला बोलायलाही नको म्हणावं अशा अपमानाची बोच टिकून रहाते. दुसरा आपल्याला कमी लेखतो असं मानत संवाद संपतो. असं सतत होत गेल्यावर त्या दोघांच्यातलं नातं तडकायला लागत असावं का?

कुठलंही नातं मग ते क्षणिक असो की अनंतकाळचं म्हणलं गेलेलं असो. नातं म्हणलं की संवाद आला. संवाद म्हणजे देवघेव आली. गंमत अशी की अशा नको त्या ठिकाणी आपण सगळे कसले दानशूर बनतो. आपले विचार, भावना, शब्द, वाक्यं सगळं नुसतं देत असतो आपण समोरच्याला आणि इनकमिंगचं विसरतो.

म्हणजे कसं की, 'माझ्या एका मैत्रिणीला इतकं सतत काहीतरी सांगायचं असतं मला. आम्ही गप्पा मारतो तेव्हा माझी उत्तरं तिच्या डोक्यात माझ्याआधी तयार होतात. उत्तरादाखल मी तोंड उघडताच हवे ते ते उत्तर मी योग्य वेळेला दिलंय असं गृहित धरून ती पुढे बोलू लागते. मग मी काय उत्तर दिलं असावं हे मी तिच्या पुढच्या वाक्यावरून समजून घेते.'
'एक मित्र आम्ही सगळे गप्पा मारत असताना मी कुठल्याही विषयाबद्दल बोलत असले तरी ते वाक्य मधेच तोडून तिसराच विषय सुरू करतो.'
'नवरा मी काय सांगतेय ते न ऐकता नुसतं हो हो म्हणत जातो. आणि मग ऐन वेळेला जे करायला नको होतं नेमकं तेच्च करतो.'
'बायको मी जे बोलतो त्याच्या बरोबर उलट्या अर्थाचं ऐकते आणि वैतागते.'
'बॉसला माझं कुठलं म्हणणं ऐकूच जात नसावं बहुतेक. कायम दुर्लक्ष माझ्या प्रॉब्लेम्सकडे.'
'ऑफिसप्यूनला कुठल्याही वाक्यातला अर्जंट हा शब्द ऐकू येत नाही.'
आणि मग शेवटी . . . द ऑलटाइम क्लासिक!
'मला कुणी समजूनच घेत नाही.'
सगळी उदाहरणं निव्वळ न 'ऐकण्याची'.

सतत दुसर्‍याला काहीतरी सांगायची, दुसर्‍यापर्यंत काहीतरी पोचवायची लसलस आणि दुसर्‍यानं ते ऐकावं, दुसर्‍याला ते समजावं अशी अपरंपार इच्छा प्रत्येकाच्यातच असते. या इच्छांना शरण जाता जाता आपण आपलं सांगण्याचं कौशल्य घासूनपुसून लख्ख करायला बघतो, ऐकण्याचं राहूनच जातं. मग हळूहळू संवाद संपतो, मग विसंवाद पण संपतो आणि दोन माणसं अनोळखी बनून जातात. नातं कुठल्याकुठे गायब, ओरखडे मात्र चिरस्थायी.

हे काय भलं नाही राजे!
मग वो?
मग एवढंच . . .

"लख्ख झळझळीत नात्यासाठी हवा उत्तम संवाद
उत्तम मोकळ्या संवादासाठी
बोलण्याइतकेच महत्वाचे . . .
आज आत्ता या क्षणापासून आजमावून बघण्याजोगे . . .
ऐकणे ऐकणे एकदम चोख ऐकणे!"
--- डिंग डाँग ---
आजकी ये प्रसारण सेवा यहीं समाप्त होती है|

- नीरजा पटवर्धन


संस्कार १ - येतोच... आलोच... - http://aatalyaasahitmaanoos.blogspot.in/2011/07/blog-post.html

Search This Blog