Saturday, May 23, 2020

कापडाचोपडाच्या गोष्टी - ५. आपलं काय काय म्हणायचं?

“ती हिंदी सिनेमातल्या दुखियारी माँ सारखे कपडे घातलेली रोमन बाई कोण गं ठकू? तिने साडीचा शोध लावलाय. हो ना?” गुगल संशोधकांनी ठकूला विचारले. “साडी म्हणजे काय वीज आहे का शोध लावायला?” ठकूने नाक उडवले.

प्राचीन रोमन काळातली दुखियारी माँ अंगावर घातलेल्या झग्यावरून आडवातिडवा लांबरुंद ‘पल्ला’ लपेटून घ्यायची. रोमन लोक इथे आले तेव्हा इथे अंगभर एकच कापड लपेटण्यापेक्षा कमरेशी बांधलेले अंतरीय आणि ओढणीसारखे वरच्या शरीरावर लपेटलेले उत्तरीय ही पद्धत होती. यामुळे काहींचं म्हणणं आहे की एकच कापड कमरेवर आणि मग ते तसेच शरीराच्या वरच्या भागावर घेणे हा प्रकार म्हणजेच साडी आपण रोमनांकडून शिकली असावी असे काही अभ्यासकांचे म्हणणे आहे.

01 Roman Dukhiyari maa.jpg

माणसे प्रवास करतात, स्थलांतर करतात, नवीन प्रदेश पादाक्रांत करतात. आपल्या जगण्याच्या पद्धती या नवीन ठिकाणी घेऊन जातात आणि नवीन ठिकाणच्या पद्धती आत्मसात करतात. नवीन प्रदेश पाहून, तिथल्या नवीन आणि मजेमजेच्या गोष्टी प्रवासी लोक आपल्या बरोबर घेऊन येतात. नवीन आलेल्या पद्धती आणि स्थानिक पद्धतींचा मिलाप होतो. आणि संस्कृतीची कथा नवे वळण घेते. यामधे अर्थातच कपड्यांची गोष्टही आलीच.

भारतामधे वसण्यासाठी, जीव वाचवण्यासाठी, प्रवासासाठी, व्यापारासाठी, लुटण्यासाठी, सत्ता प्रस्थापित करण्यासाठी वेगवेगळ्या काळात वेगवेगळे लोक आले. त्यातले काही आले आणि परत गेले तर काही आले आणि इथलेच झाले. त्या प्रत्येकाने आपल्याबरोबर आपल्या गोष्टी आणल्या.

चिनमधून रेशीम आले आणि मग इथलेच झाले. आज भारताच्या वेशभूषेची गोष्ट रेशमी वस्त्रांशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. इसपू ५०० - ३३० दरम्यान आताचा इराण ते पंजाब पसरलेल्या अकिमेनिड साम्राज्याशी झालेल्या देवाणघेवाणीतून इथे शिवणकला येऊन वसली. कुशाण काळात त्याच्या साम्राज्यात दरबारातली, योद्ध्यांची वेशभूषा शिवलेली आणि घरगुती व स्त्रियांचे कपडे गुंडाळलेले अशी विभागणीही झाली.

मुघल साम्राज्याबरोबर सलवार व कुर्ता असे शिवलेले कपडे सर्वसामान्य स्त्रीपुरूषांसाठीही आले. सुरुवातीला केवळ मुस्लिम समाजापुरती असलेली ही वेशभूषा आता सर्व धर्माच्या भारतीय स्त्रियांचा गणवेष होऊन बसली आहे. पडदा, घुंघट, गोषा वगैरे पद्धती मुघलांबरोबर आल्या. ओढणीने किंवा पदराने डोके झाकणे आणि त्याला लागून येणारे सगळे रितीरिवाज मुघलांबरोबर भारतात आले. जिथे मुघलांना अडवले गेले, जिथपर्यंत मुघल साम्राज्य पोचू शकले नाही अश्या दक्षिण भारतात मुस्लिम समाज वगळता डोक्यावरून पदर/ ओढणी घेण्याच्या पद्धती अस्तित्वात नाहीत. डोक्यावरून पदर घेण्याला काही महत्व नाही. जिथे जिथे मुघल साम्राज्य पोचले तिथे तिथे आमिर उमराव घरातल्या स्त्रियांच्या वरच्या कपड्यांमध्ये चोळी आणि कुडता किंवा चोळी आणि अंगरखा असे दोन घटक अस्तित्वात आले. आणि अर्थातच त्यावरून एक मोठा दुपट्टा किंवा पदर.

भारतात सिंधु संस्कृतीपासून मेंढीपासून लोकर मिळवून त्याचे कापड बनवल्याचे पुरावे आहेत. ती पद्धत भारतात हिमालयाच्या कुशीत अस्तित्वात होतीच. पण मुघल काळामधे भारतीय पश्मिना मेंढ्यांपासून मिळवलेल्या लोकरीच्या शालींना एक उद्योग म्हणून मान्यता मिळाली. त्या मेंढ्यांना आणि शालींना पश्मिना हे नावही याच काळात मिळाले. एखाद्याचा सन्मान म्हणून, राजकन्येला लग्नातली भेट म्हणून अस्सल म्हणजे रेशमाचे धागे न मिसळलेली पश्मिना शाल देण्याचा पायंडा या काळात पडला. आज हिच पश्मिना शाल भारतीय वारश्यामधे महत्वाचे स्थान मिळवून आहे.

आधी मुघलांनी आणि मग ब्रिटीशांनी शरीर अति झाकण्याचे स्तोम आयात केले हे आपण गेल्या वेळेला बघितलेच. ब्रिटीशांच्या बरोबरीचे समजले जावे यासाठी अनेक ठिकाणच्या अमिर उमरावांनी आपल्या राहणीमधे घरांमधे बदल केले. काही प्रदेशातील तत्कालिन उच्चवर्गीय विवाहित स्त्रिया चोळीशिवायच साडी नेसत पण ब्रिटिशांच्या सभ्यतेच्या कल्पनांबरोबरच त्यांनी तेव्हाच्या युरोपियन गाऊन्समधले बॉडिसचे डिझाइन आपलेसे केले. बाह्यांना पांढरी लेस लावलेले ब्लाऊज घातलेली बंगाली स्त्री हे याचेच एक उदाहरण. महाराष्ट्रात व दक्षिण भारतात तत्कालिन उच्चवर्गात चोळी वापरली जात असे. या चोळ्यांची शिवण्याची पद्धत मात्र वैशिष्ट्यपूर्ण होती. कापडाला चोळीचा आकार येण्यासाठी ठराविक प्रकारे तुकडे करून ते जोडले जात आणि मग स्तनांखाली गाठ मारून ही चोळी अंगावर घट्ट बसवली जाई. मात्र या चोळीच्या बाह्या दंडाला घट्टे पडतील इतक्या अंगाबरोबर नसत. चोळीच्या गाठीपासून कमरेशी साडी नेसली जाई तिथवरचा भाग उघडाच असे. हे अर्थातच ब्रिटिशांच्या दृष्टीने असभ्य होते. तत्कालिन उच्चवर्गीय तसेच सुधारक लोकांच्या घरातील स्त्रियांनी या चोळ्या टाकून देऊन किंवा चोळ्यांच्या वरून व्हिक्टोरियन काळचे बॉडिस असावे असे वस्त्र घालून त्यावरून् साडी नेसायला सुरूवात केली. पुण्यातल्या हुजूरपागेत शिक्षण घेणाऱ्या सुरुवातीच्या काळातल्या विद्यार्थिनी आणि शिक्षिकाही या प्रकारचे ब्लाऊज घालत असत. कालांतराने बॉडिसचा मुख्य भाग आणि चोळ्यांच्या बाह्या एकत्र होऊन आपल्याला माहिती असलेले साडीवरचे ब्लाऊज जन्माला आले. हे ब्लाऊज पार कमरेपर्यंत लांब नव्हते आणि चोळीच्या इतके आखूड नव्हते. या ब्लाऊजमधे कापडाला आकार देण्यासाठी विशिष्ठ प्रकारे तीन बाजूंनी तीन चुण्या घातल्या जातात. या चुण्यांना डार्टस किंवा टक्स म्हणले जाते. ही डार्टस घालून कापडाला आकार देण्याची शिवणाची पद्धत मूळ युरोपियन आहे. हीच युरोपियन पद्धत कुडत्यांमध्येही आलेली दिसते. कुडते हे प्रकरण मुळात कुशाणांच्या बरोबर भारतात आले. तेंव्हाची कुडते शिवायची पद्धत अशीच विशिष्ट प्रकारे तुकडे कापून कापडाला आकार देण्याची होती. या पद्धतीत कपडे अगदी घट्ट अंगाबरोबर बसत नाहीत. तसेच शिवलेले कपडे असले तरी त्याला बंद असतात. त्यांच्या गाठी मारल्यावर हे कपडे अंगावर बसतात. डार्ट घालून शिवायच्या कुडत्यामध्ये कपडा अंगाबरोबर जास्त बसतो.
03 gath bandhaleli choli.jpg
03 gathichi choli.jpg
02 bodicesaree bene israeli women.jpg
02 BodiceSaree sinhalese woman 1.jpg
ब्रिटीशांच्या सभ्यतेच्या कल्पनांचा प्रभाव पुरुषांच्या कपड्यांवरही पडला. हॅट, बूटमोजे, कोट वगैरे गोष्टी घालणारा तो जंटलमन या एकोणिसाव्या शतकाच्या मध्यातल्या ब्रिटिश कल्पना भारतीय पुरुषांच्यातही एकोणिसाव्या शतकाच्या शेवटाशी येताना स्वीकारल्या गेल्या. मुघल काळातल्या राजेशाही आणि घोळदार शेरवानीचे रूपांतर झाले. रोमँटिक कालखंडातल्या फ्रॉक कोटाची आकृती, गडद रंग हे शेरवानीचे महत्वाचे विशेष बनले. तसेच शेरवानी हे केवळ राजघराण्यातल्या लोकांचे वस्त्र म्हणून राह्यले नाही. ब्रिटीश सरकारच्या नोकरीत वरच्या हुद्द्यावर असलेले किंवा वकिली करणारे किंवा समाजात वरचे स्थान असणारे किंवा श्रीमंत व्यापारी लोक अश्या सर्वांनीच शेरवानीला आपले म्हणले. उत्तर भारतात सुरू झालेले हे प्रकरण जिथे जिथे ब्रिटीश सत्तेची केंद्रे होती तिथे तिथे पसरले आणि स्थिरावले सुद्धा. विसाव्या शतकामध्ये पहिल्या महायुद्धानंतर ब्रिटिश नोकऱ्या करणारे मध्यमवर्गीय नोकरदार, शिक्षक धोतर, सदरा आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या पद्धतीचा कोट, खाली बूटमोजे अश्याही वेशात दिसत. हा वेश ब्रिटीश लोक निघून गेल्यावरही ६०-७० च्या दशकापर्यंत टिकून राह्यला. विसाव्या ब्रिटिश सत्तेच्या शेवटच्या काळामध्ये भारतात पुरुषांच्या वेषामध्ये धोतराचा वा सलवारीचा वा मुंडूचा वापर कमी होत गेला. त्या जागी पाश्चात्य पँट आली. घरामध्ये, गोतावळ्यात धोतर किंवा सलवारीसारखे पारंपरिक प्रकरण तर कामाच्या ठिकाणी पॅन्ट अश्या प्रकारे अनेक जण वावरत होते.
04 paramparik sherwani.jpg
04 british influenced Sherwani.jpg

भारतात येऊन वसलेले, पण राज्यकर्ते नसलेले आणि संख्येने कमी असलेले असे जे समुदाय होते त्यांनी स्थानिक पद्धती स्वीकारल्या पण आपले स्वत:चे रंग त्यात मिसळले आणि एक नवीन पद्धती निर्माण केली. यात सगळ्यात महत्वाचा समुदाय म्हणता येईल तो म्हणजे पारशी समुदाय. आठव्या दहाव्या शतकात गुजरातच्या किनाऱ्यावर येऊन पोचलेला हा समुदाय त्यांच्या आख्यायिकेप्रमाणेच दुधात साखर मिसळावी तसा इथल्या समाजात मिसळून गेला. त्यांनी त्यांच्या मूळ कपड्यांबरोबर गुजराथी वेशभूषेतले महत्वाचे भाग आपलेसे केले. विशेषत: स्त्रियांच्या वेशभूषेमधे. आज भारतीय साड्यांबद्दल विवेचन केले जाताना पारसी गारा साडीच्या उल्लेखाशिवाय पुढे जाता येणार नाही. कोकणातल्या बेने इस्राएल समाजाने मात्र कपड्यांच्या आणि इतरही अनेक बाबतीत कोकणातल्या इतर समुदायांमध्ये मिसळून जाणे स्वीकारले होते. नऊवार नेसणाऱ्या ज्यू स्त्रिया हे त्यांचे वैशिष्ट्य. कुंकू वगळता सर्व जामानिमा एतद्देशियांप्रमाणेच असे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ख्रिश्चन समाजामध्ये आजही वयस्क स्त्रियांच्यात नऊवारी साडी नेसणाऱ्या स्त्रिया दिसतात. सिंधुदुर्ग ख्रिश्चन स्त्रियांची नऊवारी म्हणून या पद्धतीची वर्गवारी करता येईल इतकी त्यांची नऊवारी नेसायची पद्धत वेगळी आहे. मंगळसूत्र वापरणाऱ्या ख्रिश्चन आणि मुस्लिम विवाहित स्त्रिया आत्ताआत्तापर्यंत मुंबईपुण्यात दिसत असत.
05 7 parsee women.jpg

06 bene israel family.jpg

भारतामध्ये कपड्यांच्या गोष्टीत येऊन मिसळलेले आणि आपली कपड्यांची गोष्ट समृद्ध करणारे हे असे अनेक प्रवाह. पण ही मिसळण्याची गोष्ट इथेच संपत नाही. गोष्ट अजून बरीच आहे. ती उरलेली गोष्ट आपण पुढच्या वेळेला बघूया.

- नी
(दैनिक लोकमत - सखी पुरवणी - मे २०१८ मधे प्रकाशित)
आपलं काय काय म्हणायचं? - २९ मे 

कापडाचोपडाच्या गोष्टी - ४. झाकपाक

“हल्लीच्या मुलींना फार झाकपाक करायला हवी. माझ्या खापर खापर पणजीच्या काळात नुसते उत्तरीय वापरायचे. आम्ही जेमतेम स्तनपट्टे वापरले. आता मुलींना चोळ्या हव्यात. नखरे नुसते!” मौर्य काळाच्या अखेरच्या पर्वात तरुण असलेली एक पणजीबाई तिच्या गुप्त काळातल्या खापर खापर नाती, पणत्यांबद्दल वैतागत होती.

पार वैदिक काळात स्त्रियांसाठी छाती झाकायचे वेगळे वस्त्र नव्हते. पुरुषांसारखेच अंतरीय आणि उत्तरीय असे. क्वचित स्तनपट्टा असे आधारासाठी. मौर्यन कालखंडाच्या उत्तरार्धात स्तनपट्टे, कंचुक्या जास्त वापरले जाऊ लागले. गुप्त काळाने सलग शांतता आणि समृद्धी बघितली बहुतांशी. त्यामुळे जीवनमान सुधारलं. कापड, कपडे यांच्या नव्या पद्धतीही अस्तित्वात यायला लागल्या. फॅशन बदलण्याचा वेग वाढला, १०० वर्षांवर आला. आणि बायकांचे चोळ्यांचे नखरे चालू झाले. चोळ्या शिवायच्या विविध पद्धती, खास चोळ्यांसाठी विणली जाणारी कापडे, चोळ्यांवर केलेले वेगवेगळ्या प्रकारचे भरतकाम या गोष्टींचे भरपूर वैविध्य भारताच्या कपड्याच्या इतिहासात बघायला मिळते. उगाचच शरीर झाकून ठेवण्याला नकार देणारी, शरीराचे आकार उकार स्पष्ट करणारी वस्त्रे ही आपल्या भारतातच अस्तित्वात होती. ऐकायला, वाचायला गैरसोयीचं वाटलं तरीही हे आपल्याच महान संस्कृतीत घडलं.

आज ठकू गंभीर आहे. हादरून गेलीये. जिथून तिथून गोष्टी शेवटी कपडे आणि त्यातून दिसणारे त्वचेचे चतकोर यावर येऊन थांबतायत. जोडीला संस्कृती हा शब्द तोंडीलावण्यासारखा वापरला जातोय.

सर्व बाजूंनी अंग झाकून घेण्यातच केवळ संस्कृती सामावलेली आहे. अंग झाकले असता व्यक्तीच्या सभ्यतेची ओळख पटून अत्याचार टळतात. आमच्या संस्कृतीचे कपडे हेच सभ्य असतात. ते तसे घालणाऱ्या स्त्रिया सभ्य असतात. इतर संस्कृतीतील कपडे असभ्य आणि म्हणून ते वापरणाऱ्या किंवा आपल्यासारखे कपडे न वापरणाऱ्या स्त्रियाही असभ्य. त्यामुळे त्यांच्यावर अत्याचार झाले तर अत्याचार करणाऱ्यांची काय चूक? अश्या सुरस व चमत्कारिक संकल्पना सध्या वातावरणात तरंगताना आढळतायत.
Burkini_modesty_swimsuit_PROP_178_MG_2016_01.jpg

अंग झाकून घेणे हीच संस्कृती धरायची असेल तर पार वैदिक काळापासूनच्या विविध पूर्वजांना असभ्य म्हणावे लागेल. काय ते नुसते अंतरीय नेसत बायका. आणि छाती झाकण्याचे नावच नाही. घेतलं कधी उत्तरीय तर घेतलं, नाहीतर नाही. अश्लील माणसे! वगैरे.. पण असे म्हणायचे झाले तर मग आमचे तेव्हाचे पूर्वज फार महान होते या गृहीतकाची गोची होऊन बसते. छाती झाकण्याच्या इतिहासाचा वेध घेत जाताना एक अजून गैरसोयीची वस्तुस्थिती समोर येते. कुठलीही नवीन पद्धत ही समाजाच्या उतरंडीत वरच्या स्तरावर असणाऱ्या लोकांच्यात सुरू होते आणि झिरपत झिरपत शेवटच्या घटकापर्यंत जाते. छाती झाकायची पद्धत अशीच झिरपत पुढे गेली असणार. पण काही ठिकाणी शेवटच्या घटकापर्यंत ती पोचू दिली गेली नाही. छाती झाकायची परवानगीच समाजाने काही जातीतल्या स्त्रियांना ठेवली नाही. त्यांना जन्मजात असभ्य ठरवून टाकले. स्वतःची छाती झाकायचा हक्क मिळवण्यासाठी या स्त्रियांना संघर्ष करावा लागला. ही केवळ २०० वर्षांपूर्वीच आपल्याच भारतात, केरळमध्ये घडलेली घटना आहे.
Portrait-of-Two-Women---Eastern-Bengal-1860's.jpg

संस्कृती ही हवाबंद डब्यात ठेवून दिलेली कधीही न बदलणारी अशी गोष्ट नसते. एक संस्कृती (आपली) चांगली आणि एक प्रकारची संस्कृती (त्यांची) वाईट असेही काही नसते. त्या त्या जगातले राजकीय, सामाजिक, आर्थिक वातावरण, हवामान या सगळ्यांचा जो राहणीमानावर परिणाम होत असतो त्यातून ती ती संस्कृती बनत असते. आणि बदलतही असते. मुळातल्या मानवी प्रेरणांना धरूनही संस्कृती प्रवाही असते.

मानवाच्या मूलभूत प्रेरणांपैकी लैंगिक आकर्षण ही महत्वाची बाब. त्यामुळे अर्थातच जोडीदार होऊ शकेल अश्या व्यक्तीला आकर्षित करून घेण्याची इच्छा नैसर्गिकच. त्यासाठी शरीर सजवणे, दाखवणे हे ही नैसर्गिक. पण प्रदेशांप्रमाणे, काळाप्रमाणे आकर्षून घेण्यासाठी उघडे ठेवायचे शरीराचे चतकोर जरी वेगळे असले तरी ‘या जागा उघड्या ठेवणे म्हणजे असभ्य’ हे सूत्र सर्व संस्कृतींमध्ये समान आढळते.

मग एका संस्कृतीत पायातल्या चपला काढणे हे आदर दाखवण्याचे लक्षण समजले जाते तर दुसरीकडे पावलाचा भाग उघडा ठेवणे, स्टॉकिंग्ज न घालणे, उघडे पाउल दाखवणे हे लैंगिक संबंधासाठी आमंत्रण आणि अर्थातच असभ्य समजले जाई. फार दूर कशाला जा? आपल्याकडेच उत्तरेत डोक्यावरून पदर घेणे हे सभ्य आणि विनयशील स्त्रीचे लक्षण मानले जाते तर दक्षिणेत डोक्यावरून पदर हा भागच अस्तित्वात नाही. बुरखा हे ही एक असेच उदाहरण. तर पोटाचा भाग उघडा पडतो अश्या साडीचे सभ्य आणि विनयशील म्हणून कौतुक का बरे केले जाते? हा प्रश्न पूर्वी पाश्चात्यांना आणि आता आम्हाला तुम्हालाही पडतोय.

अंग झाकणे म्हणजे संस्कृती या संकल्पनेबरोबरच साडी म्हणजे संस्कृती बरोब्बर उलटी संकल्पनाही वातावरणात आहेच. लग्न झालेल्या बाईने साडीऎवजी दुसरे काही सुटसुटीत घालून मोठ्या माणसांसमोर जाणे म्हणजे ज्येष्ठांचा अपमान या विनोदी संकल्पनेने तर ठकूलाही छळलंय. आख्खी नव्वार साडी पण ओचे उचलून उचलून शॉर्टस घातल्यासारखी तोकडी केलेली, पदर कमरेपासून खांद्यावरून जाऊन परत कमरेशी खोचलेला पण काहीही न झाकणारा एक अश्यातश्या मापाचे ब्लाऊज मात्र अंगात अडकवलेले. हे असले तरीही ती लांबलचक ट्राऊझर्स आणि वर बंद गळ्याचा ढगळ टीशर्ट घातलेल्या बाईपेक्षा सभ्य समजली जाते. ट्राऊझर्सवालीचे शरीर जास्त झाकलेले असूनही.

कपड्यांच्या इतिहासाच्या मुळाशी जाताना आपण बघितले की हवामान, नैसर्गिक उपलब्धता या गोष्टींवर त्या त्या प्रदेशातले कपडे ठरत जातात. एखादी गोष्ट हवामानाची, वातावरणाची गरज म्हणून आवश्यक होऊन जाते. तिची पद्धत बनते आणि मग त्या गोष्टीला धर्माची, संस्कृतीची लेबले चिकटतात. माणसांच्या स्थलांतरांमुळे या पद्धती लेबलांसकट इकडून तिकडे जातात. कधी त्या पद्धती नावीन्य म्हणून उत्सुकतेने आत्मसात केल्या जातात तर कधी परक्यांच्या पद्धती म्हणून तिरस्काराच्या धनी बनतात.
Portrait_of_an_Indian_woman_in_Eastern_Bengal_in_the_1860s.jpg

आपल्या हवामानाला साजेसे, इकडून तिकडून हवा खेळती राहील असे गुंडाळलेले कपडे ही आपली मूळ पद्धत. प्रांताप्रमाणे कापडाचा प्रकार, नसण्याचा प्रकार, कपड्याची लांबी यात फरक आहेत पण मुळात उगाचची झाकपाक केलेली नाही. तीच पद्धत रुळलेली असल्याने शरीराच्या दिसणाऱ्या भागाच्या आकारावर सभ्यतेचे मोजमाप ठरत नसे. मग मुघल आपल्या पद्धती आणि समजुती घेऊन आले. ते जिथून आले तिथली नैसर्गिक परिस्थिती बघता अंगच काय पण चेहरा झाकून घेणे ही त्यांची गरज होती. जेत्यांच्या पद्धती म्हणून घुंघट, डोक्यावरून पदर, सर्व कपड्यांवरून गुंडाळून घेण्याचा एक शेला वगैरे गोष्टी भारतीय कपड्यात उत्तरेपासून निदान महाराष्ट्रापर्यंत तरी व्यवस्थित स्थान मिळवून बसल्या.

मग ब्रिटिशांच्या बरोबर त्यांचे अनेक थर असलेले कपडे आले. हात, पावले, पोट उघडे असलेले कपडे असभ्य आहेत याची जाणीव इथल्या अडाणी लोकांना त्यांनी करून दिली. राणी व्हिक्टोरिया च्या काळात ब्रिटिशांचा झेंडा भारतभर प्रस्थापित झालेला होता. शरीराचा चेहरा सोडून प्रत्येक इंच न इंच झाकणे यासाठी राणी व्हिक्टोरियाचा काळ प्रसिद्ध आहे. जे मूळ देशी तेच इथेही लागू झाले.

मोकळ्याढाकळ्या साडीच्या आत परकराचा एक थर वाढला. त्याही आतमध्ये स्टॉकिंग्ज, पायात बंद शूज, हातात कोपरापर्यंत हातमोजे आणि सगळ्यांच्या वरून डोक्यावरून पदर असलेली साडी असला विनोदी अवतार ऐन उन्हाळ्यात भारतात अनेक ठिकाणच्या अमीरउमरावांच्या घरातल्या स्त्रिया सहन करत असत. ‘माझे सत्याचे प्रयोग’ यामध्ये कस्तुरबांच्या अश्या वेषाचे वर्णन आहे. हेच तथाकथित सभ्यतेचे संस्कार ब्रिटिश सरकारात नोकरी असणाऱ्या पुरुषांच्या कपड्यांवरही झाले. मग संपूर्ण भारतातील पुरुषांनी ते अंगिकारले.
06gandhi2.jpg

अंग झाकण्याला भारतीय संस्कृतीत मानाचे स्थान मिळाले. स्त्रियांनी संस्कृती सांभाळायची असते त्यामुळे पारंपरिक कपड्यांचा त्यांना त्याग करता आला नाही तर त्या पारंपरिक कपड्यांना अंग झाकण्यातूनच संस्कृती या संकल्पनेची जोड द्यावी लागली. आणि अंग झाकायचे पण साडीच हवी अश्या पारंपरिक कात्रीत आपण बायका कायमच्या सापडलो. मग आपल्याला नव्वार नेसताना घोटा झाकला गेला पाहिजेच, पोटरीचा एक मिलीमीटर भागही दिसता कामा नये हे गरजेचे वाटायला लागले. साडी नेसताना खूप अंग उघडे असते ते नको वाटायला लागले. पण तरी जीन्स म्हणजे परक्यांच्या संस्कृतीची नक्कल म्हणून अनेकांना असभ्य वाटू लागली.

कपड्यांच्या लांबीरूंदीवर सगळे खापर फोडणाऱ्या, जबाबदारी नाकारणाऱ्या युक्तिवादाला हे थोडेसे उत्तर. संस्कृतीचा प्रवाह आणि त्यात मिसळणाऱ्या पद्धती यांच्याबद्दल अजून गप्पा मारूया पुढच्या लेखात.

- नी
(दैनिक लोकमत - सखी पुरवणी - एप्रिल २०१८ मधे प्रकाशित)
'झाकपाक' २४ एप्रिल

कापडाचोपडाच्या गोष्टी - ३. साडी 'नेसणं'

“ठकू, हे एवढं लांबरुंद कापड इकडून तिकडून गुंडाळायचं हा निव्वळ शिवण्याचा आळस आहे. किती गैरसोयीचं आणि अशास्त्रीय आहे हे.” शास्त्रीय मैत्रीण साडीवर वैतागत म्हणाली. ठकू विचार करत राह्यली.

भारतीय उपखंडातील गुंडाळलेल्या कपड्यांमध्ये काळानुसार आणि प्रांतानुसार भरपूर विविधता आहे. जेव्हापासूनचे पक्के संदर्भ मिळतात तेव्हापासून बघितले तर कमरेवर बांधलेले वस्त्र म्हणजे अंतरीय आणि शरीराचा वरचा भाग झाकणारे वस्त्र म्हणजे उत्तरीय आणि डोक्यावर बांधलेले वस्त्र हे प्रामुख्याने दिसते. स्त्रिया व पुरुष दोघांच्याही वेशभूषेत हे दिसून येते.

fullsizeoutput_9c.jpeg
अंतरीय हे कमरेपासून खालचे शरीर झाकणारे वस्त्र होते. कमरेशी एक गाठ मारून त्यावर तोलून धरलेले असे. ती गाठ कापडाच्या सुरुवातीचे एक टोक घेऊन मारलेली आहे की कापडाच्या मध्यात दोन टोके घेऊन बांधलेली आहे यावर उरलेली नेसण अवलंबून असे. कापडाच्या सुरुवातीला गाठ असेल तर शक्यतो निऱ्या घालून नेसलेले वस्त्र आणि मध्यात गाठ घेतली असेल तर निऱ्या नसलेले किंवा अगदी कमी निऱ्यांचे वस्त्र असा फरक दिसून येतो. आजही काष्ट्याची साडी आणि धोतर यांच्या नेसण्यामध्ये हा फरक आहे.. गुडघ्याच्यावर, गुडघ्याइतके, पोटरीइतके किंवा क्वचित पायघोळ असे अंतरियाचे वेगवेगळे प्रकार हे समाजातले स्थान, हुद्दा, व्यवसाय वगैरेंवर अवलंबून असत. काही ठिकाणी लुंगीसारखे गोल अंतरीयही दिसते. उत्तरीय हे ओढणी, उपरणे, शाल यासारखे प्रकरण. ते अंगावर ल्यायच्या - अंग झाकण्यासाठी पूर्ण गुंडाळून घेणे ते खांद्यावरून नुसतेच सोडून देऊन मिरवणे - अश्या वेगवेगळ्या पद्धती दिसतात. गुप्त काळाच्या आगेमागे काही प्रदेशांमध्ये स्त्रियांच्या कपड्यांच्यात हे अंतरीय आणि उत्तरीय एकत्र झालेले दिसून येते. आज आपल्याला साडी म्हणून जे माहिती आहे ते हेच. याच दरम्यान अंतरीय नेसायच्या गोल आणि काष्ट्याच्या अश्या दोन पद्धती स्पष्ट दिसतात.

डोक्यावर कापड गुंडाळून करायची पागोटी, मुंडाशी आपल्याला ऐकून माहितीयेत. कापडाच्या लांबीवर आणि डोक्याभोवती कापड गोल फिरवले जाते की क्रॉसमध्ये यावर सर्वसाधारणतः या शिरोभूषणांचा आकार अवलंबून असतो. कधी कुणाला फेटा, मुंडासे बांधताना बघितलंय? एखाद्या सवयीच्या फेटेभाद्दराच्या फेटा बांधताना दोन हातांच्या हालचाली बघा. निव्वळ नृत्य असते ते. एक हात उलटला म्हणजे दुसरा सुलटला पाहिजेच. लय कमी जास्त होऊन अजिबात चालणार नाही. तसे झाले तर फेट्याचा घट्टपणा गडबडणार आणि सगळा बेढब गोळा होऊन बसणार. या सर्वच शिरोभूषणांचा उपयोग उन्हापावसापासून संरक्षण म्हणून होतच असे पण युद्धात, हाणामारीत शस्त्राच्या घावापासूनही संरक्षण होत असे.

मौर्य कालखंडात सुरुवातीला तुरळक प्रमाणात स्त्रियांच्या डोक्यावरही ही अशी बांधलेली शिरोभूषणे दिसतात; जी नंतरच्या कालखंडात नाहीत. नंतर स्त्रिया डोके आच्छादण्यासाठी ओढणीसदृश वस्तू वापरू लागल्या.

अंगाभोवती कपडे गुंडाळून वस्त्रे तयार करण्याची आयडिया फक्त भारतीय उपखंडातली नसली तरी अंतरीयाचे किंवा कमरेवर बांधलेल्या वस्त्राचे काष्टा घालून दुटांगीकरण हे मात्र केवळ भारतीय उपखंडातच दिसून येते. भारतीय उपखंडाचा किंवा प्राचीन भारताचा विस्तार पार गांधार म्हणजे अफगाणिस्तानापर्यंत मानला जातो. तिथेही हे दुटांगीकरण दिसून आलेले आहे. कापडाच्या मध्यात गाठ घालून एक बाजू मागे काष्ट्यासारखी आणि दुसऱ्या बाजूचा पंखा करून पुढेच ठेवलेला किंवा दुसरी बाजू चक्क पदरासारखी खांद्यावर घेतलेली असा निऱ्या नसलेल्या साडीचा प्रकार बघायला मिळतो. गुप्त काळाच्या आसपास मात्र अजंठामध्ये आपल्याला माहिती असलेली निऱ्या घालून नेसलेली काष्ट्याची साडीही दिसते.

साधारण नेसूच्या पद्धतींचे बेसिक गणित लक्षात यायला लागले की मग विविध काळातील मूर्ती, शिल्पे बघताना त्या मूर्तीच आपल्याला त्यांची नेसूची पद्धत उलगडून सांगू लागतात. गाठ कमरेवर नक्की कुठे आहे पुढे की एका बाजूला? कमरेवरची गाठ कापडावर नक्की कुठेय? निऱ्या आहेत की नाहीत. असल्या तर किती आहेत? नेसणं गोल आहे की काष्ट्याचे? पायघोळ निऱ्या असल्या तरी पायावर बाहेरच्या बाजूला वस्त्र किंचित उचलल्यासारखे आहे तर इथे नक्की काष्टा घातलेला आहे वगैरे सगळे या मूर्तीना जरा नीट निरखून पाह्यले तर समजू शकते.

इथे मी मुद्दामून नव्वार हा शब्द टाळते आहे. नव्वार किंवा नऊवार हे कापडाच्या लांबीचे माप आहे. नेसायची पद्धत नाही आणि नऊवार लांब असलेली साडी नेसायच्या किमान ८-१० किंवा जास्तच पद्धती महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकात मिळतील. काही राजघराणी वा सरदार घराण्यांच्यातल्या स्त्रिया अकरा बारा वाराची साडी नेसत असाही एक संदर्भ मिळालेला आहे. त्यामुळे काष्ट्याची वा गोल असेच साड्यांचे वर्गीकरण केलेले योग्य ठरेल.
Raja_Ravi_Varma,_Lady_Going_for_Pooja.jpg

साडीच्या एका टोकाला गाठ आणि मग निऱ्या घालून नेसणे आणि निऱ्या, गाठी असं काही न करता एकावर एक बरेच वेढे घेऊन नेसणे असे साड्यांच्या नेसण्याच्या पद्धतींचे दोन भाग करता येतील. निऱ्या घालून नेसायच्या साड्यांचे प्रदेशानुसार आणि जमातींनुसार अजून प्रकार आहेत. या दुसऱ्या प्रकारात पदरासकटचे आणि पदराशिवायचे असेही प्रकार आहेत. ठाणे जिल्ह्यातले वारली आदिवासी, रायगडातले कातकरी आणि ठाकर आदिवासी, मुंबईच्या कोळणी, मुंबईतलाच आगरी समाज, रत्नागिरीतला कुणबी समाज, सिंधुदुर्गातला आणि गोव्यातला धनगर समाज अश्यांच्या साडी नेसायच्या पद्धती या दुसऱ्या पद्धतीत येतात.
Marathi_Women.jpg
KoliFisherman_Female_Dress.jpg

भारतातले हवामान उष्ण त्यामुळे अंगावरचे कपडे हे हवा खेळती राहील असे हवेत. कपड्याचे एकावर एक थर असता कामा नयेत. गुंडाळलेल्या कपड्यांमध्ये गरजेचा भाग झाकला जाऊन बाकी भागात हवा खेळती राहते. पूर्वीचे अंतरीय असो वा आताची काष्ट्याची साडी, काष्टा हा सगळ्या वेढ्यांच्या वर असतो त्यामुळे नैसर्गिक विधींच्यासाठीही संपूर्ण वस्त्र उतरवायची गरज पडत नाही. रत्नागिरी जिल्ह्यातल्या कुणबी समाजाच्या साड्या आणि सिंधुदुर्गातल्या ख्रिश्चन समाजाच्या साड्या अश्या प्रकारे नेसल्या जातात की मांडीशी चक्क खिसे तयार होतात. एखाद्या कार्गो बर्म्यूडाला असावेत तसे. त्यामध्ये काजू, भाजी, मोबाईल, घराच्या चिमणीसाठी मण्यांची माळ, कव्हर घातलेले आधार कार्ड असे सगळे मावू शकते. ठाकर, कातकरी अश्या आदिवासी जमातींचे वास्तव्य जास्त करून डोंगरात असते. आयुष्य कष्टाचे, झाडांवर चढणे, डोक्यावर बोजा घेऊन डोंगर चढून पार करणे हे नेहमीचेच. अश्या वेळेला कमरेशी भरपूर वेढे घालून नेसलेली साडी पाठीला आधार देणारी होत असावी. हे सगळे उलगडायला लागल्यावर साडीला किंवा गुंडाळलेल्या वस्त्राला अशास्त्रीय म्हणणे चुकीचे वाटायला लागते.

गोल अथवा काष्टा नेसायच्या विविध पद्धती या अनेक पिढ्यांच्या वापरातून हळूहळू परिपूर्ण बनत आलेल्या आहेत. साड्यांच्या नेसण्यातून, त्यांच्या काठांच्या रुळण्यातून तयार होणारे आकार, शरीराच्या आकाराबरोबर असलेला त्यांचा ताल, तोल याची पारंपरिक रचना बघितली तर त्यामध्ये एक गंमत आहे. बांधून अंगावर बसवला तरी शेवटी हा प्रवाहच आहे. झुळझुळ वाहणारा एक प्रवाह अंगावर इकडून तिकडून लपेटला तरी त्यातले वाहणे थांबत नाही. काष्टा मागे खोचल्यावर पुढे निऱ्यांना पडणाऱ्या चुण्या, त्यांची वळणे या सगळ्यांना पदराच्या काठाच्या रेषेने दिलेला छेद आणि मग त्या काठाला समांतर जाणाऱ्या पदरावरच्या चुण्या ही एक सुंदर रचना आहे. एका खांद्यावर सुरू झालेली काठाची रेषा दुसऱ्या बाजूच्या गुडघ्याच्या खालपर्यंत खेचली जाते तेव्हा त्यातून तयार होणारी लय संपूर्ण रचनेचा तोल सांभाळत असते, संपूर्ण रचनेला वाहती ठेवत असते.

पण आपण भारतीय आता नको इतक्या आखीव आणि बंदिस्त चकामकाटाला इतके भुललोय की हे मूळचे सौंदर्य विसरूनच गेलोय. साडीच्या नेसण्याच्या सौंदर्याकडे, रचनेकडे आम्ही बघतच नाही. त्यात साडी म्हणजे संस्कृती, साडी नेसणे म्हणजे घरातल्या लोकांविषयी आदर वगैरे भंपक संकल्पना वापरून आजही लग्न झालेल्या बाईवर साडी नसण्याचे दडपण आणले जाते. “त्या सोमण काकू तर साडी आणि बूट घालून मॅरेथॉनही धावतात.” या फोडणीची हल्ली भर पडलीये. घरातली एक सासू आणि परत ही ‘मनातली सासू’.. साडी नेसण्याचा सासुरवास नुसता!

या सगळ्यामुळे आम्हाला एकतर साडीबद्दलच राग उत्पन्न होतो पण तरीही संस्कृती जपायचीच असते मग साडीच्या रचनेचा विचार न करता, कृत्रिम धाग्यांपासून बनवलेल्या जिजामाता किंवा बेळगाव सिल्क साडीला विचित्र चुण्या घालून, त्या इस्त्रीने बसवून, त्यावरून मशीनची शिवण फिरवून बनवलेले एक प्रकरण साडी म्हणून वापरले जाते. ती तसली साडी ‘घालून’ (हल्ली म्हणे ‘साडी घालतात’) आमच्या संस्कृतीचे प्रचंड भले होते.

कुठल्या कपड्यांमधून संस्कृतीचे खरंच किती भले होते त्याबद्दल जरा पुढच्या महिन्यात गप्पा मारूया.

- नी
(दैनिक लोकमत - सखी पुरवणी - मार्च २०१८ मधे प्रकाशित)
'साडी नेसणं...' - २७ मार्च 

Monday, May 18, 2020

कापडाचोपडाच्या गोष्टी - २. नेसूचं आख्यान

“ठकू, हे बघ तुमचा तो कोण सब्यसाची काय म्हणतोय. भारतीय स्त्रियांना साडी नेसता येत नसेल तर लाजा वाटल्या पाहिजेत म्हणे! चला एकाला तरी संस्कृतीची चाड आहे या जगात. साडी म्हणजे आपली संस्कृती आहे. यासाठी म्हणूनच सांगतो की स्त्रियांनी साडीच नेसावी. आख्ख्या जगात कुठेही अश्या प्रकारचे वस्त्र नाही. फार बुद्धिमान होते आपले भारतीय लोक.” शेजारचे सांस्कृतिक काका राष्ट्रप्रेमाने निथळत म्हणाले. “मी पण साडीच घातलीये. तीही नव्वारी.” सांस्कृतिक काकांची सांस्कृतिक पत्नी सलवारीला पदर फुटलेला असा एक ड्रेस घालून बाहेर येत म्हणाली. साडी ‘घालणे’ हे ठकूच्या कानाला जोरदार चावले तरी समोरचा नव्वारीच्या नावाने असलेला विनोद बघून तिला काही हसू आवरेना.

आजच्या जगाचा विचार केला तर अंगाभोवती वेगवेगळ्या प्रकारे कापडाचे वेढे घालून बनवायची वस्त्रे ही केवळ भारतीय उपखंडात किंवा भारतीय उपखंडात मूळ असलेल्या लोकांच्यातच दिसतात. त्यामुळे भारतीयांनाच केवळ ही भन्नाट आयडिया सुचलेली आहे असा गैरसमज व्हायला भरपूर वाव असतो.

जेव्हा मानवाने कपडे घालायला सुरुवात केली तेव्हा प्राण्यांचे कातडे वा कापड अंगाभोवती गुंडाळूनच सुरुवात केली. मग त्या गोष्टी अंगावर टिकवण्यासाठी, उबेसाठी वेगवेगळी साधने आणि पद्धती वापरल्या गेल्या. प्राण्यांचे कातडे गाठी मारून अंगावर टिकवणे शक्य नव्हते. तिथे काटे, सुया वगैरेंचा वापर झाला आणि त्यातून शिवणकलेचा जन्म झाला. मात्र कापड हे कातड्यापेक्षा अर्थातच पातळ होते. परत ते हवे तेवढे बनवता येत होते आणि कातड्यापेक्षा लवचिक असल्याने गाठी मारणे, खोचणे वगैरे शक्य होते. यातून मग कापड गुंडाळून बनवायच्या वस्त्रांचा इतिहास तयार झाला.

हे सारखं गुंडाळणे गुंडाळणे म्हणण्याने काहीतरी बोळा वा बोंगा प्रकारची वस्त्रे डोळ्यापुढे येत असतात. तेच ड्रेप किंवा रॅप असं टोपीकराच्या भाषेत म्हणलं की एकदम टापटीप, नीटनेटके वाटते. आपल्याकडे नेसणे, बांधणे अशी क्रियापदे आहेत. हिंदीत तर ओढना असेही क्रियापद वापरले जाते. काही प्रकारच्या साड्यांच्या नेसणीला बोलीभाषेत चक्क लावणे हे ही क्रियापद वापरले जाते. विशेषतः जी साडी निऱ्या घालून नेसायच्या ऐवजी वेगवेगळ्या प्रकारे कमरेभोवती वेढे घेऊन लिंपल्यासारखी नेसली जाते त्याला साडी लावणे असेच म्हणाले जाते. साडी पूर्णपणे व्यवस्थित न नेसता नुसतीच अंग झाकण्यासाठी तात्पुरती नेसली जाते तिला साडी उभी लावणे असाही शब्द आहे. पण या सगळ्यांसाठी सध्या सोयीचे आणि त्यातल्या त्यात चपखल असे एकच काही म्हणायचे तर गुंडाळणे हा शब्द वापरण्याशिवाय पर्याय नाही. तर तोच वापरूया आणि त्यातले बोळापण, बोंगापण विसरायचा प्रयत्न करूया.

जगभरात जिथे जिथे कापडापासून(लिनन, सुती किंवा लोकर) वस्त्रसज्जेची सुरुवात दिसते तिथे तिथे ही अंगाभोवती गुंडाळून तयार केलेली वस्त्रे दिसतात. कंबरेभोवती कापड गुंडाळून घेतल्यावर कमरेपासून खालचा भाग झाकला जातो. आता हे कापड तिथेच राहायला हवे तर मग तिथे गाठ मारायला हवी. वेगवेगळे स्कर्ट ते लुंगी यातून तयार झाले. वरच्या भागासाठी दुसरे कापड गुंडाळून घेतले. शाली, खेस, चादर, उत्तरीय, उपरणे, ओढणी इत्यादींचा जन्म झाला. खालचे व वरचे कापड एक केले. खालच्या कापडाचा गाठीच्या पुढचा भाग खांद्यावरून घेतला. साडीच्या पूर्वजाचा जन्म झाला. इतकी साधी गोष्ट आहे. आणि अर्थातच ही फक्त भारतात घडलेली नाही.

जगभरातल्या सर्वात प्राचीन मानल्या गेलेल्या संस्कृतींपैकी सिंधू संस्कृतीबरोबरच ईजिप्शियन आणि मेसोपोटेमियन संस्कृतींमध्ये गुंडाळलेली वस्त्रे दिसतात. वस्त्र गुंडाळलेली एक मूर्ती मेसोपोटेमिया (सुमेर) मध्ये सापडलेली आहे. ही मूर्ती पूर्ण आहे त्यामुळे ते वस्त्र आधी कमरेशी गुंडाळून मग खांद्यावर घेतलेले असावे हे कळते. ज्यांना साडी नेसता येते त्यांना हे वाचून आपली सहावारी साडी मेसोपोटेमियाची कृपा आहे असे वाटेल. पण ते तसे नाही. हे अगदी साध्या प्रकारचे गुंडाळणे आहे आणि ते बहुतेक सगळीकडेच सुरुवातीच्या काळात दिसते.

चित्र १ - मेसोपोटेमियन, सुमेरियन मनुष्य (इसपू २२००)
1. meso 1.jpg

याच मेसोपोटेमियामध्ये कमरेशी कापड गुंडाळून बनवलेला स्कर्टही आहे आणि कापड खांद्यावरून मागेपुढे नेऊन, बांधून तयार केलेला टॉपही आहे. या वर्णनाने हा ड्रेस एखाद्या हॉट वगैरे तरुणीचा आहे असा समज होईल. तर तसे अजिबात नाही. हा ड्रेस सैन्यातल्या पुरुषांचा आहे. स्त्रियांच्या कपड्यातही स्कर्ट आहे आणि बांधून बनवलेल्या टॉप ऐवजी शालीसारखी गुंडाळलेली केप आहे. एकच कापड कमरेभोवती वा छातीभोवती गुंडाळून मग खांद्यावरून घेऊन बनवलेला ड्रेस आहे. यासाठी भरपूर रुंद कापड लागत असे. याचा अर्थ तेवढे रुंद माग अस्तित्वात होते असे म्हणायला हरकत नाही.

चित्र २ - मेसोपोटेमिया ड्रेपिंग
2. meso2.jpg

जगातल्या सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी तिसरी म्हणजे ईजिप्शियन संस्कृती. त्यांचे कापड लिनन होते. सुती कापड त्यांना माहिती झालेले नव्हते. पण कपडे अंगाभोवती गुंडाळून वस्त्रे बनवण्याची आयडिया त्यांना माहिती होती. कमरेशी कापडाची पट्टी गुंडाळून लंगोटासारखे वस्त्र मग त्यावरून मिनीस्कर्टसारखे वस्त्र असा सर्वसामान्य इजिप्शियन पुरुषांचा पोशाख दिसतो. हा मिनीस्कर्ट म्हणजे एक प्रकारची लुंगीच. अगदी कमी पन्ह्याच्या कापडाची लुंगी. कधी कधी हुद्द्यानुसार या स्कर्टची लांबी पार घोट्यापर्यंतही असे. कमरेवरच्या शरीरावर कापडाच्या पट्ट्या वेगवेगळ्या प्रकारे गुंडाळलेल्या असत. या पट्टयांचा उपयोग अंग झाकण्यापेक्षा विविध कामे करताना घाम शोषून घेण्यासाठी होत असे. स्त्रियांच्या कपड्यांमध्येही या सगळ्या गोष्टी असतच. तसेच मोठ्या चौरस आकाराचे कापड शरीराभोवती विशिष्ट प्रकारे गुंडाळून एक गाऊनसारखे वस्त्रही वापरले जात होते.

पण इजिप्तच्या गुंडाळलेल्या वस्त्रसज्जेचे सर्वात महत्वाचे प्रकरण ज्याचे तंत्र आजही डिझायनर्सना मोहात पाडते ते म्हणजे ईजिप्शियन चुण्या. अगदी बारीक, पट्टीने आखून बनवल्या असाव्यात अश्या एकसारख्या चुण्या. वेगवेगळ्या दिशेने या चुण्या घातलेल्या असत. त्यामुळे कापड अंगाभोवती बसवल्यावर त्या चुण्या विशिष्ट प्रकारे अंगाभोवती पडत असत. इथे परत कपड्यांचा मूळ उद्देश शरीर सजवणे हाच असणार हे अधोरेखित होते.

चित्र ३ - ईजिप्शियन सीन
3. egypt.jpg

यानंतर आलेल्या प्राचीन संस्कृती म्हणजे ग्रीक आणि मग रोमन. या दोन्ही संस्कृतींमध्ये शिवलेल्या आणि गुंडाळलेल्या दोन्ही प्रकारचे कपडे आहेत. शिवलेले कपडे हे शक्यतो अंगाबरोबर असलेला एक पहिला पापुद्रा या स्वरूपाचे तर गुंडाळलेले कपडे हे पूर्ण आकृतीचा आकार उकार ठरवणारे, माणसाला तपशील देणारे, माणसाचे तपशील दाखवणारे वगैरे आहेत. कापडे लिनन आणि लोकरीची आहेत पण सुती कापडही दिसते.

भरपूर रुंद असलेले कापड घेऊन त्याला ठराविक घड्या घालून बनवायचे कायटोन, पेप्लॉस, एक्झोमिस अश्या नावांचे साध्या ट्यूनिक सारखे ड्रेसेस बघायला मिळतात. दोन्ही खांद्यावरून किंवा एकाच खांद्यावर आणि उंचीनुसार ही नावे ठरतात. शालीसारखे एका किंवा दोन खांद्यावरून वागवायचे प्रकरणही आहे. त्याला पुरूषांच्यात हायमेशन आणि स्त्रियांच्यात डायप्लेक्स म्हणले जात असे.

चित्र ४ - ग्रीक सीन
4. greek.jpg

ग्रीकांच्या लगेच नंतरच्या रोमन संस्कृतीने ग्रीक वेशसज्जेतल्या अनेक गोष्टी घेतलेल्या आहेत. पण रोमन संस्कृतीतले महत्वाचे असे गुंडाळलेले वस्त्र म्हणजे टोगा. हे वस्त्र मानाचे होते. समाजातल्या ठराविक स्तरातील पुरुषांनाच हे वस्त्र वापरायचा अधिकार होता. स्त्रियांसाठी एक ओढणीसारखे वस्त्र डोक्यावरून घेतलेले असे त्याला पल्ला असे नाव होते. हे सभ्य स्त्रियांसाठी अनिवार्य होते.

चित्र ५ - रोमन सीन
5. roman.jpg

टोगा हा शब्द आपल्याकडे मुघल वेशभूषेमध्ये किंचित रूप बदलून चोगा म्हणून आलेला आढळतो. तेही सर्वात बाहेरचे असलेले वस्त्र आहे. पण टोगा नेसला जातो चोगा हा अंगरख्यासारखा शिवलेला असतो. स्त्रियांच्या डोक्यावरून घ्यायच्या छोट्या ओढणीसदृश वस्त्राला पल्ला म्हणले जाणे आणि आपल्याकडे साडीच्या पदरालाही पल्ला म्हणले जाणे ही अजून एक गम्मत इथे दिसते. आता या गमती नुसत्या योगायोग म्हणून आहेत की मानवाच्या स्थलांतरात, कपड्यांच्या प्रवासात यांचा खरंच एकमेकांशी संबंध आहे? हा एक वेगळा विषय आहे.

यानंतरच्या विविध संस्कृतींमध्ये गुंडाळायचा कपडे हे शाल, ओढणी यासारखेच मुख्यत्वेकरून दिसतात. आफ्रिकन आणि काही दक्षिण अमेरिकन संस्कृतींमध्ये डोक्याला गुंडाळायच्या टापश्या दिसतात. परंतू त्यापलीकडे गुंडाळलेल्या कपड्यांची विविधता ही मात्र भारतीय उपखंडातच टिकून आहे. त्या वस्त्रांबद्दल पुढच्या वेळेला जाणून घेऊया.

- नी
(दैनिक लोकमत - सखी पुरवणी - फेब्रु. २०१८ मधे प्रकाशित)
नेसूचे आख्यान - २७ फेब्रुवारी 

कापडाचोपडाच्या गोष्टी - १. हे सगळं कुठून येतं?


‘बरंका ठकू, वस्त्रे केवळ लज्जारक्षणाकरता असतात. कपड्यापेक्षा मनाचे सौंदर्य महत्वाचे.’ साड्या खरेदी करता करता बकूमावशीने ठकूला उपदेश केला. तलम कॉटनची साडी अंगावर लावून बघत मानेनेच ‘कशी दिसते?’ हे ठकूला विचारले. “अगदी तुझ्यासारखी!” ठकूने खुश होऊन सांगितले. ती साडी नेसल्यावर तिच्या मनाचे सौंदर्य त्या साडीवर पसरणार आणि बकूमावशी एकदम सुंदर दिसणार याची खात्रीच होती ठकूला.

पूर्वी बायकांनी सहावारी नेसावे की नऊवारी वगैरे गोष्टींवर वाद होत असत म्हणे, आजीच्या लहानपणी तिला कंपलसरी खादीच वापरावी लागे म्हणे, काका गल्फमधून जे ड्रेस मटेरियल आणतो तसलं काही आजीच्या लहानपणी मिळतच नसे म्हणे, आजोबा केवळ शिकवायला जाताना पँटशर्ट घालत, एरवी धोतर आणि सदरा.

देवळात, घरात चपला घालून वावरायचं नाही. मंगळसूत्र लग्न झालेल्या बायकाच वापरतात. पूर्वी विधवा स्त्रीला जाडेभरडे लाल लुगडे नेसून राहावे लागे. हपिसात हाफ शर्ट नसतो चालत म्हणे. हिंदी सिनेमातल्या ख्रिश्चन बायका लेस आणि फ्रीलचे झगे घालतात आणि तशीच टोपीही. शाळेत सर्व शिक्षिका साध्या वेषात म्हणजे साडी नेसून येतात. अमुक इतक्या इंचा-सेंटिमीटरांपेक्षा जास्त भाग दिसला शरीराचा तर ते चांगलं समजत नाहीत. आपण हिंदू आहोत तर लावावी ना टिकली. आपली साडी नेसायची पद्धत त्यांच्यापेक्षा वेगळी आहे.

हे असं किंवा अश्यासारखं बरंच काही अनेक ठक्यांच्या आणि ठकोबांच्या बघण्यातलं, ऐकण्यातलं, अनुभवातलं असतं. हे सगळं कुठून येतं? ते असंच का? तसं का नाही? पूर्वीच्या काळी नक्की काय असायचं? पूर्वीचा काळ म्हणजे नक्की कुठला काळ? इथे असं तर तिथे कसं असेल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधली तर हाती लागतं ते फार गमतीशीर असतं.

माणसाच्या तीन मूलभूत गरजा अन्न, वस्त्र आणि निवारा हे आपण शाळेत असताना पाठ केलेलं आहे. या तिन्ही गरजांचा इतिहास म्हणजे आख्ख्या मानवजातीचा इतिहास आहे. राजकीय, सामाजिक, वैज्ञानिक सर्व प्रकारच्या स्थित्यंतरांचे प्रतिबिंब या इतिहासात पडलेले दिसते. विविध कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर माणसांचे स्थलांतर होते. अश्या स्थलांतरानंतर जी देवाणघेवाण होते त्यातून कपड्यांचा इतिहास नवे वळण घेत जातो. उदाहरणार्थ बघायचे तर पार त्या तिकडे इराणातून आलेल्या पारशी स्त्रियांचा पारंपरिक वेष एक ठराविक प्रकारची साडी असा असतो किंवा कोकणच्या किनाऱ्याला येऊन पोचलेल्या ज्यू लोकांनी नऊवारी साडी आपलीशी केलेली असते किंवा बंगालातल्या एकेकाळच्या भद्र स्त्रियांच्या साडीवर घालायच्या लाल ब्लाऊजला मडमेच्या झग्यासारखी पांढरी लेस लावलेली असते इत्यादी.

हे झालं नंतरचं, अगदी मुळाशी जायचं तर कपड्यांची सुरुवात झाली तिथे बघावं लागेल. पाषाणयुगातल्या काही गुहांमधली चित्रे आपल्याला मानवाने कपड्यांचा वापर सुरू केल्याचा पुरावा देतात. साधारण ३३,००० वर्षांपूर्वी. साधारण २७००० वर्षांपूर्वीच्या काही खापरांवर कापडाच्या धाग्यांचे अंश चिकटलेले मिळाले आहेत. अजून काही खापरांवर कपडे घातलेल्या माणसांची चित्रे आहेत. पण विणलेला असा कापडाचा तुकडा हा साधारण इसपू (इसवीसनपूर्व) ६५०० ते ७००० वर्षांपूर्वीचा आहे. हा सुती म्हणजे कापसापासून बनलेल्या कापडाचा तुकडा नाही. सध्यातरी शास्त्रज्ञ याला लिनेन म्हणजे जवसाच्या खोडापासून बनवलेल्या धाग्यातून विणलेले कापड मानतात. जवसाच्या शेतीचे पुरावेही या जवळच्या कालखंडात आणि परिसरात मिळालेले आहेत. जवसाची शेती आणि त्या कापडाच्या तुकड्याची वीण बघता धाग्यांपासून कापड विणायची कला इसपू ६५००-७००० च्याही बरीच आधी अवगत झाली असावी असे दिसते.

ऊन, पाऊस, थंडी यांच्यापासून संरक्षण म्हणून मानवाने कपडे वापरायला सुरुवात केली असे आपण शाळेत शिकलो. पण या संरक्षणाच्याही आधीपासून माणसाने स्वतःच्या शरीराला सजवणे सुरू केले होते. कधी झाडांची पाने अंगावर चिकटवणे, प्राण्यांच्या कातडीचा, नखांचा वापर, माती, दगड, फुलं यांच्यापासून मिळालेल्या रंगांनी अंगभर नक्षी काढणे, दगड, शंख, शिंपले, फुलं अश्या वस्तूंच्या माळा अंगावर घालणे आणि विविध प्रकारचे कपडे परिधान करणे अश्या अनेक प्रकारे शरीर सजवले जात असे. स्थलांतर केल्यावर नवीन हवामानाशी जुळवून घेता यावे, संरक्षण व्हावे यासाठीही कपड्यांचा वापर सुरू झाला.

एकाच रंगाचे कपडे, एकाच प्रकारच्या चपला रोज घालणे याचा जसा आजच्या मानवाला कंटाळा येतो तसाच तेव्हाच्याही मानवाला येत असणारच. आणि ड्रेस कोड असायला तो तेव्हा हापिसात, शाळेत वगैरे जात नव्हता. त्यामुळे शरीराच्या वेगवेगळ्या भागांना वेगवेगळ्या प्रकारे सजवून बघणे होता होते. त्यातून शरीर सजवण्याच्या पद्धती, प्रकार बदलत होते. नुसतंच संरक्षण हा हेतू असता तर हे बदल घडले नसते. वेगवेगळ्या प्रकारे कापड बनवण्याच्या प्रकारांचा शोध लागला नसता.

या मानवाला निसर्गातल्या बहुतेक सगळ्या गोष्टींचा कार्यकारणभाव माहिती नव्हता. जगण्याची इच्छा, मृत्यूची भीती या प्रेरणा नक्कीच होत्या. मग अमुक प्रकारे माळ घातली की अंधार पडल्यावर भीती वाटत नाही. अमुक एका प्राण्याचे नख बरोबर बाळगले की ढग भिववत नाहीत असे अनेक आडाखे योगायोगाच्या आधारांवर त्याने मांडले. तश्याप्रकारे ठरावीक वस्तू वापरू लागला आणि गंडेदोरे, ताईत व तत्सम सगळ्या बाजारपेठेला त्याने जन्म दिला.

शरीर सजवायच्या वेगवेगळ्या पद्धती बनत गेल्या त्याच सुमारास माणसांनी कळपाने, गटाने, टोळीने राहायला सुरुवात केली होती. टोळीतले स्थान, केलेले कर्तृत्व, मारलेल्या प्राण्यांची संख्या या सगळ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारे सजावट शरीरावर दिसू लागली. बुजलेले व्रण परत रंगवून शिकारीतल्या कर्तृत्वाची ओळख राहिल असे बघणे वगैरे गोष्टी सुरू झाल्या. यानंतर हजारो वर्षांनी, पंधराव्या शतकामध्ये, युरोपात पुरुषांच्या कपड्यांच्या बाह्यांना ठराविक अंतरावर छोटे छोटे कटस देऊन आतमधून वेगळ्या रंगाचे कापड लावायची पद्धत सापडते. रेनेसाँसच्या (इसवीसन १४००-१६००) अखेरीपर्यंत ही पद्धत स्त्रियांच्या गाऊन्सच्या बाह्यांवरही पसरल्याचे दिसून येते. या पद्धतीचे मूळ आपले शौर्य मिरवण्याची हौस यात असावे असा एक मतप्रवाह आहे. कपड्यांवर ज्या प्रकारे फाडले जाई ते तलवारीचे घाव असल्याप्रमाणे दिसत असे. तलवारीचा घाव आणि आतमधून वाहणारे रक्त असे शरीरावर मिरवणारा तो शूरवीर योद्धा मानला जाई.

पुरातन लिनेनचं कापड वापरणाऱ्या मानवाच्या टोळ्यांचा समाज बनत गेला तसा समाजाचे नियम बनत गेले. आणि मग सभ्यतेच्या कल्पनांचाही उगम झाला. शरीराचे नाजूक भाग आधी संरक्षणासाठी आणि मग सभ्यता म्हणून झाकले जाऊ लागले. त्यापलीकडे जाऊन शरीराचे ठराविक भाग झाकण्याचा संबंध सभ्यतेशी जोडला गेला. आणि लज्जारक्षण हा अजून एक पैलू कपड्यांना मिळाला.

माणसांच्या टोळ्या जगाच्या ज्या ज्या प्रदेशात स्थिरावल्या तिथले हवामान, तिथे उपलब्ध असलेल्या वस्तू, तिथे पिकू शकणाऱ्या गोष्टी, तिथल्या गरजा या सगळ्याला धरून त्यांच्या कपड्यांचे स्वरूप ठरत गेले. जगभरातले कपडे बघितले तर या प्रादेशिक वैशिष्टयांवरून दोन गट करता येऊ शकतात. एक म्हणजे शरीराच्या आकारानुसार शिवून तयार केलेले कपडे आणि सलग कापड अंगाभोवती वेगवेगळ्या प्रकारे गुंडाळून तयार केलेले कपडे असे जगभरातल्या कपड्यांचे दोन गट आपल्याला करता येऊ शकतात. जिथे उष्ण हवामान आहे तिथे कापूस पिकू शकतो आणि त्यातून लांबच्या लांब कापड विणता येऊ शकते. हवामान उष्ण असल्याने कपडे असे हवेत ज्यात महत्वाच्या भागांचे सरंक्षण होईल आणि हवाही खेळती राहिल. यातून शरीराभोवती गुंडाळून तयार करायच्या कपड्यांचा जन्म झाला. तर जिथे थंड हवामान आहे तिथे कापूस किंवा जवस पिकू शकत नाही. पण प्राणी मोठ्या संख्येने असतात. मग प्राण्यांना मारून त्यांचे कातडे कपड्यासाठी वापरणे गरजेचे झाले. कपडे उबदार असायला हवेत तर ते अंगाबरोबर असायला हवेत. त्यात हवा शिरून चालणार नाही. यातून शिवणाच्या कलेचा उदय झाला. लोकरीसाठी मेंढ्या पाळणे, त्यांच्या लोकरीतून धागा बनवून त्यातून उबदार कपडे बनवणे हे मानवाला माहिती व्हायच्या बरेच आधीपासून कातड्याचे दोन तुकडे एकमेकांना शिवून जोडणे हे अस्तित्वात आलेले होते. जगातली हातशिलाईची सगळ्यात जुनी सुई ही पक्ष्याच्या हाडापासून बनवलेली आहे. आजपासून ५०००० वर्षांपूर्वी. पक्ष्याची हाडे, लाकूड, हस्तीदंत, तांबं असा प्रवास करत करत आजच्या सुईच्या जवळ जाणारी लोखंडाची सुई इसपू तिसऱ्या शतकात बनलेली आढळते.

माणसे एका जागी स्थिरावली, त्यांचा समाज बनला आणि मग त्यातून संस्कृती बनली. जगभरातल्या सगळ्यात प्राचीन संस्कृतींपैकी एक भारतीय उपखंडात सापडते. जिच्याबद्दल आपण शाळेत शिकलो ती मोहेंजोदरो आणि हरप्पाची सिंधू संस्कृती. इथे मिळालेल्या अवशेषांच्यात एक पूर्ण जीवनशैली आहे. माणसांची घरे आहेत. त्यांची भांडीकुंडी आहेत. एक राजा आहे, एक नर्तिका आहे, या संस्कृतीची नाणी आहेत. पण या काळातल्या कपड्यांबद्दल मात्र अगदी जुजबी पुरावे आहेत. कापडाचोपडाचे अवशेष अस्तित्वात नाहीत. पण सापडलेल्या काही मूर्तीमध्ये कपड्यांच्या रेषा आहेत. हे कपडे म्हणजे शक्यतो शरीराभोवती कापड गुंडाळून तयार केलेले कपडे आहेत. तसेच बहुतांश मूर्ती या कपड्यांशिवायही आहेत. संशोधकांच्या मते तेव्हा सुती, लिनेन आणि कमी प्रतीचे रेशमी कापड वापरले जात होते. प्रत्यक्ष कपडे, कापडे काही मिळालेली नसली तरी सिंधूच्या तीरावर वसलेल्या या संस्कृतीतले स्त्रीपुरुष विविध प्रकारचे दागिने घालत होते हे सिद्ध करणाऱ्या अनेक वस्तू मिळालेल्या आहेत. कपड्यांशिवाय असलेल्या मूर्तीही दागिन्यांच्याशिवाय नाहीत. शरीर सजवण्याच्या प्रेरणेचा हात माणसाने इथेही सोडलेला दिसत नाही. लाकूड, प्राण्यांची हाडे, हस्तिदंत, वेगवेगळे धातू, पितळ्यासारखे मिश्र धातू, माती, लॅपिस लजुली सारखे खडे व मणी यांचा दागिन्यांमध्ये वापर केलेला दिसतो. खड्यांना धातूचे कोंदण करण्याची कला या संस्कृतीतील माणसाला अवगत होती. जगभरात दागिने बनवायच्या कलेची सुरुवात ही पहिल्यांदा सिंधू संस्कृतीमध्ये दिसून येते.

या काळाला वेदपूर्व कालखंड म्हणले जाते. रामायण आणि महाभारत घडले असल्यास या काळानंतरच आणि पहिले भारतीय साम्राज्य (मौर्य साम्राज्य) उदयाला यायच्या आधी म्हणजे वैदिक कालखंडाच्या दरम्यान घडले असू शकते असा संशोधकांचा मतप्रवाह आहे. या दोन्ही कालखंडांना एकेका बाजूला ठेवून मग रामायण आणि महाभारत काळातले कपडे, दागिने यांचा वेध घ्यायचा प्रयत्न केला तर जे चित्र मिळतं ते मात्र आपल्याला चक्रावून टाकणारं असतं.

लहानपणापासून बघितलेले सागर आणि चोप्रांच्या सिरीयलमधल्यासारखे प्लास्टिकची चमक असलेले पायघोळ धोतर राम नेसत नाही. व्हेलवेट, मोत्यांच्या माळा आणि जरिचा भरपूर वापर केलेले युद्धाचे चिलखत नसते. सीता व्यवस्थित शिवलेले फुलं कटोरी ब्लाऊज घालत नाही. जिथे बघावं तिथे जर लावून चकचकीत केलेला कृष्णाचा ड्रेस नसतो. युद्धामध्येही न मळणारे कपडे चुकूनही सापडत नाहीत.

आता हे कसे काय बरे? ही आणि वेशभूषेच्या हजारो वर्षांच्या प्रवासातल्या अजून अश्याच गमतीजमती या लेखमालेत तुम्हाला सांगणार आहे.

- नी 
(दैनिक लोकमत - सखी पुरवणी - जाने. २०१८ मधे प्रकाशित)
हे सर्व कुठून येते? २९ जानेवारी २०१८

Search This Blog