Wednesday, September 14, 2016

लंब बेटावरील बर्फाळ चहा! (Long Island Ice Tea)

दारू या शब्दाने डोके फिरत असेल तर पुढचे वाचू नका.  ही केवळ एक रेसिपी आहे. ज्याला दारू केवळ आस्वादासाठी प्यायची माहितीये त्यांच्यासाठीच आहे.
----------------------------------------------------------------------------------
लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 
बर्फाचे तुकडे
कोकाकोला
लिंबू
पुदिन्याची पाने
उंच ग्लास
दारवा
५ व्हाइट दारवा
१. व्हाइट रम
२. सिल्व्हर टकिला
३. व्होडका
४. जीन
५. ट्रिपल सेक किंवा कॉइंत्रु किंवा व्हर्माउथ/ व्हर्मूथ( vermouth) (शक्यतो ऑरेंज लिक्योर्स)
क्रमवार पाककृती: 
उंच ग्लासाच्या कडेला जेमतेम मीठ लावून घेणे.
ग्लासात २/३ पातळीपर्यंत बर्फाचे तुकडे भरायचे.
मग काचेच्या स्टररवरून एकेक अल्कोहोल सोडायचे.
पाचही अल्कोहोल्सचे प्रमाण १:१:१:१:१ असे हवे.
नवखे असाल तर प्रत्येकी १५ मिलि च घ्या. मिडियम टॉलरन्स असेल तर २० मिलि चालेल. टाकी असाल तर ३० मिलि प्रत्येकी घ्यायला हरकत नाही.
दारवा ग्लासात स्थानापन्न झाल्यावर मग हळूहळू कोक सोडायचा. फुगायला जागा राहील इतपत. लिंबाचे चार थेंब टाकायचे.
गार्निशला एकदोन पुदिन्याची पाने.
ग्लासला लिंबाची चकती खोचायची.
आणि मग चांगभलं!! 
वाढणी/प्रमाण: 
असा एक ग्लास करायचा. :)
अधिक टिपा: 
आपण प्यायलेल्या दारूची मजा आपल्यालाच मिळायला हवी. इतरांचे मनोरंजन हा हेतू नाही त्यामुळे बॉटम्स अप करायचं नाही. हळूहळू पित जायचं. पाची द्रव्यांपैकी प्रत्येकाची वळणे, चवी ओळखत घोळवत ग्लास संपवायचा.
यानंतर चुकूनही ड्रायव्हिंगच्या फंदात पडायचे नाही. आपला टॉलरन्स वाला इगो चपला काढल्यासारखा बाजूला ठेवायचा.
माहितीचा स्रोत: 
माझ्या अ‍ॅSथेन्स, जॉSज्या च्या डाऊनटाऊनात द ग्लोब म्हणून बार होता(अजूनही असेल कदाचित!). आजवर चाखलेल्या लंब बेटावरच्या बर्फाळ चहांपैकी सर्वात उत्तम त्या ठिकाणी असायचा. तिथल्या रेसिपीला इंटरनेटवरच्या रेसिपीने गुणून ही रेसिपी झालेली आहे.

- नी

कैरी मार्गारिटा व कैरी आंबा मार्गारिटा

दारू या शब्दाने डोके फिरत असेल तर पुढचे वाचू नका.  ही केवळ एक रेसिपी आहे. ज्याला दारू केवळ आस्वादासाठी प्यायची माहितीये त्यांच्यासाठीच आहे.
----------------------------------------------------------------------------------
लागणारा वेळ:  
तयारी + ५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 
बर्फ
कैरीचा रस
पिकलेल्या आंब्याचे तुकडे वा रस (ऑप्शनल)
मीठ
मिक्सर
दारवा
व्हाइट/ सिल्व्हर टकिला
कुठलीही ऑरेंज लिक्यॉर - ट्रिपल सेक(Triple Seq) किंवा कॉनत्रॉ/ कॉनत्रु/ कॉन्ट्रो(Cointreau)
क्रमवार पाककृती: 
लागणारा वेळ हा कैरीचा रस काढायला लागणारा वेळ न लक्षात घेता दिलेला आहे. कैरीचा रस ही पूर्वतयारी आहे. तो विकतचा असल्यास (असतो का हे माहित नाही) त्याचे प्रमाण चव घेऊन मग ठरवावे. शक्यतो स्वतःच करावा.

कैरीचा रस काढायची पद्धत -
कैरीची साले काढून तुकडे करायचे. ते तुकडे मिक्सरमधून अगदी गंधासारखे बारीक वाटण होईल एवढे फिरवायचे. यासाठी थोडे पाणी घालावेच लागेल. पण गरजेपेक्षा जास्त पाणी घालू नये.
हे वाटण कापडातून गाळून घ्यावे. पटकन सगळे गाळले जाणार नाही तर सरळ कापडात पुरचुंडी करून चक्क्यासारखे टांगून खाली पातेले ठेवायचे. तास दीड तास ठेवून द्या आणि कंटाळा आला की शेवटी ती पुरचुंडी पिळून घ्या.
हा रस बाटलीत/ डब्यात भरून फ्रिजात (त्याच दिवशी बनवायची असेल तर) किंवा डिप फ्रिजात (दोन तीन दिवसांनी करायची असेल तर) ठेवून द्या.
आंबा फ्लेवरही आणायचा असेल तर आपल्या आवडीप्रमाणे हापूस/ पायरीच्या व्यवस्थित पिकलेल्या आंब्याचे तुकडे वा रस करून ठेवावे. हे मात्र आयत्यावेळेलाच कारण पिकलेल्या आंब्याची चव कापून ठेवल्यावर उतरते हे आपल्याला माहित आहेच.
शक्य झाल्यास प्रत्यक्ष सर्व्ह करायच्या तासभर आधी मार्गारिटाच्या ग्लासांच्या कडा कैरी रसाने किंचित ओल्या करून त्यावर मीठ लावून ते ग्लासेस फ्रीजमधे ठेवून द्यावे.
आता प्रत्यक्ष सर्व्ह करायच्या वेळेस करायच्या गोष्टी
एरवी मार्गारिटामधे लिंबाचा रस असतो. इथे आपण कैरीचा रस हा लिंबाच्या रसाऐवजी वापरत आहोत. लिंबापेक्षा कैरीचा रस आंबट जास्त असतो त्यामुळे आपण काढलेल्या रसाची चव घेऊन मग पाणी घालून थोडा डायल्युट करावा. मात्र डायल्युट करून स्टोर करू नये. ते आयत्या वेळेलाच करावे.
टकिला (२ भाग) + ऑरेंज लिक्योर(१ भाग) + कैरीचा डायल्युटेड रस(दीड भाग) + बर्फ (१ भाग) असे मिक्सरात घालावे एकदा फिरवावे. बर्फाचा चुरा होणे गरजेचे. हेच हॅण्ड ब्लेण्डरनेही करता येऊ शकते.
मग फ्रिजातले फ्रॉस्ट केलेले ग्लासेस काढून त्यात हे मिश्रण ओतावे. एका ग्लासामधे एकूण साधारण ७५ मिली एवढे मिश्रण ओतावे.
बर्फाऐवजी बर्फचुरा तयार असेल तर तो १ भाग बर्फचुरा आधीच प्रत्येक ग्लासात भरावा. मग मिक्सरात/ ब्लेंडरमधे वेगळा बर्फ घालू नये.
असे गारेगार झालेले ग्लास लग्गेच लोकांना प्यायला द्यावे.
आंबा फ्लेवर मार्गारिटा -
वरच्या सगळ्या मिश्रणात अर्धा भाग एवढे आंब्याचे तुकडे/ रस घालावे. मिक्सरमधून फिरवताना तुकडे/ रस अगदी एकजीव व्हायची गरज नाही. पण पिताना मोठे मोठे तुकडे किंवा रसाच्या गुठळ्याही यायला नकोत मधे मधे एवढेच फिरवावे.
चीअर्स!!!
वाढणी/प्रमाण: 
अंदाजपंचे दाहोदरसे!
अधिक टिपा: 
ओरिजिनल मार्गारिटामधे टकिला : ऑरेंज लिक्योर : लिंबाचा रस : फ्लेवर याचे प्रमाण थोडे वेगळे असते. हे प्रमाण आपण आपल्या टॉलरन्स आणि चवीप्रमाणे कमी जास्त करू शकतो. कैरी-आंबा मार्गारिटा साठी मी वर दिलेले प्रमाण माझ्यासाठी आणि माझ्या मित्रमंडळींच्यात आवडलेले आहे. तुम्ही प्रयोग करून टकिला वाढवू शकता 
माहितीचा स्रोत: 
इंटरनेट, विविध ठिकाणी घेतलेली मार्गारिटाची चव, प्रयोग

- नी

Monday, September 12, 2016

सबटायटल्सच्या नावानं!!

एवढ्यातच सबटायटल्स किती विचित्र असतात यासंदर्भातले उदगार वाचायला मिळाले. ते वाचून सबटायटल्स या प्रकाराबद्दल ’जे जे आपल्यास ठावे, ते ते इतरांना सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन!’ या भावनेने सबटायटल्स बद्दल काही प्रवचन करणार आहे.
तुम्हाला चित्रपट ज्या भाषेतला आहे ती भाषा येत असेल तर ती सबटायटल्स तुम्ही वाचण्यासाठी नाहीत. सिनेमा बघा. सबटायटल्स वाचण्यात आपला वेळ घालवू नका. पण ते करायचेच असेल तर निदान काही मुद्दे लक्षात घ्या.
पुस्तकाचे भाषांतर व सबटायटल्स यात भाषांतर हा समान धागा असला तरी जमीन अस्मानाचा फरक असतो. पुस्तकाचा आस्वाद घेताना पुस्तकातील मजकूर हे एकमेव साधन असते. जे मूळ भाषेत लिहिले असेल ते दुसर्‍या भाषेतही नेमकेपणाने पोचवण्यासाठीही भाषांतरीत मजकूर हेच साधन असते. त्यामुळे तो मजकूर जास्तीत जास्त नेमकेपणाने, मूळ भाषेचा लहेजा सांभाळत पण दुसर्‍या भाषेतही आपसूक वाटेल अश्या प्रकारे आणावा लागतो. कधी कधी काही संकल्पना ज्या मूळ भाषेशी निगडीत संस्कृतीत अगदीच रोजच्या असतात त्या दुसर्‍या भाषेत जाताना त्या संस्कृतीला अनोळखी असतील तर थोड्या विस्ताराने समजावून द्याव्याही लागतात. तसेच मूळ भाषेत एखादे वाक्य ४ शब्दांचे असेल तर त्याचे भाषांतर करताना ७ शब्द करण्याची मुभा नक्कीच असते.
सबटायटल्स ही चित्रपटातली मौखिक भाषा न समजणार्‍याला टेकू म्हणूनच केवळ आलेली असतात/ असायला हवीत. चित्रभाषा ही बरीचशी जागतिक असते. आणि चित्रपटात सिनेमामधे समोर जे दिसत असते, ऐकू येत असते - म्हणजे भाषा कळली नाही तरी भाषेचा ताल, बोलणार्‍याच्या स्वरांचे चढ उतार वगैरे - यातून बरेच काही पोचत असते. पोचायला हवे. याउपर जे तपशील असतात ते सबटायटल्समधून पोचतात.
चित्रपट बघतानाच ही सबटायटल्स वाचली जातात त्यामुळे बघणार्‍याला ते वाचण्यासाठी वेगळे श्रम घ्यावे लागणार नाहीत, सिनेमा बघण्याकडे त्याचे दुर्लक्ष होणार नाही अश्या प्रकारे ही सबटायटल्स ठेवावी लागतात.
फ्रेममधली मूळ अ‍ॅक्शन झाकली जाऊ नये म्हणून फ्रेमच्या तळाला सबटायटल्स असतात. पण अगदी पाताळात गेल्यासारखी तळाच्या कडेला चिकटून ठेवून चालत नाही. त्यामुळे एका सबटायटलमधे दोनच ओळी योग्य ठरतात. त्याहून जास्त ओळी सिनेमा बघायला अडथळा आणू लागतात.
तसेच फ्रेमच्या डाव्या कडेपासून उजव्या कडेपर्यंत पसरलेली सबटायटल्स चित्रपटाच्या पडद्यासाठी त्रासदायक होतील. प्रत्येक संवादाच्या वेळेला बघणारा माणूस सबटायटल्स वाचण्यासाठी डावीकडून उजवीकडे नजर फिरवू शकत नाही. चक्कर येईल ना राव असे करून! :) त्यामुळे एका दृष्टीक्षेपात ते वाक्य वाचता यावे लागते. म्हणजेच डावी व उजवीकडून साधारण मध्यात असे ते वाक्य ठेवावे लागते. म्हणून चित्रपटांमधे एका ओळीत साधारण ३७ कॅरेक्टर्स विथ स्पेस यापलिकडे जाता येत नाही असा एक नियम आहे.
म्हणजे एक सबटायटल हे एका ओळीत जास्तीत जास्त ३७ कॅरेक्टर्स (विथ स्पेस) अश्या जास्तीत जास्त दोन ओळी एवढेच असू शकते.
आता यानंतर महत्वाचा म्हणजे वाक्य बोलण्यासाठी लागलेला वेळ. एक वाक्य बोलायला उदाहरणार्थ तीन सेकंद लागली असतील तर त्या वाक्याचे सबटायटल हे ही तेवढाच वेळ म्हणजे तीन सेकंदच दाखवता येते. ते तेवढ्यातच वाचून पुरे व्हावे लागते कारण त्या तीन सेकंदांच्या नंतर पुढचा संवाद असतो आणि पुढचे सबटायटल असते.
या सगळ्या बंधनांमुळे सबटायटल्समधे भाषा लालित्य अर्थातच कमी असते. म्हणजे आता बघा की ३७ कॅरेक्टर्समधे बसवताना शब्दाचे स्पेलिंग जितके लहान तितके बरे हे करावे लागणार. मग निवडलेला शब्द भाषालालित्य पातळीवर जरा कमी मार्कांचा असू शकतो.
सगळ्या संकल्पना जशाच्या तश्या भाषांतरीत होत नाहीत. एका भाषेत २ शब्दात जे सांगून होते ते इंग्रजीत लिहायला १० शब्दांचे वाक्य खर्ची घालावे लागते. ते तर शक्य नसते. मग कधी शब्दश: भाषांतर किंवा कधी जेमतेम सूचक भाषांतर केले जाते कारण बाकीचा मुद्दा संदर्भाने कळायला पडद्यावरची अ‍ॅक्शन असतेच.
जेव्हा चित्रपटाची मौखिक भाषा ही ग्रामीण, ठराविक लहेजाची वगैरे असते किंवा म्हणी, वाकप्रचारांचा अंतर्भाव असतो किंवा काव्यात्म शब्द असतात तेव्हा या सगळ्या बंधनात राहून केलेले भाषांतर थोडे कृत्रिमच वाटते. त्याला पर्याय नाही.
सबटायटल्स जेव्हा भाषांतरीत करण्यासाठी भाषांतरकाराकडे येतात तेव्हा ते शॉट बाय शॉट संवाद तोडलेले असतात किंवा सबटायटलचे पंचिंग जसे केले जाणार त्याप्रमाणे संवाद तोडलेले असतात. आणि ते तसेच भाषांतरीत करायचे असते.
एखादे बोललेले वाक्य लांबलचक असते. त्याचे दोन भाग पडू शकत असतात. अश्या वेळेला अनेकदा मराठीत जसे बोलले जाते त्याच्या बरोबर उलट म्हणजे दुसरा भाग आधी आणि पहिला भाग नंतर अशी रचना इंग्रजीत जास्त बरोबर असते. पण हे करता येत नाही. कारण जे बोलले आहे तेच त्या वेळेला सबटायटलमधे येणे सर्वसाधारणत: अपेक्षित असते.
अश्या अनेक कारणांमुळे सबटायटल्स हा उत्तम इंग्रजी साहित्याचा नमुना होऊ शकत नाही. अर्थात या सगळ्या मुद्द्यांना विचारात घेऊनही सबटायटल्स भाषांतरीत करणार्‍या व्यक्तीच्या कौशल्याचेही योगदान महत्वाचे असतेच.
सबटायटल्स म्हणजे काहीतरी विचित्र भाषांतर अश्या प्रकारच्या टिप्पण्या करण्याआधी हे सगळे ध्यानात घेतले जावे एवढीच एक अपेक्षा.
बाकी हल्ली सगळेच सूज्ञ, तज्ञ वगैरे असतातच..

- नी

Wednesday, February 17, 2016

अद्भुताचा प्रवास!

हा प्रवास ऑक्टोबर २००७ मधला आणि लिखाणही तेव्हाचंच. २००७ च्या मायबोली दिवाळी अंकात हा लेख होता. 
-------------------------------------------------------------------------------------------------------
"किती वळणं, आणि रस्त्याला एक पाटी नाही. काय तुमच्या रत्नागिरी जिल्ह्यातले रस्ते रे!" मी वैतागून कळवळून नवर्‍याला म्हटलं. आणि तो नेहमीप्रमाणे हसायला लागला मिशीतल्या मिशीत.
गेले दोन दिवस गुहागर परिसरात फिरत होतो आणि आज निघालो होतो लाँचच्या सफरीसाठी. आधी कामानिमित्ताने ही सफर संदीपने केलेली असल्याने त्याच्याकडून वर्णनं ऐकली होती. त्यामुळे कोकणात ट्रीपला जायचं ठरल्यावर ही सफर करायचीच असं वदवून घेतलं होतं त्याच्याकडून. तिथे पोचायच्या आधी मात्र माझा धीर सुटत चालला होता. रस्त्याला पाट्या नसल्याने आम्ही दोन वेळा चुकलो होतो रस्ता. लाँचवाल्याचा फोन येऊन गेला होता. तो कधीचा धक्क्यावर येऊन थांबला होता.
ही सफर होती जयगड खाडीतून. फुणगुस नावाच्या गावापासून जयगड बंदरापर्यंत. मोटर लाँचचा प्रवास होता. आणि वाटेत सावंतांचं भातगाव लागणार होतं. संगमेश्वरहून रत्नागिरीला जाताना रत्नागिरीच्या अलिकडे २०-२५ किमी वर हायवेच्या उजव्या बाजूला निवळी फाटा लागतो. त्या फाट्याला लागायचे. हाच रस्ता पुढे जयगड बंदराकडे आणि गणपतिपुळ्याकडे जातो. थोड्या वेळाने उजवीकडे भातगाव, फुणगुस असा फाटा लागतो. तिथे उजवीकडे वळायचं. मग परत भातगाव आणि फुणगुस असे दोन फाटे लागतात. त्यातला फुणगुस फाटा पकडायचा आणि पुढे जायचे. या नंतर रस्त्यावर पाट्यांचे दगड आहेत पण नावं असतीलच असं नाही. साधारण खाली खाली उतरणारा रस्ता तो आपला असं समजायचं.
तर एकदाचे पोचलो फुणगुसला विचारत विचारत. दुपारचे साडेतीन झाले होते. जेट्टीपर्यंत जायला अजून(२००७ मधे) चांगला रस्ता झाला नाहीये पण काम चालू आहे. आणि फुणगुसच्या इथून खाडीवर पूल पण होतोय. जिथपर्यंत गाडी पोचत होती तिथे उतरून पुढच्या तीन चार तासांसाठी तहानलाडू, भूकलाडूच्या गोष्टी काखोटीला मारून आम्ही धक्क्याशी आलो. ड्रायव्हरला गाडी घेऊन जयगडला पाठवून दिलं. युसुफ टेमकर म्हणजे आमचे लाँचवाले, आमची वाटच पहात होते.
पटकन मोटर लाँच मधे बसलो आणि प्रवास सुरू झाला. जयगड खाडी किंवा शास्त्री नदी फारशी रूंद वाटत नव्हती. एका बाजूला संपूर्ण हिरवा पट्टा आणि उजव्या बाजूला फुणगुसचा धक्का असं दृश्य दिसत होतं. बोटीमधे कडेला लागून बसायची फळी होती. त्यात एका बाजूला मी बसले. सरळ बसले तर बसल्या बाजूच्या समोरची विरूद्ध बाजू दिसत होती पण लाँचच्या छपराने कापल्यासारखी आणि वाकडं बसल्यावर आपली बाजू दिसत होती. असं तीन तास जायचं? असा म्हातारा विचार आलाच माझ्या डोक्यात. नाही म्हटलं तरी गुहागर परिसरातल्या वळणांच्या रस्त्यांनी दमवलं होतंच. हे सगळं प्रवास सुरू होऊन चार पाच मिनिटांपर्यंतच.
फुणगुस कधीच मागे पडलं होतं. खाडीचं पात्र मिनिटागणिक रूंदावत होतं. ऊन होतं तरी लांबवर पसरलेलं पाणी आणि बाजूचा हिरवाकंच अवकाश डोळ्याला, मनाला शांत करत होता. शाळेतल्या धड्यातले, तेव्हा तद्दन खोटे वाटलेले 'हिरव्या शालूने धरीत्री नटली होती, देवाच्या कुंचल्याने काढलेले सुंदर चित्र' इत्यादी वाकप्रचार अचानक खरे वाटायला लागले. हिरवा रंग हा इतक्या तर्‍हांनी आणि हरकतींनी येऊ शकतो हे बघायला मजा वाटत होती. आपल्याला असं कधी रंगवता येईल का असे मूर्ख विचारही येत होते डोक्यात. पण एकूणात पाण्याच्या सोनेरी ते काळा अश्या सर्व तर्‍हा, मातीचं लालभडक्कपण, ती हिरवाई आणि वरती स्वच्छ आकाश असं जे काय माझ्याभोवती होतं ते मी पिऊन घेत होते. आत आत रूजवत होते. डोळ्यात साठवू की कॅमेर्‍यात साठवू असंही होत होतं.

फुणगुस सोडल्या सोडल्या समोरचा विस्तार
 

सुरूवातीला फुणगुसनंतर बरीच छोटी छोटी गावं आहेत किनार्‍याला लागून आणि त्यांचे छोटे छोटे धक्केही. तिथून तरींनी वाहतूक चालते या किनार्‍यापासून त्या किनार्‍यापर्यंत. काही तरी मासे पकडणार्‍यांच्याही होत्या. त्यातल्या एका तरीचा काढलेला फोटो. फोटो काढल्यावर या तरीतल्या मावशींनी अगदी मस्त हात हालवून दाखवला मला.
तरीतल्या मावशी.


बाजूला तरीतल्या मावशी होत्या आणि समोर वेगळंच आश्चर्य उलगडत होतं. जयगड खाडी ही सरळसोट खाडी नाही. डोंगरांमधून वळत वळत ती जाते. त्यामुळे समोर बघितलं की दोन्ही बाजूंनी येणारे डोंगर कुठेतरी दूर कोपर्‍यात एकमेकाच्या पुढे येत ओव्हरलॅप करत असतात. त्यातून एक मस्त छायाप्रकाशाचा खेळ तयार होतो. मग हळूहळू आपण पुढे गेलो की ते डोंगर एकमेकांपासून दूर होतात, पाणी वाढत जातं आणि मग एखादा डोंगराचा चुकार पाय मधेच असतो की ज्याला वळसा घालून आपली शास्त्री नदी समुद्राकडे जायचा मार्ग शोधत गेलेली असते आणि मग मागोमाग आम्हीही. मधे मधे ही अशी बेटंही दिसायची.

रूंदावत जाणारं पात्र आणि मधेच दिसणारं अस्पर्श्य बेट
आता एका बाजूला बघणं आणि दुसर्‍या बाजूचं राहून देणं हे शक्य होत नव्हतं त्यामुळे मी सरळ लाँचच्या नाकावर जाऊन बसले. सगळ्या लाँचच्या पुढे मी त्यामुळे आपण कसले सॉल्लिड आहोत असं वाटायला लागलं मला. आता समोर येणार्‍या अद्भुताला मी पहिल्यांदा सामोरी जाणार होते. आमच्या लाँचशिवाय तिथल्या परीसरात कुठलाच मानवी स्पर्श नव्हता दिसत आणि ह्या अस्पर्श्याला मी एक माणूस पहिल्यांदा स्पर्श करणार होते असं आपलं मला वाटत होतं.
 साधारण अर्धा तास होत आलेला होता प्रवास सुरू होऊन आणि दूरवर पुसटसा एक पूल दिसायला लागला. हाच तो नवीन झालेला राई-भातगाव पूल. तो पूल दिसायला लागल्यावर माझा नवरा एकदमच खुशीत आला. भातगावाशी लहानपणापासूनचं नातं ना त्याचं! एवढ्या सगळ्या निसर्गात ती मानवी अस्तित्वाची खूण मोठ्या दिमाखात उभी होती. काय गंमत आहे ना शेवटी आपण सगळे मानवच. सुंदर निसर्ग आवडतो पण तो जर संपूर्ण अस्पर्श्य असेल (मानवाचा स्पर्श जाणवणार नाही असा) तर भिववतो तो आपल्याला. मग बाजूच्या गावांचे धक्के, तुरळक भातशेती, एखादी तर, एखादं एकांडं घर किंवा आता हा पूल असं काही दिसलं की आपल्याला सुरक्षित वाटतं आणि त्याच खुणा आपण आठवणी म्हणून घेऊन येतो..
लाँचचं नाक आणि दूर जिथे डोंगर जवळ आल्यासारखे दिसतात तिथे दिसणारा राई-भातगाव पूल.
 हा पूल असा अस्पष्ट दिसायला लागल्यापासून पुलाशी पोचेतो निदान वीसएक मिनिटं तरी जातात. वाटेत लागलेल्या गावांची नावं युसुफ टेमकर सांगत होते पण ती सगळी लक्षात रहाणं अवघड वाटायला लागल्यावर मी नाद सोडला. तशीही मी आता शाळेत नव्हते आणि मला कुणी "कोकणची सहल" असा निबंध लिहून आणायला सांगणार नव्हतं. त्यामुळे नावं लक्षात ठेवण्यापेक्षा मी बाजूचं अद्भुत अनुभवत बसले. आणि क्षणाक्षणाला जवळ येणारा तो पूल डोळ्यात साठवत बसले!
हा असा पूल आता नजरेच्या टप्प्यात न मावणारा..
हा एवढा थोरला पूल हळूहळू जवळ येतो आणि आपली मान हळूहळू वर वर जायला लागते. पूल मोठा मोठा होत अगदी डोक्यावर येतो आणि मग मागे निघून जातो.. मस्त अनुभव असतो हा. 
पूल मागे टाकला आणि उजव्या बाजूला भातगाव सुरू झालं. मगाच्याच सारखं अस्पर्श्य हिरवं जंगल असलेला डोंगर. मधेच एखादी दरड कोसळल्याने उघडा पडलेला मातीचा लाल भाग. नारळाच्या झाडांची दाटी दिसली तर ती वस्तीची खूण. इथून जात असताना मग संदीप मला सांगत होता
"हे बघ तो पट्टा दिसतोय ना त्या नारळीपासून ते तिथे मधेच पोपटी असं दिसतंय ना तिथवर आपली जमीन आहे.",
"त्या तिथे ते वरती एकच झाड दिसतंय ना त्याच्या खाली ती नारळाची झाडं आहेत तिथेच बघ एका घराचं कौलारू छप्पर दिसतंय ती आपली वाडी.. आपण गेलो होतो ना दोन वर्षांपूर्वी ती.",
"पूर्वी गाडीचा रस्ता नव्हता भातगावात जायला. भाऊच्या धक्क्यापासून जयगड खाडीपर्यंत बोट यायची. चांगली दोन तीन मजली. मग तिथून गावापर्यंत यायला पडाव पाठवलेला असायचा आजीने. बोटीतून उतरून पडावात बसायचं. आणि तीन चार तासानी भातगावला उतरायचं. आजीने गडी पाठवलेले असायचे. ते सामान घ्यायचे, मला डोक्यावर घ्यायचे आणि मग आम्ही डोंगर चढून सकाळी ८-१० च्या सुमारास घरी पोचायचो. आदल्या दिवशी सकाळी मुंबईतून निघालेले आम्ही असे २४ तासांनी घरी पोचायचो."
यानंतर मग आजीच्या आठवणी, घराच्या आठवणी, गावाच्या आठवणी... मला तो तिसंग भातगाव ते दुर्गा भातगाव असा सगळा दोन तीन डोंगरांचा परिसर एकदम ओळखीचाच वाटायला लागला. संदीपच्या आजीला मी कधी पाह्यलं नाही पण ती पण ओळखीची वाटायला लागली.

भातगावचा खाडीत घुसलेला डोंगर. या डोंगराच्या मागेही भातगावचाच डोंगर आहे.
 
लाल माती, हिरवी श्रीमंती आणि आत घुसलेल्या पाणवाटा


उजव्या बाजूला भातगाव होतं तर समोर हे असं अस्सल झळाळतं सोनं

भातगावातला शेवटचा धक्का मागे पडला. समोर बघतो तर नदी वळण घेताना दिसली. 'ही परत वळली..!' मी म्हणाले.. आणि वळण अनुभवत राह्यले.
अशी नदी वळली.
 योगसाधनेतलं मला काही कळत नाही पण तपाचरणासाठी निसर्ग जवळ का करत असावेत लोक हे कळायला लागलं होतं मला. विचार येत होते, जात होते. मला ना ते आलेले कळत होते ना जाताना ऐकू येत होते. समोरच्या अथांगाशी तंद्री लागली होती. आता ना कुठल्या जेट्ट्या दिसत होत्या. ना कुठल्या वाड्या वस्त्या, ना कुठली भातशेती. फक्त जंगल. मधूनच उडणारे पक्षी एवढीच जाग आमच्या लाँचच्या आवाजापलिकडे.


चिरतंद्रा... मी नव्हे नदी..

सूर्यास्ताची वेळ होत चालली होती आणि खास आमच्यासाठी सूर्य, जंगल, नदी सगळ्यांनी मिळून रंगांचा खास खेळ ठेवला होता. आणि आम्ही क्षणोक्षणी अवाक होण्यापलिकडे काही करू शकत नव्हतो. फोटो काढले, डोळे भरून पाह्यलं, मनभरून पिऊन घेतलं पण तरी ती सगळी गंमत आमच्या कवेत मावेचना. एक अजून गंमत दिसत होती. आत्तापर्यंत दूरवरूनच नदी नक्की उजवीकडे वळतेय की डावीकडे ते कळत होतं पण आता पात्र इतकं रूंदावलं होतं आणि समोरचा पाण्याचा विस्तार उजव्या व डाव्या दोन्ही बाजूला वळतोय कारण नाकाडासमोर डोंगर आलाय असं दिसायला लागलं. मग आता आपली लाँच उजवीकडे वळेल की डावीकडे अश्या गप्पा दर वळणाला सुरू झाल्या. नाकासमोर डोंगर आणि वरती सूर्य आल्याने ही गंमत कॅमेर्‍यात साठवता आली नाही.

असं सोन्याचं पाणी

नंतर मधेच कुठेतरी प्लॅस्टीकचा किंवा थर्माकोलचा एखादा ठोकळा पाण्यावर तरंगताना दिसायचा. आता असे बरेच ठोकळे दिसायला लागले. तिथे जाळी टाकलीयेत मासे पकडायला टेमकरांनी माहिती पुरवली. याच वेळेला परत लोकवस्ती दिसायला लागली. गाव तर अगदी काठाला वसलेलं. दुमजली घरं, नारळाची सरळसोट खोडं, काठालगत मासेमारीच्या बोटी आणि मशिदीचा निळा मिनार. स्टिल लाइफ काढण्यासाठी मांडून ठेवतात ना तसं सगळं सुबक आणि सूर्यास्तापूर्वीचा मॅजिक लाइट असल्याने अगदी तीटपावडर केल्यासारखं देखणं दिसत होतं. आणि हे असं दोन्ही बाजूला होतं.
 
डावीकडचं जांभारी गाव

उजवीकडचं कालाले गाव
मच्छिमारीच्या होड्या.

ही गावं संपताना मधे परत वळण आलंच. नदी डावीकडे वळत होती. आणि लाइटशोचा फिनाले दिमाखात चालू झाला होता. नदी डावीकडे वळल्यावर समोर फिनालेचे क्षण दिसायला लागले.

 
सूर्यास्ताच्या उंबरठ्यावर  

 
सूर्यास्त

सूर्यास्तानंतर

सूर्यास्तानंतर

आता पाण्यावर संध्याप्रकाशाची चांदी होती. सव्वासहा-साडेसहाचा सुमार होता. उजव्या बाजूला पाण्याच्यापलिकडे डोंगराची धूसर किनार दिसत होती. चांदीच्या पाण्यात दूर लांबवर एक एकांडा मच्छीमार एकांड्या तरीतून हिंडत होता. डाव्या बाजूचा डोंगर जवळच होता पण पाण्यात मिसळून गेला होता. अंधार चढत चालला होता. समोर डोंगराचा काळा पट्टा. खाली पाण्यात आणि वर आकाशात सूर्य गेला तरी त्याच्या पावलांच्या न विरलेल्या केशरी खुणा. त्याच्याही वर निखळ निळं आकाश आणि एकदम वरती चंद्राची कोर झोकात चमकायला लागली होती.

The Grand Finale

हा नवाच अध्याय उलगडत होता या रंगांच्या खेळाचा. तेवढ्यात आम्ही थोडेसे डाव्याबाजूला वळलो आणि अचानक डावीकडची डोंगर रांग संपली नी समोर दूरवर फक्त पाणी होतं. एक बोटीचा लख्ख ठिपका त्या पाण्यात लांबवर दिसत होता. आम्ही समुद्राजवळ आलो होतो. नदी आणि समुद्राची भेट झाली होती. अंगावर शहारा आला. काहीतरी अलौकिक आपल्याला स्पर्श करतंय. आपल्यातल्या आदीम समर्पणाला हाकारतंय असं काहीसं.. खळ्ळ्कन एक खारा थेंब ओघळला. आणि मी संदीपकडे पाह्यलं. तिथेही असं अथांग पाणी दिसलं.

काही क्षण हे अनुभवण्यात गेले तोच समोर दिवे, लोकवस्तीच्या खुणा, मोठ्ठी जेट्टी, नवरात्रीचा मंडप असं सगळं दिसायला लागलं. जयगड बंदर आलं होतं आणि हा जीवघेण्या अद्भुताचा प्रवास संपला होता.

- नी

Tuesday, February 16, 2016

देवा मला पास कर.. अरे मूर्खा अभ्यास कर!

'देवा मला पास कर.. अरे मूर्खा अभ्यास कर!'
असे वाक्य वहीवर लिहिले की परीक्षेत पेपर सोप्पा जातो, पेपराच्या प्रत्येक पानावर डोक्यावर लिहिले की चांगले मार्क मिळतात अशी एक युक्ती मला शाळेत सोडायलाआणायला येणार्‍या पुष्पाने जाताना सांगितली. माझे वय ७ आणि तिचे वय १५. तिने नववीत नापास झाल्यावर शाळा सोडली होती. एवढी पावरबाज युक्ती माहिती असून तू नापास कशी झालीस? हे विचारण्याइतकी अक्कल मला वय वर्ष सातमधे नव्हती. भारीच वाटली होती ती युक्ती.
मी लग्गेच अमलात आणले ते. सर्व वह्यांवर लिहिले. पेपरात प्रत्येक पानाच्या डोक्यावर लिहायचा विचार होता पण माझा लिखाणाचा वेग इतका सुपरफास्ट असायचा की बरेचदा पेपर लिहून पूर्ण व्हायचा नाही त्यात ही ब्याद कुठे लिहीत बसा. देव बघेल तेव्हा त्याला पहिले पान दिसेलच की. असा सोयीस्कर विचार करून मी हे वाक्य फक्त पहिल्या पानावरच लिहिले.
इयत्ता तिसरीत मला तसेही बरे मार्कच पडायचे, तेवढेच याही परिक्षेत पडले. वाक्य लिहिण्याचा स्पेशल असर काही दिसला नाही. मात्र पेपरात पहिल्या पानावर लिहिलेल्या वाक्यांबद्दल वर्गशिक्षिका बाईंकडून त्यांची आख्खं विश्व इकडचं तिकडे हलेल अश्या पावरची स्पेशल थोबाडित मात्र मिळाली.
तेव्हा शिक्षकांनी थोडेफार फटके हाणले तरी पालक आकांडतांडव करत नसत त्यामुळे घरी येऊन थोबाडितचे सांगितल्यावर 'तू काय केलं होतंस?' हाच प्रश्न पहिला. उत्तरादाखल भारी युक्ती आईला सांगण्यात आली.
आईने डोक्यावर हात मारला, स्वतःच्याच. लिहिलेल्या वाक्याचा अर्थ नीट स्पष्ट करून सांगण्यात आला. अभ्यासाशिवाय, स्वतःच्या प्रयत्नांशिवाय तरणोपाय नाही हे नीटच बसवले डोक्यात. परिक्षेला जाताना देवाला नमस्कार करणे हे फारतर केलेल्या अभ्यासाचा शांतपणे विचार करण्यापुरते उपयोगी पडते. हे पक्कं बसलं डोक्यात. आणि शिक्षणाच्या पुढच्या टप्प्यांमधे अजूनच खोल कोरलं गेलं.

कट टू पाचेक वर्षांपूर्वीची एक घटना.
"आपण या भागात शूट करण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला इथले सगळे रस्ते माहिती हवेत. आत्तापर्यंत आपण तीन चार वेळा इथून गेलोय. तेव्हाच तुम्हाला रस्ता लक्षात ठेवायचा सांगितलेले आहे. आता ड्रायव्हर वेगळा आहे. त्याला मुंढरपर्यंतचा रस्ता तुम्ही सांगायचा."
दिग्दर्शकाने त्याच्या तीनही एडीजना सांगितले. रत्नागिरी शहरातून राई-भातगाव पुलाच्या मार्गे आम्हाला मुंढर गावात पोचायचे होते. रत्नागिरीत कामे आटपता आटपता संध्याकाळचे साडेसात वाजून गेले होते. मला राई-भातगाव पुलापर्यंतचा रस्ता माहित नव्हता. पुढचा फारच ओळखीचा होता. शहरातून बाहेर पडतानाचा फाटा योग्य तो निवडला आणि मग निघालो. बराच वेळ जात राह्यलो तरी राई-भातगाव पूल येण्याचे चिन्ह दिसेना. डोंगरातला रस्ता, अंधाराची वेळ त्यामुळे रस्ता चुकलोय हे लक्षात यायला थोडा वेळच लागला. बर चुकलोय तर नक्की कुठे चुकलोय हे कळायला मार्ग नाही. आता काय करायचे?
एडी १ - अं अं अं
एडी २ - रस्ता चुकलो? रस्ता चुकलो? (खिशातून फोन काढून त्यात कुठल्या तरी गुरूच्या भजनाची ऑडिओ सुरू केली.)
एडी ३ - कुणाला तरी विचारायला पाहिजे.
ड्रायव्हर - आता कसा रस्ता कळणार? ( गाडीत वाजत असलेले किशोरकुमारचे गाणे बंद करून टाकले. खिशातून मोबाइल काढून कुठल्या तरी गुरूच्या फोटोचा वॉलपेपर बघून फोन डोक्याला लावणे सुरू)
दिग्दर्शक, मी आणि एडी ३ यांच्यात अजून थोडी वाक्यांची देवाणघेवाण होऊन आहे त्या रस्त्याने पुढे जाऊया. जे पहिलं गाव लागेल तिथे विचारूया. असे ठरले. गेलो.
वाटेत एक उजवे वळण आमचे सुटले होते त्यामुळे आम्ही पुळ्याच्या दिशेने निघालो होतो. पहिले जे गाव लागले तिथे हा उलगडा झाला. मग अजून चार पाच जणांना विचारल्यावर योग्य तो रस्ता कसा सापडेल तेही कळले. तसे गेलो. इप्सित स्थळी पोचलो. एक तासा दीडतासाचा उशीर झाला फारतर.
खाली उतरून किंवा गाडीतच बसून रस्त्याने येणार्‍या माणसाला थांबवून रस्ता विचारणे वगैरे करायला भाविक मंडळींची हिंमत होत नव्हती. कर्णकटू भजन सतत मोठ्ठ्या आवाजात ऐकणे आणि सतत फोनमधला गुरूंच्या फोटोचा वॉलपेपर बघत फोन डोक्याला लावणे यापलिकडे त्यांचे प्रयत्न जात नव्हते.
राई-भातगावच्या पुलावर आल्यावर पुढच्या रस्त्याबद्दल कुणालाच प्रश्न नव्हता. त्यामुळे पुलाशी पोचल्यावर 'चला आता प्रश्न नाही!' अशी आमची प्रतिक्रिया तर भाविक मंडळींचे भजन, नमस्कार, जप वगैरे चालूच होते. मुंढरला पोचल्यावर एडी २ म्हणे, 'स्वामींनी वाचवले!'. सर्वांनीच कपालबडवती करून घेतली तिथे.
कुणावर श्रद्धा असणे चुकीचे नाही पण प्रत्यक्ष प्रयत्न, प्रत्यक्ष मार्ग चालणे, प्रत्यक्ष कष्ट तुमचे तुम्हालाच करायचे आहेत. कोणी मार्ग बिर्ग दाखवायला येणार नसतो. आपल्यापेक्षा अनुभव जास्त असलेले लोक पॉइंटर्स देऊ शकतात. त्याचा विचार करण्याचा कदाचित उपयोग होऊ शकतो. श्रद्धेचा उपयोग फारतर मार्ग शोधताना डोके शांत ठेवायला होऊ शकतो. तुम्ही मनाने पुरेसे घट्ट असाल तर त्याचीही गरज नाही. मनाने घट्ट होत जाणे हे एका रात्रीत होत नाही. ती प्रक्रिया मोठी असते. पण आपल्याकडून प्रयत्न केल्याशिवाय ती सुरू होत नाही.
तस्मात 'अरे मूर्खा अभ्यास कर!' हेच अंतिम वगैरे सत्य...
डिंगडाँग...
- नी

Sunday, January 3, 2016

नटसम्राटाचे साम्राज्य..

मायबोली.कॊम दरवर्षी मराठी भाषा दिवस आयोजित करते. २०१२ च्या वर्षी कुसुमाग्रज जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने कुसुमाग्रजांचे साहित्य हा महत्वाचा विषय होता. त्यानिमित्ताने खालीले लेख लिहिला आहे.
-------------------------------------------------------------------------------------------

नाटककार वि.वा.शिरवाडकर लिखित ‘नटसम्राट’ हे नाटक मराठी रंगभूमीच्या इतिहासातील महत्त्वाचे पान. नटसम्राटच्या भाषेची जादू आणि कुठल्याही कसबी नटाला आव्हान वाटेल अशी आप्पासाहेब बेलवलकरांची व्यक्तिरेखा आजही अनेकांना आकर्षित करते.
नटसम्राटच्या संहितेचे मूळ शेक्सपिअरच्या ‘किंग लिअर’मध्ये आहे हे सर्वज्ञातच आहे. किंग लिअर ते नटसम्राट या प्रवासाबद्दल शिरवाडकरांनीच काही टिपणे केलेली आहेत. प्रत्यक्ष आयुष्यात मनावर ताण आला की, नाट्यप्रयोगात शिरणारा नट अशी व्यक्तिरेखा असलेल्या एका इंग्रजी सिनेमाबद्दल शिरवाडकरांनी ऐकले होते. नानासाहेब फाटकांनी ’किंग लिअर’चे रूपांतर करण्याची विनंती शिरवाडकरांना केली होती. परंतु रूपांतर करताना प्रमुख व्यक्तिरेखा राजा न रहाता रंगभूमीचा अनभिषिक्त सम्राट त्यांना दिसू लागला. हा सम्राट त्यांना नानासाहेब फाटकांच्याच व्यक्तिरेखेत मिळाला. कधीकाळी ऐकलेली सिनेमातील व्यक्तिरेखा, ’किंग लिअर’च्या कथेचा सांगाडा, नानासाहेब फाटकांचे व्यक्तिमत्व आणि अखेरीस जेव्हा नटसम्राट कागदावर उतरले तेव्हाचे शिरवाडकरांचे वय या सर्व गोष्टींच्या मिश्रणातून नटसम्राट प्रत्यक्षात आले.
२३ डिसेंबर १९७० रोजी संध्याकाळी, बिर्ला मातोश्री सभागृह, मुंबई येथे नटसम्राटचा पहिला प्रयोग झाला. गोवा हिंदू असोसिएशनने हे नाटक मंचावर आणले होते. संस्थेचा सुवर्णमहोत्सवातला हा प्रयोग होता. या नाटकाचे दिग्दर्शन केले होते श्री. पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी. आप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका केली होती डॉ. श्रीराम लागू यांनी; तर कावेरी साकारली होती शांता जोग यांनी.
गडकर्‍यांच्या ’एकच प्याला’नंतर जवळजवळ ५० वर्षांनी इतके अभूतपूर्व भाषासौंदर्य घेऊन येणारे नाटक म्हणून तेव्हापासून या नाटकाला लोकांनी डोक्यावर घेतले. नटसम्राट या नाटकाला १९७० सालचा राज्य नाट्य पुरस्कार मिळाला तर या नाटकाच्या लिखाणासाठी शिरवाडकरांना १९७४ सालचा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला.
नटसम्राटच्या पहिल्या प्रयोगात गणपतराव बेलवलकरांची भूमिका डॉ.श्रीराम लागू यांनी केली होती. नटसम्राटच्या संवादांच्या बाबतीत पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे लांबच्या लांब स्वगते. या बाबत डॉ. लागू सांगतात की लहानपणी, सकाळी देवापुढे बसून स्तोत्रे पाठ करण्याची सवय त्यांना उपयोगी पडली. साधारण २८१ प्रयोगानंतर डॉ. लागूंनी प्रकृतीच्या कारणास्तव ही भूमिका करणे थांबवले. त्यांच्यानंतर अनेकांनी ही भूमिका केली. प्रत्येकाने आपापल्या परीने या भूमिकेत रंग भरण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकाला डॉ. लागूंशी केलेल्या तुलनेला तोंड द्यावे लागले.
डॉ. लागूंच्या नंतर ही भूमिका समर्थपणे पेलली दत्ता भट यांनी. दत्ता भटांचा खडा आवाज व भारदस्त व्यक्तिमत्व यामुळे बेलवलकरांच्या व्यक्तिरेखेला वेगळे परिमाण मिळाले. त्यांचा नटसम्राट अपरिमित गाजला. दत्ता भटांनी नटसम्राटचे ४०० प्रयोग केले. त्यांनाही नंतर प्रकृती-अस्वास्थ्यामुळे नटसम्राट करणे थांबवावे लागले. नंतर १९७७च्या दरम्यान सतीश दुभाषींनी नटसम्राटाची भूमिका पेलली. त्यांनी आधीच्या दोघांचा नटसम्राट पाहिला नव्हता. याचमुळे ठराविक साच्यापेक्षा वेगळा नटसम्राट उभा करायचा त्यांनी प्रयत्न केला. १९७९ च्या सुमारास याच संचामधे चंद्रकांत गोखले यांनी नटसम्राट साकारायला सुरुवात केली. याही नटसम्राटाला प्रेक्षक व समीक्षकांची चांगली दाद मिळाली.
या चारही नटसम्राटांच्या बरोबर कावेरी साकारणार्‍या एकच अभिनेत्री होत्या त्या म्हणजे शांता जोग. कणखर पण मर्यादशील अश्या त्यांनी साकारलेल्या कावेरीची छाप पुसणे आजपर्यंत कोणालाही शक्य झाले नाही.
नंतर १९८२ साली अरविंद देशपांडे यांच्या दिग्दर्शनाखाली यशवंत दत्त यांनी बेलवलकर व सुलभा देशपांडे यांनी कावेरी साकारली. स्वतः शिरवाडकरांनी ‘आत्तापर्यंतचा मला सगळ्यात भावलेला नटसम्राट’ अशी पावती या नटसम्राटाला दिली होती. या प्रयोगाचे दिग्दर्शकीय वैशिष्ट्य म्हणजे नाटकातील बाकीची पात्रे म्हणजे मुले, सुना व जावई हे सर्व आधीच्या प्रयोगांप्रमाणे खलनायकी ढंगाने न दाखवता परिस्थितीचे गुलाम म्हणून दाखवण्यात आले होते.
नंतर परत एकदा पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी मधुसुदन कोल्हटकर व लता अरुण यांना घेऊन नटसम्राट दिग्दर्शित केले. या प्रयोगाचे श्रेयस इतकेच की आजपर्यंत महाराष्ट्रातल्या ज्या गावांमधे नटसम्राट पोचला नव्हता तिथपर्यंत तो पोचला. यानंतर नटसम्राटाच्या भूमिकेत राजा गोसावी व कावेरीच्या भूमिकेत उषा नाडकर्णी असाही एक प्रयोग करण्यात आला. उषा नाडकर्णींच्या कावेरीने वाहवा मिळवली पण गोसावींचा नटसम्राट मात्र लोकांना फारसा आवडला नाही.
पहिल्या नटसम्राटानंतर दत्ता भटांपासून राजा गोसावींपर्यंत अनेक अभिनेत्यांनी नटसम्राटाचे आव्हान स्वीकारून झाल्यानंतर १९८६ साली डॉ. लागूंनी पुन्हा एकदा नटसम्राट पेलले. यावेळेला दिग्दर्शक होते माधव वाटवे आणि कावेरी साकारत होत्या सुहास जोशी. या नटसम्राटालाही लोकांची मान्यता मिळाली. सुहास जोशींची थोडी वेगळ्या पद्धतीने उभी केलेली कावेरीही लोकांना आवडली.
यानंतरही अनेकांनी नटसम्राटला हात घालण्याचा वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केला. त्यातील विशेष उल्लेखनीय प्रयोग म्हणजे लक्ष्मण देशपांडे व अनुया दळवी यांनी केलेला द्विपात्री नटसम्राटाचा प्रयोग. या प्रयोगाचे दिग्दर्शनही प्राध्यापक लक्षमण देशपांडे यांचेच होते. देशपांड्यांनी नाटक द्विपात्री करून त्याचे रुपडेच बदलून टाकले. यासाठी संशोधन करून संहितेचे पुन्हा संपादन केले. नेपथ्य, नाटकातील स्वगते व पार्श्वसंगीत यांचाही वेगळ्या पद्धतीने विचार केला. गणपतराव बेलवलकर आणि कावेरी या दोन पात्रांव्यतिरिक्त बाकी पात्रे उल्लेखापुरतीच ठेवली. अगदीच गरज पडली तेव्हा त्यांचे संवाद नुसते ऐकवले. हा प्रयोग म्हणून यशस्वी झाला असे समीक्षकांनी मांडले आहे.
मराठी भाषेतून इतर भारतीय भाषांत अनुवादित केल्या गेलेल्या महत्त्वाच्या मराठी नाटकांपैकी नटसम्राट हे एक. या नाटकाचे इंग्रजी, गुजराथी, हिंदी आणि तेलुगू भाषांतील अनुवाद आणि नाट्यप्रयोग दोन्ही भरपूर गाजले.
काही अनुवाद :
इंग्रजी: द लास्ट सीन - अनु. - वसंत लिमये
हिंदी: नटसम्राट - अनु. र. श. केळकर.
तेलुगू :नाटकांतम - अनु. उदयभानू
गुजराथी: २ अनुवाद१. बहुत नाच्यो गोपाला - कांती मडीया२. हमारी दुनिया तमारी दुनिया - प्रवीण सोलंकी


हिंदीमधे ३ - ४ वेगवेगळ्या दिगदर्शकांनी हे नाटक केले आहे.
तेलुगूमधे नाटकांतम - संस्था रंगधारा - जानेवारी १९९८. दिग्दर्शन: प्राध्यापक भास्कर शेवाळकर. प्रमुख भूमिका: चाटला श्रीरामलू
गुजराथीमधे
१. बहुत नाच्यो गोपाला - १९७४ दिग्दर्शन: कांती मडीया. प्रमुख भूमिका: चंद्रकांत भट
२. हमारी दुनिया तमारी दुनिया - १९९५ दिग्दर्शन व प्रमुख भूमिका: सिद्धार्थ रांदेरीया
अजूनही अनेक अभिनेते आणि दिग्दर्शक आपापल्या परीने हे धनुष्य पेलायचा प्रयत्न करताना दिसतात.
हा झाला या नाटकाचा इतिहास.

माझ्या पिढीने लहानपणी नटसम्राटचे वादळी वारे ऐकले. किंचित कळत्या वयात दूरदर्शनवर नटसम्राट बघितले. नववी-दहावीच्या काळात हे नाटक वाचले, उतारे पाठ केले आणि चोख भाषेत म्हणून दाखवून सगळ्यांकडून शाबासकी मिळवली. तेव्हापासूनच नटसम्राटच्या संदर्भाने सतत डोक्यात दोन वेगळ्या टोकाची मते येत असत. मराठी शाळेत शिकल्याने आणि वाचनाचा किडा वेळेवर डसल्याने नटसम्राटच्या लिखाणातले भाषासौंदर्य, नाटकाची बांधणी हे प्रचंड आवडत असे आणि त्याच वेळेला अप्पासाहेबांचा भाबडेपणा त्रासदायक होत असे. त्या भाबडेपणाचे, भोळेपणाचे निष्कारण उदात्तीकरण आहे असं वाटत असे. आणि कुठेतरी अप्पासाहेबांच्या दुरवस्थेला तो निष्कारण भाबडेपणाच जबाबदार आहे असे वाटत राही. पुढे पुढे ते अधोरेखित होत गेले. अखेर ठाम मतबीतच बनले!
मग नाटक शिकताना 'लियर' पचवला. त्याचा भाबडेपणा हा त्याच्या काळाला आणि कर्तृत्वाला शोभून दिसतोय हे जाणवलं. तो खटकेच ना. त्याची वाताहात इत्यादी सगळीच ट्रॅजेडी एका प्रकारे रोमॅन्टिसिस्टिक वाटत राहिली. भली मोठी नाट्यमय उंची होती त्या ट्रॅजेडीला. या पार्श्वभूमीवर परत नटसम्राट आठवल्यावर ५० च्या दशकातल्या नटसम्राटाचा भाबडेपणा जाम म्हणजे जामच खटकू लागला. मग नाटक ट्रॅजिक न रहाता मेलोड्रामाच जास्त वाटू लागला.
मधे प्रसारभारतीच्या उपक्रमांतर्गत दूरदर्शनसाठी ६ भागांमधे नटसम्राट करून दिले. त्यावेळेला अभ्यास करताना पुन्हा तेच जाणवत राहिले. मुलगा-सून, मुलगी-जावई हे खलनायक न वाटता परिस्थितीची बाहुली आहेत हे जाणवू लागले. नाटक आशय-विषय-कथेच्या बाबतीत मनातून उतरत गेले. भाषा आणि नाटकाची बांधणी मात्र कायम मोहात पाडते यात वाद नाही.

- नीरजा पटवर्धन
तळटीप: वरील लेखातील सर्व संदर्भ एन सी पी ए, मुंबई येथील ग्रंथालयातील 'नटसम्राट'च्या संदर्भ संग्रहातून घेतले आहेत.

Sunday, December 27, 2015

दोदोल - गोवन किरिस्ताव स्वीट पण संपूर्ण शाकाहारी.

लागणारा वेळ: 
दीड ते दोन तास
लागणारे जिन्नस: 
kala-gool.jpg
२ कप नारळाचे दूध
३/४ कप नाचणीचे सत्व किंवा पिठ (मी पिठ वापरले पण सत्व वापरल्यास जास्त बरे)
३-४ चमचे तूप किंवा खोबरेल तेल
३/४ कप काळा गूळ (माडाचा गूळ) - हा म्हापश्याच्या मार्केटमधे डिसेंबर-जानेवारी महिन्यात नक्की मिळतो. इतर कुठे मिळत असल्यास माहित नाही. गोवन कॅथलिक मित्रमैत्रिणी असतील तर त्यांना विचारावे. पण या गुळाशिवाय दोदोलची योग्य चव येणार नाही.
हा काळा गूळ/ माडाचा गूळ (सौदागर सिनेमातला तो हाच की नाही ते माहित नाही. हा गोव्यातला आहे. तो सिनेमा बंगालातला होता.  )
१ टेबलस्पून गव्हाचे पीठ
चिमूटभर वेलदोडा पूड
१०-१२ काजू अर्धे केलेले. आणि हवे असल्यास बदाम

क्रमवार पाककृती: 
१. काळा गूळ बारीक किसून घ्या
२. नारळाचे दूध, नाचणीचे पिठ, काळा गूळ एकत्र करा. गुठळ्या रहाणार नाहीत आणि गूळ पुरा विरघळेल असं बघा. मी हॅण्ड ब्लेण्डरने मिक्स केलं.
३. ज्या पॅनमध/ ट्रेमधे किंवा कपांमधे दोदोल सेट करणार त्याला आधीच तुपाचा/ खो तेलाचा हात लावून घ्या.
४. जाड बुडाच्या पॅनमधे तूप/ खो तेल घाला. तापायला आले की त्यात काजू, बदाम वगैरे टाका. खरपूस परतून घ्या. गॅस कमी करा. मंद आचेवर ठेवा.
४. ना दूध, गूळ आणि ना पिठ असं मिश्रण या पॅनमधे सोडा. एका हाताने ढवळत रहा. आता गुठळ्या होऊ नयेत यासाठी सतत ढवळत रहावे लागेल.
५. थोडा घट्टपणा येऊ लागला की वेलची पूड भुरभुरा. ढवळत रहा. मग १ टेबलस्पून गव्हाचे पीठ पण भुरभुरा. ढवळत रहा.
६. मिश्रण घट्ट होऊ लागले, कडा सोडू लागले आणि साधारण अर्धे झाले की गॅस बंद करा.
७. पॅन/ ट्रे किंवा कप्समधे ओता. अर्धा तास गार व्हायला आणि सेट व्हायला द्या.
८. सेट झाले की काढा. वरून काजूने डेकोरेट करा. खा. गरम किंवा गार दोन्ही उत्तम लागते.

हे तयार झालेलं दोदोल.
वाढणी/प्रमाण: 
साधारण ७-८ कपकेक्सचे मोल्डस भरतील
अधिक टिपा: 
वड्या काढल्याप्रमाणे ट्रेमधे ओतून मग कापून याच्या वड्या पाडता येतील. किंवा छोटे छोटे कप्स भरता येतील.
वड्या म्हणलं तरी या कडक वड्या होत नाहीत. तश्या दुलदुलितच रहातात. म्हणूनच म्हणे त्याचं नाव दोदोल आहे असं एका गोव्यातल्या मैत्रिणीने सांगितलं होतं.
गोव्याला एवढ्यात कोणी जाणार असेल तर माझ्यासाठी म्हापश्याच्या स्टॅण्डजवळच्या मार्केटातून प्लीज प्लीज हा गूळ घेऊन या.

Saturday, December 5, 2015

सालंकृत

हा लेख २००२ सालच्या मायबोलीच्या दिवाळी अंकासाठी लिहिला होता. असंच कशावरून तरी आठवण झाली त्यामुळे लेखाचे पुनरूज्जीवन करावेसे वाटले. केले.  १३ वर्षांपूर्वी लिहिलेला लेख त्याच्या विस्कळीतपणासकट तसाच ठेवलाय. अगदीच जेमतेम बारकेसे बदल आहेत.
---------------------------------------------------------------
कधीही कुठलाही चॅनेल लावा, आजकाल सगळीकडे सोन्याने लगडलेल्या बायकाच दिसतात. एवढे दागिने घालुनहि त्या अजून दागिने नि साड्या खरेदी करत असतात. लाख दोन लाखाचे दागिने तर त्या सहज खरेदी करतात. कल्पना करा कुणा परदेशी माणसाने हे बघितले तर त्याला वाटेल ‘सोन्याचा धूर’ निघणारा काळ तो हाच बहुतेक. 
"अरे लोकांना खायला मिळत नाही  आणि दागिने कसले खरेदी करताय! भारतात लोकांच्या तिजोर्‍यात डेड मनी बनून राह्यलेलं सोनं बाजारात आलं ना तर तेवढ्या बळावर भारत श्रीमंत बनेल.”असे मानणारेही काही जण आहेत. आता हे कसे काय घडू शकते हे कळण्याइतके व्यावहरिक शहाणपण माझ्यात नाही तेव्हा अर्थातच त्यावर नो कमेंटस.
दागिने म्हणजे नुसतं सोनं नाही पण. त्यात एक संस्कृती आहे, कला आहे. आपल्याकडच्या वेशभूषेच्या  इतिहासात दागिन्यांच्या इतिहासाला वेगळे स्थान आहे. आता मला सांगा ’उत्सव’ मधे किन्वा ’मृच्छकटीकम’ मधे जर तो दागिन्यांचा सीन नसता तर  वसंतसेनेचा आणि चारुदत्ताचा रोमान्स हा कुठल्याही इतर प्रेमिकांसारखाच वाटला असता ना. दागिन्यांच्या त्या गमतीने हा रोमान्स वेगळ्याच पातळीवर नेउन ठेवलाय. शाहीर अनंत फंदींची तर वेगळीच गंमत आहे. बाळी ह्या कानातल्या अलंकाराची बत्तीस नावे असलेली एक लावणी त्यांनी रचलीये जी ’बत्तिस बाळ्यान्ची लावणी’ म्हणून प्रसिद्ध आहे. यावर कडी म्हणुन परशुराम शाहीराने तेहेतीस बाळ्यान्ची नावे गुंफून चढी लावणी रचली होती अशी एक गोष्ट शाहीरी जगात प्रसिद्ध आहे.
लोकसाहीत्यात किंवा जनमानसात बांगडी फुटणे किंवा वाढणे याला एक अभद्र अर्थ आहे तसाच एक जामच रोमँटिक अर्थ पण आहे.  ”नदीच्या काठावर मी पाणी भरायला गेले असताना ’तो’ आला नि त्याने छेडाछेडी सुरु केली, त्या ओढाओढीत मझ्या बांगड्या फुटल्या. आता मी घरी काय सांगू?  कशी घरच्यांना तोन्ड देउ?” असे गाणे म्हणणारी जया भादुरी आपण सगळ्यांनीच ’अभिमान’ मधे बघितलेली आहे. 
दागिने घालताना काहीजण ’शक्तिप्रदर्शन’(वजन उचलण्याचे नि पैशाचे) म्हणून घालत असतीलहि पण दागिने घालण्याचा तो अर्थ नाहीच मुळी. शरीर सुशोभित करणे हा दागिने घालण्याचा महत्वाचा उद्देश. थोडे इतिहासात डोकावाल तर शरीर सुशोभिकरणाबरोबरच लज्जारक्षण हाही उद्देश दिसून येतो. अजूनहि काहि आदीवासी जमातीत हे दिसते. ठाकूर बायका (सह्याद्रीतले आदीवासी)  आजहि चोळीवरून पदर घेत नाहित पण मण्यांच्या माळा मात्र असतातत भरगच्च. 'बॉम्बे स्वदेशी' नाहीतर तत्सम ठिकाणी मिळणार्‍या एथनिक ज्वेलरीच्या तोंडात मारतील अश्या ह्या माळा असतात.
दागिने घालण्याचा अजुन एक उद्देश इतिहासात दिसून येतो तो म्हणजे एम्फसिस किंवा लक्ष वेधणे. त्या त्या काळाप्रमाणे स्त्री देहाच्या सौंदर्याच्या कल्पना बदलत जातात आणि तो तो भाग उठून दिसावा यासाठी दागिन्यांची योजना होते. अजंठा किंवा त्याही आधीच्या लेण्यांमधे स्त्रियांनी एक कंबरपट्टा घातलेला दिसतो. तो आपल्याला माहीत असलेल्या कंबरपट्ट्यासारखा अगदी कमरेवर न बांधता बराच खाली बांधलेला आढळतो. त्या काळामधे बरिक कंबर पोटाला हलक्याश्या वळ्या आणि रूंद नितंब  हे सौंदर्याचे लक्षण होते. हे सगळे एम्फसिस करायला तो कंबरपट्टा किंवा वेशभूषेच्या इतिहासाच्या भाषेत 'गर्डल' असायचे.
मंगळसुत्र नावाचा एक दागिना ज्याच्या मागच्या भावनेचा किंवा विश्वासाचा यच्चयावत भारतीय चंदेरी दुनियेने वापरून वापरून चोथा केलेला आहे. पण स्त्रीच्या गळ्यात इतर अनेक अश्या गोष्टी घातल्या जात ज्या तिच्या विवाहित असल्याची साक्ष देत. फार जुनी नाहि शिवकालातलीच गोष्ट आहे. जवाळी नावाची एक माळ, जिच्यात खारका, बदाम, पिस्ते असत. ही माळ ब्राह्मण नवर्‍यामुलीच्या व सव्वाष्णीच्या गळ्यात आवश्यक असे.  कदाचित सासरी हाल झाले, खायला दिले नाहि तर आपले असावे म्हणून या माळेची योजना असेल का हो? 
कोल्हापुरी साज तर आपल्या सगळ्यान्च्या परिचयाचा. ह्या दागिन्यालाही मंगळसूत्राइतकेच महत्व होते. अशुभ निवारणासाठी तसेच विविध देवतांशी संबंधित अशी अनेक प्रतिके या साजात असतात. ताईत, वाघनख, बेलपान, पानडी, कारले, दोडका, कासव, मासा, नाग, भुन्गा, मोर, शन्ख, चक्र, चन्द्र, दोन तोंडे असलेला गरुड अश्या विविध पदकांनी हा साज बनलेला असे. साजामधे आज, सारखेपणा साधण्यासाठी असेल कदाचित, ही पदके कमी झालेली आढळतात. कारले या विशिष्ट पदकाला अजुन एक वेगळा अर्थ आहे. ग्रामिण भागात आजहि काही ठिकाणी कारलं डोरलं असे म्हटले जाते. कारले हे त्याच्या आकारामुळे पुरुषाचे प्रतिक मानले जाते त्यामुळे विवाहितेच्या गळ्यात हे प्रतिक असण्याची प्रथा असावी.
संकट निवारण हा एक खुप मोठा उद्देश असे दागिने घालण्यामागचा. यासाठिच दंडावर ताईत, गळ्यात वाघनख वगैरे घालतात. पुरुष व लहान मुले यांच्या अंगावर या दोन गोष्टी जास्त आढळून येतात. दुसरेपणावर दिलेल्या स्त्रीच्या गळ्यात पुतल्यांच्या माळेत एक ’सवतीचि पुतळी' असे. मृत सवतीच्या आत्म्याने त्रास देउ नये म्हणून ही घातली जात असे.
कोळी लोकांचे आयुष्य समुद्रावर अवलंबून असते. म्हणून अर्थातच त्यांच्याकडे समुद्रपूजनच्या प्रथा आहेत. कोळी बायका उजव्या हातात फक्त चांदीचा वाळा घालतात व डाव्या हातात वाट्टेल तितक्या बांगड्या. उजव्या हातातल्या बांगड्या नवर्‍याच्या आयुष्याकरता समुद्रदेवतेला अर्पण केलेल्या असतात. 
दागिन्यांचा इतिहास हा असा थोडासा डोळ्याखालून घातल्यावर मग जेव्हा मी एकेक दागिना अंगावर चढवते तेव्हा मला प्रत्येक काळातल्या स्त्रीशी काहीतरी नातं जाणवतं.
एलकुंचवारांच्या 'वाडा चिरेबंदी’ मधली वहिनी घराण्यातले जुने दागिने चढवते नि म्हणते "खरं सांगू? असं वाटते, हे सोनं नाही नुसतं. खूप काही आहे आणखी. वाटते, देशपांड्यांच्या घरातल्या सगळ्या बायका उभ्या आहेत माझ्या अवतीभवती कौतुकानं पहात. सगळ्यांच्या मायेचा स्पर्श आपल्याला लागून राह्यला असं वाटते. किती जणींनी हे घातलं, जतन केलं. कोणाकोणाचे हात, गळे ह्यांना लागले असतील.” 
हे असं किंवा त्याहूनही खूप मोठं काहीतरी मला जाणवत रहातं.

- नीरजा पटवर्धन
------------
संदर्भ:
•    Ancient Indian Costume – Roshen Alkazi
•    मराठा कालखंडातील महाराष्ट्राचे अलंकार: (इ. स. १६०० ते १८५०) – म. वि. सोवनी यांचा थिसीस.
•    वादा चिरेबंदी – महेश एलकुंचवार
•    स्त्री-पुरुष – छाया दातार
•    शिवकालातील व पेशवेकालीन स्त्री जीवन – डॉ. शारदा देशमुख

Wednesday, October 28, 2015

तुम्ही काय करता?

"मी गोग्गोड वनिता समाज इथून बोलतेय. नटमोगरी मेकपकर यांनी नंबर दिलाय तुमचा."
मेकपकर बाईंचं नाव ऐकून मी जरा सावध झाले. नेहमीप्रमाणेच कसलीतरी प्रचंड धावपळ चालू होती. डोक्यात पुढच्या चार पाच दिवसांच्या कामांची यादी फिरत होती. त्यात मेकपकर बाईंच्या रेफरन्सने फोन.

"आम्ही ना खूप छान कामे करतो. मेकपकर बाई तर आमच्या अगदी नेहमीच्या आहेत."
मी अजूनच धास्तावले.
"२४ तारखेला आमच्या मंडळाचा कार्यक्रम आहे. तिथे आम्ही मंगळागौरीचे पारंपारिक खेळ आधुनिक गाण्यांवर करून दाखवणार आहोत. आम्ही सगळ्या नऊवारी नेसणार आहोत. आम्ही एकूण १५ जणी आहोत. तर तुम्ही येऊ शकाल का?"
"मी? कशासाठी यायचंय मी?"
"तुम्हाला नऊवारी साडी नेसवता येते ना?"
"हो येते."
"तर आम्हाला साड्या नेसवायला या तुम्ही. तुमचा रिक्षाचा खर्च देऊ आम्ही. पत्ता लिहून घेता का?"
"मला नऊवारी साडी नेसवता येते पण ते काही माझं काम नाहीये. मी कॉश्च्युम डिझायनर आहे."
"पण मेकपकर बाईंनी तर सांगितले की तुम्ही साड्या नेसायला शिकवता."
"हो शिकवते. पण ते नाटकाचे विद्यार्थी असतात. त्यांना कॉश्च्युम डिझायनिंग हा विषय असतो अभ्यासाला. तो संपूर्ण विषय मी शिकवते. त्या विषयाच्या अंतर्गत हा एक टॉपिक असतो. तो ही मी शिकवते. साड्या नेसवायला जाणे हे माझे काम नाहीये."
"पण येतं ना तुम्हाला?"
"अहो तुमच्या लक्षात येतंय का? मी कॉश्च्युम डिझायनर आहे. शूटसवर माझ्या हाताखाली कपडे नेसवायला माणसं असतात. ते त्यांचं काम असतं. मला येतं म्हणजे तो माझा व्यवसाय नाहीये."
"पण आम्ही रिक्षाचा खर्च देऊ ना."
"कुठून? विलेपार्ल्यापासून?"
"तुम्ही अमुक पेठेत राहता हे सांगितलंय मेकपकर बाईंनी आम्हाला."
"रहायचे. आता मी मुंबईत राहते."
"पण नाहीच का जमणार? मेकपकर बाईंनी आम्हाला एवढं सांगितलं होतं."
"मेकपकर बाईंना सांगा आधी कॉश्च्युम डिझायनर म्हणजे काय ते समजून घ्या." (निघाल्या प्रमुख व्हायला..!)
"आमचा अगदीच प्रॉब्लेम होणारे हो."
"मी काय करू? तुमचा प्रश्न आहे तो."

मी वैतागून फोन बंद केला. मेकपकर बाई तीनहजार सातशे त्रेपन्नाव्या वेळेला डोक्यात गेल्या.
----------------------------------
तळटिप: या किश्श्यातील व्यक्तींचे कुणा खर्‍याखुर्‍या व्यक्तींशी साम्य आढळल्यास योगायोग समजू नये
--------------------------------

- नी

Sunday, October 11, 2015

सुरक्षितता वगैरे!

'उद्याच्या दिवशी काहीही काम करावं लागणार नाहीये. उद्या 'सेफ्टी डे' आहे.' असं सर्वांना सांगितलं गेलं तेव्हा मी चकीत झाले होते. जिथे तासावर कामाचे पैसे मिळतात अश्या ठिकाणी 'सेफ्टी डे' पायी आख्खा दिवस बिनकामाचा घालवूनही कामाचे तास धरले जाणार होते. हे कळल्यावर मी अजून जास्त चकीत झाले.
युनिव्हर्सिटी ऑफ जॉर्जियामधे शिकत असताना, समर सेमिस्टरमधे, सॅन्टा फे ऑपेरा या समर थिएटर कंपनीत त्या वर्षी मी इंटर्नशिप करायला गेले होते. त्यावर्षी सॅन्टा फे ऑपेरा कंपनीच्या कॉश्च्युम शॉपमधे स्टिचर अप्रेंटिस होते. तो माझा पहिलाच उन्हाळा होता तिथला. काम चालू झाल्याच्या दोन तीन दिवसातच हा सेफ्टी डे असणार होता. 'कैत्तरी फिरंगी फ्याड!' हे आलंच डोक्यात. पण प्रत्येकाला सेफ्टी डे ला हजेरी लावणे कंपलसरी होते त्यामुळे बघू तरी काय गंमत असं म्हणत दुसर्‍या दिवशी ऑपेराच्या रांचवर पोचले.
सेफ्टी लेडी नावाने ओळखली जाणारी एक इंस्ट्रक्टर लेक्चर द्यायला आली होती. आल्याआल्या तिने एक मोठे बुकलेट दिले. ज्यामधे ऑपेरा रांचवर किंवा ऑपेराच्या विविध शॉप्समधे वापरल्या जाणार्‍या वस्तू आणि त्यांच्यासंदर्भाने शक्य असलेले धोके आणि त्यासाठी घ्यायची काळजी, मस्ट डूज, मस्ट डोण्टस यांच्याबद्दल तपशीलात वर्णन होते.
हातशिलाईची सुई, सर्जींग किंवा ओव्हरलॉकिंगचे मशीन, प्रॉप शॉप वा सीन शॉपमधे वापरली जाणारी महाकाय आणि भयावह मशिनरी, कॉश्च्युम क्राफ्ट, प्रॉप शॉप, डाय शॉप, मिलिनरी, मेकप वगैरें विभागात वापरली जाणारी रसायने हे सगळंच किती आणि कसं धोकादायक आहे ते सांगितलं गेलं. हे सगळं वापरताना घ्यायची काळजी व नियम सांगितले गेले. उदाहरणार्थ हातशिलाई करताना थिंबल वापरणे कंपलसरी, सर्जर किंवा ओव्हरलॉक मशीन वापरताना हातांची पोझिशन कशी ठेवायची? सर्व मशिन्स वापरताना सेफ्टी गॉगल्स कंपलसरी, विविध स्प्रे पेंटस वापरताना उघड्यावर/ मोकळ्या हवेवर वापरायचे आणि हातमोजे-सेफ्टी गॉगल्स-रेस्पिरेटर घालूनच ते काम करायचे, अ‍ॅसिटोन हाताळताना रेस्पिरेटर आणि अ‍ॅसिटोनला दाद न देणारे हातमोजे घातलेच पाहिजेत, काही मशिन्स वापरताना सेफ्टी गॉगल्सबरोबर कानात रबरी बोळे वापरलेच पाहिजेत वगैरे.
हे नियम पाळले जातात की नाही हे बघण्यासाठी काही लोक कायम रांचवर असणार होते. नियम न पाळणार्‍यांना मेमो मिळणार होते. सर्व नियम पाळून चुकून अपघात झालाच म्हणजे अगदी एखाद्या तुलनेने कमी घातक वस्तूचा/ रसायनाचा कण डोळ्यात गेला तरी तो अपघातच. तर तो झाला तर काय खबरदारी घ्यायची याचेही प्रशिक्षण झालेच. इतका छोटा अपघात असला तरी त्याची नोंद सेफ्टी रजिस्टरमधे झाली पाहिजे आणि त्याचा व्यवस्थित रिव्ह्यू नोंद करून ठेवला जायला हवा हे ही कंपलसरी होते.
हे सगळं शिकवलं जाताना सेफ्टी लेडी जी होती ती भरपूर विनोदांची पखरण करत शिकवत होती त्यामुळे काही गोष्टी फारच पक्क्या स्मरणात राह्यल्या. उदाहरणार्थ 'सेन्सटायझेशन' ही प्रक्रिया. एखाद्या वस्तूच्या वारंवार वापराने त्या वस्तूची अ‍ॅलर्जी निर्माण होते हा या शब्दाचा थोडक्यात अर्थ. हे अर्थात ठराविक केमिकल्स/ वस्तूंच्या बाबतीतच होते. त्या केमिकल्सची यादी बुकलेटात होती. ती अर्थातच डोक्यावरून गेली. त्यातल्या एका केमिकलचे नाव घेऊन तिने सांगितले "हे म्हणजे तुम्ही वापरता ते रबर लॅटेक्स, जे ग्लोव्ह्ज आणि मेकपमधे वापरले जाते." हे एवढं सिन्सियरली सांगून मग 'आणि बघा ते लॅटेक्स कशात वापरतात ते... ' अशी टिप्पणी हवेत सोडून दिली. तिसर्‍या सेकंदाला संपूर्ण जनता खिदळत होेती. आणि सेन्सटायझेशन आमच्या डोक्यात पक्के झालेले होते.
सेफ्टी डे झाला. कामे सुरू झाली. पहिल्या वर्षी मी केवळ स्टिचिंगमधे होते आणि अप्रेंटिस असल्याने हातशिलाईच करायला लागायची बहुतेकवेळा त्यामुळे या सेफ्टी गाइडलाइन्सचा फारसा मुद्दा आला नाही. नंतरच्या उन्हाळ्यात मी कॉश्च्युम क्राफ्टमधे गेले. मग त्यावर्षी विविध प्रकारचे मास्कस ते रेस्पिरेटर्स आणि ते कश्याकश्यापासून सुरक्षितता देऊ शकतात वगैरे सगळ्यांबद्दल शिकवले गेले. रेस्पिरेटर्सची फिटींग्ज करून, माझ्या चेहर्‍याच्या आकाराला योग्य असा रेस्पिरेटर मला दिला गेला. दोन तीन प्रकारचे ग्लोव्ह्ज दिले गेले. नियमही समजावले गेले.

safety-gear.jpg
स्प्रे पेंट करण्यास सज्ज अशी मी.



















पण माझा पिंड भारतीय होता. नियम पाळण्याची चालढकल, 'चलता है!', 'इतनेसे क्या होनेवाला है!' हे सगळं हाडीमाशी खिळलं होतं. मग एकदा घामामुळे वैतागून सेफ्टी गॉगल्स बाजूला ठेवून स्प्रे पेंट करायला घेतले आणि नेमकी वार्‍याने दिशा बदलली. वाळवंटातला वारा तो, वेग आणि ताकद भरपूर. खालच्या दिशेने केलेला स्प्रे वार्‍याने उडून डोळ्यात गेला. डोळे धुणे बिणे झाल्यावर, सेफ्टी रूममधे अ‍ॅक्सिडेंट रिपोर्ट वगैरे झाला. माझाच निष्काळजीपणा होता वगैरे मी लिहून दिले. मग माझ्यावर अजूनच करड्या नजरेने लक्ष ठेवण्यात यायला लागले. कुठल्या तरी केमिकलचा वापर करताना ठराविक ग्लोव्ह्ज घातले नाहीत म्हणून मला मेमो मिळाला. यानंतर मला सेफ्टी रूममधे असे न वागण्याबद्दल आणि मी किती मोठ्या रिस्कस घेते आहे याबद्दल सांगण्यात आले. मेमोज नंतरची स्टेप पे क्ट ही होती त्या दडपणाने का होईना मला अक्कल आली आणि मी माझ्याच भल्याचे नियम पाळू लागले. हे कदाचित ऑपेरा कंपनीने कुठल्याही लॉसूटपासून किंवा तत्सम कॉम्प्लिकेशन्सपासून स्वतःचा 'अ‍ॅस वाचवणे' असेल पण नियम योग्य आणि गरजेचे होते आणि माझ्या भल्याचेच होते यात वाद नाही.
कट टू ’मेरा भारत महान!’
आपापल्या कामाच्या परिघातले, स्वत:च्या भल्यासाठी असलेले नियम पाळताना फार कमी लोक दिसतात. विविध यंत्रे, रसायने यासंदर्भाने असे नियम असतात ते पाळायचे असतात याबद्दलची जागरूकता बहुतेक मोठे कारखाने कदाचित सोडले तर बाकी कुठेही नाही. छोट्य़ा उद्योगांच्यात, शेतीसारख्या उद्योगात तर अजिबातच नाही.
सुरक्षिततेचे नियम हे आपल्याला चोचले, फ्याडं, जास्तीचा शहाणपणा वगैरेच वाटत असतात. पळवाटा काढण्यात तर आपण माहिर असतो. धबधबा, कडे, समुद्र याठिकाणी फिरायला गेलेल्यांचे अपघाती मृत्यू किंवा लोकलच्या टपावर चढल्याने वीजेचा धक्का बसून झालेला मृत्यू ही काही अतिशय चपखल उदाहरणे. हातशिलाई करणार्‍याच्या उजव्या हाताजवळ(माणूस डावरा असेल तर डाव्या हाताजवळ) बसू नये नाहीतरे सुई डोळ्यात जाईल. असं मला लहानपणापासून आजी आणि आई सांगत आल्या. आयुष्यात भरपूर हातशिलाई केलेली असल्याने त्याचे कारण आणि महत्व मला कळते. साध्या शिवणकामात असे नियम आपल्याकडे आहेत तर याचा अर्थ इतर सर्व ठिकाणीही पारंपरिकरित्या असे नियम असणार कदाचित त्याला देवाधर्माचा रंग लावलेला असेल पण नियम असणार.
मग हे सगळं कुठे गेलं? स्वतःच्या जिवाबद्दल आपण इतके निष्काळजी का आणि कधी झालो? वापरायच्या वस्तू अचानक बदलल्या गेल्याने गोंधळ होणे शक्य आहे पण नियम पाळणे आणि सुरक्षित राहणे याचे महत्व वाटेनासे का झाले? एवढा स्वतःचा जीव स्वस्त का वाटायला लागला?
इतकी अति माणसे सर्वत्र असल्याने जोवर आपला वा जवळच्यांचा जीव जात नाही तोवर माणसाच्या जीवाचे महत्व समजत नाही असे म्हणायचे का?
मला काही होणार नाही हा फालतू आत्मविश्वास कुठे जन्म घेतो नक्की? किंवा मला काही का होईना कुणाला फरक पडणारे हा न्यूनगंड आधी जन्माला येत असावा का?
प्रश्न बरेच, उत्तरे नाहीत. प्रश्नांकडे लक्ष जाणे अवघड दिसते. मधे अजून बरेच महत्वाचे प्रश्न उभे असावेत ज्यांचा पूर्ण खातमा झाल्याशिवाय यंत्रणा लक्ष देणार नाही. तर तुम्ही आम्ही निदान आपापल्या परिघापुरते सुरक्षिततेचे नियम पाळत राहण्याचे बघूया.

Saturday, September 26, 2015

गणपतीच्या आठवणी १ - गणपती बघणे आणि मिरवणूक

मी फार भाविक, धार्मिक वगैरे नाही पण पुण्यात तेही पेठांमधे वाढल्यावर गणपती आणि त्या अनुषंगाने येणार्‍या गोष्टी हा माझ्या जगाचा अविभाज्य भाग बनलेला आहे.  त्याबद्दल थोडसं..

अगदी लहानपणी म्हणजे शिशुविहारमधे असताना हिराबागेचा हलता देखावा, बाबांच्या खांद्यावर बसून बघितल्याचे आठवतेय. स्कूटरवर मी, आई आणि बाबा फिरायचो. गणपती मंडळाच्या जवळपास स्कूटर लावायची आणि गर्दी कमी असेल तर मला चालवायचे. जास्त असेल तर मी खांद्यावर असला प्रकार. मग आम्ही तिघे स्कूटरवर मावणार नाही अश्या स्टेजला पोचलो तेव्हा आईचा गर्दीत जायचा उत्साह कमी झाला होता. बाबा आणि मी एखादा दुसरा दिवस गणपती बघायला स्कूटरीवरून जाऊन यायचो. बरेचदा लांबूनच बघितले जायचे.
विसर्जन मिरवणूक बघायला जाणे हे कर्तव्य असल्यासारखे वाटे. आई आणि बाबा दोघेही ऐन स पे मधेच वाढले. लक्ष्मी रोडपासून अगदी जवळ. त्यामुळे त्या दोघांच्याही दरवर्षी मिरवणुकीला जायच्या आठवणी होत्या. दुपारी मानाचे पहिले पाच बघायचे. घरी यायचे. संध्याकाळी लवकर जेवून मग रोषणाईचे गणपती बघायला जायचे. थोडावेळ बघून परत यायचे. मग झोप काढायची. तेव्हा काही फोन बिन नव्हतेच पण कुणीतरी चाळीत हाकारा घाले. ’मंडईचा गणपती कुंटे चौकात आला रेSSS '  की सगळी वानरसेना टक्कन जागी होऊन विजय टॉकिजच्या चौकात येऊन थांबत असे. मंडई, दगडूशेठ दोन्ही बघून घरी. आणि मग गुडुप्प. अशी आठवण आई नेहमी सांगत असे
माझ्या लहानपणीही आम्ही हेच करत असू. मात्र चाळकरी मित्रमंडळी नव्हती. दरवर्षी कोणीनाकोणी नातेवाइक पुण्यातल्या मिरवणुकीची मजा बघायला येतच असत. मग कॉलेजमधे गेल्यावर लक्ष्मी रोडच्या आसपास राहणार्‍या मित्रमंडळींची, नातेवाइकांची, मित्रांच्या नातेवाइकांची, नातेवाइकांच्या मित्रांची ओळख काढून ठिकाणा तिथे ठेवायचा आणि तिथून गणपती बघायला ये जा करायची असा प्लॅन असे.
एक वर्ष कॉलेजच्या रेडक्रॉसच्या स्टॉलवर पण बसले होते रात्रभर. सेफ वाटेल आणि जरा इंटरेस्टिंग म्युझिक असलेले मंडळ स्टॉलसमोर आले की आम्ही तिघी चौघी जणी त्यांच्या मिरवणुकीत घुसून नाचून घ्यायचो. ते पुढे सरकले की आम्ही परत स्टॉलवर.
एक अनंतचतुर्दशी फार पक्की लक्षात राह्यलेली आहे. सर्व ग्रुपपैकी मी आणि अजून एकदोन जण सोडले तर बाकी सगळ्यांनी गर्दीत जाणार नाही असा असहकार पुकारला होता. सिंहगड रोडला एका मित्राच्या घरी सगळा ग्रुप जमला होता.  त्यातच दोन मित्र मुंबईहून आलेले होते. त्या दोन मित्रांपैकी एकाशी माझी बोलाचाली बंद होती. भांडण नव्हते काही. या दोन मित्रांना पुण्याची मिरवणूक बघायचीच होती. मला जायचेच होते कारण मी पुढे भारताबाहेर शिकायला जाणार होते. तीन वर्ष गणपती अनुभवता येणार नव्हते. गणपतीची मिरवणूक अनुभवणे आणि बरोबर ज्याच्याशी बोलतच नाही तो मित्र. दुग्धशर्करा की काय तो योग. मग कधीतरी मध्यरात्री आम्ही ४-५ जण निघालो सिंहगड रोडहून चालत. पहाटेपर्यंत म्हणजे मंडई आणि दगडूशेठ जाईपर्यंत मिरवणूक अनुभवली. पण मी आणि मित्र एकमेकांशी बोललो नाही ते नाहीच. अगदी आम्ही बोलावे एकमेकांशी म्हणून बाकीचे मुद्दामून पुढे गेले आम्हाला मागे सोडून तरीही मी बोलले नाहीच. याचा फायदा झाला पुढे. तपश्चर्या फळाला आली. अखेर काही काळाने त्याच मित्राशी माझे लग्न झालेच. 
अमेरिकेतल्या तीन वर्षाच्या वास्तव्यात गणेशोत्सवात अक्षरश: तगमग व्हायची. शतकबदलाची वर्षे ती. इंटरनेट होते पण लाइव्ह स्ट्रीमिंग वगैरे गोष्टी रूळलेल्या नव्हत्या. गुगल, ऑर्कुट, फेसबुक वगैरेंचे तर अस्तित्वच नव्हते. कुणीतरी पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीची टाकलेली एखादी क्लिप तीही अत्यंत लो रिझोल्युशन आणि प्रचंड बफरींग सकट यावर समाधान मानायचे. तरी त्यातला तो ढोलताशाचा आवाज आला की पाय थिरकणे वगैरे चालू व्हायचेच. ढोलताशाचा गजर ऐकून गळा दाटून वगैरे येणे तेव्हाच सुरू झाले. शिक्षण संपवून परत आले ती ऐन गणपतीतच. परत आल्याच्या दुसर्‍या दिवशी गर्दीतून माझ्या लाडक्या म-८० वरून रपेट मारून आले आणि घरी आल्यासारखे वाटले.
लग्नानंतर एक दोन वेळा मी आणि नवर्‍याने(तोच तो!) मिळून दुपारचे मानाचे पाच, संध्याकाळचे लायटींगचे काही आणि पहाटे मंडई, दगडूशेठ असे पाह्यले होते. मात्र तेव्हा हाकारे नाही. टिव्ही होता. चॅनेलवर सांगितले की मंडईचा गणपती गणपती चौकात की आमचा गणपती घरातून हाले.
ढोलताश्याच्या गजराच्या आवाजाशी, मिरवणुकीशी सगळे बाळपण जोडले गेलेले आहे. मग ते आवाज आले की घसा कोंडणे आलेच ओघाने.

Friday, August 21, 2015

रेलकथा २ - पासहोल्डर राण्या, रणरागिण्या वगैरे..

आज लांब पल्ल्याच्या गाड्यांमधल्या १८ पासहोल्डर महिलांवर बोईसर स्थानकात कारवाई केल्याची बातमी वाचली पेपरमधे. जागा धरणे, ठराविक जागांवर हक्क समजणे आणि त्यातून होणारी भांडणे, अरेरावी हे सगळं त्या कारवाईच्या मुळाशी होतं असं बातमीमधे आहे. हे वाचून अनेकांची प्रतिक्रिया ’बरी खोड मोडली!’ अशी असणार. आणि त्यात चुकीचे काही नाही. पासहोल्डर्सचा असा अनुभव आलेले खूप जण असणार. मी पण होते की एकेकाळी पासहोल्डर असूनही नवखी असल्याने कळपातली जागा निश्चित नव्हती. मग मलाही इकडून तिकडे हुसकले जात असेच बसायच्या जागेसाठी. मनापासून राग यायचा त्यांचा.
मग कधीतरी हा राग थोडासा निवळायला लागला.

मुंबईकडे चाललेल्या गाडीत कुणीतरी कुणालातरी विचारलं ’तू आजच परत जाणारेस का संध्याकाळी?’ तिने उत्तर दिले ’नाही आज नाही. आता उद्या. दादरला चढेन. मला जागा ठेवा.’ दुसर्‍या दिवशी दादरला परतीची गाडी पकडणार्‍या ताई सायन हॉस्पिटलात नर्स होत्या. डेक्कन क्वीनने पुण्याहून निघून, हॉस्पिटलात पोचून, ड्युटीचे कपडे वगैरे घालून त्या दुपारी त्यांची शिफ्ट सुरू करत ती रात्रीपर्यंत. मग तिथेच कुठेतरी झोप काढून पहाटे दुसरी शिफ्ट सुरू करत ती दुपारी संपे. मग परत कपडे बदलून परतीची गाडी गाठत. रात्री १०:३० - ११:०० ला घरी पोचत. घरी दोन दिवसांच्या पोळ्या बडवणे, एक दिवसाची भाजी करणे, दुसर्‍या दिवशीच्या भाजीचे चिरणे/ निवडणे करून ठेवणे असं सगळं मॅनेज करून त्या परत दुसर्‍या दिवशी सकाळची डे क्वी पकडत. हे सगळं का? तर अर्थातच पोटासाठी. पुण्यातल्या हॉस्पिटलात बदली करून मिळत नव्हती काही कारणाने आणि नोकरी सोडणे परवडण्यासारखे नव्हते मग लटका.

एक मैत्रिण होती. तिची तिच्या बँकेच्या मुंबई ब्रांचला बदली झाली होती. मैत्रिणीचं माहेर पुण्यात. सासर नाशिकला. नवर्‍याची नोकरी बदली करून घेण्यासारखी नाही. बदली घेतली नाही तर नोकरी सोडायला लागायची परिस्थिती. ते शक्य नाही. नाशिकला मुलीला सांभाळणारे कोणी नाही. मग मैत्रिण मुलीला घेऊन चक्क माहेरी रहायला आली. आठवडाभर तिची आई सांभाळे मुलीला आणि ही रोज पु-मु अपडाऊन. शनिवारी नवरा पुण्यात येत असे या दोघींना भेटायला किंवा कधी ही जात असे.  माहेरी रहायचं, मूल आईच्या भरवश्यावर सोडायचं या सगळ्याचं नाही म्हणलं तरी दडपण येतंच. मग ते कमी करायला माहेरी जेवढा वेळ घरात असे तेवढा वेळ जास्तीत जास्त घरातली कामं करायची. पैशाने मदत करायची वगैरे आलंच. ती सांगायची पासमुळे मिळेल ती गाडी, मिळेल तिथे बसून पुण्याला परत येता येते. बसायला नीट सीट मिळाली तर तेवढाच आराम मिळतो. नाहीतर मग दारात, कधी कुठल्या लांब पल्ल्याच्या तीन टियरवाल्या एक्स्प्रेसच्या वरच्या बर्थवर किंवा दोन सीटसच्या मधोमध जमिनीवर असं कुठेही बसून यावे लागते.

अशा हजारो कहाण्या. सगळ्या नोकरीपायी धावणार्‍या, घरातून बाहेर पडायची आणि पोचायची वेळ अशी की कुणाशी काही संवाद व्हायची सोय नाही पण घरच्या जबाबदार्‍या पार पाडल्या नाहीत तर टोमणे हाणायला सगळे तयार. बहुतेक सगळ्या जणी निम्नमध्यमवर्गीय ते मध्यममध्यमवर्गीय स्तरातल्या त्यामुळे घरातली कुठलीही जबाबदारी मोलाने देणं यासाठी मानसिकता व खिसा दोघांची परवानगी नाही. सुट्टीचा दिवस हा अपराधभावाने केवळ घरासाठी लिहून दिलेला. शरीराला विश्रांती, मनाला विश्रांती ही फक्त रेल्वेच्या प्रवासात.

बसायची जागा मिळणे आणि तिथे थोडावेळ शांतपणे बसता येणे, सगळं काही विसरता येणे, आपल्यासारख्याच बाकीच्या सगळ्यांबरोबर थोडेसे हास्यविनोद करता येणे हे एकमेव सुखनिधान आयुष्यातलं. ते कुणी काढून घेतंय म्हणल्यावर तडफड होणारच. कायदा, नियम माहिती असले तरी चिडचिड होणार. जी समोरच्याला समजणार नाहीच. मग यातून येत असेल ती बसायच्या जागेची अरेरावी वगैरे. खरंतर अर्ध्या अधिक जणी थोड्या थोड्या वेळाने जरा वेळ तू बस गं. मग अमुक स्टेशनला मी बसेन परत वगैरेही करतात एकदा तुम्ही त्यांच्या आतल्या ग्रुपच्या जवळपास पोचलात की.

शेवटी कधीतरी जाणार्‍याला एकदाच तीन चार तास बसायचे असते सीटवर आणि यांच्यासाठी रोजची लढाई.  अरेरावी, इतरांना बसू न देणे वगैरे गोष्टी नियमबाह्य, समाजासाठी अयोग्य वगैरे ठिकच. त्याचे समर्थन नाही पण या सगळ्यांच्या आयुष्यातल्या एकमेव विश्रांतीचे काय? प्रश्न बाकी राहतोच... 

- नी

Tuesday, August 11, 2015

रेलकथा १ - डेक्कन क्वीनच्या पासहोल्डर राण्या!

मृण्मयीच्या रेलकथांवरून स्फूर्ती घेऊन माझ्या काही रेलकथा.
१.
नेपथ्य - पुणे-मुंबई डेक्कन क्वीनचा लेडीज पासहोल्डर डबा. डे क्वी मधे लेडीज पासहोल्डर्सचा वेगळा डबा असतो. बाकी गाड्यांच्यातला लेडीज डबा हा जनरल + पासहोल्डर्स असा असतो.
पहिल्यांदाच काढलेला पु-मु पास. लग्नही नुकतंच झालेलं. सासर मुंबई. माहेर पुणे. आणि खूप सारी कामेही अजून पुण्यातच होती त्यामुळे बसपेक्षा पास काढणे स्वस्त पडेल म्हणून सेकंड क्लासचा पास काढला.
सकाळी रिक्षावाल्यांच्या मिनतवार्‍या करत डे क्वी च्या वेळेआधी २० मिनिटे पोचले. लेडीज पासहोल्डर डबा शोधून त्यात शिरले. शिरल्या शिरल्या 'पासवालोंके लिये है. टिकटवाले जाओ जनरलमे!' अश्या वाक्यांनी माझे स्वागत केले. "माझा पण पासच आहे. दोनच दिवसांपूर्वी काढलाय." असे मी ही ठणकावून सांगितले.
एका रिकाम्या दिसलेल्या जागी बसायला गेले. बूड टेकवणार इतक्यात एका काकूंनी तिथे आपली पर्स आपटली. ह्या 'सहा जागा धरलेल्या आहेत. दुसरीकडे जा.' असं सुनावलं. हाच प्रकार अजून दोन तीन ठिकाणी घडल्यावर मग एका ठिकाणी बसले ते आता धरलेली जागा सांगितली तरी हलायचंच नाही हे ठरवून. पण चक्क ती जागा धरलेली नव्हती.
गाडी सुटायला ५ मिनिटे असताना सर्व डबा खच्चून भरला. सहा जागांच्या बाकड्यावर आठ जणी तर आरामात बसलेल्या होत्या.
गाडी सुटली. हळूहळू मी नवीन पासहोल्डर आहे हे आता सर्व नेहमीच्या बायकांना कळले. कुणीही माझ्याकडे 'तिकीटवाल्यांनी त्या डब्यात जा!' सांगायला आले की कुठून तरी "अगं नवीन पासहोल्डर आहे!" असा हाकारा येत होता.
मी आता बसल्या जागी जरा पेंगत होते तेवढ्यात कुणीतरी खांद्यावर टपटप करून जागे केले. डोळे उघडले तर समोर कुणीतरी खाऊचा डबा धरला होता. अनोळखी माणसांकडून काही खायचे प्यायचे घेऊ नये असा नियम मी कैक वर्षांपासून पाठ केला होता. पण सर्वांचे डबे डबाभर फिरताना दिसले. मी समोरच्या डब्यातला थोडासा खाऊ तोंडात टाकला.
मग गप्पा सुरू झाल्या. तुम्ही कोण, आम्ही कोण वगैरे वगैरे. माझं दोनतीन महिन्यांपूर्वीच लग्न झालंय, मी पुण्याला तासांवर शिकवते विद्यापिठात, माहेर पुणे, सासर मुंबई, नाटक सिनेमातलं कपड्यांचं काम करते वगैरे सर्व तपशील कळले. मी रोज येणार नाहीये पण महिन्यातून ३-४ वेळा तरी येणेजाणे होईल म्हणून पास काढलाय हे ही त्यांना कळले.
नवीन लग्न आणि हातात बांगड्या नाहीत? नवर्‍याचं आणि तुझं आडनाव एकच का नाही? तू फिरतेस तर नवर्‍याच्या जेवणाचे काय? असले भोचक प्रश्न कुणीही विचारले नाहीत. नवीन लग्न झालेली मुलगी इतका प्रवास करते तर सासरी कुणी बोलत नाही ना? अशी काळजीवाहू चौकशी मात्र झाली.
कर्जतच्या इथे शेजारच्या ताईंनी दोन बटाटेवडे विकत घेतले. पिशवीतून दोन डबे काढले. त्यातला एक उघडला. तो रिकामा होता. झाकणामधे वड्यांचे आवरण काढून ठेवून आतली भाजी डब्यात घेतली. मग दुसर्‍या डब्यातली पोळी काढून पोळीभाजी खाऊन टाकली. मी बघत होते. काय करणार आज भाजी करायला वेळच नाही झाला असं ओशाळं हसत त्यांनी सगळ्यांना सांगितलं. त्या हडपसरला राहणार्‍या होत्या. डे क्वी ची वेळ सकाळी ७:१० ची. ह्डपसरला पीएमटी मिळणार कधी आणि स्टेशनला पोचणार कधी? किमान साडेपाच सहाला तरी निघत असाव्यात घरातून. आणि भाजी न केल्याबद्दल ओशाळवाण्या झाल्या होत्या? माझी सासू तर मी मुंबईत असायचे तेव्हाही स्वैपाकाची अपेक्षा करत नसायची. एकूणात गमतीशीरच सगळे.
सगळ्यांनी माझी माहिती विचारली तशी त्यांचीही त्यांनी सांगितली. त्याबद्दल पुढे कधीतरी...

- नी

Thursday, May 21, 2015

'नी' ची कहाणी

हा दागिना म्हणजे 'नी' च्या कहाणीचे महत्वाचे वळण आहे. आसनं समर्पयामि! मधली गणपतीबाप्पाची कहाणी वाचून एका मायबोलीकर मैत्रिणीने गळ्यातल्यासाठी विचारले. मी या प्रकारे बनवलेल्या दागिन्यांची ज्वेलरी लाइन लाँच करणार आहे हे बर्‍याच मित्रमैत्रिणींना माहिती होतं पण कधी याची मलाही कल्पना नव्हती. त्यामुळे अर्थातच ज्वेलरी लाइनचे नाव काय ठेवायचे वगैरेही ठरलेले नव्हते. मी फक्त माझी कारागिरी अधिकाधिक सुबक व्हावी यासाठी भरपूर प्रॅक्टिस करत होते, ती करता करता माझ्या स्वतःसाठी तांब्या पितळ्याची ज्वेलरी बनत होती.
मैत्रिणीला गळ्यातले करून द्यायचे मान्य केले. मग आम्ही साधारण स्टाइल ठरवली. तिला हव्या असलेल्या तारखेच्या आत गळ्यातले बनवले. त्याच वेळेला 'नी' हे नाव नक्की केले.
मी बनवलेल्यापैकी विकलेला हा पहिला दागिना.
यातला दगड सिंधुदुर्गातल्या नदिकाठी गोळा केलेला आहे.
धातू जर्मन सिल्व्हर आहे.
_MG_0232_m_scr_swapnali_0.jpg
यानंतर ही कला वापरून बनवलेल्या वस्तू (सध्या फक्त कानातली) 'नी' या लेबलखाली लाँच केल्या.
१० एप्रिल रोजी मराठी स्त्रियांपुरत्या असलेल्या एका संकेतस्थळावर याचे छोटे ओपनिंग केले.
मग १५ एप्रिल रोजी फेसबुक पेज सर्वांसाठी खुले केले.
ही फेसबुक पेजची लिंक  https://www.facebook.com/NeeCreation- नी

Wednesday, November 5, 2014

आसनं समर्पयामि!

"या दगडातून काहीतरी करून दे बरं मला वायर वापरून!"
डिसेंबरमधे शूटच्या दरम्यान नदीकाठच्या लोकेशनवर एक दगड दाखवत आमचा डिओपी संजय मेमाणे म्हणाला. दगड होता अगदी गणपतीबाप्पाची आठवण करून देणारा.
01 Ganesha-stone.jpg
वायर रॅप हे तंत्र मी कोणे एके काळी 'सॅन्टा फे ऑपेरा'मध्ये काम करताना शिकले. गेली एक-दोन वर्षे तारा वळवून विविध प्रकारचे दागिने बनवण्याचे माझे प्रयोग चालू आहेत. कामानिमित्ताने जंगल, नदी फिरत असताना विविध आकार, रंग, पोताचे दगड गोळा करणे हा चाळा पहिल्यापासून होताच. या अश्या दगडांना वेगवेगळ्या प्रकारे तारांमधे गुंडाळून त्यातून कलाकृती, कलात्मक दागिने बनवणे यावर गेले काही महिने माझा भर आहे. मी बनवलेल्या काही वस्तू, काही दागिने संजयने नुकतेच बघितले होते. ते त्याला आवडले होते, त्यामुळे तो गणपतीच्या आकाराचा दगड मिळाल्यावर लगेच घरात ठेवायला त्या दगडाचे तारा वापरून मी काहीतरी करून द्यावे अशी इच्छा त्याने व्यक्त केली.
दगडाला त्याचा आकार, रंग, रूप हे सगळं नैसर्गिकरीत्या प्राप्त होतं. जिथे तो दगड सापडला असेल तिथल्या वातावरणाचा, भौगोलिक परिस्थितीचा परिपाक म्हणून कुठलाही दगड तयार होतो. मी गोळा केलेले सगळे दगड कोकण-गोव्यातल्या नदीकाठचे. एकेक दगड हाताळताना, त्याचे रूप बघताना, त्याचा पोत अनुभवताना जाणवतं की हा एकेक दगड म्हणजे नदीच्या वाहण्याची कहाणी आहे! अश्या दगडांना तारांनी बांधून वस्तू तयार करणे म्हणजे नदीच्या वाहण्याच्या कहाणीला सजवून मांडणे. त्यामुळे सजावट ही फक्त कहाणीला उठाव देणारी हवी.
या सगळ्याला हा गणपतीच्या आकाराचा दगडही अपवाद नव्हता. त्या आकाराचे 'गणपती'पण महत्वाचे, ते दिसले पाहिजे. पण गणपतीचा आकार हा तारांनी दाखवायचा नाही अन्यथा या दगडाच्या गणपतीपणाला काहीच अर्थ नाही. त्यामुळे गणपतीला एखाद्या बेसवर बसवायचे आणि बाजूने मखर करायचे हे ठरले.
बेससाठी तांब्याची १८ गेजची तार घेऊन स्पायरल करून एक चकती तयार केली. पितळ्याच्या २१ गेजच्या तारा घेऊन त्याच्या पाकळ्या तयार केल्या. त्या पाकळ्यांच्या दांड्यांची जुडी बांधली आणि पाकळ्या सर्व दिशांना सूर्यकिरणासारख्या मुडपल्या. हा झाला पाया. या पाकळ्या आता सर्व बाजूंनी वजनाला बॅलन्स करणार. या जुडीच्या वरती तांब्याची चकती बसवली. हे झाले बाप्पांचे बसण्यासाठीचे स्टूल. सिंहासनाच्या पायाशी पाकळ्यांच्या दांड्यांच्यामधे तांब्याच्या २२ गेजच्या तारेने विणून घेतले. याच्यामुळे पाया जास्त स्टेबल झाला.
02 sinhasan.jpg
आता बाप्पांना त्यावर बसवायचे तर टेकायला काहीतरी हवे आणि बाप्पा स्टुलावरून हलू नयेत म्हणून त्यांना धरून ठेवणारेही काहीतरी हवे. ते तांब्याच्या १८ गेजच्या तारेतून तयार केले. पण ते तयार करताना एकही तार बाप्पांच्या पुढून क्रॉस होणार नाही आणि गणपतीचा आकार झाकणार नाही ही काळजी घेतली. इथे बाप्पांनी माझी परिक्षा घेतली. विविध पद्धतीने तारा बांधून बघितल्या पण बाप्पा काही स्थिर बसायला तयार नाहीत. काही करा स्टुलावरून उडी मारणे चालूच.
अजून तारा वापरल्या, जास्त गुंडाळले तर पक्के बसणार पण मग गणपतीपण हरवून जाणार... अश्या काहीतरी खोड्यात अडकले होते. कला तुम्हाला आयुष्याविषयी बरंच काही शिकवून जाते ती अशी वगैरे फिलॉसॉफीही सुचत होती त्या दरम्यान. पण उडी कशी थांबवायची? बाप्पा कसे जागेवर रहातील? ते काही समजत नव्हते. सगळं गुंडाळून बाजूला ठेवून दिलं आणि जरा वेळ घेऊन नव्याने विचार करावा, केलेलं काम जाऊ देत, अजून काही वेगळी कल्पना लढवूया असे ठरवले.
'सगळ्या गोष्टींची वेळ यावी लागते' हे एक वारंवार वापरून गुळगुळीत झालेलं वाक्य इथेही खरं ठरलं. तब्बल दीड महिन्यांनी गुंडाळून ठेवलेले बाप्पा आणि त्यांचं अर्धवट झालेलं सिंहासन बाहेर काढलं. केलेलं सगळं खारीज वगैरे करण्यापूर्वी एक शेवटचा प्रयत्न म्हणून आधीच्याच टेक्निकने बाप्पांना बांधून घालायचा प्रयत्न केला आणि काय आश्चर्य बाप्पा शहाण्या मुलासारखे एका जागी बसले. एक महत्वाचे काम झाले होते. अडकलेलं काहीतरी सुटून पुढे वाहतं व्हावं तसं काहीतरी वाटलं मला.
मग मागची प्रभावळ करायला घेतली. पायामधे असलेल्या पाकळ्यांच्या सारखेच काहीतरी करायचे ठरवले कारण खूप वेगळं काही केलं तर पूर्ण डिझाइनचा तोलच ढळला असता. पाकळ्यांचा पिसारा तयार करून बाप्पांच्या मागे बसवला. नंतर त्या पाकळ्यांच्या मधे मधे तांब्याच्या २२ गेज तारेने विणून घेतले.
03 bappa-closup.jpg
वायर रॅप टेक्निकमधे केलेली वस्तू जरी एकाच बाजूने बघायची असली तरी मागची बाजू दृष्टीस पडली तर ती सुबकच दिसली पाहिजे या नियमाला फार महत्व असते. त्यामुळे पिसारा बसवल्यानंतर मागच्या बाजूनेही तारा विणून सगळे जोडकाम वगैरे झाकून टाकले.
04 Moraya-pathmore.jpg
मग बाप्पांच्या सिंहासनाला गादी बनवली. तिच्या चारी बाजूंनी तारेने धावदोरा घातला आणि पाटाच्या कोपर्‍यांना फुलं बसवावी तसे त्या तारांचे छोटे स्पायरल्स बसवले.
05 Gaadi.jpg
अश्या तर्‍हेने बाप्पा पूर्ण तयार होऊन आता आपल्या योग्य स्थळी जाण्यास सिद्ध झाले.
06 Morayaa.jpg
- नी

Search This Blog