Showing posts with label पुस्तकांविषयी. Show all posts
Showing posts with label पुस्तकांविषयी. Show all posts

Wednesday, February 28, 2018

गौरी आणि मी!



व्हॅलेन्टाइन निमित्त लिहिलेले काही 
वाचण्यात आलेल्या प्रेमाच्या गोष्टींमधे जिच्या गोष्टी जास्त खर्‍याजास्त हाडामासाच्या आणि हे असे प्रेम जास्त शक्य आहे अश्या वाटल्या   तिच्याबद्दल थोडेसे... 
माझ्या टीनएज काळात आजूबाजूला अनेक ठरीव आणि कंटाळवाण्या गोष्टी होत्यामुली स्वप्नांचे पतंग उडवू लागल्या तर ‘सासरी चालणार का पण?’ असला भिकारडा प्रश्न विचारून त्या स्वप्नांची वाट लावणे हे आपले परम कर्तव्य आहे असे अनेकांना वाटत असेजे काय थोडेफार वाचन वगैरे करणारे लोक होते त्यांची झेप वपु काळे  तत्सम यापलीकडे जात नसेहसरा समाधानी चेहराकामाला वाघपाहुण्यारावळ्यांना अर्ध्या  रात्रीही चारी ठाव स्वंयपाक करून वाढेल अशी अधिक शयनेषु रंभा अशी एक स्त्री प्रतिमा आदर्श म्हणून प्रोजेक्ट केली जात असेस्त्री वा पुरुष साहित्यिकांच्या लिखाणात प्रकर्षाने हेच दिसत असेसिनेमांच्याबद्दल तर सांगण्यातही अर्थ नाही
पण अश्या घट्ट कंटाळवाण्या माहौलमध्ये माझे घर जरा वेगळे होतेस्त्रीमिळून सार्‍याजणीगौरी देशपांडेआहे मनोहर तरी अश्या  खिडक्यांच्यातून आलेल्या वेगळ्या वार्‍यांचे माझ्या घरी स्वागत होतेआजूबाजूच्या वातावरणातून दिसणार्‍या आयुष्याबद्दलच्यास्त्री-पुरूष नात्याबद्दलच्या ज्या टिपिकल शक्यता समोर होत्या त्यांच्यापलीकडे अनेक शक्यता आहेत जगण्याच्या हे भान येण्यासाठी गौरी  देशपांड्यांच्या लिखाणाचा मला उपयोग झालाआजूबाजूचे वातावरण ज्या बावळट चौकटी घट्ट ठोकून बसवू पाहात होते ते नाकारले तरी बाई ही बाई असतेच आणि खरी  चांगलीही असू शकते हे तिने सांगितले मलायासाठी ती मला महत्वाची आहेआवडते हे म्हणायला लाज नाही वाटत मलामाझ्या अनेक मैत्रिणींना लग्नाचे रूखवतहरतालिकेची पूजा एकत्र करणे ही लाडकी अॅक्टिव्हिटी वाटत असेमला त्यावर आलेलाकंटाळा हे माझ्या वाया गेलेपणाचे प्रतिक होतेजीन्स घातल्यावर कपाळाला टिकली नाही म्हणून टिकलीचे पाकीट विकत घेऊन देऊन "आपण हिंदू आहोत.." वगैरे लेक्चर झोडणारे आचार्य लोक माझ्या मित्रमंडळात होतेमाझ्या शाळेतल्या अनेक शिक्षिकांना आजही आमच्या शाळेच्या मुली घराला पहिलं महत्व देतात याचं कौतुक आहे.
या सगळ्यात माझी टिनेजकॉलेजची वर्षे तिच्या लिखाणाचा मला आधार मिळालापरंपरासंस्कृती वगैरेचे फास मी स्वतःला बसू दिले नाहीत ते तिच्यामुळेती परीपूर्ण लेखिका वगैरे आहे किंवा नाही हा मुद्दाच नाहीआज तिचे वाचल्यावर ती मला तशीच आवडेलपचेलपटेल का हे माहिती नाहीती महत्वाची लेखिका होती हे नक्की
तिच्या साहित्यिक महत्वाला छाटून कमी करण्यासाठी कीबोर्ड सरसावून अनेकांनी बरीच विधाने नुकतीच केली होती फेबुवरअमिताभ बच्चन ला मिळालेली प्रसिद्धी आणि गौरीला मिळालेले फॉलोइंग एकाच प्रतीचेगौरीच्या व्यक्तिमत्वामुळे तिचा साहित्यिक बोलबाला झाला असले   काहीही तर्क वाचलेहे तर्क करणारे सगळे पुरुष आहेत ही एक वेगळी गंमतहाडामासाची नायिका विथ ऑल हर फॉलीज आणि पुरुषी इगोला फारशी भीक  घालणारी हे अजूनही किती जणांना दुखते आहे हे बघून मजा वाटली

नी

Monday, October 17, 2011

सृजनाचे साक्षात्कार; दृश्य कथा कार्यशाळेतील कलाकार स्त्रियांची संपादित मनोगतं

पुस्तकाचे नाव - सृजनाचे साक्षात्कार; दृश्य कथा कार्यशाळेतील कलाकार स्त्रियांची संपादित मनोगतं
मूळ लेखन - सी. एस. लक्ष्मी
अनुवाद - उर्मिला भिर्डीकर, उज्ज्वला मेहेंदळे
संपादन - अंजली मुळे
प्रकाशक - स्पॅरो SPARROW
प्रथम आवृत्ती - ऒगस्ट २०००
--------------
मुखपृष्ठावर इंटरेस्टिंग चित्र, स्पॅरोचा संदर्भ आणि पुस्तकाचं नाव यांच्यामुळे हे पुस्तक फारसा विचार न करता विकत घेतले. पुस्तकाचं नाव फारच गोंधळात पाडणारं आहे. दृश्य कथा कार्यशाळेतील कलाकार स्त्रियांची मनोगतं याचा अर्थ मला जो समजला त्याच्या तर मी मोहातच पडले होते. दृश्य कथा म्हणजे एखादा पूर्ण किंवा छोट्या लांबीचा चित्रपट मग तो माहितीपट असेल अथवा फिक्शन. स्पॅरोतर्फे अशी एखादी फिल्ममेकिंगची कार्यशाळा आयोजित करण्यात आली असावी आणि त्या कार्यशाळेत सहभागी असलेल्यांनी आपापल्या ज्या फिल्म्स बनवल्या त्या संदर्भातल्या अनुभवांवर आधारित हे पुस्तक असावं असा माझा समज झाला.
हा समज अर्थातच चुकीचा होता हे पुस्तक वाचायला घेतल्यावर हळूहळू लक्षात यायला लागलं. दृश्य कथा कार्यशाळा हा स्पॅरोचा एक महत्वाचा उपक्रम आहे. स्त्री-कलाकाराला कलेच्या जगात काम करताना कलाकाराचं स्त्रीपण खूप महत्वाची भूमिका बजावत असतं. या स्त्री कलाकारांकडून त्यांची अभिव्यक्ती, त्यासाठी त्यांनी शोधलेला/ मिळवलेला अवकाश, त्यांचे अनुभव याची ओळख या कार्यशाळेतून करून दिली जाते. या स्त्री कलाकारांना कार्यशाळेत बोलावून त्यांची मुलाखत घेतली जातेच. त्याचबरोबर कलाकाराच्या घरी, कामाच्या ठिकाणीही स्पॅरो सदस्य भेट देतात आणि कलाकाराचं स्त्री म्हणून जगणं, काम करणं समजून घेतात. हे सगळं ध्वनिचित्रमुद्रित केलं जातं. आणि मग त्यातून हे असं पुस्तक निर्माण होतं. साधारण १९९६-१९९७ दरम्यान घडलेल्या या कार्यशाळांमधे विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि संशोधक सहभागी होते. या पुस्तकामधे एकुणात सहा कलाकार स्त्रियांच्या कारकिर्दीचा लेखाजोखा आहे. मुलाखती आणि कलाकारांशी त्यांच्या त्यांच्या अवकाशात भेट, त्यांना बोलतं करणं हे वेगवेगळ्या व्यक्तींनी केलं आहे. आणि त्याचे या पुस्तकामधे शब्दांकन सी. एस लक्ष्मी यांनी केले आहे.
पहिल्या आहेत जुन्या जमान्यातील चित्रपटांतील नटी व निर्माती प्रमिला उर्फ एस्थर व्हिक्टोरिया अब्राहम. यांची मुलाखत स्वत: सी एस लक्ष्मी यांनीच घेतलेली आहे. १९९७ साली ८१ वर्षांचे वय असताना प्रमिला यांनी या कार्यशाळेसाठी मुलाखत दिलेली आहे. १९३५ ते १९६१ अशी अभिनयाची कारकीर्द आणि १९४२ ते १९६० अशी निर्माती म्हणून कारकीर्द असा प्रमिला यांचा आलेख आहे. इतक्या जुन्या काळात चित्रपट निर्माती स्त्री हे माझ्यासाठी फारच कुतूहलाचे होते. परंतू पाण्यात पडल्यावर पोहणे पेक्षा 'मी बिचारी बाई कशी पोहणार तरले कशीबशी' असाच अप्रोच जास्त जाणवला. संपूर्ण मुलाखतीचा सूर ’गाऊ तयांची आरती’ टाइप आहे. त्यातून प्रमिला यांच्या आयुष्याचा घटना-घटना-घटना असा आलेख मिळतो पण स्त्री म्हणून चित्रपटसृष्टीशी त्यांचे नाते, मर्यादा, अनुभव याबद्दल फार थोडे मिळते. आणि हा आलेख बघता प्रमिला यांचं कर्तुत्व, धडाडी यामधे बरंच काही ऐकण्यासारखं, शिकण्यासारखं असणार जे मुलाखतकाराला पकडता आले नाहीये हे सतत वाटत रहाते.
दुसर्‍या स्त्री कलाकार एक पारंपारीक व व्यक्तिचित्र शिल्पकार आहेत. त्यांचं नाव कनका मूर्ती. यांची मुलाखत लेखिका शशी देशपांडे यांनी घेतलीये. १९४२ साली म्हैसूरजवळच्या एका छोट्या गावात, अत्यंत पारंपारीक व कर्मठ वातावरणात जन्म घेतलेल्या कनका यांना आईने वडलांच्या मिनतवार्‍या करून पदवीपर्यंत शिकवणे आणि नंतर कनकांनी पारंपारिक शिल्पकलेच्या क्षेत्रातच काम करण्याचे ठरवणे यापासून ते त्यात त्यांनी यशस्वी होणे इथपर्यंत हा सगळा प्रवास अतिशयच प्रेरणादायी आणि अभ्यासण्यासारखा. विश्वकर्मा समाजातल्या स्त्रीने प्रख्यात शिल्पकार बनणे यासारखी सर्वच बाबतीत विरोधाभासाने पुरेपूर भरलेली घटना सत्यात उतरताना कनका यांना बरीच मानहानी, अविश्वास, कमीपणा सहन करावा लागला असणारच पण त्याबद्दल त्यांच्या पूर्ण मुलाखतीत कुठेही कडवटपणाचा अंश जाणवत नाही. त्या आपल्या कलेविषयी बोलताना कुठेच मी मी प्रकार नसतो. त्या पूर्णपणे कला आणि कलाकृती घडत जातानाची प्रक्रिया याबद्दल बोलतात. ही मुलाखत मला फारच आवडली.
तिसर्‍या स्त्री कलाकार आहेत नृत्यांगना दमयंती जोशी. ही मुलाखत नीला भागवत यांनी घेतलेली आहे. अतिशय गरिबीत मुंबईतल्या एका ब्राह्मण कुटुंबात जन्माला आलेल्या दमयंती जोशी यांना वयाच्या चौथ्या वर्षी मादाम मेनका या नृत्यांगनेने आपली वारसदार म्हणून पंखाखाली घेतले. ही सगळी घटना प्रचंड रोचक आहे. ती मुळातून वाचायला हवी. दमयंती जोशींबद्दल लिहिताना मादाम मेनका यांच्या मादाम मेनका बनण्याच्या प्रवासाबद्दल पण या मुलाखतीत आले आहे. तेही तितकेच वाचनीय आहे. आणि हे सगळे १९३०च्या दशकाच्या उत्तरार्धात मुंबईत घडत होते ह्या पार्श्वभूमीवर अजूनच जास्त महत्वाचे आहे. मादाम मेनका या पारंपारिकरित्या नृत्याच्या घराण्यातून आलेल्या नव्हत्या पण कथ्थक शिकलेल्या होत्या आणि मणिपुरी, कुचिपुडी अश्याही अनेक शैलींचाही त्यांनी अभ्यास केला होता. अनेक शैलींना आपल्या बॅलेमधे एकत्र करण्याचे प्रयोग मेनकाबाईंनी केले. त्याचे संस्कार घेऊन दमयंतीबाईंनीही पुढे बरेच महत्वाचे यशस्वी प्रयोग केले. या सगळ्यात त्यांना पूर्णपणे साथ देणारी त्यांची आई वत्सलाबाई जोशी यांचेही योगदान प्रचंड महत्वाचे आहेच. २० पानी मुलाखतीमधे हा सगळा आलेख थोडा कोंबल्यासारखा वाटतो. तसेच बरेच संदर्भ सतत मागे पुढे मागे पुढे होत रहातात त्यामुळे गोंधळ उडू शकतो पण त्याला पर्याय नाही. नृत्याबद्दल आस्था असणार्‍यांसाठी दमयंतींचा प्रवास समजून घेणे हे फार महत्वाचे ठरावे.
चौथ्या स्त्री कलाकार आहेत आपल्या सगळ्यांनाच माहित असलेल्या सुषमा देशपांडे. बारामतीमधे गेलेलं बालपण, मग पुण्यात कॉलेज, नाटक, पत्रकारितेचं शिक्षण आणि पत्रकारिता करताना स्वत:चा म्हणून गवसलेला नाट्यपत्रकारितेचा रस्ता (व्हय मी सावित्रीबाई, तिच्या आईची गोष्ट हे प्रयोग) हे सगळं फार छान मांडलेलं आहे. ’व्हय मी सावित्रीबाई’ या प्रयोगाची संपूर्ण संहिताही यामुलाखतीसोबत आहे.
पाचव्या स्त्री कलाकार आहेत नाटक जगणार्‍या समकालीन नाट्यकर्मी माया. यांची मुलाखत/ माहिती जे काय म्हणाल ते प्रत्यक्ष त्यांच्या शब्दात एका मोनोलॉगसदृश चिंतनात आहे. आजूबाजूची स्पेस, वस्तू चाचपडत, शोधत, नव्याने शोधून काढत या मोनोलॉगचा प्रवास सुरू होतो तो शेक्सपिअर, कथकलीची तत्वे, मॉडर्न स्कूलमधलं शिक्षण, विविध प्रयोग, शरीर नटाचं साधन, श्वासावरची पकड अश्या अनेक स्टेशनातून जातो. नाटक डसतं म्हणजे कसं नक्की ते समजून घ्यायला हे नक्कीच वाचलं पाहिजे. भारतीय समकालीन नाट्यविचार समजून घेण्यासाठीही या मोनोलॉगचा प्रचंड उपयोग आहे आणि आमच्यासारख्या चिरकुट नाटकवाल्यांसाठी बरीच मोठी प्रेरणा.
सहाव्या स्त्री कलाकार आहेत चित्रकार समाजातील नसूनही म्हैसूर शैलीतली चित्रकारी आपला व्यवसाय म्हणून निवडलेल्या नीला. परंपरेनुसार ही कला स्त्रियांसाठी नसते. चित्रकार समाजातसुद्धा घरातल्या मुली-सुनांना ही कला शिकवली जात नाही किंबहुना त्यांच्यापासून ती गुप्तच राखली जाते(हे भारतातल्या बहुसंख्य हस्तकलांच्या बाबतीत बघायला मिळते). अश्या वातावरणात या शैलीला व्यवसाय म्हणून निवडण्याची इच्छा, हिंमत आणि चिकाटी दाखवणार्‍या नीला यांच्याबद्दलची माहिती या लेखात आहे पण माफक प्रमाणात. या माहितीबरोबरच ’अकाली गेलेली नणंदच पोटी जन्माला आली’ यासारख्या बिनमहत्वाच्या गोष्टी पण आहेत. परंतू भारतातील पारंपरिक चित्रशैली, रंग बनवण्याच्या पद्धती, या चित्रशैलींमधला विचार, वापरल्या जाणार्‍या वस्तूंबद्दल टिप्पण्या, म्हैसूर चित्रशैलीचे तपशील अश्या विविध गोष्टींसंबंधी असलेल्या संदर्भचौकटी कलाअभ्यासकांसाठी उपयोगी ठराव्यात.
स्पॅरोच्या पुढच्या उद्दिष्टांबद्दल सुतोवाच करून हे पुस्तक संपतं. कलाकार स्त्री म्हणून या सगळ्यांना जे अनुभव आलेत त्यातून मी काही गोष्टी शिकतेच पण मुलाखत, मुलाखतीचे शब्दांकन यासंदर्भातही काही करावे ते/ करू नये ते (dos & don'ts) मी शिकते.
- नीरजा पटवर्धन

Sunday, July 24, 2011

For here or to go?







बरेच दिवसांपासून वाचेन म्हणत होते ते शेवटी काल संपवलं वाचून.

इथे लिहितेय म्हणजे पुस्तक खूप महत्वाचं वाटतंय मला असं काही नाही. रादर अजिबातच नाही वाटत म्हणून हा प्रपंच.  तुम्ही स्वतः किंवा जवळपासचं कोणी अमेरिकेत असेल, कधीतरी अमेरिकेत राहून आला असेल तर हे पुस्तक तुमचा इंटरेस्ट टिकवून ठेवेल अन्यथा शक्यता कमी.

लेखिकेने केलेल्या मेहनतीचे कौतुक. ३०-४० वर्षांच्याही बरंच आधी अमेरिकेत स्थलांतर केलेल्यांच्या अजिबात माहित नसलेल्या कहाण्या आणि त्यांची पाय रोवायची धडपड याबद्दल काहीच माहिती नव्हती. ती माहिती खरंच इंटरेस्टिंग आहे. इथे माझ्यादृष्टीने या पुस्तकाचे प्लस पॉइंटस संपले.

पुस्तकात अमेरिकेबद्दल वाईट लिहिले हो म्हणून ज्यांच्याबद्दल रडले गेलेय त्या रमेश मंत्री, सुभाष भेण्डे आणि बाळ सामंत यांचंही काही वाचलं नाही. रमेश मंत्री आणि सुभाष भेण्डे दोघांची अमेरिकेबद्दलची जी पुस्तकं होती त्याची मुखपृष्ठ आवाज-जत्रा टाइपची चावट असल्याचं आठवतंय (हा समजुतीचा घोटाळा असू शकतो) त्यावरून त्या पुस्तकांना हात लावायची गरज वाटली नाही. अमेरिकेतील सर्वांनी ह्या लेखकांना सिरीयसली घेऊन फार दु:ख करून घेतले हे लेखिकेचे म्हणणे थोडे जास्त बढाचढाकेच वाटते.

एकुणात रिपिटेशन प्रचंड आहे. काही अंशी भारतात राह्यलेल्यांना धडा शिकवायला अधोरेखित केलेले मुद्दे असल्यासारखे वाटले.

३०-४० वर्षांपूर्वी अमेरिकेत गेलेल्या पिढीच्या धाडसाबद्दल जे लिहिलेय त्याचे कौतुक आहे निश्चित पण ज्यांच्यात धाडस होते ते अमेरिकेत गेले आणि ज्यांच्यात धाडस नव्हतं ते भारतात राहून नुसतेच टोमणे मारत राह्यले अश्या प्रकारचे ठोकताळे पटले नाहीत. त्या बाबतीत हे पुस्तक प्रचंड एकांगी होते.

काही मुद्दे तर अगदी डोक्यात जाणारे. देशात आल्यावर हक्काने उकडीचे मोदक खायला आत्याकडे जायचं असेल तर आत्याने मुलीसाठी स्थळ बघ म्हणलेलं का खटकावं बुवा? किंवा तिने विकतचे मोदक वाढले तर आत्यापण आता थकलीये आणि काळ बदललाय याची जाणीव न होता हृदय का भळभळावं?
एकुणातच भारतात महिन्याभराच्या सुट्टीसाठी आल्यावर झालेल्या बदलांनी केलेले अपेक्षाभंग फारसे पचनी न पडलेले सगळ्या अनुभवांच्यात लक्षात येतं. पण भारतातल्या आपल्या घरांमधे बदल होणारच यातली अपरिहार्यता का कळत नाही? किंवा का समजून घेता आली नाही? ते बदल म्हणजे जखम असल्यासारखं उराशी का बाळगलं गेलं हा प्रश्न सतत पडत होता. भारतात आल्यावर सतत प्रत्येक गोष्टीला नावं ठेवत आमच्याकडे असं नाहीये असं म्हणण्याबद्दल 'आपल्या लोकांना वाईट वाटू नये म्हणून खरी परिस्थिती लपवली' हे जरा जास्तच उगाच सारवासारव केल्यासारखं होतं. नाहीच पटलं. इथल्यांच्या प्रत्येक कुजक्या शेर्‍याटोमण्यांनी घायाळ होणार्‍यांना आपल्याकडून असे शेरेटोमणे जात नाहीयेत ना याचं भान का उरलं नाही म्हणे?

मात्र यासंदर्भात अमान मोमीनांचा पुस्तकात आलेला दृष्टीकोन एकदम रिफ्रेशिंग आणि जास्त प्रॅक्टिकल वाटला मलातरी.

शेवटाला येताना इकडचे-तिकडचे हा वाद संपवायच्या गोष्टी करत करत लेखिका परत इकडचे-तिकडचेची पाचर मारूनच ठेवते.

एकुणात ठराविक अजेंड्यासाठी 'लिहून घेतलंय' की काय पुस्तक अशी शंका आल्याशिवाय रहात नाही.

ज्यांनी वाचले नसेल त्यांनी नाही वाचले तरी आयुष्यात काही बिघडणार नाही. अर्थात भेळेचा कागदही वाचून काढण्याइतके वाचन अंगी मुरले असेल तर घ्या बापडे...

- नी

Search This Blog