Sunday, January 3, 2016

नटसम्राटाचे साम्राज्य..

मायबोली.कॊम दरवर्षी मराठी भाषा दिवस आयोजित करते. २०१२ च्या वर्षी कुसुमाग्रज जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने कुसुमाग्रजांचे साहित्य हा महत्वाचा विषय होता. त्यानिमित्ताने खालीले लेख लिहिला आहे.
-------------------------------------------------------------------------------------------

नाटककार वि.वा.शिरवाडकर लिखित ‘नटसम्राट’ हे नाटक मराठी रंगभूमीच्या इतिहासातील महत्त्वाचे पान. नटसम्राटच्या भाषेची जादू आणि कुठल्याही कसबी नटाला आव्हान वाटेल अशी आप्पासाहेब बेलवलकरांची व्यक्तिरेखा आजही अनेकांना आकर्षित करते.
नटसम्राटच्या संहितेचे मूळ शेक्सपिअरच्या ‘किंग लिअर’मध्ये आहे हे सर्वज्ञातच आहे. किंग लिअर ते नटसम्राट या प्रवासाबद्दल शिरवाडकरांनीच काही टिपणे केलेली आहेत. प्रत्यक्ष आयुष्यात मनावर ताण आला की, नाट्यप्रयोगात शिरणारा नट अशी व्यक्तिरेखा असलेल्या एका इंग्रजी सिनेमाबद्दल शिरवाडकरांनी ऐकले होते. नानासाहेब फाटकांनी ’किंग लिअर’चे रूपांतर करण्याची विनंती शिरवाडकरांना केली होती. परंतु रूपांतर करताना प्रमुख व्यक्तिरेखा राजा न रहाता रंगभूमीचा अनभिषिक्त सम्राट त्यांना दिसू लागला. हा सम्राट त्यांना नानासाहेब फाटकांच्याच व्यक्तिरेखेत मिळाला. कधीकाळी ऐकलेली सिनेमातील व्यक्तिरेखा, ’किंग लिअर’च्या कथेचा सांगाडा, नानासाहेब फाटकांचे व्यक्तिमत्व आणि अखेरीस जेव्हा नटसम्राट कागदावर उतरले तेव्हाचे शिरवाडकरांचे वय या सर्व गोष्टींच्या मिश्रणातून नटसम्राट प्रत्यक्षात आले.
२३ डिसेंबर १९७० रोजी संध्याकाळी, बिर्ला मातोश्री सभागृह, मुंबई येथे नटसम्राटचा पहिला प्रयोग झाला. गोवा हिंदू असोसिएशनने हे नाटक मंचावर आणले होते. संस्थेचा सुवर्णमहोत्सवातला हा प्रयोग होता. या नाटकाचे दिग्दर्शन केले होते श्री. पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी. आप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका केली होती डॉ. श्रीराम लागू यांनी; तर कावेरी साकारली होती शांता जोग यांनी.
गडकर्‍यांच्या ’एकच प्याला’नंतर जवळजवळ ५० वर्षांनी इतके अभूतपूर्व भाषासौंदर्य घेऊन येणारे नाटक म्हणून तेव्हापासून या नाटकाला लोकांनी डोक्यावर घेतले. नटसम्राट या नाटकाला १९७० सालचा राज्य नाट्य पुरस्कार मिळाला तर या नाटकाच्या लिखाणासाठी शिरवाडकरांना १९७४ सालचा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला.
नटसम्राटच्या पहिल्या प्रयोगात गणपतराव बेलवलकरांची भूमिका डॉ.श्रीराम लागू यांनी केली होती. नटसम्राटच्या संवादांच्या बाबतीत पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे लांबच्या लांब स्वगते. या बाबत डॉ. लागू सांगतात की लहानपणी, सकाळी देवापुढे बसून स्तोत्रे पाठ करण्याची सवय त्यांना उपयोगी पडली. साधारण २८१ प्रयोगानंतर डॉ. लागूंनी प्रकृतीच्या कारणास्तव ही भूमिका करणे थांबवले. त्यांच्यानंतर अनेकांनी ही भूमिका केली. प्रत्येकाने आपापल्या परीने या भूमिकेत रंग भरण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकाला डॉ. लागूंशी केलेल्या तुलनेला तोंड द्यावे लागले.
डॉ. लागूंच्या नंतर ही भूमिका समर्थपणे पेलली दत्ता भट यांनी. दत्ता भटांचा खडा आवाज व भारदस्त व्यक्तिमत्व यामुळे बेलवलकरांच्या व्यक्तिरेखेला वेगळे परिमाण मिळाले. त्यांचा नटसम्राट अपरिमित गाजला. दत्ता भटांनी नटसम्राटचे ४०० प्रयोग केले. त्यांनाही नंतर प्रकृती-अस्वास्थ्यामुळे नटसम्राट करणे थांबवावे लागले. नंतर १९७७च्या दरम्यान सतीश दुभाषींनी नटसम्राटाची भूमिका पेलली. त्यांनी आधीच्या दोघांचा नटसम्राट पाहिला नव्हता. याचमुळे ठराविक साच्यापेक्षा वेगळा नटसम्राट उभा करायचा त्यांनी प्रयत्न केला. १९७९ च्या सुमारास याच संचामधे चंद्रकांत गोखले यांनी नटसम्राट साकारायला सुरुवात केली. याही नटसम्राटाला प्रेक्षक व समीक्षकांची चांगली दाद मिळाली.
या चारही नटसम्राटांच्या बरोबर कावेरी साकारणार्‍या एकच अभिनेत्री होत्या त्या म्हणजे शांता जोग. कणखर पण मर्यादशील अश्या त्यांनी साकारलेल्या कावेरीची छाप पुसणे आजपर्यंत कोणालाही शक्य झाले नाही.
नंतर १९८२ साली अरविंद देशपांडे यांच्या दिग्दर्शनाखाली यशवंत दत्त यांनी बेलवलकर व सुलभा देशपांडे यांनी कावेरी साकारली. स्वतः शिरवाडकरांनी ‘आत्तापर्यंतचा मला सगळ्यात भावलेला नटसम्राट’ अशी पावती या नटसम्राटाला दिली होती. या प्रयोगाचे दिग्दर्शकीय वैशिष्ट्य म्हणजे नाटकातील बाकीची पात्रे म्हणजे मुले, सुना व जावई हे सर्व आधीच्या प्रयोगांप्रमाणे खलनायकी ढंगाने न दाखवता परिस्थितीचे गुलाम म्हणून दाखवण्यात आले होते.
नंतर परत एकदा पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी मधुसुदन कोल्हटकर व लता अरुण यांना घेऊन नटसम्राट दिग्दर्शित केले. या प्रयोगाचे श्रेयस इतकेच की आजपर्यंत महाराष्ट्रातल्या ज्या गावांमधे नटसम्राट पोचला नव्हता तिथपर्यंत तो पोचला. यानंतर नटसम्राटाच्या भूमिकेत राजा गोसावी व कावेरीच्या भूमिकेत उषा नाडकर्णी असाही एक प्रयोग करण्यात आला. उषा नाडकर्णींच्या कावेरीने वाहवा मिळवली पण गोसावींचा नटसम्राट मात्र लोकांना फारसा आवडला नाही.
पहिल्या नटसम्राटानंतर दत्ता भटांपासून राजा गोसावींपर्यंत अनेक अभिनेत्यांनी नटसम्राटाचे आव्हान स्वीकारून झाल्यानंतर १९८६ साली डॉ. लागूंनी पुन्हा एकदा नटसम्राट पेलले. यावेळेला दिग्दर्शक होते माधव वाटवे आणि कावेरी साकारत होत्या सुहास जोशी. या नटसम्राटालाही लोकांची मान्यता मिळाली. सुहास जोशींची थोडी वेगळ्या पद्धतीने उभी केलेली कावेरीही लोकांना आवडली.
यानंतरही अनेकांनी नटसम्राटला हात घालण्याचा वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केला. त्यातील विशेष उल्लेखनीय प्रयोग म्हणजे लक्ष्मण देशपांडे व अनुया दळवी यांनी केलेला द्विपात्री नटसम्राटाचा प्रयोग. या प्रयोगाचे दिग्दर्शनही प्राध्यापक लक्षमण देशपांडे यांचेच होते. देशपांड्यांनी नाटक द्विपात्री करून त्याचे रुपडेच बदलून टाकले. यासाठी संशोधन करून संहितेचे पुन्हा संपादन केले. नेपथ्य, नाटकातील स्वगते व पार्श्वसंगीत यांचाही वेगळ्या पद्धतीने विचार केला. गणपतराव बेलवलकर आणि कावेरी या दोन पात्रांव्यतिरिक्त बाकी पात्रे उल्लेखापुरतीच ठेवली. अगदीच गरज पडली तेव्हा त्यांचे संवाद नुसते ऐकवले. हा प्रयोग म्हणून यशस्वी झाला असे समीक्षकांनी मांडले आहे.
मराठी भाषेतून इतर भारतीय भाषांत अनुवादित केल्या गेलेल्या महत्त्वाच्या मराठी नाटकांपैकी नटसम्राट हे एक. या नाटकाचे इंग्रजी, गुजराथी, हिंदी आणि तेलुगू भाषांतील अनुवाद आणि नाट्यप्रयोग दोन्ही भरपूर गाजले.
काही अनुवाद :
इंग्रजी: द लास्ट सीन - अनु. - वसंत लिमये
हिंदी: नटसम्राट - अनु. र. श. केळकर.
तेलुगू :नाटकांतम - अनु. उदयभानू
गुजराथी: २ अनुवाद१. बहुत नाच्यो गोपाला - कांती मडीया२. हमारी दुनिया तमारी दुनिया - प्रवीण सोलंकी


हिंदीमधे ३ - ४ वेगवेगळ्या दिगदर्शकांनी हे नाटक केले आहे.
तेलुगूमधे नाटकांतम - संस्था रंगधारा - जानेवारी १९९८. दिग्दर्शन: प्राध्यापक भास्कर शेवाळकर. प्रमुख भूमिका: चाटला श्रीरामलू
गुजराथीमधे
१. बहुत नाच्यो गोपाला - १९७४ दिग्दर्शन: कांती मडीया. प्रमुख भूमिका: चंद्रकांत भट
२. हमारी दुनिया तमारी दुनिया - १९९५ दिग्दर्शन व प्रमुख भूमिका: सिद्धार्थ रांदेरीया
अजूनही अनेक अभिनेते आणि दिग्दर्शक आपापल्या परीने हे धनुष्य पेलायचा प्रयत्न करताना दिसतात.
हा झाला या नाटकाचा इतिहास.

माझ्या पिढीने लहानपणी नटसम्राटचे वादळी वारे ऐकले. किंचित कळत्या वयात दूरदर्शनवर नटसम्राट बघितले. नववी-दहावीच्या काळात हे नाटक वाचले, उतारे पाठ केले आणि चोख भाषेत म्हणून दाखवून सगळ्यांकडून शाबासकी मिळवली. तेव्हापासूनच नटसम्राटच्या संदर्भाने सतत डोक्यात दोन वेगळ्या टोकाची मते येत असत. मराठी शाळेत शिकल्याने आणि वाचनाचा किडा वेळेवर डसल्याने नटसम्राटच्या लिखाणातले भाषासौंदर्य, नाटकाची बांधणी हे प्रचंड आवडत असे आणि त्याच वेळेला अप्पासाहेबांचा भाबडेपणा त्रासदायक होत असे. त्या भाबडेपणाचे, भोळेपणाचे निष्कारण उदात्तीकरण आहे असं वाटत असे. आणि कुठेतरी अप्पासाहेबांच्या दुरवस्थेला तो निष्कारण भाबडेपणाच जबाबदार आहे असे वाटत राही. पुढे पुढे ते अधोरेखित होत गेले. अखेर ठाम मतबीतच बनले!
मग नाटक शिकताना 'लियर' पचवला. त्याचा भाबडेपणा हा त्याच्या काळाला आणि कर्तृत्वाला शोभून दिसतोय हे जाणवलं. तो खटकेच ना. त्याची वाताहात इत्यादी सगळीच ट्रॅजेडी एका प्रकारे रोमॅन्टिसिस्टिक वाटत राहिली. भली मोठी नाट्यमय उंची होती त्या ट्रॅजेडीला. या पार्श्वभूमीवर परत नटसम्राट आठवल्यावर ५० च्या दशकातल्या नटसम्राटाचा भाबडेपणा जाम म्हणजे जामच खटकू लागला. मग नाटक ट्रॅजिक न रहाता मेलोड्रामाच जास्त वाटू लागला.
मधे प्रसारभारतीच्या उपक्रमांतर्गत दूरदर्शनसाठी ६ भागांमधे नटसम्राट करून दिले. त्यावेळेला अभ्यास करताना पुन्हा तेच जाणवत राहिले. मुलगा-सून, मुलगी-जावई हे खलनायक न वाटता परिस्थितीची बाहुली आहेत हे जाणवू लागले. नाटक आशय-विषय-कथेच्या बाबतीत मनातून उतरत गेले. भाषा आणि नाटकाची बांधणी मात्र कायम मोहात पाडते यात वाद नाही.

- नीरजा पटवर्धन
तळटीप: वरील लेखातील सर्व संदर्भ एन सी पी ए, मुंबई येथील ग्रंथालयातील 'नटसम्राट'च्या संदर्भ संग्रहातून घेतले आहेत.

Sunday, December 27, 2015

दोदोल - गोवन किरिस्ताव स्वीट पण संपूर्ण शाकाहारी.

लागणारा वेळ: 
दीड ते दोन तास
लागणारे जिन्नस: 
kala-gool.jpg
२ कप नारळाचे दूध
३/४ कप नाचणीचे सत्व किंवा पिठ (मी पिठ वापरले पण सत्व वापरल्यास जास्त बरे)
३-४ चमचे तूप किंवा खोबरेल तेल
३/४ कप काळा गूळ (माडाचा गूळ) - हा म्हापश्याच्या मार्केटमधे डिसेंबर-जानेवारी महिन्यात नक्की मिळतो. इतर कुठे मिळत असल्यास माहित नाही. गोवन कॅथलिक मित्रमैत्रिणी असतील तर त्यांना विचारावे. पण या गुळाशिवाय दोदोलची योग्य चव येणार नाही.
हा काळा गूळ/ माडाचा गूळ (सौदागर सिनेमातला तो हाच की नाही ते माहित नाही. हा गोव्यातला आहे. तो सिनेमा बंगालातला होता.  )
१ टेबलस्पून गव्हाचे पीठ
चिमूटभर वेलदोडा पूड
१०-१२ काजू अर्धे केलेले. आणि हवे असल्यास बदाम

क्रमवार पाककृती: 
१. काळा गूळ बारीक किसून घ्या
२. नारळाचे दूध, नाचणीचे पिठ, काळा गूळ एकत्र करा. गुठळ्या रहाणार नाहीत आणि गूळ पुरा विरघळेल असं बघा. मी हॅण्ड ब्लेण्डरने मिक्स केलं.
३. ज्या पॅनमध/ ट्रेमधे किंवा कपांमधे दोदोल सेट करणार त्याला आधीच तुपाचा/ खो तेलाचा हात लावून घ्या.
४. जाड बुडाच्या पॅनमधे तूप/ खो तेल घाला. तापायला आले की त्यात काजू, बदाम वगैरे टाका. खरपूस परतून घ्या. गॅस कमी करा. मंद आचेवर ठेवा.
४. ना दूध, गूळ आणि ना पिठ असं मिश्रण या पॅनमधे सोडा. एका हाताने ढवळत रहा. आता गुठळ्या होऊ नयेत यासाठी सतत ढवळत रहावे लागेल.
५. थोडा घट्टपणा येऊ लागला की वेलची पूड भुरभुरा. ढवळत रहा. मग १ टेबलस्पून गव्हाचे पीठ पण भुरभुरा. ढवळत रहा.
६. मिश्रण घट्ट होऊ लागले, कडा सोडू लागले आणि साधारण अर्धे झाले की गॅस बंद करा.
७. पॅन/ ट्रे किंवा कप्समधे ओता. अर्धा तास गार व्हायला आणि सेट व्हायला द्या.
८. सेट झाले की काढा. वरून काजूने डेकोरेट करा. खा. गरम किंवा गार दोन्ही उत्तम लागते.

हे तयार झालेलं दोदोल.
वाढणी/प्रमाण: 
साधारण ७-८ कपकेक्सचे मोल्डस भरतील
अधिक टिपा: 
वड्या काढल्याप्रमाणे ट्रेमधे ओतून मग कापून याच्या वड्या पाडता येतील. किंवा छोटे छोटे कप्स भरता येतील.
वड्या म्हणलं तरी या कडक वड्या होत नाहीत. तश्या दुलदुलितच रहातात. म्हणूनच म्हणे त्याचं नाव दोदोल आहे असं एका गोव्यातल्या मैत्रिणीने सांगितलं होतं.
गोव्याला एवढ्यात कोणी जाणार असेल तर माझ्यासाठी म्हापश्याच्या स्टॅण्डजवळच्या मार्केटातून प्लीज प्लीज हा गूळ घेऊन या.

Saturday, December 5, 2015

सालंकृत

हा लेख २००२ सालच्या मायबोलीच्या दिवाळी अंकासाठी लिहिला होता. असंच कशावरून तरी आठवण झाली त्यामुळे लेखाचे पुनरूज्जीवन करावेसे वाटले. केले.  १३ वर्षांपूर्वी लिहिलेला लेख त्याच्या विस्कळीतपणासकट तसाच ठेवलाय. अगदीच जेमतेम बारकेसे बदल आहेत.
---------------------------------------------------------------
कधीही कुठलाही चॅनेल लावा, आजकाल सगळीकडे सोन्याने लगडलेल्या बायकाच दिसतात. एवढे दागिने घालुनहि त्या अजून दागिने नि साड्या खरेदी करत असतात. लाख दोन लाखाचे दागिने तर त्या सहज खरेदी करतात. कल्पना करा कुणा परदेशी माणसाने हे बघितले तर त्याला वाटेल ‘सोन्याचा धूर’ निघणारा काळ तो हाच बहुतेक. 
"अरे लोकांना खायला मिळत नाही  आणि दागिने कसले खरेदी करताय! भारतात लोकांच्या तिजोर्‍यात डेड मनी बनून राह्यलेलं सोनं बाजारात आलं ना तर तेवढ्या बळावर भारत श्रीमंत बनेल.”असे मानणारेही काही जण आहेत. आता हे कसे काय घडू शकते हे कळण्याइतके व्यावहरिक शहाणपण माझ्यात नाही तेव्हा अर्थातच त्यावर नो कमेंटस.
दागिने म्हणजे नुसतं सोनं नाही पण. त्यात एक संस्कृती आहे, कला आहे. आपल्याकडच्या वेशभूषेच्या  इतिहासात दागिन्यांच्या इतिहासाला वेगळे स्थान आहे. आता मला सांगा ’उत्सव’ मधे किन्वा ’मृच्छकटीकम’ मधे जर तो दागिन्यांचा सीन नसता तर  वसंतसेनेचा आणि चारुदत्ताचा रोमान्स हा कुठल्याही इतर प्रेमिकांसारखाच वाटला असता ना. दागिन्यांच्या त्या गमतीने हा रोमान्स वेगळ्याच पातळीवर नेउन ठेवलाय. शाहीर अनंत फंदींची तर वेगळीच गंमत आहे. बाळी ह्या कानातल्या अलंकाराची बत्तीस नावे असलेली एक लावणी त्यांनी रचलीये जी ’बत्तिस बाळ्यान्ची लावणी’ म्हणून प्रसिद्ध आहे. यावर कडी म्हणुन परशुराम शाहीराने तेहेतीस बाळ्यान्ची नावे गुंफून चढी लावणी रचली होती अशी एक गोष्ट शाहीरी जगात प्रसिद्ध आहे.
लोकसाहीत्यात किंवा जनमानसात बांगडी फुटणे किंवा वाढणे याला एक अभद्र अर्थ आहे तसाच एक जामच रोमँटिक अर्थ पण आहे.  ”नदीच्या काठावर मी पाणी भरायला गेले असताना ’तो’ आला नि त्याने छेडाछेडी सुरु केली, त्या ओढाओढीत मझ्या बांगड्या फुटल्या. आता मी घरी काय सांगू?  कशी घरच्यांना तोन्ड देउ?” असे गाणे म्हणणारी जया भादुरी आपण सगळ्यांनीच ’अभिमान’ मधे बघितलेली आहे. 
दागिने घालताना काहीजण ’शक्तिप्रदर्शन’(वजन उचलण्याचे नि पैशाचे) म्हणून घालत असतीलहि पण दागिने घालण्याचा तो अर्थ नाहीच मुळी. शरीर सुशोभित करणे हा दागिने घालण्याचा महत्वाचा उद्देश. थोडे इतिहासात डोकावाल तर शरीर सुशोभिकरणाबरोबरच लज्जारक्षण हाही उद्देश दिसून येतो. अजूनहि काहि आदीवासी जमातीत हे दिसते. ठाकूर बायका (सह्याद्रीतले आदीवासी)  आजहि चोळीवरून पदर घेत नाहित पण मण्यांच्या माळा मात्र असतातत भरगच्च. 'बॉम्बे स्वदेशी' नाहीतर तत्सम ठिकाणी मिळणार्‍या एथनिक ज्वेलरीच्या तोंडात मारतील अश्या ह्या माळा असतात.
दागिने घालण्याचा अजुन एक उद्देश इतिहासात दिसून येतो तो म्हणजे एम्फसिस किंवा लक्ष वेधणे. त्या त्या काळाप्रमाणे स्त्री देहाच्या सौंदर्याच्या कल्पना बदलत जातात आणि तो तो भाग उठून दिसावा यासाठी दागिन्यांची योजना होते. अजंठा किंवा त्याही आधीच्या लेण्यांमधे स्त्रियांनी एक कंबरपट्टा घातलेला दिसतो. तो आपल्याला माहीत असलेल्या कंबरपट्ट्यासारखा अगदी कमरेवर न बांधता बराच खाली बांधलेला आढळतो. त्या काळामधे बरिक कंबर पोटाला हलक्याश्या वळ्या आणि रूंद नितंब  हे सौंदर्याचे लक्षण होते. हे सगळे एम्फसिस करायला तो कंबरपट्टा किंवा वेशभूषेच्या इतिहासाच्या भाषेत 'गर्डल' असायचे.
मंगळसुत्र नावाचा एक दागिना ज्याच्या मागच्या भावनेचा किंवा विश्वासाचा यच्चयावत भारतीय चंदेरी दुनियेने वापरून वापरून चोथा केलेला आहे. पण स्त्रीच्या गळ्यात इतर अनेक अश्या गोष्टी घातल्या जात ज्या तिच्या विवाहित असल्याची साक्ष देत. फार जुनी नाहि शिवकालातलीच गोष्ट आहे. जवाळी नावाची एक माळ, जिच्यात खारका, बदाम, पिस्ते असत. ही माळ ब्राह्मण नवर्‍यामुलीच्या व सव्वाष्णीच्या गळ्यात आवश्यक असे.  कदाचित सासरी हाल झाले, खायला दिले नाहि तर आपले असावे म्हणून या माळेची योजना असेल का हो? 
कोल्हापुरी साज तर आपल्या सगळ्यान्च्या परिचयाचा. ह्या दागिन्यालाही मंगळसूत्राइतकेच महत्व होते. अशुभ निवारणासाठी तसेच विविध देवतांशी संबंधित अशी अनेक प्रतिके या साजात असतात. ताईत, वाघनख, बेलपान, पानडी, कारले, दोडका, कासव, मासा, नाग, भुन्गा, मोर, शन्ख, चक्र, चन्द्र, दोन तोंडे असलेला गरुड अश्या विविध पदकांनी हा साज बनलेला असे. साजामधे आज, सारखेपणा साधण्यासाठी असेल कदाचित, ही पदके कमी झालेली आढळतात. कारले या विशिष्ट पदकाला अजुन एक वेगळा अर्थ आहे. ग्रामिण भागात आजहि काही ठिकाणी कारलं डोरलं असे म्हटले जाते. कारले हे त्याच्या आकारामुळे पुरुषाचे प्रतिक मानले जाते त्यामुळे विवाहितेच्या गळ्यात हे प्रतिक असण्याची प्रथा असावी.
संकट निवारण हा एक खुप मोठा उद्देश असे दागिने घालण्यामागचा. यासाठिच दंडावर ताईत, गळ्यात वाघनख वगैरे घालतात. पुरुष व लहान मुले यांच्या अंगावर या दोन गोष्टी जास्त आढळून येतात. दुसरेपणावर दिलेल्या स्त्रीच्या गळ्यात पुतल्यांच्या माळेत एक ’सवतीचि पुतळी' असे. मृत सवतीच्या आत्म्याने त्रास देउ नये म्हणून ही घातली जात असे.
कोळी लोकांचे आयुष्य समुद्रावर अवलंबून असते. म्हणून अर्थातच त्यांच्याकडे समुद्रपूजनच्या प्रथा आहेत. कोळी बायका उजव्या हातात फक्त चांदीचा वाळा घालतात व डाव्या हातात वाट्टेल तितक्या बांगड्या. उजव्या हातातल्या बांगड्या नवर्‍याच्या आयुष्याकरता समुद्रदेवतेला अर्पण केलेल्या असतात. 
दागिन्यांचा इतिहास हा असा थोडासा डोळ्याखालून घातल्यावर मग जेव्हा मी एकेक दागिना अंगावर चढवते तेव्हा मला प्रत्येक काळातल्या स्त्रीशी काहीतरी नातं जाणवतं.
एलकुंचवारांच्या 'वाडा चिरेबंदी’ मधली वहिनी घराण्यातले जुने दागिने चढवते नि म्हणते "खरं सांगू? असं वाटते, हे सोनं नाही नुसतं. खूप काही आहे आणखी. वाटते, देशपांड्यांच्या घरातल्या सगळ्या बायका उभ्या आहेत माझ्या अवतीभवती कौतुकानं पहात. सगळ्यांच्या मायेचा स्पर्श आपल्याला लागून राह्यला असं वाटते. किती जणींनी हे घातलं, जतन केलं. कोणाकोणाचे हात, गळे ह्यांना लागले असतील.” 
हे असं किंवा त्याहूनही खूप मोठं काहीतरी मला जाणवत रहातं.

- नीरजा पटवर्धन
------------
संदर्भ:
•    Ancient Indian Costume – Roshen Alkazi
•    मराठा कालखंडातील महाराष्ट्राचे अलंकार: (इ. स. १६०० ते १८५०) – म. वि. सोवनी यांचा थिसीस.
•    वादा चिरेबंदी – महेश एलकुंचवार
•    स्त्री-पुरुष – छाया दातार
•    शिवकालातील व पेशवेकालीन स्त्री जीवन – डॉ. शारदा देशमुख

Wednesday, October 28, 2015

तुम्ही काय करता?

"मी गोग्गोड वनिता समाज इथून बोलतेय. नटमोगरी मेकपकर यांनी नंबर दिलाय तुमचा."
मेकपकर बाईंचं नाव ऐकून मी जरा सावध झाले. नेहमीप्रमाणेच कसलीतरी प्रचंड धावपळ चालू होती. डोक्यात पुढच्या चार पाच दिवसांच्या कामांची यादी फिरत होती. त्यात मेकपकर बाईंच्या रेफरन्सने फोन.

"आम्ही ना खूप छान कामे करतो. मेकपकर बाई तर आमच्या अगदी नेहमीच्या आहेत."
मी अजूनच धास्तावले.
"२४ तारखेला आमच्या मंडळाचा कार्यक्रम आहे. तिथे आम्ही मंगळागौरीचे पारंपारिक खेळ आधुनिक गाण्यांवर करून दाखवणार आहोत. आम्ही सगळ्या नऊवारी नेसणार आहोत. आम्ही एकूण १५ जणी आहोत. तर तुम्ही येऊ शकाल का?"
"मी? कशासाठी यायचंय मी?"
"तुम्हाला नऊवारी साडी नेसवता येते ना?"
"हो येते."
"तर आम्हाला साड्या नेसवायला या तुम्ही. तुमचा रिक्षाचा खर्च देऊ आम्ही. पत्ता लिहून घेता का?"
"मला नऊवारी साडी नेसवता येते पण ते काही माझं काम नाहीये. मी कॉश्च्युम डिझायनर आहे."
"पण मेकपकर बाईंनी तर सांगितले की तुम्ही साड्या नेसायला शिकवता."
"हो शिकवते. पण ते नाटकाचे विद्यार्थी असतात. त्यांना कॉश्च्युम डिझायनिंग हा विषय असतो अभ्यासाला. तो संपूर्ण विषय मी शिकवते. त्या विषयाच्या अंतर्गत हा एक टॉपिक असतो. तो ही मी शिकवते. साड्या नेसवायला जाणे हे माझे काम नाहीये."
"पण येतं ना तुम्हाला?"
"अहो तुमच्या लक्षात येतंय का? मी कॉश्च्युम डिझायनर आहे. शूटसवर माझ्या हाताखाली कपडे नेसवायला माणसं असतात. ते त्यांचं काम असतं. मला येतं म्हणजे तो माझा व्यवसाय नाहीये."
"पण आम्ही रिक्षाचा खर्च देऊ ना."
"कुठून? विलेपार्ल्यापासून?"
"तुम्ही अमुक पेठेत राहता हे सांगितलंय मेकपकर बाईंनी आम्हाला."
"रहायचे. आता मी मुंबईत राहते."
"पण नाहीच का जमणार? मेकपकर बाईंनी आम्हाला एवढं सांगितलं होतं."
"मेकपकर बाईंना सांगा आधी कॉश्च्युम डिझायनर म्हणजे काय ते समजून घ्या." (निघाल्या प्रमुख व्हायला..!)
"आमचा अगदीच प्रॉब्लेम होणारे हो."
"मी काय करू? तुमचा प्रश्न आहे तो."

मी वैतागून फोन बंद केला. मेकपकर बाई तीनहजार सातशे त्रेपन्नाव्या वेळेला डोक्यात गेल्या.
----------------------------------
तळटिप: या किश्श्यातील व्यक्तींचे कुणा खर्‍याखुर्‍या व्यक्तींशी साम्य आढळल्यास योगायोग समजू नये
--------------------------------

- नी

Sunday, October 11, 2015

सुरक्षितता वगैरे!

'उद्याच्या दिवशी काहीही काम करावं लागणार नाहीये. उद्या 'सेफ्टी डे' आहे.' असं सर्वांना सांगितलं गेलं तेव्हा मी चकीत झाले होते. जिथे तासावर कामाचे पैसे मिळतात अश्या ठिकाणी 'सेफ्टी डे' पायी आख्खा दिवस बिनकामाचा घालवूनही कामाचे तास धरले जाणार होते. हे कळल्यावर मी अजून जास्त चकीत झाले.
युनिव्हर्सिटी ऑफ जॉर्जियामधे शिकत असताना, समर सेमिस्टरमधे, सॅन्टा फे ऑपेरा या समर थिएटर कंपनीत त्या वर्षी मी इंटर्नशिप करायला गेले होते. त्यावर्षी सॅन्टा फे ऑपेरा कंपनीच्या कॉश्च्युम शॉपमधे स्टिचर अप्रेंटिस होते. तो माझा पहिलाच उन्हाळा होता तिथला. काम चालू झाल्याच्या दोन तीन दिवसातच हा सेफ्टी डे असणार होता. 'कैत्तरी फिरंगी फ्याड!' हे आलंच डोक्यात. पण प्रत्येकाला सेफ्टी डे ला हजेरी लावणे कंपलसरी होते त्यामुळे बघू तरी काय गंमत असं म्हणत दुसर्‍या दिवशी ऑपेराच्या रांचवर पोचले.
सेफ्टी लेडी नावाने ओळखली जाणारी एक इंस्ट्रक्टर लेक्चर द्यायला आली होती. आल्याआल्या तिने एक मोठे बुकलेट दिले. ज्यामधे ऑपेरा रांचवर किंवा ऑपेराच्या विविध शॉप्समधे वापरल्या जाणार्‍या वस्तू आणि त्यांच्यासंदर्भाने शक्य असलेले धोके आणि त्यासाठी घ्यायची काळजी, मस्ट डूज, मस्ट डोण्टस यांच्याबद्दल तपशीलात वर्णन होते.
हातशिलाईची सुई, सर्जींग किंवा ओव्हरलॉकिंगचे मशीन, प्रॉप शॉप वा सीन शॉपमधे वापरली जाणारी महाकाय आणि भयावह मशिनरी, कॉश्च्युम क्राफ्ट, प्रॉप शॉप, डाय शॉप, मिलिनरी, मेकप वगैरें विभागात वापरली जाणारी रसायने हे सगळंच किती आणि कसं धोकादायक आहे ते सांगितलं गेलं. हे सगळं वापरताना घ्यायची काळजी व नियम सांगितले गेले. उदाहरणार्थ हातशिलाई करताना थिंबल वापरणे कंपलसरी, सर्जर किंवा ओव्हरलॉक मशीन वापरताना हातांची पोझिशन कशी ठेवायची? सर्व मशिन्स वापरताना सेफ्टी गॉगल्स कंपलसरी, विविध स्प्रे पेंटस वापरताना उघड्यावर/ मोकळ्या हवेवर वापरायचे आणि हातमोजे-सेफ्टी गॉगल्स-रेस्पिरेटर घालूनच ते काम करायचे, अ‍ॅसिटोन हाताळताना रेस्पिरेटर आणि अ‍ॅसिटोनला दाद न देणारे हातमोजे घातलेच पाहिजेत, काही मशिन्स वापरताना सेफ्टी गॉगल्सबरोबर कानात रबरी बोळे वापरलेच पाहिजेत वगैरे.
हे नियम पाळले जातात की नाही हे बघण्यासाठी काही लोक कायम रांचवर असणार होते. नियम न पाळणार्‍यांना मेमो मिळणार होते. सर्व नियम पाळून चुकून अपघात झालाच म्हणजे अगदी एखाद्या तुलनेने कमी घातक वस्तूचा/ रसायनाचा कण डोळ्यात गेला तरी तो अपघातच. तर तो झाला तर काय खबरदारी घ्यायची याचेही प्रशिक्षण झालेच. इतका छोटा अपघात असला तरी त्याची नोंद सेफ्टी रजिस्टरमधे झाली पाहिजे आणि त्याचा व्यवस्थित रिव्ह्यू नोंद करून ठेवला जायला हवा हे ही कंपलसरी होते.
हे सगळं शिकवलं जाताना सेफ्टी लेडी जी होती ती भरपूर विनोदांची पखरण करत शिकवत होती त्यामुळे काही गोष्टी फारच पक्क्या स्मरणात राह्यल्या. उदाहरणार्थ 'सेन्सटायझेशन' ही प्रक्रिया. एखाद्या वस्तूच्या वारंवार वापराने त्या वस्तूची अ‍ॅलर्जी निर्माण होते हा या शब्दाचा थोडक्यात अर्थ. हे अर्थात ठराविक केमिकल्स/ वस्तूंच्या बाबतीतच होते. त्या केमिकल्सची यादी बुकलेटात होती. ती अर्थातच डोक्यावरून गेली. त्यातल्या एका केमिकलचे नाव घेऊन तिने सांगितले "हे म्हणजे तुम्ही वापरता ते रबर लॅटेक्स, जे ग्लोव्ह्ज आणि मेकपमधे वापरले जाते." हे एवढं सिन्सियरली सांगून मग 'आणि बघा ते लॅटेक्स कशात वापरतात ते... ' अशी टिप्पणी हवेत सोडून दिली. तिसर्‍या सेकंदाला संपूर्ण जनता खिदळत होेती. आणि सेन्सटायझेशन आमच्या डोक्यात पक्के झालेले होते.
सेफ्टी डे झाला. कामे सुरू झाली. पहिल्या वर्षी मी केवळ स्टिचिंगमधे होते आणि अप्रेंटिस असल्याने हातशिलाईच करायला लागायची बहुतेकवेळा त्यामुळे या सेफ्टी गाइडलाइन्सचा फारसा मुद्दा आला नाही. नंतरच्या उन्हाळ्यात मी कॉश्च्युम क्राफ्टमधे गेले. मग त्यावर्षी विविध प्रकारचे मास्कस ते रेस्पिरेटर्स आणि ते कश्याकश्यापासून सुरक्षितता देऊ शकतात वगैरे सगळ्यांबद्दल शिकवले गेले. रेस्पिरेटर्सची फिटींग्ज करून, माझ्या चेहर्‍याच्या आकाराला योग्य असा रेस्पिरेटर मला दिला गेला. दोन तीन प्रकारचे ग्लोव्ह्ज दिले गेले. नियमही समजावले गेले.

safety-gear.jpg
स्प्रे पेंट करण्यास सज्ज अशी मी.



















पण माझा पिंड भारतीय होता. नियम पाळण्याची चालढकल, 'चलता है!', 'इतनेसे क्या होनेवाला है!' हे सगळं हाडीमाशी खिळलं होतं. मग एकदा घामामुळे वैतागून सेफ्टी गॉगल्स बाजूला ठेवून स्प्रे पेंट करायला घेतले आणि नेमकी वार्‍याने दिशा बदलली. वाळवंटातला वारा तो, वेग आणि ताकद भरपूर. खालच्या दिशेने केलेला स्प्रे वार्‍याने उडून डोळ्यात गेला. डोळे धुणे बिणे झाल्यावर, सेफ्टी रूममधे अ‍ॅक्सिडेंट रिपोर्ट वगैरे झाला. माझाच निष्काळजीपणा होता वगैरे मी लिहून दिले. मग माझ्यावर अजूनच करड्या नजरेने लक्ष ठेवण्यात यायला लागले. कुठल्या तरी केमिकलचा वापर करताना ठराविक ग्लोव्ह्ज घातले नाहीत म्हणून मला मेमो मिळाला. यानंतर मला सेफ्टी रूममधे असे न वागण्याबद्दल आणि मी किती मोठ्या रिस्कस घेते आहे याबद्दल सांगण्यात आले. मेमोज नंतरची स्टेप पे क्ट ही होती त्या दडपणाने का होईना मला अक्कल आली आणि मी माझ्याच भल्याचे नियम पाळू लागले. हे कदाचित ऑपेरा कंपनीने कुठल्याही लॉसूटपासून किंवा तत्सम कॉम्प्लिकेशन्सपासून स्वतःचा 'अ‍ॅस वाचवणे' असेल पण नियम योग्य आणि गरजेचे होते आणि माझ्या भल्याचेच होते यात वाद नाही.
कट टू ’मेरा भारत महान!’
आपापल्या कामाच्या परिघातले, स्वत:च्या भल्यासाठी असलेले नियम पाळताना फार कमी लोक दिसतात. विविध यंत्रे, रसायने यासंदर्भाने असे नियम असतात ते पाळायचे असतात याबद्दलची जागरूकता बहुतेक मोठे कारखाने कदाचित सोडले तर बाकी कुठेही नाही. छोट्य़ा उद्योगांच्यात, शेतीसारख्या उद्योगात तर अजिबातच नाही.
सुरक्षिततेचे नियम हे आपल्याला चोचले, फ्याडं, जास्तीचा शहाणपणा वगैरेच वाटत असतात. पळवाटा काढण्यात तर आपण माहिर असतो. धबधबा, कडे, समुद्र याठिकाणी फिरायला गेलेल्यांचे अपघाती मृत्यू किंवा लोकलच्या टपावर चढल्याने वीजेचा धक्का बसून झालेला मृत्यू ही काही अतिशय चपखल उदाहरणे. हातशिलाई करणार्‍याच्या उजव्या हाताजवळ(माणूस डावरा असेल तर डाव्या हाताजवळ) बसू नये नाहीतरे सुई डोळ्यात जाईल. असं मला लहानपणापासून आजी आणि आई सांगत आल्या. आयुष्यात भरपूर हातशिलाई केलेली असल्याने त्याचे कारण आणि महत्व मला कळते. साध्या शिवणकामात असे नियम आपल्याकडे आहेत तर याचा अर्थ इतर सर्व ठिकाणीही पारंपरिकरित्या असे नियम असणार कदाचित त्याला देवाधर्माचा रंग लावलेला असेल पण नियम असणार.
मग हे सगळं कुठे गेलं? स्वतःच्या जिवाबद्दल आपण इतके निष्काळजी का आणि कधी झालो? वापरायच्या वस्तू अचानक बदलल्या गेल्याने गोंधळ होणे शक्य आहे पण नियम पाळणे आणि सुरक्षित राहणे याचे महत्व वाटेनासे का झाले? एवढा स्वतःचा जीव स्वस्त का वाटायला लागला?
इतकी अति माणसे सर्वत्र असल्याने जोवर आपला वा जवळच्यांचा जीव जात नाही तोवर माणसाच्या जीवाचे महत्व समजत नाही असे म्हणायचे का?
मला काही होणार नाही हा फालतू आत्मविश्वास कुठे जन्म घेतो नक्की? किंवा मला काही का होईना कुणाला फरक पडणारे हा न्यूनगंड आधी जन्माला येत असावा का?
प्रश्न बरेच, उत्तरे नाहीत. प्रश्नांकडे लक्ष जाणे अवघड दिसते. मधे अजून बरेच महत्वाचे प्रश्न उभे असावेत ज्यांचा पूर्ण खातमा झाल्याशिवाय यंत्रणा लक्ष देणार नाही. तर तुम्ही आम्ही निदान आपापल्या परिघापुरते सुरक्षिततेचे नियम पाळत राहण्याचे बघूया.

Saturday, September 26, 2015

गणपतीच्या आठवणी १ - गणपती बघणे आणि मिरवणूक

मी फार भाविक, धार्मिक वगैरे नाही पण पुण्यात तेही पेठांमधे वाढल्यावर गणपती आणि त्या अनुषंगाने येणार्‍या गोष्टी हा माझ्या जगाचा अविभाज्य भाग बनलेला आहे.  त्याबद्दल थोडसं..

अगदी लहानपणी म्हणजे शिशुविहारमधे असताना हिराबागेचा हलता देखावा, बाबांच्या खांद्यावर बसून बघितल्याचे आठवतेय. स्कूटरवर मी, आई आणि बाबा फिरायचो. गणपती मंडळाच्या जवळपास स्कूटर लावायची आणि गर्दी कमी असेल तर मला चालवायचे. जास्त असेल तर मी खांद्यावर असला प्रकार. मग आम्ही तिघे स्कूटरवर मावणार नाही अश्या स्टेजला पोचलो तेव्हा आईचा गर्दीत जायचा उत्साह कमी झाला होता. बाबा आणि मी एखादा दुसरा दिवस गणपती बघायला स्कूटरीवरून जाऊन यायचो. बरेचदा लांबूनच बघितले जायचे.
विसर्जन मिरवणूक बघायला जाणे हे कर्तव्य असल्यासारखे वाटे. आई आणि बाबा दोघेही ऐन स पे मधेच वाढले. लक्ष्मी रोडपासून अगदी जवळ. त्यामुळे त्या दोघांच्याही दरवर्षी मिरवणुकीला जायच्या आठवणी होत्या. दुपारी मानाचे पहिले पाच बघायचे. घरी यायचे. संध्याकाळी लवकर जेवून मग रोषणाईचे गणपती बघायला जायचे. थोडावेळ बघून परत यायचे. मग झोप काढायची. तेव्हा काही फोन बिन नव्हतेच पण कुणीतरी चाळीत हाकारा घाले. ’मंडईचा गणपती कुंटे चौकात आला रेSSS '  की सगळी वानरसेना टक्कन जागी होऊन विजय टॉकिजच्या चौकात येऊन थांबत असे. मंडई, दगडूशेठ दोन्ही बघून घरी. आणि मग गुडुप्प. अशी आठवण आई नेहमी सांगत असे
माझ्या लहानपणीही आम्ही हेच करत असू. मात्र चाळकरी मित्रमंडळी नव्हती. दरवर्षी कोणीनाकोणी नातेवाइक पुण्यातल्या मिरवणुकीची मजा बघायला येतच असत. मग कॉलेजमधे गेल्यावर लक्ष्मी रोडच्या आसपास राहणार्‍या मित्रमंडळींची, नातेवाइकांची, मित्रांच्या नातेवाइकांची, नातेवाइकांच्या मित्रांची ओळख काढून ठिकाणा तिथे ठेवायचा आणि तिथून गणपती बघायला ये जा करायची असा प्लॅन असे.
एक वर्ष कॉलेजच्या रेडक्रॉसच्या स्टॉलवर पण बसले होते रात्रभर. सेफ वाटेल आणि जरा इंटरेस्टिंग म्युझिक असलेले मंडळ स्टॉलसमोर आले की आम्ही तिघी चौघी जणी त्यांच्या मिरवणुकीत घुसून नाचून घ्यायचो. ते पुढे सरकले की आम्ही परत स्टॉलवर.
एक अनंतचतुर्दशी फार पक्की लक्षात राह्यलेली आहे. सर्व ग्रुपपैकी मी आणि अजून एकदोन जण सोडले तर बाकी सगळ्यांनी गर्दीत जाणार नाही असा असहकार पुकारला होता. सिंहगड रोडला एका मित्राच्या घरी सगळा ग्रुप जमला होता.  त्यातच दोन मित्र मुंबईहून आलेले होते. त्या दोन मित्रांपैकी एकाशी माझी बोलाचाली बंद होती. भांडण नव्हते काही. या दोन मित्रांना पुण्याची मिरवणूक बघायचीच होती. मला जायचेच होते कारण मी पुढे भारताबाहेर शिकायला जाणार होते. तीन वर्ष गणपती अनुभवता येणार नव्हते. गणपतीची मिरवणूक अनुभवणे आणि बरोबर ज्याच्याशी बोलतच नाही तो मित्र. दुग्धशर्करा की काय तो योग. मग कधीतरी मध्यरात्री आम्ही ४-५ जण निघालो सिंहगड रोडहून चालत. पहाटेपर्यंत म्हणजे मंडई आणि दगडूशेठ जाईपर्यंत मिरवणूक अनुभवली. पण मी आणि मित्र एकमेकांशी बोललो नाही ते नाहीच. अगदी आम्ही बोलावे एकमेकांशी म्हणून बाकीचे मुद्दामून पुढे गेले आम्हाला मागे सोडून तरीही मी बोलले नाहीच. याचा फायदा झाला पुढे. तपश्चर्या फळाला आली. अखेर काही काळाने त्याच मित्राशी माझे लग्न झालेच. 
अमेरिकेतल्या तीन वर्षाच्या वास्तव्यात गणेशोत्सवात अक्षरश: तगमग व्हायची. शतकबदलाची वर्षे ती. इंटरनेट होते पण लाइव्ह स्ट्रीमिंग वगैरे गोष्टी रूळलेल्या नव्हत्या. गुगल, ऑर्कुट, फेसबुक वगैरेंचे तर अस्तित्वच नव्हते. कुणीतरी पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीची टाकलेली एखादी क्लिप तीही अत्यंत लो रिझोल्युशन आणि प्रचंड बफरींग सकट यावर समाधान मानायचे. तरी त्यातला तो ढोलताशाचा आवाज आला की पाय थिरकणे वगैरे चालू व्हायचेच. ढोलताशाचा गजर ऐकून गळा दाटून वगैरे येणे तेव्हाच सुरू झाले. शिक्षण संपवून परत आले ती ऐन गणपतीतच. परत आल्याच्या दुसर्‍या दिवशी गर्दीतून माझ्या लाडक्या म-८० वरून रपेट मारून आले आणि घरी आल्यासारखे वाटले.
लग्नानंतर एक दोन वेळा मी आणि नवर्‍याने(तोच तो!) मिळून दुपारचे मानाचे पाच, संध्याकाळचे लायटींगचे काही आणि पहाटे मंडई, दगडूशेठ असे पाह्यले होते. मात्र तेव्हा हाकारे नाही. टिव्ही होता. चॅनेलवर सांगितले की मंडईचा गणपती गणपती चौकात की आमचा गणपती घरातून हाले.
ढोलताश्याच्या गजराच्या आवाजाशी, मिरवणुकीशी सगळे बाळपण जोडले गेलेले आहे. मग ते आवाज आले की घसा कोंडणे आलेच ओघाने.

Friday, August 21, 2015

रेलकथा २ - पासहोल्डर राण्या, रणरागिण्या वगैरे..

आज लांब पल्ल्याच्या गाड्यांमधल्या १८ पासहोल्डर महिलांवर बोईसर स्थानकात कारवाई केल्याची बातमी वाचली पेपरमधे. जागा धरणे, ठराविक जागांवर हक्क समजणे आणि त्यातून होणारी भांडणे, अरेरावी हे सगळं त्या कारवाईच्या मुळाशी होतं असं बातमीमधे आहे. हे वाचून अनेकांची प्रतिक्रिया ’बरी खोड मोडली!’ अशी असणार. आणि त्यात चुकीचे काही नाही. पासहोल्डर्सचा असा अनुभव आलेले खूप जण असणार. मी पण होते की एकेकाळी पासहोल्डर असूनही नवखी असल्याने कळपातली जागा निश्चित नव्हती. मग मलाही इकडून तिकडे हुसकले जात असेच बसायच्या जागेसाठी. मनापासून राग यायचा त्यांचा.
मग कधीतरी हा राग थोडासा निवळायला लागला.

मुंबईकडे चाललेल्या गाडीत कुणीतरी कुणालातरी विचारलं ’तू आजच परत जाणारेस का संध्याकाळी?’ तिने उत्तर दिले ’नाही आज नाही. आता उद्या. दादरला चढेन. मला जागा ठेवा.’ दुसर्‍या दिवशी दादरला परतीची गाडी पकडणार्‍या ताई सायन हॉस्पिटलात नर्स होत्या. डेक्कन क्वीनने पुण्याहून निघून, हॉस्पिटलात पोचून, ड्युटीचे कपडे वगैरे घालून त्या दुपारी त्यांची शिफ्ट सुरू करत ती रात्रीपर्यंत. मग तिथेच कुठेतरी झोप काढून पहाटे दुसरी शिफ्ट सुरू करत ती दुपारी संपे. मग परत कपडे बदलून परतीची गाडी गाठत. रात्री १०:३० - ११:०० ला घरी पोचत. घरी दोन दिवसांच्या पोळ्या बडवणे, एक दिवसाची भाजी करणे, दुसर्‍या दिवशीच्या भाजीचे चिरणे/ निवडणे करून ठेवणे असं सगळं मॅनेज करून त्या परत दुसर्‍या दिवशी सकाळची डे क्वी पकडत. हे सगळं का? तर अर्थातच पोटासाठी. पुण्यातल्या हॉस्पिटलात बदली करून मिळत नव्हती काही कारणाने आणि नोकरी सोडणे परवडण्यासारखे नव्हते मग लटका.

एक मैत्रिण होती. तिची तिच्या बँकेच्या मुंबई ब्रांचला बदली झाली होती. मैत्रिणीचं माहेर पुण्यात. सासर नाशिकला. नवर्‍याची नोकरी बदली करून घेण्यासारखी नाही. बदली घेतली नाही तर नोकरी सोडायला लागायची परिस्थिती. ते शक्य नाही. नाशिकला मुलीला सांभाळणारे कोणी नाही. मग मैत्रिण मुलीला घेऊन चक्क माहेरी रहायला आली. आठवडाभर तिची आई सांभाळे मुलीला आणि ही रोज पु-मु अपडाऊन. शनिवारी नवरा पुण्यात येत असे या दोघींना भेटायला किंवा कधी ही जात असे.  माहेरी रहायचं, मूल आईच्या भरवश्यावर सोडायचं या सगळ्याचं नाही म्हणलं तरी दडपण येतंच. मग ते कमी करायला माहेरी जेवढा वेळ घरात असे तेवढा वेळ जास्तीत जास्त घरातली कामं करायची. पैशाने मदत करायची वगैरे आलंच. ती सांगायची पासमुळे मिळेल ती गाडी, मिळेल तिथे बसून पुण्याला परत येता येते. बसायला नीट सीट मिळाली तर तेवढाच आराम मिळतो. नाहीतर मग दारात, कधी कुठल्या लांब पल्ल्याच्या तीन टियरवाल्या एक्स्प्रेसच्या वरच्या बर्थवर किंवा दोन सीटसच्या मधोमध जमिनीवर असं कुठेही बसून यावे लागते.

अशा हजारो कहाण्या. सगळ्या नोकरीपायी धावणार्‍या, घरातून बाहेर पडायची आणि पोचायची वेळ अशी की कुणाशी काही संवाद व्हायची सोय नाही पण घरच्या जबाबदार्‍या पार पाडल्या नाहीत तर टोमणे हाणायला सगळे तयार. बहुतेक सगळ्या जणी निम्नमध्यमवर्गीय ते मध्यममध्यमवर्गीय स्तरातल्या त्यामुळे घरातली कुठलीही जबाबदारी मोलाने देणं यासाठी मानसिकता व खिसा दोघांची परवानगी नाही. सुट्टीचा दिवस हा अपराधभावाने केवळ घरासाठी लिहून दिलेला. शरीराला विश्रांती, मनाला विश्रांती ही फक्त रेल्वेच्या प्रवासात.

बसायची जागा मिळणे आणि तिथे थोडावेळ शांतपणे बसता येणे, सगळं काही विसरता येणे, आपल्यासारख्याच बाकीच्या सगळ्यांबरोबर थोडेसे हास्यविनोद करता येणे हे एकमेव सुखनिधान आयुष्यातलं. ते कुणी काढून घेतंय म्हणल्यावर तडफड होणारच. कायदा, नियम माहिती असले तरी चिडचिड होणार. जी समोरच्याला समजणार नाहीच. मग यातून येत असेल ती बसायच्या जागेची अरेरावी वगैरे. खरंतर अर्ध्या अधिक जणी थोड्या थोड्या वेळाने जरा वेळ तू बस गं. मग अमुक स्टेशनला मी बसेन परत वगैरेही करतात एकदा तुम्ही त्यांच्या आतल्या ग्रुपच्या जवळपास पोचलात की.

शेवटी कधीतरी जाणार्‍याला एकदाच तीन चार तास बसायचे असते सीटवर आणि यांच्यासाठी रोजची लढाई.  अरेरावी, इतरांना बसू न देणे वगैरे गोष्टी नियमबाह्य, समाजासाठी अयोग्य वगैरे ठिकच. त्याचे समर्थन नाही पण या सगळ्यांच्या आयुष्यातल्या एकमेव विश्रांतीचे काय? प्रश्न बाकी राहतोच... 

- नी

Tuesday, August 11, 2015

रेलकथा १ - डेक्कन क्वीनच्या पासहोल्डर राण्या!

मृण्मयीच्या रेलकथांवरून स्फूर्ती घेऊन माझ्या काही रेलकथा.
१.
नेपथ्य - पुणे-मुंबई डेक्कन क्वीनचा लेडीज पासहोल्डर डबा. डे क्वी मधे लेडीज पासहोल्डर्सचा वेगळा डबा असतो. बाकी गाड्यांच्यातला लेडीज डबा हा जनरल + पासहोल्डर्स असा असतो.
पहिल्यांदाच काढलेला पु-मु पास. लग्नही नुकतंच झालेलं. सासर मुंबई. माहेर पुणे. आणि खूप सारी कामेही अजून पुण्यातच होती त्यामुळे बसपेक्षा पास काढणे स्वस्त पडेल म्हणून सेकंड क्लासचा पास काढला.
सकाळी रिक्षावाल्यांच्या मिनतवार्‍या करत डे क्वी च्या वेळेआधी २० मिनिटे पोचले. लेडीज पासहोल्डर डबा शोधून त्यात शिरले. शिरल्या शिरल्या 'पासवालोंके लिये है. टिकटवाले जाओ जनरलमे!' अश्या वाक्यांनी माझे स्वागत केले. "माझा पण पासच आहे. दोनच दिवसांपूर्वी काढलाय." असे मी ही ठणकावून सांगितले.
एका रिकाम्या दिसलेल्या जागी बसायला गेले. बूड टेकवणार इतक्यात एका काकूंनी तिथे आपली पर्स आपटली. ह्या 'सहा जागा धरलेल्या आहेत. दुसरीकडे जा.' असं सुनावलं. हाच प्रकार अजून दोन तीन ठिकाणी घडल्यावर मग एका ठिकाणी बसले ते आता धरलेली जागा सांगितली तरी हलायचंच नाही हे ठरवून. पण चक्क ती जागा धरलेली नव्हती.
गाडी सुटायला ५ मिनिटे असताना सर्व डबा खच्चून भरला. सहा जागांच्या बाकड्यावर आठ जणी तर आरामात बसलेल्या होत्या.
गाडी सुटली. हळूहळू मी नवीन पासहोल्डर आहे हे आता सर्व नेहमीच्या बायकांना कळले. कुणीही माझ्याकडे 'तिकीटवाल्यांनी त्या डब्यात जा!' सांगायला आले की कुठून तरी "अगं नवीन पासहोल्डर आहे!" असा हाकारा येत होता.
मी आता बसल्या जागी जरा पेंगत होते तेवढ्यात कुणीतरी खांद्यावर टपटप करून जागे केले. डोळे उघडले तर समोर कुणीतरी खाऊचा डबा धरला होता. अनोळखी माणसांकडून काही खायचे प्यायचे घेऊ नये असा नियम मी कैक वर्षांपासून पाठ केला होता. पण सर्वांचे डबे डबाभर फिरताना दिसले. मी समोरच्या डब्यातला थोडासा खाऊ तोंडात टाकला.
मग गप्पा सुरू झाल्या. तुम्ही कोण, आम्ही कोण वगैरे वगैरे. माझं दोनतीन महिन्यांपूर्वीच लग्न झालंय, मी पुण्याला तासांवर शिकवते विद्यापिठात, माहेर पुणे, सासर मुंबई, नाटक सिनेमातलं कपड्यांचं काम करते वगैरे सर्व तपशील कळले. मी रोज येणार नाहीये पण महिन्यातून ३-४ वेळा तरी येणेजाणे होईल म्हणून पास काढलाय हे ही त्यांना कळले.
नवीन लग्न आणि हातात बांगड्या नाहीत? नवर्‍याचं आणि तुझं आडनाव एकच का नाही? तू फिरतेस तर नवर्‍याच्या जेवणाचे काय? असले भोचक प्रश्न कुणीही विचारले नाहीत. नवीन लग्न झालेली मुलगी इतका प्रवास करते तर सासरी कुणी बोलत नाही ना? अशी काळजीवाहू चौकशी मात्र झाली.
कर्जतच्या इथे शेजारच्या ताईंनी दोन बटाटेवडे विकत घेतले. पिशवीतून दोन डबे काढले. त्यातला एक उघडला. तो रिकामा होता. झाकणामधे वड्यांचे आवरण काढून ठेवून आतली भाजी डब्यात घेतली. मग दुसर्‍या डब्यातली पोळी काढून पोळीभाजी खाऊन टाकली. मी बघत होते. काय करणार आज भाजी करायला वेळच नाही झाला असं ओशाळं हसत त्यांनी सगळ्यांना सांगितलं. त्या हडपसरला राहणार्‍या होत्या. डे क्वी ची वेळ सकाळी ७:१० ची. ह्डपसरला पीएमटी मिळणार कधी आणि स्टेशनला पोचणार कधी? किमान साडेपाच सहाला तरी निघत असाव्यात घरातून. आणि भाजी न केल्याबद्दल ओशाळवाण्या झाल्या होत्या? माझी सासू तर मी मुंबईत असायचे तेव्हाही स्वैपाकाची अपेक्षा करत नसायची. एकूणात गमतीशीरच सगळे.
सगळ्यांनी माझी माहिती विचारली तशी त्यांचीही त्यांनी सांगितली. त्याबद्दल पुढे कधीतरी...

- नी

Thursday, May 21, 2015

'नी' ची कहाणी

हा दागिना म्हणजे 'नी' च्या कहाणीचे महत्वाचे वळण आहे. आसनं समर्पयामि! मधली गणपतीबाप्पाची कहाणी वाचून एका मायबोलीकर मैत्रिणीने गळ्यातल्यासाठी विचारले. मी या प्रकारे बनवलेल्या दागिन्यांची ज्वेलरी लाइन लाँच करणार आहे हे बर्‍याच मित्रमैत्रिणींना माहिती होतं पण कधी याची मलाही कल्पना नव्हती. त्यामुळे अर्थातच ज्वेलरी लाइनचे नाव काय ठेवायचे वगैरेही ठरलेले नव्हते. मी फक्त माझी कारागिरी अधिकाधिक सुबक व्हावी यासाठी भरपूर प्रॅक्टिस करत होते, ती करता करता माझ्या स्वतःसाठी तांब्या पितळ्याची ज्वेलरी बनत होती.
मैत्रिणीला गळ्यातले करून द्यायचे मान्य केले. मग आम्ही साधारण स्टाइल ठरवली. तिला हव्या असलेल्या तारखेच्या आत गळ्यातले बनवले. त्याच वेळेला 'नी' हे नाव नक्की केले.
मी बनवलेल्यापैकी विकलेला हा पहिला दागिना.
यातला दगड सिंधुदुर्गातल्या नदिकाठी गोळा केलेला आहे.
धातू जर्मन सिल्व्हर आहे.
_MG_0232_m_scr_swapnali_0.jpg
यानंतर ही कला वापरून बनवलेल्या वस्तू (सध्या फक्त कानातली) 'नी' या लेबलखाली लाँच केल्या.
१० एप्रिल रोजी मराठी स्त्रियांपुरत्या असलेल्या एका संकेतस्थळावर याचे छोटे ओपनिंग केले.
मग १५ एप्रिल रोजी फेसबुक पेज सर्वांसाठी खुले केले.
ही फेसबुक पेजची लिंक  https://www.facebook.com/NeeCreation- नी

Wednesday, November 5, 2014

आसनं समर्पयामि!

"या दगडातून काहीतरी करून दे बरं मला वायर वापरून!"
डिसेंबरमधे शूटच्या दरम्यान नदीकाठच्या लोकेशनवर एक दगड दाखवत आमचा डिओपी संजय मेमाणे म्हणाला. दगड होता अगदी गणपतीबाप्पाची आठवण करून देणारा.
01 Ganesha-stone.jpg
वायर रॅप हे तंत्र मी कोणे एके काळी 'सॅन्टा फे ऑपेरा'मध्ये काम करताना शिकले. गेली एक-दोन वर्षे तारा वळवून विविध प्रकारचे दागिने बनवण्याचे माझे प्रयोग चालू आहेत. कामानिमित्ताने जंगल, नदी फिरत असताना विविध आकार, रंग, पोताचे दगड गोळा करणे हा चाळा पहिल्यापासून होताच. या अश्या दगडांना वेगवेगळ्या प्रकारे तारांमधे गुंडाळून त्यातून कलाकृती, कलात्मक दागिने बनवणे यावर गेले काही महिने माझा भर आहे. मी बनवलेल्या काही वस्तू, काही दागिने संजयने नुकतेच बघितले होते. ते त्याला आवडले होते, त्यामुळे तो गणपतीच्या आकाराचा दगड मिळाल्यावर लगेच घरात ठेवायला त्या दगडाचे तारा वापरून मी काहीतरी करून द्यावे अशी इच्छा त्याने व्यक्त केली.
दगडाला त्याचा आकार, रंग, रूप हे सगळं नैसर्गिकरीत्या प्राप्त होतं. जिथे तो दगड सापडला असेल तिथल्या वातावरणाचा, भौगोलिक परिस्थितीचा परिपाक म्हणून कुठलाही दगड तयार होतो. मी गोळा केलेले सगळे दगड कोकण-गोव्यातल्या नदीकाठचे. एकेक दगड हाताळताना, त्याचे रूप बघताना, त्याचा पोत अनुभवताना जाणवतं की हा एकेक दगड म्हणजे नदीच्या वाहण्याची कहाणी आहे! अश्या दगडांना तारांनी बांधून वस्तू तयार करणे म्हणजे नदीच्या वाहण्याच्या कहाणीला सजवून मांडणे. त्यामुळे सजावट ही फक्त कहाणीला उठाव देणारी हवी.
या सगळ्याला हा गणपतीच्या आकाराचा दगडही अपवाद नव्हता. त्या आकाराचे 'गणपती'पण महत्वाचे, ते दिसले पाहिजे. पण गणपतीचा आकार हा तारांनी दाखवायचा नाही अन्यथा या दगडाच्या गणपतीपणाला काहीच अर्थ नाही. त्यामुळे गणपतीला एखाद्या बेसवर बसवायचे आणि बाजूने मखर करायचे हे ठरले.
बेससाठी तांब्याची १८ गेजची तार घेऊन स्पायरल करून एक चकती तयार केली. पितळ्याच्या २१ गेजच्या तारा घेऊन त्याच्या पाकळ्या तयार केल्या. त्या पाकळ्यांच्या दांड्यांची जुडी बांधली आणि पाकळ्या सर्व दिशांना सूर्यकिरणासारख्या मुडपल्या. हा झाला पाया. या पाकळ्या आता सर्व बाजूंनी वजनाला बॅलन्स करणार. या जुडीच्या वरती तांब्याची चकती बसवली. हे झाले बाप्पांचे बसण्यासाठीचे स्टूल. सिंहासनाच्या पायाशी पाकळ्यांच्या दांड्यांच्यामधे तांब्याच्या २२ गेजच्या तारेने विणून घेतले. याच्यामुळे पाया जास्त स्टेबल झाला.
02 sinhasan.jpg
आता बाप्पांना त्यावर बसवायचे तर टेकायला काहीतरी हवे आणि बाप्पा स्टुलावरून हलू नयेत म्हणून त्यांना धरून ठेवणारेही काहीतरी हवे. ते तांब्याच्या १८ गेजच्या तारेतून तयार केले. पण ते तयार करताना एकही तार बाप्पांच्या पुढून क्रॉस होणार नाही आणि गणपतीचा आकार झाकणार नाही ही काळजी घेतली. इथे बाप्पांनी माझी परिक्षा घेतली. विविध पद्धतीने तारा बांधून बघितल्या पण बाप्पा काही स्थिर बसायला तयार नाहीत. काही करा स्टुलावरून उडी मारणे चालूच.
अजून तारा वापरल्या, जास्त गुंडाळले तर पक्के बसणार पण मग गणपतीपण हरवून जाणार... अश्या काहीतरी खोड्यात अडकले होते. कला तुम्हाला आयुष्याविषयी बरंच काही शिकवून जाते ती अशी वगैरे फिलॉसॉफीही सुचत होती त्या दरम्यान. पण उडी कशी थांबवायची? बाप्पा कसे जागेवर रहातील? ते काही समजत नव्हते. सगळं गुंडाळून बाजूला ठेवून दिलं आणि जरा वेळ घेऊन नव्याने विचार करावा, केलेलं काम जाऊ देत, अजून काही वेगळी कल्पना लढवूया असे ठरवले.
'सगळ्या गोष्टींची वेळ यावी लागते' हे एक वारंवार वापरून गुळगुळीत झालेलं वाक्य इथेही खरं ठरलं. तब्बल दीड महिन्यांनी गुंडाळून ठेवलेले बाप्पा आणि त्यांचं अर्धवट झालेलं सिंहासन बाहेर काढलं. केलेलं सगळं खारीज वगैरे करण्यापूर्वी एक शेवटचा प्रयत्न म्हणून आधीच्याच टेक्निकने बाप्पांना बांधून घालायचा प्रयत्न केला आणि काय आश्चर्य बाप्पा शहाण्या मुलासारखे एका जागी बसले. एक महत्वाचे काम झाले होते. अडकलेलं काहीतरी सुटून पुढे वाहतं व्हावं तसं काहीतरी वाटलं मला.
मग मागची प्रभावळ करायला घेतली. पायामधे असलेल्या पाकळ्यांच्या सारखेच काहीतरी करायचे ठरवले कारण खूप वेगळं काही केलं तर पूर्ण डिझाइनचा तोलच ढळला असता. पाकळ्यांचा पिसारा तयार करून बाप्पांच्या मागे बसवला. नंतर त्या पाकळ्यांच्या मधे मधे तांब्याच्या २२ गेज तारेने विणून घेतले.
03 bappa-closup.jpg
वायर रॅप टेक्निकमधे केलेली वस्तू जरी एकाच बाजूने बघायची असली तरी मागची बाजू दृष्टीस पडली तर ती सुबकच दिसली पाहिजे या नियमाला फार महत्व असते. त्यामुळे पिसारा बसवल्यानंतर मागच्या बाजूनेही तारा विणून सगळे जोडकाम वगैरे झाकून टाकले.
04 Moraya-pathmore.jpg
मग बाप्पांच्या सिंहासनाला गादी बनवली. तिच्या चारी बाजूंनी तारेने धावदोरा घातला आणि पाटाच्या कोपर्‍यांना फुलं बसवावी तसे त्या तारांचे छोटे स्पायरल्स बसवले.
05 Gaadi.jpg
अश्या तर्‍हेने बाप्पा पूर्ण तयार होऊन आता आपल्या योग्य स्थळी जाण्यास सिद्ध झाले.
06 Morayaa.jpg
- नी

Sunday, March 9, 2014

बाई गं बाई गं!

२०१३ च्या एप्रिलपासून पुढचे बरेच महिने मी काहीनाकाही कारणाने फिरतीवर होते.  एकदा तर साधारण पावणेदोन महिन्यांनी घरात पाऊल टाकलं. ते पण ८-१० दिवसांकरताच.
एप्रिलच्या आधीही लेक्चर्स वगैरेमुळे महिन्यातले ७-८ दिवस बाहेरगावी असणं हे होतंच.
तर या सगळ्यासंदर्भाने आलेले दोन गमतीशीर अनुभव.
१. फेसबुकावर जुजबी ओळख झालेले सदगृहस्थ (फेजुओझास). त्यांच्या कॉलेजच्या कुठल्या तरी कार्यक्रमात मी सामील होणे त्यांना अपेक्षित होते त्याप्रित्यर्थ फोन नंबराची देवाणघेवाण केली गेली होती.
फेजुओझास - पुढच्या महिन्यात अमुक तारखेला वेळ देऊ शकाल का आमच्या कॉलेजसाठी.
मी - नाही. तेव्हा माझी तमुकची लेक्चर्स ठरलेली आहेत. ढमुक तारखांना मी तुमच्या शहरात असेन. तेव्हा चालेल का?
फेजुओझास - बघतो. एक प्रश्न विचारू का तुम्हाला?
मी - विचारा
फेजुओझास - तुमच्या घरी बाळ आहे का?
मी - हॉ?
फेजुओझास - नाही म्हणजे तुम्ही एवढं फिरत असता. घरातल्या जबाबदार्‍या सांभाळून हे जमणं शक्यच नाही म्हणजे बाळ नसेलच.
मी - ह्म्म्म. नाहीये पण बाळ असलेल्या अनेक जणी माझ्यापेक्षाही जास्त फिराफिरी करत असू शकतात.
फेजुओझास - त्याला काय अर्थ नाही!
मी - असो. मला मिटींग आहे. मी फोन ठेवते.

२. २०१३ च्या ऑगस्टात आम्ही शूटींगच्या तयारीसाठी सावंतवाडीमधे होतो. खूप घाईघाईत, शूटची काही खरेदी करण्यापुरती पुणे आणि मुंबई चक्कर मारली. पुण्यात २४ तास तर मुंबईत संध्याकाळपासून सकाळपर्यंत अक्षरशः १२-१५ तासच होते. हे सगळे ज्या गाडीने केले त्या गाडीचा ड्रायव्हर (गा ड्रा). पुणे ते मुंबई प्रवासात. (या सगळ्या दरम्यान माझा नवरा याच प्रोजेक्टच्या निमित्ताने सावंतवाडीतच होता)
गा ड्रा - तुम्हाला मुंबईला सोडून मी लगेच निघू ना वाडीला?
मी - नाही. मी पण सकाळी निघणार वाडीला.
गा ड्रा - परत?
मी - हो.
गा ड्रा - मॅडम मग तुम्ही एवढे दिवस घराबाहेर असता तर घराचं काय मग?
मी - कुलूप लावायचं.
गा ड्रा - हा पण बाकी घरातली कामं वगैरे?
मी - काहीच नसतात.
गा ड्रा - असं चालतं?
मी - हो
गा ड्रा - सर काही म्हणत नाहीत?
मी - कशाबद्दल?
गा ड्रा - म्हणजे एवढे दिवस तुम्ही घरात नाही तर..
मी - पण सरांबरोबरच तर काम करतेय की मी. ते कशाला काय म्हणतील?
गा ड्रा - नाही तसं नाही... (जौद्या या अर्थाने खांदे उडवतो)

मी पण विषय वाढवत नाही मग...

दोन्ही उदाहरणांच्यात मला या दोन्हीही माणसांच्या बुद्धीची निव्वळ गंमतच वाटलेली आहे.

बाईची पहिली जबाबदारी घराचीच. घरचं सगळं सांभाळूनच बाकी उद्योग करायचे. हे ज्या त्या बाईने आपलं आपण ठरवायचं नाही. तिला कुणाची तरी परवानगी हवी. हे आपल्या मानसिकतेत अजूनही घट्ट बसलंय.

त्यामुळे बाई कितीका काम करेना, कुठल्याका पोझिशनला असेना तिला घराबद्दल कोणीही टोकू शकतो. मग ती जुजबी ओळख असूदेत नाहीतर बाई जिथे कंपनी डिरेक्टर आहे/ प्रोड्यूसर आहे अश्या युनिटचा एक ड्रायव्हर असूदेत हे एक भारतीय सत्य मला परत एकदा उमगलं.

- नी

Thursday, March 14, 2013

आतली गोष्ट!

हा लेख 'माहेर' मासिकाच्या मार्च २०११ च्या महिला दिन विशेषांकामधे पहिल्यांदा प्रसिद्ध झाला होता.
----------------------------------------------------------------------------------------
मैत्रिणीची मुलगी, वय वर्ष चौदा. अचानक पोक काढायला लागली. थोडी दडपणात वागायला लागली. विचारल्यावर समजलं तिच्या आजूबाजूच्या मुली तिला हसतात तिच्या गोलाकारांवरून. तू फारच मोठी दिसतेस म्हणतात. हसणार्‍या सगळ्या अगदी बारीक चणीच्या. तेराचौदा वयाला मुलगा म्हणून खपून जातील अश्या. मैत्रिणीने मुलीला समजावलं की या मुलींकडे जे नाहीये ते तुझ्याकडे आहे. पुढे जाऊन याच मुली खटपट करतील आपले आकार योग्य बनवण्यासाठी. वय वर्ष चौदा खुश झालं. समजूत पटली पण बाईपणाच्या एका विचित्र चढाओढीत मुलगी कायमची अडकली.

मला आठवले माझे ज्युनियर कॉलेजचे दिवस. एनसीसीचा ड्रेस फक्त मलाच चांगला बसतो असं म्हणणारी अशीच उफाड्याची असलेली मैत्रिण. तो ड्रेस घालून आपलं रूप आरशात बघत ‘आपण पुरेशी मुलगी वाटत नाही’ असं सत्रांदा मनात येऊन खट्टू होणार्‍या आम्ही. ‘आम्ही आपापल्या वडिलांच्या वळणावर गेलोय’ असे केविलवाणे विनोद करणार्‍या आम्ही.

हे कसंतरी मागे टाकून आपलं आयुष्य घडवायला घेतलं. बरंच पुढे आल्यावरही या मापांच्या चढाओढीने या ना त्या पद्धतीने पाठपुरावा केलाच. कापडचोपड आणि त्याच्या इतिहासाबद्दल शिकताना बरीच अंजनं डोळ्यात घातली गेली.

नुकतीच इकडच्या तिकडच्या संस्थळावर ‘ब्राज्वलन’ हा शब्द व त्याविषयी ‘उद्बोधक’ चर्चा वाचली. चर्चेचा एकंदर सूर स्त्रियांची आणि स्त्रीवादाची हेटाळणी, स्त्रीमुक्ती या संकल्पनेची उडवलेली खिल्ली असा होता. मुद्दा अंतर्वस्त्राचा आणि त्यातही स्त्रियांच्या अंतर्वस्त्रांचा त्यामुळे चर्चेमधे जोडीला स्त्रीशरीराची एक वस्तू या पातळीवर केलेली आचरट आणि आंबटशौकीन वर्णनेही होती. हे नवीन नाही. कधीही कुठेही ‘ब्राज्वलन’(ब्रा-बर्निंग बाय फेमिनिस्टस) या घटनेसंदर्भाने वेगळे काही ऐकू येत नाही.

एखादी वस्तू अंगावर असणे वा नसणे यामुळे चळवळ होत नाही असे म्हणणारे एखादी वस्तू अंगावर असण्यानेच स्त्रीच्या चारित्र्याची ग्वाही मिळते हे मात्र छातीठोकपणे म्हणतात. हे गमतीशीर जरूर आहे पण यात नवल वाटण्यासारखं काही नाही. लाज, इभ्रत, प्रतिष्ठा या केवळ बाईनेच जपायच्या गोष्टी असताना ते सगळं वेशीवर टांगून आपलं एक अंतर्वस्त्र या बाया जाळतात म्हणजे त्यांची डोकीच फिरली असली पाहिजेत असं सहजपणे समजणारा समाज अजून जगाच्या पाठीवर सगळीकडेच आहे.

१९६८ च्या मे महिन्यात अटलांटिक सिटी मधे होत असलेल्या मिस अमेरिका पॅजन्टच्या वेळेस अमेरिकेतील काही बायांनी एकत्र येऊन आपल्या ब्रेसियर्स जाळल्या ही ती घटना. ही घटना मोठ्या प्रमाणात वगैरे काही घडली नाही. ब्यूटी पॅजन्ट म्हणजे बाईला एक सुंदर वस्तू म्हणून पुरूषांच्या मान्यतेसाठी प्रदर्शनाला उभी करणे असा विचार धरून या स्पर्धेला विरोध म्हणून निदर्शने केली गेली. या निदर्शनांचा एक भाग म्हणून ‘फ्रीडम ट्रॅश कॅन’ असं नाव दिलेल्या एका कचर्‍याच्या डब्यामधे ब्रेसियर्स, गर्डल्स, खोट्या पापण्या, प्लेबॉयची मासिके, उंच टांचाची पादत्राणे असं सगळं जाळलं जाणार होतं. बायांनी खरोखर ब्रेसियर्स जाळल्या का आणि किती बायका यात सामील झाल्या याबद्दल खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही. या निदर्शनांचं नेतृत्व जिच्याकडे होतं त्या रॉबिन मॉर्गनच्या म्हणण्याप्रमाणे प्रत्यक्षात काहीच जाळलं गेलं नाही. घोषणा, फलक आणि मोर्चा यांच्यातूनच केवळ विरोध जाहीर केला गेला. त्यामुळे मॉर्गन बाईंच्या म्हणण्याप्रमाणे जाळण्याची घटना ही संपूर्णपणे प्रतिकात्मक होती. परंतु काही बायांनी ब्रेसियर्स वापरणे या दरम्यान बंद केले हे मात्र निश्चित. अर्थात ब्रेसियर्स जाळणे या कृतीमधे नाट्यमयता जास्त असल्याने स्त्रीवादविरोधी लोकांनी ह्या कृतीचं भरपूर भांडवल केलं स्त्रीवादाची चेष्टा करण्यासाठी. माध्यमांनी यातून ब्रा-बर्निंग फेमिनिस्ट (ब्रेसियर जाळणारे स्त्रीवादी) असा एक वाक्प्रचार कुत्सितपणाच्या फोडणीसकट रूढ केला. गैरसोयीच्या स्त्रीवादाला टोकाचा, अतिरेकी स्त्रीवाद म्हणण्यासाठी हा शब्द वापरला गेला, रूळला. स्त्रीवादी बायका म्हणजे ब्रेसियर्स न घालणार्‍या, हातापायावरचे केस न काढलेल्या आणि लेस्बियन अशी एक व्याख्या प्रचलित केली गेली. या व्याख्येचे पडसाद म्हणून अजून अजून सौंदर्यप्रसाधने वापरत आणि सौंदर्याच्या ठराविक संकल्पनांनाच जोपासत अनेक बायकांनी अर्थातच आम्ही ‘त्यातल्या’ नाही हे सांगण्याची पराकाष्ठा केली.

मात्र प्रतिकात्मक का होईना पण या घटनेने काही बायांनी ब्रेसियर्स वापरणे बंद केले आणि त्यातून कुठेतरी सौंदर्य म्हणजे ठराविक आकार, ठराविकच उभार अश्या कल्पना मोडायला सुरूवात झाली. अंतर्वस्त्रांच्या खपावर परिणाम होण्याची चिन्हे दिसू लागताच अंतर्वस्त्रे डिझाइन करणार्‍यांनी सर्वसामान्य बायांना उपयोगी होतील अश्या ब्रेसियर्स डिझाइन करायला सुरूवात केली. इथून अंतर्वस्त्रातून शरीराचा अनैसर्गिक आकार घडवणे या पद्धतीला मोठ्या प्रमाणात खीळ नक्कीच बसली. यातूनच जास्तीत जास्त नैसर्गिक आकार आणि आधार देणार्‍या ब्रेसियर्सचा जन्म झाला. अंतर्वस्त्रांमुळे होणारा शरीराचा छळ या घटनेनंतर काही प्रमाणात कमी होत गेला. हा या घटनेनंतर आत्तापर्यंतचा म्हणजे गेल्या तीस-चाळीस वर्षांचा इतिहास.

पण असं आव्हान का केलं गेलं असेल? काही बायांनी ब्रेसियर्स घालणं बंदच का केलं असेल?

जेव्हापासून माणूस कपडे घालू लागला त्यानंतर लवकरच अंतर्वस्त्रे जन्माला आली. मुळात शरीराच्या नाजूक भागांचं रक्षण, हवामानापासून बचाव अश्या महत्वाच्या उद्देशांपोटी अंतर्वस्त्रे निर्माण झाली. त्यांचे आकार, स्वरूप अर्थातच आजच्यापेक्षा खूप वेगळं होतं. हल्लीची ब्रेसियर हे मुळातलं पाश्चात्य जगातून भारतात आलेलं प्रकरण आहे. त्यामुळे अर्थातच पाश्चात्य जगातल्या अंतर्वस्त्राच्या प्रवासाविषयी आपण आधी समजून घेतलं पाहिजे.

काळाच्या ओघात अंतर्वस्त्रांच्या मूळ उद्देशांपेक्षाही शरीराला विशिष्ठ आकार देणे, बसण्याउठण्यात विशिष्ठ ढब निर्माण करणे, घाम व इतर स्त्रावांपासून बाहेरच्या कपड्यांचा बचाव करणे यासाठी या काही अंतर्वस्त्राचा वापर होऊ लागला. शरीराच्या छाती, कंबर, पोट या भागांना योग्य त्या आकारउकारातच ठेवणारे जे वस्त्र होते त्याला कॉर्सेट असे म्हणले जाई.

हे कॉर्सेट म्हणजे मुळात कंबर आवळून ती कमी करणारे आणि छाती पूर्ण सपाट करण्यासाठी किंवा छातीला जास्त उभार देण्यासाठी वापरले जाणारे वस्त्र. विविध प्राचीन संस्कृतींमधे अश्या प्रकारचे वस्त्र वापरले गेल्याचे संदर्भ मिळालेले आहेत. परंतु इ.स. १३०० -१४०० दरम्यान कॉर्सेट किंवा कॉर्प्स सर्रास वापरायला सुरूवात झालेली दिसते. कॉर्सेट हा शब्द अठराव्या शतकानंतर अस्तित्वात आला. तोवर कॉर्प्स, स्टे, बॉडिस असे शब्दच वापरले जात. हा कपडा कापडांचे अनेक थर एकमेकाला जोडून आणि जिथे गरज आहे तिथे कडकपणासाठी इतर वस्तूंचा वापर करून विशिष्ठ आकारात बनवलेला असतो. हे प्रकरण समजून घ्यायचं तर एका ठराविक आकारात बनवललेला पिंजरा आणि पिंजर्‍याच्या पट्ट्या खुपू नयेत म्हणून त्यावरून चढवलेले कापडाचे अनेक थर अशी कल्पना करावी लागेल.



पुनरूत्थानाच्या (रेनेसान्स) सुरवातीच्या काळामधे कंबर अगदी बारीक, छाती पुढून पूर्णपणे सपाट, शरीराचा वरचा भाग इंग्रजी व्हि आकाराचा दिसेल असा निमुळता आणि उंच असा आकार शरीराला असणे हे योग्य, सुंदर, सभ्य इत्यादी मानले जायचे त्यामुळे अर्थातच कॉर्सेटरूपी पिंजरा त्या आकाराचा असायचा. मग पुढे पुढे पहिल्या एलिझाबेथ राणीच्या काळात तर कंबर अजूनच निमुळती होत गेली आणि धडाची उंची वाढत गेली. याच काळात संपूर्णपणे लोखंडी पट्ट्या असलेल्या आणि बिजागर्‍यांवरील स्क्रू फिरवून घट्ट करायच्या कॉर्सेट ही होत्या. पहिल्या एलिझाबेथ राणीने या कॉर्सेटबद्दल ‘मला पिंजर्‍यात ठेवल्यासारखे वाटतेय’ असे उदगार काढले आहेत. 





नंतरच्या काळात धडाची उंची कमी झाली, छातीची गोलाई सूचक पातळीवर दिसणं गरजेचं ठरू लागलं आणि कॉर्सेटचे आकार तसे तसे बदलत गेले. लोखंडी पट्ट्यांच्याऐवजी प्राण्यांची हाडे, लाकडाच्या पट्ट्या, स्टीलच्या पट्ट्या, बांबूच्या पट्ट्या अश्या गोष्टींचा वापर होऊ लागला. चित्र क्रमांक २ मधील तिन्ही कॉर्सेटमधे आकार साधारण सारखा दिसत असला तरी वापरल्या जाणार्‍या वस्तू, त्यांची बेतण्या-शिवण्याची पद्धत, कॉर्सेटशिवाय शरीराला आकार देणारी इतर अंतर्वस्त्रे यांच्यामधेही या काळामधे बदल होत गेला. ‘गॉन विथ द विंड’ या चित्रपटाची नायिका पूर्वी अठरा इंच असलेली कंबर आता बाळंतपणानंतर कॉर्सेट घट्ट आवळूनही वीस इंच झाल्याबद्दल नाराजी व्यक्त करते हे दृश्य आपल्या सगळ्यांच्या लक्षात असेलच. ही गोष्ट रोमॅन्टीक काळातीलच.



नंतर बेल इपॉक(१८९५-१९१४) काळामधील कॉर्सेटमधे अति आवळून लहान, म्हणजे सोळा ते अठरा इंच केलेली कंबर नक्कीच होती. परत पुढच्या बाजूला छातीचा खालचा भाग आणि पोट अतिशय सपाट करण्याची योजना होतीच. तसेच ही कॉर्सेट नितंबांच्यावरूनही येत असे. स्त्रियांना केवळ श्वास नीट घेता यावा म्हणून स्तनांचा भाग हा फक्त बाहेरच्या दोन्ही बाजूंनी आधार दिलेला असे. यामुळे दोन स्तनांचा आकार वेगळा न दिसता एकत्रच दिसे. म्हणून या कॉर्सेटला मोनोबुझम असे नाव आहे. बाजूने बघितल्यास शरीराचा आकार इंग्रजी एस या अक्षराच्या आकाराचा किंवा कबुतरासारखाही दिसे. यामुळे या प्रकारच्या आकाराला पिजनबुझम असेही म्हणले जाई. कॉर्सेट नितंबांच्यावरून असल्याने साधे भराभरा चालणेही शक्य नसे. 



 आकारामधे बदल घडलेले असले तरी एक गोष्ट अगदी कायम होती की तथाकथित योग्य आकारामधे शरीर येण्यासाठी लहानपणापासूनच मुलींचे शरीर या कॉर्सेट/ स्टे/ कॉर्प्स प्रकारात बांधले जाई. हे नुसतं वाचत जाताना कदाचित यातलं क्रौर्य जाणवणार नाही. पण मुलीच्या वयाच्या पाचव्या-सहाव्या वर्षापासून किंवा अगदी जन्मल्यापासूनही एका ठराविक आकाराच्या पिंजर्‍यामधे / पट्ट्यामधे शरीर घट्ट आवळून बांधून ठेवलं जात असे ज्यायोगे शरीर त्याच आकारात वाढत असे. या अश्या पिंजर्‍यामुळे पाठीचा कणा काही प्रमाणात कमकुवत होत असे. बरगड्यांची वाढ खुरटत असे किंवा खालच्या बरगड्या आतल्या बाजूला वळत असत. शरीराच्या आतले इतर अवयव वाढीसाठी योग्य जागा न मिळाल्याने इकडे तिकडे सरकून अयोग्य पद्धतीने वाढत. त्यामुळे जेवण खूपच कमी असे. पचनाच्याही समस्या निर्माण होत. त्यामुळे अर्थातच शरीराला योग्य पोषण मिळत नसण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सगळ्यांमुळे श्वसनसंस्था, पचनसंस्था व प्रजननसंस्था मुळातूनच कमकुवत रहात आणि सर्वांगीण आरोग्यही धोक्यात येत असे. परत शरीरावर हा असा पिंजरा बांधून फिरणे काही कमी कटकटीचे नव्हते. जरासुद्धा वाकणे, बसणे या पिंजर्‍यामुळे शक्य नसे. 

 












केवळ कॉर्सेट हा एकच पिंजरा नव्हे तर त्याबरोबर मोठ्या धातूच्या रिंगा लावलेला स्कर्ट घातला जाई. याचे नाव फार्दिंगेल. हा पण अजून एक वेगळा पिंजरा जो कमरेवर बांधलेला असे ज्यामुळे स्कर्ट हा कायमच फुललेला दिसत असे. फार्दिंगेलची फॅशन लयाला गेली तेव्हा पॅनिए नावाचा छोटा पिंजरा नितंबांचा आकार वाढवण्यासाठी कमरेवर बांधणे सुरू झाले. मग बसल नावाचा प्रकार आला. या स्कर्टशी संबंधित वस्तूंनी शरीरावर हानीकारक परिणाम केले नाहीत तरी साध्या साध्या हालचालीही आखडून ठेवल्या. सगळी वेशभूषा पूर्ण झाल्यावर बसणे सुद्धा शक्य नसे.

कपड्यांच्या आतून हे असे विविध प्रकारचे पिंजरे अंगावर वागवण्याला आळा बसला पहिल्या महायुद्धाच्या चाहुलीने. बेल इपॉकच्या शेवटच्या काळातच युरोप अमेरिकेतील स्त्रियांनी काही प्रमाणात कचेर्‍यांमधे नोकर्‍या करायला सुरूवात केली होती. माणसे कमी पडायला लागल्यावर युद्धकाळात स्त्रियांनाही सैन्यात भरती करून घेतले जाऊ लागले होते. कचेर्या, युद्धक्षेत्र किंवा सैन्याच्या कचेर्‍या या ठिकाणी काम करताना घोळदार कपडे आणि आतून पिंजरा याची अर्थातच अडचण होऊ लागली आणि कॉर्सेट इतिहासजमा झाली. त्याऐवजी बस्ट (छातीवर बांधायचा टक्स घातलेला पट्टा) आणि गर्डल(कंबर बांधून ठेवणारे वस्त्र) अशी दोन वेगळी वस्त्रे निर्माण झाली. बस्ट या वस्त्रातूनच छातीला आधार देणारे एक वस्त्र जन्माला आले. १९०७ मधील व्होग मासिकामधे या वस्त्राची पहिली नोंद आढळते. या वस्त्राचे नाव ब्रेसियर. ज्याचा मूळ फ्रेंच भाषेतील अर्थ आधार असा होतो.


त्यानंतर १९६० पर्यंत या अंतर्वस्त्रांमधे अपेक्षित आकार, वापरले जाणारे कापड, बेतण्या-शिवण्याचे प्रकार यामधे अनेक बदल होत गेले. यातले बरेचसे बदल हे सौंदर्याच्या ठराविक कल्पनांपायी होते. शरीराचा छळ कमी झाला असला तरी ठराविक माप-आकार-उभार यांचा आग्रह या काळापर्यंतही संपला नव्हता.

पण पहिल्या महायुद्धापूर्वीपर्यंततरी इतके भयंकर परिणाम होत असताना बायका कॉर्सेट आणि इतर सगळा साज का वागवत असत अंगावर? अगदी साधी सोपी कारणं आहेत याची. वरती जे काळानुरूप बदल आपण बघितले ते बदल घडण्यामागे महत्वाचं कारण होतं ते म्हणजे सौंदर्याच्या व सभ्यतेच्या बदलत्या कल्पना. पण मुळात स्त्रीने सुंदरच दिसले पाहिजे ह्याबद्दल असणारा पुरूषी आग्रह आणि स्त्रीच्या सौंदर्याची व्याख्या शरीराच्या ठराविक मापात, आकारात आणि उभारात केली जाणे हे सर्व काळात कायम होते. अमुक मापाची-आकाराची व उभाराची स्त्री ही सभ्य, सुशील आणि आदरणीय बाकीच्या वाईट चालीच्या किंवा कमी प्रतीच्या किंवा निम्नस्तरीय इत्यादी असं वर्गीकरण केलं गेलं. मग ते ते माप-आकार-उभार मिळवण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न केले गेले. अगदी शरीराचे हाल सोसूनही केले गेले. तसंही बाईने सोसण्याचं उदात्तीकरण जगातल्या कुठल्याही संस्कृतीत सारखंच.

चिनी संस्कृतीतले मुलींचे पाय बांधणं, अजून कुठेतरी मान उंच करण्यासाठी लहानपणापासून मानेमधे लाकडी रिंगा अडकवून ठेवणं हे ही सौंदर्याच्या कल्पनांपायी स्त्रीच्या शरीराचे हाल या प्रकारात मोडणारं. त्याचं अवास्तव महत्व आणि उदात्तीकरण यात जगभरात कुठेही कणभरही फरक नाहीच.

१९६० च्या दशकात सुरू झालेल्या स्त्रीवादाच्या वार्‍यांनी विशिष्ठ माप-आकार-उभार म्हणजेच सुंदर आणि सभ्य, आदरणीय स्त्री ह्या समीकरणातला फोलपणा स्पष्ट केला. समाजाने ठरवून दिलेल्या सौंदर्य आणि सभ्यतेच्या मापांपेक्षा निसर्गाने घडवलेले आकार तसेच राहू देणं आणि अंगावरच्या कपड्यामधे आराम वाटणं, सर्व हालचाली व्यवस्थित करता येणं महत्वाचं आहे अश्या भावनेतून अनेकींनी ब्रेसियर्सचा वापर बंद केला.
हे समजून घेतल्यावर मला तरी या घटनेकडे टोकाचा व अतिरेकी स्त्रीवाद म्हणून बघता येत नाही. स्त्रीकडे प्रथम एक माणूस म्हणून बघण्याच्या प्रवासातला हा स्त्रीच्या शरीराशी निगडीत असलेला हा एक महत्वाचा टप्पा मला वाटतो. तरीही ह्या टप्प्याने सौंदर्याच्या कल्पनांपायी शरीराचे हाल थांबवले हे म्हणायला मात्र जीभ रेटत नाही. तथाकथित ‘योग्य’ मापांच्या सोसापायी खाल्लेलं अन्नं ओकून काढणार्‍या बुलिमिक पोरी, अनोरेक्सियाने अगदी लहान वयात मृत्यूमुखी पडलेल्या पोरी, फॅड डाएट किंवा महिन्याभरात २०-२५किलो वजन कमी करून देणार्‍या तथाकथित आहारतज्ञांच्याकडची गर्दी, करीना कपूरच्या साइझ झिरोचे मेडियाने केलेले नको इतके कौतुक, सर्व जाहिरातींमधून, दृश्य माध्यमांमधून दिसणारी अतिशय सडपातळ अशी स्त्रीची प्रतिमा, हॉलिवूडमधील अमुक एक नटीने बाळंतपणानंतर दोन महिन्यात वजन उतरवले याबद्दल तपशीलांसकट वाचायला मिळणारी कहाणी या सगळ्या गोष्टी सध्या माझ्या आजूबाजूला मला दिसत वा ऐकू येत रहातात.

बाईने कुठल्याही परिस्थितीत सुंदर असायला हवं आणि सुंदर बाई म्हणजे अमुक एक माप, रंग इत्यादी ह्यात काहीच बदल झालेला दिसत नाही. बायांच्या मनातही. ‘अमुक एक’ चे तपशील बदलत रहातात फक्त. तरीही १९६० च्या दशकातल्या घटनेने बर्‍याच मोठ्या प्रमाणात सामान्य बायांचे हाल कमी केले हे नाकारता येणार नाहीच.

बाकी ब्रा-बर्निंग संदर्भाने चेष्टा, आंबटशौकीन वर्णनं होतच रहाणार. तुम्ही करायची का नाही हे तुमच्या माणूसपणाच्या पातळीवर अवलंबून. नाही का?

- नीरजा पटवर्धन




Tuesday, February 19, 2013

संस्कार २ - ऐका ऐका हो शंकरा, बोलाचा अर्थ करा ||

हा लेख मायबोली.कॊम या संकेतस्थळाच्या २०११ च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला आहे.
------------------------------------------------------------------------------------------------
प्रयोगाची तारीख चार दिवसांवर आली होती. तालमी जोरदार चालू होत्या. यावर्षी आमचंच कॉलेज जिंकणार ह्याची खात्रीच होती आम्हाला सगळ्यांना. सॉलिड विषय, तुफान स्क्रिप्ट आणि आमच्या मते एकदम हिट्ट अभिनय करणारं पब्लिक होतं आमच्या ग्रुपात. आऊचा काऊ असा दुवा जोडत एका मोठ्या नाट्यकर्मीला तालमीच्या इथे बोलावलं होतं आमच्या दिग्दर्शकाने. त्या नाट्यकर्मीने तालीम पाह्यली. आता आम्ही प्रशंसेचा आणि कौतुकाचा मारा झेलायला अगदी तयार, असे त्यांच्यासमोर उभे राह्यलो प्रतिक्रियांसाठी. "बरं करताय. पण तुम्ही नटमंडळी ऐकत नाही का रे एकमेकांचं? नुसती वाक्यावर वाक्यं चाललीयेत. आधी ऐका बरोबरचा नट काय बोलतो ते आणि मग तुमचं बोला." त्यांनी कौतुक केले नसल्याने आम्ही त्यांचं ऐकायच्या वगैरे भानगडीत पडलो नाही आणि स्पर्धेत वाजले बारा.

आता आपला अभिनय घासूनपुसून नीट केला पाहिजे तर वर्कशॉप बिर्कशॉप करायला हवं असं वाटायला आणि दुबेजींच्या वर्कशॉपची जाहिरात पेपरात यायला एकच गाठ पडली. अस्मादिक वर्कशॉपमधे रुजू झाले. सगळ्यांना पार ठार इम्प्रेसच करून सोडायचं असा निश्चयच होता माझा. एक दिवस वर्कशॉपमधे काहीतरी एक प्रश्नार्थक वाक्य कानावर पडलं आणि मी तेव्हाच्या पद्धतीप्रमाणे स्मार्ट, चौकस आणि हुशार मुलगी असल्याने उत्तर द्यायला लग्गेच तोंड उघडलं. काही बोलणार त्या अगोदरच कानफडात मारल्यासारखं दुसरं वाक्य आलं. "डोन्ट आन्सर राइट अवे बाई, लर्न टू लिसन फर्स्ट. विचाSSर कर मग उत्तर दे." स्पर्धेच्या जोषात त्या नाट्यकर्मीच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केलं होतं पण इथे दुर्लक्ष करणं काही शक्य नव्हतं. कंपलसरी विचार सुरू झाला की 'हे ऐकण्याचं काये?'

दोन माणसांच्यातला साधा संवाद असतो.
- जेवलास?
- हो
- भूक भागली?
- हो
पहिल्या प्रश्नानंतरच उत्तरादाखल हो येतो. पहिला प्रश्न कानावर पडतो, मेंदूपर्यंत जातो, तिथे त्याचा अर्थ स्पष्ट होतो, मेंदू उत्तर ठरवतो, बोलण्याच्या उर्जेसकट ते उत्तर स्वरयंत्राकडे, तोंडाच्या स्नायूंकडे पाठवतो आणि मगच आपण 'हो' असं उत्तर देतो. ह्या मधल्या प्रक्रियेसाठी अगदी किंचित किंवा खूप जास्त असा काळ जाऊ शकतो. किती काळ जावा ते प्रश्नोत्तरे करणार्‍या दोघांच्या नात्यावर, त्यांच्यात आधी काय घडून गेलंय, सद्य परिस्थिती काय आहे या सगळ्यावर अवलंबून असतं. साध्या 'हो' च्या मागे पुढे बरंच काही असू काही शकतं. मात्र रंगमंचावर होतं काय की आपण सगळे संवाद इतके चोख पाठ केलेले असतात की या कश्शाकश्शाचा विचार न होता धडाधड एकानंतर एक पल्लेदार वाक्यं बोलली जातात. नट आपापली भाषणं पाठ म्हणत असतात आणि दोन व्यक्तिरेखांचं एकमेकांच्यातलं नातं, एकमेकांच्यातला दुवा गायब असतो. रंगमंचावर 'ऐकून बोला' हा विविध लोकांनी केलेला उपदेश कशासाठी हे आता कुठेतरी थोडं थोडं उमगायला लागलं.

पण दुबेजी रंगमंचापुरतं नव्हते सांगत. ते एरवीच ऐकायला सांगत होते. विचारलेला प्रश्न किंवा समोरच्याचं म्हणणं काय आहे? कुठे आहे त्याचा रोख? बोलणारा कशाबद्दल आणि काय बोलतोय नक्की? हे सगळं समजून घेतल्याशिवाय रिअ‍ॅक्ट होऊ नका, उत्तर द्यायची घाई करू नका असं सांगत होते. 'कान आहेत, ऐकू येतंय तर आता वेगळं ऐकायला शिकायची गरज काय?' असा प्रश्न माझ्यातल्या स्मार्ट, चौकस आणि हुशार मुलीला पडलाच. तसंही इतर बाजूंनी म्हणजे 'व्यक्तिमत्व विकास' करून देणारी ४ दिवसांची शिबिरे, विविध आखीव ग्रुप डिस्कशन्स अशा ठिकाणी पटकन उत्तरं देणे, पटकन रिअ‍ॅक्ट होणे हे भयानक हुशारीचं लक्षण मानलं जात होतं. तरीही भरपूर कानपिचक्यांच्यानंतर का होईना 'ऐकल्याशिवाय' लगेच रिअ‍ॅक्ट न होणे, प्रश्न समजून घेऊन मगच उत्तर देणे हळूहळू अंगवळणी पडायला लागले. आणि मग अनेक ठिकाणची संवादांची दारे सहजगत्या उघडायला लागली. 'लर्न टू लिसन!' या मंत्राची महती चांगलीच पटली.

आता हल्ली माझे विद्यार्थी मी शिकवत असताना माझं वाक्य संपूर्णपणे वेगळ्याच दिशेने पुरं करू पहातात तेव्हा मूळचा विषय बाजूला ठेवून 'लर्न टू लिसन!' चा एक वळसा दिल्याशिवाय मला चैन पडत नाही. कामाच्या इथल्या सहकार्‍यांशी चर्चा करताना, मित्रमैत्रिणींशी गप्पा मारताना कुणी एकाचं वाक्य मधेच तोडून आपलं गाडं पुढे घुसवतो तेव्हा मनातल्या मी जोराजोरात 'लर्न टू लिसन!' ओरडत असते.

पहिलं वाक्य बोलत असलेला लिंक तोडली गेल्याने वैतागलेला असतोच. कधीतरी त्याचा फ्यूज उडतो आणि तो चिडचिडू लागतो.
- मला माझा मुद्दा पुरा करू देत, मधे बोलू नकोस
- तू कोण मला सांगणारा
- माझं वाक्य तरी पूर्ण होऊ देत
- काय बोलणार होतास असं अमुक तमुक आणि ढमुक हेच ना.
- नाही माझं म्हणणं वेगळंच होतं.
- होक्का? मग सांग बरं काय ते?
- जाऊ दे मरू देत. आता नाही इंटरेस्ट.
- आता बोलायलो सांगतोय तर ते नाही.
- तू म्हणशील तेव्हाच बोलायचं का मी? कोण समजतोस स्वतःला?
- असं म्हणलंय का मी? उगाच खुसपटं!
- तू च्यायला दर वेळेला माझी मुस्कटदाबी कर आणि वर मलाच म्हणतो खुसपटं बिसपटं.

असं काहीतरी, छोट्या किंवा खूप मोठ्या तीव्रतेचं होतं. दुसर्‍याने आपला मुद्दा ऐकला पाहिजे ही गोष्ट महत्त्वाची होऊन बसते. विषय संपला तरी इगो दुखावलेले असतात. समोरच्याने आपलं वाक्य पण ऐकून घेऊ नये किंवा आपल्याला बोलायलाही नको म्हणावं अशा अपमानाची बोच टिकून रहाते. दुसरा आपल्याला कमी लेखतो असं मानत संवाद संपतो. असं सतत होत गेल्यावर त्या दोघांच्यातलं नातं तडकायला लागत असावं का?

कुठलंही नातं मग ते क्षणिक असो की अनंतकाळचं म्हणलं गेलेलं असो. नातं म्हणलं की संवाद आला. संवाद म्हणजे देवघेव आली. गंमत अशी की अशा नको त्या ठिकाणी आपण सगळे कसले दानशूर बनतो. आपले विचार, भावना, शब्द, वाक्यं सगळं नुसतं देत असतो आपण समोरच्याला आणि इनकमिंगचं विसरतो.

म्हणजे कसं की, 'माझ्या एका मैत्रिणीला इतकं सतत काहीतरी सांगायचं असतं मला. आम्ही गप्पा मारतो तेव्हा माझी उत्तरं तिच्या डोक्यात माझ्याआधी तयार होतात. उत्तरादाखल मी तोंड उघडताच हवे ते ते उत्तर मी योग्य वेळेला दिलंय असं गृहित धरून ती पुढे बोलू लागते. मग मी काय उत्तर दिलं असावं हे मी तिच्या पुढच्या वाक्यावरून समजून घेते.'
'एक मित्र आम्ही सगळे गप्पा मारत असताना मी कुठल्याही विषयाबद्दल बोलत असले तरी ते वाक्य मधेच तोडून तिसराच विषय सुरू करतो.'
'नवरा मी काय सांगतेय ते न ऐकता नुसतं हो हो म्हणत जातो. आणि मग ऐन वेळेला जे करायला नको होतं नेमकं तेच्च करतो.'
'बायको मी जे बोलतो त्याच्या बरोबर उलट्या अर्थाचं ऐकते आणि वैतागते.'
'बॉसला माझं कुठलं म्हणणं ऐकूच जात नसावं बहुतेक. कायम दुर्लक्ष माझ्या प्रॉब्लेम्सकडे.'
'ऑफिसप्यूनला कुठल्याही वाक्यातला अर्जंट हा शब्द ऐकू येत नाही.'
आणि मग शेवटी . . . द ऑलटाइम क्लासिक!
'मला कुणी समजूनच घेत नाही.'
सगळी उदाहरणं निव्वळ न 'ऐकण्याची'.

सतत दुसर्‍याला काहीतरी सांगायची, दुसर्‍यापर्यंत काहीतरी पोचवायची लसलस आणि दुसर्‍यानं ते ऐकावं, दुसर्‍याला ते समजावं अशी अपरंपार इच्छा प्रत्येकाच्यातच असते. या इच्छांना शरण जाता जाता आपण आपलं सांगण्याचं कौशल्य घासूनपुसून लख्ख करायला बघतो, ऐकण्याचं राहूनच जातं. मग हळूहळू संवाद संपतो, मग विसंवाद पण संपतो आणि दोन माणसं अनोळखी बनून जातात. नातं कुठल्याकुठे गायब, ओरखडे मात्र चिरस्थायी.

हे काय भलं नाही राजे!
मग वो?
मग एवढंच . . .

"लख्ख झळझळीत नात्यासाठी हवा उत्तम संवाद
उत्तम मोकळ्या संवादासाठी
बोलण्याइतकेच महत्वाचे . . .
आज आत्ता या क्षणापासून आजमावून बघण्याजोगे . . .
ऐकणे ऐकणे एकदम चोख ऐकणे!"
--- डिंग डाँग ---
आजकी ये प्रसारण सेवा यहीं समाप्त होती है|

- नीरजा पटवर्धन


संस्कार १ - येतोच... आलोच... - http://aatalyaasahitmaanoos.blogspot.in/2011/07/blog-post.html

Tuesday, July 31, 2012

वेशसंकल्पन (कॉश्च्युम डिझाइनिंग) शिकवताना....

९ ते ११ फेब्रुवारी २०१२ या दरम्यान फ्लेम, पुणे येथील कॅम्पसमधे आंतरराष्ट्रीय थिएटर कॉन्फरन्स झाली. 'नाट्यप्रशिक्षणाचे शास्त्रः भारतीय व आंतरराष्ट्रीय दृष्टीकोन(थिएटर पेडगॉजी: इंडियन अ‍ॅण्ड इंटरनॅशनल परस्पेक्टीव्ह)' असा या कॉन्फरन्सचा विषय होता.
मी २००१ पासून ललित कला केंद्र - पुणे विद्यापीठ, अ‍ॅकेडमी ऑफ थिएटर आर्टस - मुंबई विद्यापीठ, फ्लेम - पुणे, नाट्यदिशा - नेहरू सेन्टर, नॉर्थ लखिमपूर-आसाम येथील राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे एक्स्टेन्शन वर्कशॉप अश्या विविध नाट्यप्रशिक्षण केंद्रांमधे वेशसंकल्पन शिकवत आहे/ शिकवले आहे. तसेच वेशसंकल्पन या विषयातच माझे पदव्युत्तर शिक्षण (एम एफ ए - थिएटर मेजर, कॉश्च्युम डिझाइन फोकस) झालेले आहे. या माझ्या अनुभवावर आधारीत वेशसंकल्पनेच्या शिक्षणासंदर्भात एक पेपर सादर केला होता. माझ्या पेपरचे शीर्षक होते 'टिचिंग कॉश्च्युम डिझाइन..' कॉन्फरन्समधला पेपर असला तरी हा विषय म्हणजे रॉकेट सायन्स नाही आणि पेपरमधले मुद्दे सर्वांच्यासमोर आलेच तर कदाचित हे क्षेत्र समजून घ्यायला मदत होईल या हेतूने खालील लेख लिहित आहे. प्रस्तुत लेख माझ्या पेपरमधील काही भागाचा अनुवाद आहे. काही गोष्टींना मराठी प्रतिशब्द वापरता आले नाहीयेत तर काही ठिकाणी ते तसे वापरणे हे अतिक्लीष्ट तसेच मुद्दा चुकीच्या दिशेला नेत असल्याने वापरले नाहीयेत.
----------
वेशसंकल्पन (कॉश्च्युम डिझाइनिंग) शिकवताना....
रंगभूमी हे दृकश्राव्य माध्यम आहे जिथे संवाद व संगीत ऐकून तर नटांच्या हालचाली व रंगमंचाची मांडणी बघून प्रेक्षक नाटकाचा आस्वाद घेत असतो. हा जो बघण्याचा किंवा दृश्य भाग आहे तो अतिशय महत्वाचा आहे. कुठल्याही नाटकाचा दृश्य भाग किंवा संरचना कथा व व्यक्तिरेखांना खरेपणा देतो, आधार देतो.
या दृश्य भागाचे एक महत्वाचे अंग म्हणजे वेशसंकल्पन. नाटकाचे मुख्य कार्य जे कथा सांगणे त्यामधे वेशभूषेचा मोठा वाटा आहे. वय, व्यवसाय अश्या ढोबळ गोष्टींपासून स्वभावातल्या बारीक सारीक कंगोर्‍यांपर्यंत व्यक्तीरेखेच्या अनेक संदर्भांची ओळख प्रेक्षकांना वेशभूषेमुळे होते. प्राचीन काळी म्हणजे जेव्हा नाटक लिहिलेही जात नव्हते तेव्हापासून नटाचे/ नर्तकाचे भूमिकेत जादूई रूपांतर करण्यासाठी वेशभूषेचा उपयोग असेच. नटाचे भूमिकेत रूपांतर करण्यासाठी आजही या कलेची जरूर आहे. हे सर्व असले तरीही रंगभूमीच्या सर्व कलांमधे वेशसंकल्पना ह्या कलेबद्दल अजूनही प्रचंड गैरसमज आहेत आणि अजूनही या कलेला योग्य स्थान दिले जात नाही .
बहुतांशी वेशसंकल्पनेला फॅशन डिझायनिंगचा एक प्रकार मानले जाते. व्यक्तीरेखा व कथेप्रमाणे कपडे, दागिने, इतर अ‍ॅक्सेसरीज, डिझाइन करून वेशसंकल्पक एक पूर्ण चित्र निर्माण करतो. एक व्यक्तिरेखा डिझाइन करण्यासाठी व्यक्तिरेखेच्या सखोल अभ्यासाबरोबरच संहितेची शैली, दिग्दर्शकाची ट्रीटमेंट, सादरीकरणाची पद्धत, अभिनयाची पद्धत या सर्व गोष्टींचा अभ्यास वेशसंकल्पकाला करावा लागतो. यासाठी वेशसंकल्पकाला वेगळे शिक्षण घ्यावे लागते जे फॅशनच्या अभ्यासापेक्षा नाट्यशिक्षणाशी जास्त नाते सांगते.
वेशसंकल्पनाचे शिक्षण: पाश्चात्य विचार
पाश्चात्य जगात वेशसंकल्पनाचे शिक्षण हे स्पेशलायझेशन किंवा संपूर्ण नाट्य प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून असे दोन्ही प्रकारे घेता येते. जवळजवळ सर्वच विद्यापीठांच्यात जिथे नाट्य शिक्षण आहे तिथे पदव्युत्तर (ग्रॅड स्कूल/ मास्टर्स - एम एफ ए) स्पेशलायझेशन करता येते. तसेच काही ठिकाणी पदवीही (बॅचलर्स - बी एफ ए) करता येते. या सर्व अभ्यासक्रमांच्या मागे एक विशिष्ट मेथडॉलॉजी आहे.
वेशसंकल्पक बनण्यासाठी संपूर्ण नाट्यकलेचे ज्ञान असणे आवश्यक मानले आहे. यामुळे रंगभूमीचा इतिहास व संहिता विश्लेषण ह्या अतिशय महत्वाच्या विषयांचा अभ्यासक्रमात अंतर्भाव असतो. रंगभूमीच्या इतिहासाचा अभ्यास करताना जगभरातल्या रंगभूमीवर प्रचलित असलेल्या सादरीकरणाच्या पद्धती, त्यांची उत्पत्ती, वेळोवेळी केले गेलेले प्रयोग यांची ओळख होते तर संहिता विश्लेषण शिकताना विविध शैलींमधे लिहिलेली नाटके अभ्यासली जातात, अनेकविध दृष्टीकोनांच्यातून तपासली जातात. साहित्यिक प्रवाहांचाही अभ्यास यामधे केला जातो.
याबरोबरच वेशसंकल्पनेची सैद्धांतिक मूलतत्वे आणि प्रात्यक्षिक असे दोन्ही प्रकारचे शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांनी वर्गामधले छोटे प्रोजेक्टस तसेच पूर्ण नाटकाच्या प्रत्यक्ष सादरीकरणासाठीही वेशसंकल्पन करणे आवश्यक असते. या प्रक्रियेच्या दरम्यान दिग्दर्शक व वेशसंकल्पक एकमेकांबरोबर काम कसे करतात याचे प्रत्यक्ष शिक्षण मिळते. सेमिनार क्लाससाठी विद्यार्थी महत्वाचे विविध वेशसंकल्पक आणि त्यांचे कलेसाठीचे योगदान याच्याबद्दल अभ्यास, संशोधन करून समजून घेतात. एखाद्या क्लास प्रोजेक्टसाठी किंवा प्रयोगासाठी वेशसंकल्पन करताना विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पना कागदावर दृश्यस्वरूपात आणणे अपेक्षित असते. यासाठी चित्रकलेच्या शिक्षणाचीही गरज असते. वेशसंकल्पनासाठी उपयोगी अश्या स्केचिंग, जलरंग, कोलाज अश्या विविध तंत्रांचे शिक्षणही दिले जाते. मोठ्या मोठ्या नाटक कंपन्यांची कॉश्च्युम शॉप्स अथवा ज्येष्ठ वेशसंकल्पकाच्या हाताखाली इंटर्नशिप करून व्यावसायिक जगातील कामाच्या पद्धतीचा अनुभव घेणे हे सुद्धा या शिक्षणात अनिवार्य असते.
यानंतरचा महत्वाचा भाग म्हणजे वेशभूषेचा इतिहास. यामधे कपड्याच्या इतिहासाबरोबरच कला, सजावट व वास्तुकलेचा इतिहासही अभ्यासला जातो. तसेच कला इतिहास आणि सामाजिक व राजकीय इतिहासाचा परस्परसंबंधाबद्दलही तपशीलात जाऊन विचार केला जातो. यामुळे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या संस्कृती आणि समाजाच्या जडणघडणीच्या संदर्भाने एक व्यापक दृष्टीकोन मिळतो जो एखादी व्यक्तिरेखा समजून घेण्यासाठी अत्यावश्यक असतो.
वेशसंकल्पन करताना इतर बाकीच्या संकल्पनाबद्दलही म्हणजे नेपथ्य व प्रकाशयोजना यांबद्दल विद्यार्थ्यांना ज्ञान असायला हवे कारण या दोन्ही विभागांच्याबरोबरच काम केले जाते. त्यामुळे नेपथ्य व प्रकाशयोजना या दोन्ही कलांबद्दल शिकणे अनिवार्य असते.
वेशसंकल्पकाला कापड, कपडा बेतणे, शिवणे, आल्टरेशन्स या सर्व गोष्टी उत्तमपणे येणे अत्यंत जरूरीचे असते. त्यामुळे वेशभूषा तयार करण्याचे शास्त्र हा अभ्यासक्रमाचा अतिशय महत्वाचा भाग असतो.
उत्तर अमेरिकेतील बहुतेक सर्व विद्यापिठांच्या नाट्यविभागामधे वेशसंकल्पनामधे मास्टर्स करणार्‍या विद्यार्थ्यांना 'शॉप असिस्टंटशिप' मिळते. ज्यायोगे शिक्षणाच्या आर्थिक बाजू सांभाळली जाण्याबरोबरच विद्यापिठाच्या कॉश्च्युम शॉपमधे काम करण्याचा अनुभवही मिळतो.
वेशसंकल्पनाचे शिक्षण: भारतीय वस्तुस्थिती
वेशसंकल्पनाच्या शिक्षणासंदर्भात भारतातील परिस्थिती अभ्यासल्यास काही ठळक महत्वाचे मुद्दे दिसून येतात.
भारतात केवळ वेशसंकल्पनाचे शिक्षण देणारी एकही संस्था नाही. केवळ राष्ट्रीय नाट्य विद्यालय, दिल्ली येथील तीन वर्षांच्या पदव्युत्तर पदविके अंतर्गत 'नाट्य तंत्रज्ञान व संरचना' या विषयामधे दुसर्‍या व तिसर्‍या वर्षात स्पेशलायझेशन करता येते. इथेही केवळ वेशसंकल्पन नाही.
बर्‍याचश्या नाटक शिकवणार्‍या संस्थांमधे वा विद्यापिठातील विभागांमधे सेट शॉप, कॉश्च्युम शॉप तर दूरच स्वत:चे नाट्यगृह/ सादरीकरणाची जागाही असतेच असे नाही.
काही फॅशन डिझायनिंग शिकवणार्‍या संस्थांमधे वेशसंकल्पन हा विषय थोडक्यात शिकवला जातो. तिथल्या शिक्षणामधे तारेतारकांचे ग्लॅमरस स्टायलिंग जास्त करून शिकवले जाते. वेशभूषेचा इतिहास या विषयाचा अंतर्भाव फॅशन डिझायनिंगच्या शिक्षणात नक्कीच असतो पण नाट्यशिक्षण वा चित्रपटनिर्मिती यासंदर्भात अर्थातच काहीही शिकवले जात नाही.
इथले पदव्युत्तर नाट्यशिक्षण हे संपूर्ण नाट्यकलेविषयी(कॉम्प्रिहेन्सिव्ह) शिक्षण देणारे असते. असे असले तरीही अभ्यासक्रमात अभिनयशिक्षणावर सगळ्यात जास्त भर असतो. काही शिक्षणसंस्थांच्या मते वेशसंकल्पन वा इतर तंत्राधारीत गोष्टींना अभ्यासक्रमात तोंडओळखीच्या पलिकडे स्थान देण्याची गरज नाही कारण येणार्‍या विद्यार्थ्यांचा ओढा अभिनय वा दिग्दर्शनाकडेच असतो.
वेशसंकल्पनाची सैद्धांतिक बाजू शिकवण्यासाठी ठेवलेला वेळ जरूरीपेक्षा अतिशय कमी ठेवलेला असतो. या थोडक्या वेळात जे शिकवले जाईल त्याचे प्रात्यक्षिक करून बघण्याची संधी क्वचित उपलब्ध होते कारण मुळात नाट्यशिक्षणासाठी गरजेचे असलेले इन्फ्रास्ट्रक्चरच अस्तित्वात नसते. याच प्रकारे गुणांकन व्यवस्थेमधेही सैद्धांतिक व प्रात्यक्षिक विभागात वेशसंकल्पना या विषयाचा अंतर्भाव असतोच असे नाही. 

मी जॉर्जिया विद्यापिठात शिकत असताना एक भारतीय म्हणून मला स्वतःची एक महत्वाची कमतरता जाणवली, ती म्हणजे दृश्य संवेदना आणि दृश्यात्मक विचाराचा अभाव. हाच अभाव आज मला माझ्या बहुतांश विद्यार्थ्यांच्यातही दिसून येतो. दृश्यकलांचा अतिशय श्रीमंत वारसा लाभूनही भारतीय विद्यार्थ्यांच्या नाट्यकलेसाठी पोषक अश्या दृश्य जाणिवा पुरेश्या विकसित नसतात. आपल्या शालेय शिक्षणात दृश्यकलांचा अतिशय माफक वापर असतो. दृश्यात्मकता हे शिकण्या-शिकवण्याचे साधन म्हणून क्वचित वापरले जाते. समकालीन दृश्य कलांचे जग हे नेहमीच एक समांतर जग असते आणि माणूस म्हणून घडण्याच्या प्रक्रियेत त्याचा काहीच सहभाग नसतो. अर्थातच दृश्यकलांसंदर्भाने विचार व जाणिवा अविकसितच रहातात.  बहुतेक नाट्यप्रशिक्षणसंस्थांना दृश्यकलांचा प्रयोगकलांशी संबंध आहे आणि त्यांचा अंतर्भाव शिक्षणात केला पाहिजे असे वाटत नाही. हे सगळे मुद्दे या 'गोष्ट सांगण्याच्या कलेच्या' दृश्य भागाबद्दल शिकणे अवघड करून ठेवतात. यामुळेच बहुतेक रंगमंच संरचनेला नाट्यप्रशिक्षणामधे फारसे महत्व दिले जात नाही. 

भारतीय वस्तुस्थिती आणि प्रस्तावित शिक्षण पद्धती
विविध नाट्यप्रशिक्षण संस्थांमधे जवळजवळ अठरा वर्षे मी वेशसंकल्पन शिकवत आहे. येथील वस्तुस्थिती लक्षात घेता पाश्चात्य जगात ज्या प्रकारे शिकवले जाते तो अभ्यासक्रम तसाच्या तसा इथे शिकवता येणे शक्य नाही हे उघड आहे. भारतीय प्रशिक्षण संस्थांमधे संपूर्ण नाट्यकलेचा अभ्यासक्रम शिकवला जातो हे लक्षात घेऊन मी वेशसंकल्पनेच्या अभ्यासक्रमात वेगवेगळ्या मॉड्युल्सचा प्रयोग करत आलेली आहे.
अ. वेशसंकल्पनेची प्राथमिक तत्वे - यामधे वेशसंकल्पनेचे प्रयोगातील स्थान व महत्व अधोरेखित होईल अशी काही मॉड्युल्स मी वापरते.
१. वेशभूषेचा मानसशास्त्रीय परिणाम - विद्यार्थी एका व्यक्तीचे कपडे, राहणी, अ‍ॅक्सेसरीज या सर्व गोष्टींचे निरीक्षण करतात व त्या व्यक्तीबद्दल आडाखे बांधण्याचा प्रयत्न करतात. रोजच्या आयुष्यातले कपडे, वस्तू व्यक्तीमत्वावर आणि व्यक्तिमत्व या वस्तूंवर कसा परिणाम करत असते यावर चर्चा होते. चपखल निरीक्षण आणि बारकावे/ तपशील यांना यामधे महत्व दिले जाते.
२. तुलनात्मक अभ्यास - यामचे फॅशन डिझायनिंग आणि कॉश्च्युम डिझायनिंग या दोन शास्त्रांची साम्यस्थळे व फरक याबद्दल चर्चा केली जाते. वेशसंकल्पन (कॉश्च्युम डिझायनिंग) हा फॅशन डिझायनिंगच्या कलेचा एक भाग नाही ह्याची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली जाते. उत्तम प्रकारचे कापडचोपड, अत्युत्तम कारागिरी वापरून बनवलेले कुत्यूर/ कुटूर आणि इमिटेशन, उच्च दर्जा व किमतीचा भास निर्माण करणार्‍या वस्तू वापरून बनवलेले कॉश्च्युम यातला फरक स्पष्ट केला जातो. उदाहरणार्थ एखाद्या कॉश्च्युममधे फेविकॉल आणि रंग यांच्या पेस्टने चित्र काढून उत्तम भरतकामाच्या नमुन्याचा आभास निर्माण करता येऊ शकतो.
३. वेशभूषेचे रसग्रहण - विद्यार्थी एखादे नाटक एकत्र बघून त्यातील वेशभूषेचे सखोल विश्लेषण करतात.
ब. वेशसंकल्पनाची प्रक्रिया - बहुतांश विद्यार्थी हे अभिनय वा दिग्दर्शनातच रस असलेले असतात. त्यामुळे संहिता ते प्रयोग या प्रवासातली वेशसंकल्पनेची प्रक्रिया अभ्यासताना, अभिनेता किंवा दिग्दर्शकाच्या संदर्भाने ही प्रक्रिया समजावून सांगितली जाते. अभिनेत्याचे वा दिग्दर्शकाचे या प्रक्रियेतील योगदान आणि भूमिका तसेच अभिनेता व वेशसंकल्पक आणि दिग्दर्शक व वेशसंकल्पक या दोन्ही नात्यांबद्दल सविस्तर चर्चा केली जाते.
१. शब्दशः कोणतेही नाटक हे दिग्दर्शकाचे 'व्हिजन' असते असे म्हणता येईल. दृश्य भागासंदर्भाने, प्रेक्षकांना कश्या प्रकारचा अनुभव द्यायचा आहे याची स्पष्ट कल्पना दिग्दर्शकाच्या मनात असायला हवी आणि ती कल्पना तीनही डिझायनर्सना उत्तम प्रकारे समजावून देता यायला हवी.
२. अभिनेत्याने वेशभूषेची संकल्पना समजून घ्यायला हवी. वेशसंकल्पकाच्या अभ्यासाचा आदर करायला हवा. मला हे आवडत नाही ते आवडत नाही असता कामा नये. तसेच तालमींच्या वेळेस वेशभूषेचा सराव व्हावा म्हणून घालायचे कपडे, वेशभूषा व नटांच्या हालचाली या सर्व गोष्टींची चर्चा दोघांमधे व्हायला हवी.
क. दृश्य जाणिवा - हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. तसेच आधी सांगितल्याप्रमाणे याबाबतीत काही प्रमाणात विशेष काम करण्याची गरजही आहे. विद्यार्थ्यांनी दृश्यात्मक विचार करावा, त्यांच्या डोळ्यांवर संस्कार व्हावेत यासाठी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त चित्रांची/ शिल्पांची प्रदर्शने, वेगवेगळ्या पुस्तकांच्यातले चित्र वा शिल्पांचे फोटो, आंतरजालावर उपलब्ध असलेली चित्रे बघावीत हा माझा प्रयत्न असतो.
१. दृश्य संवाद - संरचनेचे घटक व मूलतत्वे, घटकांचे मानसशास्त्रीय परिणाम यांचा तपशिलात अभ्यास.
२. नाटकाच्या संहितेची शैली, सादरीकरणाची शैली आणि नाटकाचे दृश्य संकल्पन यांच्यातले नाते याचा मुळातून व सविस्तर विचार.
वरील दोन्ही गोष्टी समजायला मदत व्हावी म्हणून या चर्चेदरम्यान भरपूर वेगवेगळी दृश्ये, मोठ्या मोठ्या चित्रकारांची चित्रे, महत्वाच्या नाट्यप्रयोगांचे फोटोग्राफ्स असे बरेच काही दाखवून त्यावरही चर्चा केली जाते.
अतिशय कमी तासिकांची उपलब्धता आणि प्रात्यक्षिकाचा अभाव यामुळे ही याही मॉड्यूल्स तशी मर्यादित स्वरूपातच यशस्वी होतात.
भारतीय वस्तुस्थिती: आता यापुढे...
भारतीय नाट्यप्रशिक्षण संस्था व विद्यापीठीय नाट्यविभागांमधे काही मूलभूत बदल होणे गरजेचे आहे. प्रत्येक महत्वाच्या प्रशिक्षण संस्थेकडे स्वतःचे नाट्यगृह आणि स्वतःची कॉश्च्युम, सेट, प्रॉपर्टी, लाइट वर्कशॉप्स असणे गरजेचे आहे. यासाठी प्रचंड आर्थिक पाठबळाची गरज पडणार आहे. यासाठी विद्यापीठाच्या प्रशासनाने नाट्यविभागाचा भाषा किंवा अश्या विषयांपेक्षा वेगळ्या पद्धतीने विचार करणे अत्यंत जरूरीचे आहे. नाट्यविभागाच्या गरजा वेगळ्या आहेत हे समजून घेणे अनिवार्य आहे.
योग्य प्रकारे पायाभूत सुविधा उभारल्या जाव्यात यासाठी नाट्यप्रशिक्षण संस्था वा नाट्यविभागांचा डिझायनिंग किंवा दृश्य संकल्पन या गोष्टींबद्दलचा दृष्टीकोन बदलणे नितांत गरजेचे आहे. कोरी पाटी घेऊन येणार्‍या विद्यार्थ्याला अभिनय वा दिग्दर्शन यातच रस असणे हे साहजिक आहे कारण आपल्याकडे नाटकाच्या तांत्रिक वा दृष्यसंकल्पनाच्या अंगांबद्दल सामान्य माणसांना फारसे माहित नसते, त्यासंदर्भाने तेवढी जागरूकता नसते. पण हे अज्ञान आहे हे कारण अभ्यासक्रम आखतानाचा पाया असता कामा नये. एकत्रित किंवा संपूर्ण नाट्याभ्यासक्रमात सर्व बाजूंना योग्य ते स्थान दिले गेले पाहिजे. दृश्य भाग हा पैशाअभावी काट मारण्याचा 'जास्तीचा' भाग नव्हे हे प्रशिक्षण संस्थांनी वा विद्यापिठांतील नाट्यविभागांनी लक्षात ठेवायला हवे. याचबरोबर दृश्यसंकल्पनाचे विषय शिकवण्यासाठी ठेवला जाणारा वेळ पण वाढवायला हवा जेणेकरून विद्यार्थ्यांना विषयाची किमान तोंडओळख तरी व्यवस्थित होऊ शकेल.
गुणांकन पद्धतीमधेही या अनुषंगाने बदल व्हायला हवेत. विद्यार्थ्यांना मूल्यमापनात शिकलेल्या विषयाचे प्रात्यक्षिक करून बघायची संधी मिळायला हवी. संपूर्ण नाट्यप्रशिक्षणाच्या काळात किमान एका तरी प्रॉडक्शनमधे विद्यार्थ्याने वेशभूषा विभागात काम करणे अनिवार्य ठेवायला हवे.
प्रशिक्षण संपल्यावर विद्यार्थी याच क्षेत्रात उतरणार असतात त्यामुळे प्रत्यक्ष क्षेत्रात काम कश्या प्रकारे चालते याचा अंदाज येण्यासाठी प्रशिक्षणाचा भाग म्हणून व्यावसायिक व्यक्तीच्या हाताखाली काम करणे अनिवार्य असायला हवे. जेणेकरून या क्षेत्राशी प्रत्यक्ष ओळख तर होतेच पण संपर्क वाढल्याने बाहेर पडल्यावर काम मिळण्याच्या दृष्टीनेही मदत होऊ शकते.
सर्वात शेवटी अतिशय मह्त्वाचा मुद्दा म्हणजे भारतीय पारंपरिक रंगभूमीची ओळख व नाळ जोडली जाणे. भारताची पारंपरिक रंगभूमी ही विधिनाट्य ते लोकधर्मी आणि नाट्यधर्मी अश्या सर्व प्रकारच्या अनेक शैलींचा समावेश असलेली श्रीमंत रंगभूमी आहे. प्रत्येक पारंपरिक रंगभूमी वैशिष्ठ्यपूर्ण दृश्य संकेतांचे पालन करते. भरतमुनींच्या नाट्यशास्त्रातही हे उल्लेख आहेत. अभिनय प्रकारापैकी 'आहार्य अभिनय' ह्या संकल्पनेत रंगमंच, नेपथ्य, वेशभूषा, रंगभूषा यांचा विस्तृत स्वरूपात विचार केलेला आहे. बहुतेक नाट्यप्रशिक्षण अभ्यासक्रमात पारंपरिक रंगभूमीचा आढावा घेतला जातो. पण तो आढावा शारीरीक हालचालींची पद्धत, वारंवार दिसून येणारे विषय, संगीताचा प्रकार यासंदर्भात जास्त करून असतो. वेशभूषेचे वर्णन केलेले असते पण ते वस्तूंची यादी, त्या शरीरावर कुठे घातल्या जातात इतपतच असते. ठराविक वेशभूषा असण्याच्या मागचा संरचनात्मक विचार आणि त्याचा भारतीय दृश्य कलांशी घातलेला मेळ याबद्दल काहीच मिळत नाही. ह्या विषयाची किमान तोंडओळख होण्याइतपत तरी चर्चा केली जायला हवी. अर्थात या विषयामधे खूप मर्यादित स्वरूपात संशोधन उपलब्ध आहे. भारतीय रंगभूमीच्या इतिहासाच्या या पैलूबद्दल खोलात जाऊन केलेल्या संशोधनाची, संदर्भांची इथे नितांत आवश्यकता आहे.
समारोप
वेशसंकल्पन किंवा रंगभूमीच्या कुठल्याही पैलूचे व्यावसायिक शिक्षण देणार्‍या अभ्यासक्रमात त्या त्या विषयाचे संपूर्ण सैद्धांतिक तसेच प्रात्यक्षिक ज्ञान या दोन्हीचा समावेश असायला हवा. अश्या प्रकारच्या प्रशिक्षणातून तयार झालेला विद्यार्थी बाहेर पडल्यावर आपल्या क्षेत्रात अर्थातच उत्तम कामगिरी करेल. त्याच्यामुळे त्याच्यासारख्या इतर अनेकांकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा ठेवली जाईल. त्यामुळे अनेकांना व्यावसायिक अभ्यासक्रमाची निवड करण्याची प्रेरणा मिळेल. यामुळे प्रशिक्षण संस्थांकडे पायाभूत सुविधा उभारण्यासाठी निधी जमा होणे हे पण सोपे होईल.
सध्यातरी ऐकायला स्वप्नवत वाटतेय.. नाट्यप्रशिक्षण अभ्यासक्रमातील दृश्यसंकल्पन या विषयाची पुनर्बांधणी केल्यावरच हे सर्व स्वप्न की वास्तव हे खरोखर समजू शकेल.
-----------------------------------------------------------------------------
संदर्भसूची
पुस्तके:
द मॅजिक गार्मेंट - रिबेका कनिंगहॅम
कॉश्च्युम डिझाइनः टेक्निक्स ऑफ मॉडर्न मास्टर्स - लिन पेक्टेल
संकेतस्थळे:
डिपार्टमेंट ऑफ थिएटर अ‍ॅण्ड फिल्म स्टडीज; युनिव्हर्सिटी ऑफ जॉर्जिया
स्कूल ऑफ थिएटर; कॅलिफोर्निया इंस्टीट्यूट ऑफ आर्टस
स्कूल ऑफ ड्रामा; कार्नेजी मेलन युनिव्हर्सिटी
टिश स्कूल ऑफ आर्ट; न्यू यॉर्क युनिव्हर्सिटी
स्कूल ऑफ थिएटर, फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन; यूसिएलए
रॉयल अ‍ॅकेडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्टस

Monday, January 9, 2012

धमाल!

dubeyji.jpg
रिक्षा सोडली आणि जानकी कुटीरमधे प्रवेश केला. पृथ्वीच्या गेटमधून आत शिरताना आपोआप नजर उजवीकडे कॅफेतल्या टेबलांवर फिरून आली.
आहेत का?
च्च आता कसे असतील? ते नाहीत म्हणून तर इथे जमलेत सगळे.

अ‍ॅब्सेन्स.. गैरहजेरीनेच जाणवणार आहात का यापुढे?
नो नो डोन्ट वरी.. नो रोतडूगिरी. ओन्ली 'धमाल'

एक रंगमंच, अनेक कलाकार नवशिके ते मान्यवर..
काही कविता, काही नाट्यप्रवेश, काही नाच, काही गाणी.....
सोनालीने म्हणलेली दुबेजींची आवडती कविता 'झाड'..
स्वानंदने गायलेलं 'बावरा मन'.
रत्नाजींनी वाचून दाखवलेला आजोबांनी नातवंडासाठी झाड लावण्याबद्दलचा उतारा...
क्षणात कोंडणारा घसा, डोळ्याला ओल, गालांवरून वाह्यलेलं पाणी..
बट आय अ‍ॅम नॉट क्रायिंग सर!

पहले सांस लो फिर बोलो.
फोकस..
सेन्टेन्स पुरा बोलो,
बाई, पिच अर्धा सूर खाली,
तुम्ही तेव्हा गमतीदार मराठी बोलायचात.
एकही उच्चार चूक नसायचा पण तरी वाक्याचा रिदम वेगळा होता.
ते फार मस्त वाटायचं कानाला.

पूर्वा नरेशचे अप्रतिम आणि सहज सुंदर नृत्य
इप्टा वाल्यांनी तुमच्यासाठी म्हणून सादर केलेली अप्रतिम गाणी...
अधून मधून तुमच्या आठवणी,

तू पुण्यातली कोकणस्थ. तुला स्टेजवर रडता येत नसेलच.
काय ओळखलंत!
तुमचा पेन एक्सरसाइझही माझ्यापुढे निष्प्रभ ठरला होता.
पण 'आडा चौताल' मधे मला रडण्यापासूनच सीनची सुरूवात करायला लावलीत.
रडायला शिकवलंत खरं..
तरी मी आत्ता रडत बसणार नाहिये!

'खुदा के लिये.. मत देखना' मधला तुम्हीच तुमच्या 'संभोग से सन्यास तक' मधून कॉपी केलेला सीन,
कुमुद-सुहिताचे 'सुदामा के चावल'
टाळ्यांचा कडकडाट, हसण्याचा धबधबा..

सगळं काही तुमच्या ओढीने. ही कुठली जादू होती तुमच्याकडे?
जो जो तुमच्या संपर्कात आला त्याला श्रीमंत करून सोडलंत. अगदी आयुष्य बदलण्याइतकं श्रीमंत.
हे करताना त्या त्या प्रत्येकावर प्रेम केलंत. शिव्या घालत, समोरच्याचा इगो डिवचत प्रेम केलंत.
अगदी माझ्यासारख्या चिरकुट लोकांपासून पार नसीरजी, अमरिश पुरी यांच्यासारख्यांपर्यंत.

तुम्ही स्वतःच स्वतःची घेतलेली मुलाखत. थँक्स टू सुनिल आणि हिदा.
स्वतःचं डिसेक्शन करून ठेवलं होतंत तुम्ही. 'संगीत नाटक अकादमी' अवॉर्ड मिळालं तेव्हा.

सरतेशेवटी "आयुष्यभरात राहून गेलेल्या झोपेचा कोटा पुरा करत होते दुबेजी गेले तीन महिने, जेणेकरून स्वर्गात गेल्यावर लगेच नाटक करता यावं. ही मस्ट बी मेकिंग 'हेल' आउट देअर!" इति नसीरजी
"येस 'अंधा युग' विथ ओरिजिनल कास्ट!"
व्हॉट अ 'धमाल!!'

- नीरजा पटवर्धन
--------------------------------------------------------

तळटिपा - १. कोणीही उस्फूर्तपणे स्टेजवर येऊन एकट्याने/ समूहाने ५ मिनिटाचे काहीतरी परफॉर्म करायचे. क्रम ठरवलेला नाही, एकत्रित तालमी बिलमी असं काही नाही. असा दीड दोन तासाचा कार्यक्रम म्हणजे 'धमाल!' दुबेजींची अतिशय आवडती अ‍ॅक्टिव्हिटी होती. हे नावही त्यांनीच दिलेले होते.
२. 'अंधा युग' हे धर्मवीर भारतींचं अतिशय गाजलेलं नाटक. महाभारतावर आधारित आहे.

Thursday, October 27, 2011

मला बी जत्रंला येऊ द्या की! - ३

मला बी जत्रंला येऊ द्या की! - १
मला बी जत्रंला येऊ द्या की! - २

----------------------------------------
कशे आसंत सगळे? बरा मां?
पुढची पुरचुंडी सोडतंय त्याआधी
एक म्हणजे माका फ्रेंच, स्पॅनिश आणि बाकीचो भाषा येऊक नाय. स्पेलिंग आणि उच्चार यांचा मेळ जमतलाच असा काय नाय तर माफीच करून टाका. आणि दुसरं म्हणजे हयसरलो डिस्क्लेमर परत वाचा बघू. स्मित
वाचलात. समजला मां? आता येवा पुरचुंडी बघूक.
पुरचुंडीत पयलो रत्न आसां
द मिनिस्टर (L'exercice de l'etat) - पियेर शूलर या दिग्दर्शकाचा हा फ्रेंच चित्रपट. एका ट्रान्सपोर्ट मिनिस्टरच्या आयुष्यातील काही घडामोडींभोवती ही घटना घडते. एका प्रचंड मोठ्या अपघातापासून कथा सुरू होते. मंत्र्याचं अत्यंत तणावग्रस्त आणि धावपळीचं आयुष्य, हा मंत्री कुठल्याही 'टायटल्ड' घराण्यातला नसणं, त्याला जनतेची चाड असणं हे त्यातून उलगडत जातं. मंत्री आणि त्याचा ड्रायव्हर यांच्यातलं माणुसकीचं मैत्रीपूर्ण नातं आपल्याला दिसतं पण त्याचा पार टडोपा करत नाहीत. मग रेल्वेस्टेशन्सचे खाजगीकरण या मुद्द्यावरून राजकारणातले बेरिजवजाबाकीचे खेळ आपल्यापुढे यायला लागतात. शेवटी या मंत्र्याला दुसर्‍या खात्यावर टाकून खाजगीकरणाचे गाडे पुढे सरकते. राजकारणाचे खेळ, मैत्री या शब्दाचा पोकळपणा, 'टायटल' चा युरोपियन सोस, एकटेपणा अश्या सगळ्या गोष्टींना घेऊन सिनेमाची गाडी पुढे जाते. नुसत्या राजकारणाच्या कोरड्या खेळापेक्षा मानवी स्वभाव आणि नात्यांना स्पर्श करत कथा जाते त्यामुळे कंटाळा येत नाही.

हयसर आसंय एक बाभळी..
लास अ‍ॅकेशियास (Las acacias) - अर्जेंटिना आणि स्पेनची निर्मिती असलेला, पाब्लो जिऑर्जेयी (Pablo Giorgelli) या दिग्दर्शकाचा हा पहिलाच चित्रपट. भाषा इस्पॅनोल (स्पॅनिश). पेरूग्वे ते ब्युनॉस आयर्स या रस्त्यावर ही कथा घडते. वर्षोनवर्षे याच रस्त्यावरून ट्रक चालवणारा एक ट्रक ड्रायव्हर रुबेनच्या आयुष्यातल्या वेगळ्या दिवसाची ही गोष्ट. प्रवासाच्या सुरूवातीला जेसिंता त्याच्या ट्रकमधे ब्युनॉस आयर्सपर्यंत लिफ्ट मागते. जेसिंताबरोबर तिची आठ महिन्यांची मुलगीही आहे. संपूर्ण प्रवासभर ते फारसे बोलत नाहीत पण तरी संपूर्ण अनोळखीपणापासून मैत्रीपर्यंत त्यांचा जो प्रवास आहे तो फार सुंदर. सगळ्यात महत्वाचे म्हणजे एकमेकांच्या आयुष्याबद्दल भोचकपणे प्रश्न विचारून फुकटचे तत्वज्ञानाचे डोस ते एकमेकांना पाजत नाहीत. एकमेकांच्या खाजगीपणाचा आदर ठेवून एकमेकांचे प्रवासाचे साथी होतात, एकमेकांना गरज पडल्यास मदत करतात. या सगळ्यात छोट्या मुलीचं तिथं असणं हा पण एक सुंदर कॅटॅलिस्ट. चित्रपटाचा दिग्दर्शक स्क्रिनिंगनंतर बोलताना म्हणाला की मी लिहिलेल्या पहिल्या स्क्रिप्टमधे मी खूप बडबड लिहिली होती पण दुसर्‍या तिसर्‍या ड्राफ्टला येताना ती बडबड इतकी अनावश्यक वाटायला लागली आणि संवाद अगदी कमीतकमी झाले. जे काय प्रेक्षकांपर्यंत पोचवायचं ते नुसत्या सीन्समधूनच पोचवता येईल हे लक्षात आलं. एकूणात चित्रपटाची पटकथा आणि दिग्दर्शनाबद्दलचा हा डोस मला फार महत्वाचा वाटला. अभिनयाबद्दल रुबेन, जेसिंता आणि बेबी अनाही तिघांची दृष्ट काढायला हवी. चित्रपट बघायला हवा. उरलेला दिवस प्रसन्न होऊन जाईल.

इथे आहे लंकेतून आलेला भुरभुर पाऊस
ऑगस्ट ड्रिझल (Nikini Vassa) - मी बघितलेला पहिला श्रीलंकन चित्रपट. दिग्दर्शन अरूणा जयवर्दना या दिग्दर्शकाचे. संपूर्ण चित्रपटात मृत्यू प्रमुखस्थानी आहे. पण चित्रपट खूप जड इत्यादी नाही. सोमलता ही मृतदेहांना साफ करून, मेकप करून चांगले कपडे घालून पुरण्यासाठी तयार करण्याचे काम करत असते. वडिलांच्या नंतर हे काम तिच्याकडे आलेले आहे. तिने लग्न केलेले नाही या कारणास्तव गावात तिच्याबद्दल वाईट साईट चर्चा करणारे खूप आहेत. गावासाठी स्वतःच्या खर्चातून एक स्मशान बांधून द्यावे जेणेकरून आपल्याला थोडी तरी प्रतिष्ठा मिळेल गावात असा सोमलताचा विचार आहे. या कामादरम्यान सोमलताची भेट एका आर्किटेक्टशी होते. जो गावातलाच असूनही गावाच्या मानसिकतेपेक्षा वेगळा असतो. दोघांचं वेगळेपण त्यांना जवळ आणतं. पण स्मशान बांधणे आणि त्यातून सोमलताला मिळू शकणारी प्रतिष्ठा हे गावातल्या तिच्या प्रतिस्पर्ध्याला (मृतदेह साफ करण्याच्या धंद्यातला प्रतिस्पर्धी) पचणारं नसतं. त्याची ताकद आणि वजन गावात भरपूर आहे. त्यामुळे त्यावरून खूप मोठं राजकारण सुरू होतं. शेवटी सोमलताचा यात खून होतो. सिनेमा संपतो. श्रीलंकन गावातलं वातावरण आपल्यासाठी एकाचवेळी अनोळखी आणि ओळखीचं वाटतं. सोमलताची व्यक्तिरेखा करणार्‍या अभिनेत्रीचा चेहरा वेगळाच सुंदर आणि अभिनयक्षमता अफाट आहे. एकदा बघावा असा.

हयसर अमेरिकेतल्या त्रासलेल्या सुंदर्‍या आसत!
डॅम्झेल्स इन डिस्ट्रेस - शीर्षक वाचूनच बारीकसं फिदी टाइपचं हसू येतं. सगळा सिनेमा त्याच धर्तीवर आहे. गुडीगुडी हॉलिवूड स्टाइल मशी अमेरिकन कॉलेज ड्रामा प्रकारच्या फिल्म्सवर स्पूफ आहे(काय मराठी आहे वा वा!) . व्हिट स्टिलमन हा दिग्दर्शक. ज्यांना हॉटशॉटस, स्क्रीम असे स्पूफ सिनेमे आवडले असतील त्यांनी जरूर बघाच. जास्त काही सांगण्याची जरूरच नाही.स्मित

आणि या १७ पोटुश्या पोरी
१७ गर्ल्स (17 Filles) - २००८ मधे एका अमेरिकन हायस्कूलमधे घडलेल्या 'प्रेग्नंसी पॅक्ट' या घटनेवरून प्रेरणा घेऊन बनवलेला हा फ्रेंच चित्रपट. म्युरिएल आणि डेल्फिन कोलिन या बहिणींचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट. यातल्या म्युरिएल कोलिनने किस्लॉव्हस्कीच्या 'थ्री कलर्स' आणि इतर अनेक फिल्म्ससाठी कॅमेरा डिपार्टमेंटमधे काम केले आहे. फ्रान्समधल्या समुद्रकिनार्‍याला लागून असलेल्या एका छोट्याश्या गावी ही कथा घडते. एका हायस्कूलमधल्या १६ वर्षाच्या काही मैत्रिणी एकत्र गरोदर रहायचं ठरवतात आणि एकत्र राहून मुलांना वाढवायचं ठरवतात त्याची ही गोष्ट. कॅमेरा वर्क अप्रतिम. फिल्म बाकी ठिकठाक असली तरी सगळ्या टिनेजर मुली आयुष्यात पहिल्यांदाच कॅमेर्‍यासमोर आल्या आहेत हे बघता त्यांच्या अभिनयाला आणि दोन्ही दिग्दर्शक ताईंना टोप्या उडवून सलाम!!

आता उरलंसुरलं...
काही फिल्म्स बाकी आवडल्या नाहीत फारश्या पण त्यातली दिग्दर्शकीय प्रयोगशीलता आणि प्रामाणिकपणा फार महत्वाचा वाटला. यात एक इराणी फिल्म 'मोर्निंग' आणि रोमेनियन फिल्म 'बेस्ट इंटेशन्स' यांचा खास उल्लेख करायला हवा.

ही अजून एक पुरचुंडी पाह्यलेल्या आणि राह्यलेल्या पश्चात्तापाची..
पाह्यलेल्या पश्चात्तापाचो पतेरो
१ - सगळ्यात मोठा पश्चात्ताप 'मेलनकोलिया' - झेक रिपब्लिकची निर्मिती असलेला टिपिकल साय-फाय धर्तीचा हॉलिवूडी विंग्रजी चित्रपट. फिल्मच्या सुरूवातीची १० मिनिटे टायटल्स, काही अ‍ॅनिमेशन असा एक टॅब्लो आहे. तो अप्रतिम आहे पण त्यानंतर फिल्म बघायची काहीही गरज नाही. व्हिज्युअली उत्कृष्ट असली तरी कमालीची कंटाळवाणी आहे. आणि सगळ्याला 'काय उगाच?' हा प्रश्न आहेच. मेलनकोलिया नावाचा एक ग्रह पृथ्वीवर आदळून सगळं जग नष्ट करून टाकणार असतो त्यामुळे अतिप्रचंड श्रीमंत लोक वेड्यावेड्यासारखे विचित्र वागू लागतात त्याची गोष्ट आहे. या चित्रपटाचे आयएमडिबी रेटिंग बरेच आहे. त्यामुले २ तास रांगेत तंबू ठोकून हा चित्रपट बघितला आणि स्वतःचे डोके फोडून घ्यावेसे वाटले.
२ - ब्रेकफास्ट लंच डिनर - साउथ इस्ट एशियामधल्या तीन देशातील तीन दिग्दर्शक बायांनी केलेला हा चित्रपट. वेगवेगळ्या तीन जेवणाच्या तीन वेगळ्या गोष्टी. पण मूळ विषय प्रेम हा आहे. असे क्याटलॉगबुकात लिवलेले. कमालीची संथ हाताळणी. हॉटेलमधे १ मुलगी बसून बॉयफ्रेंडची वाट बघते. त्याला १५ मिनिटे उशीर होतो तर आपणही 'रियल टाइम' मधे १५ मिनिटे घालवतो असला खेळ. आणि त्याने काही होत नाही, कथा पुढे सरकत नाही. प्रेम कंटाळवाणे असते यापलिकडे काही अनुभव मिळत नाही.. दुसरी कथेचा कंटाळा इतका कंटाळवाणा झाला की कंटाळून आम्ही बाहेर पडलो.
३ - अरेंज्ड हॅपिनेस - काश्मिरमधल्या एका अ‍ॅरेंज मॅरेज कम प्रेमाची ही कथा आहे असं सिनॉप्सिस सांगतो. क्याटलॉगबुकात वाचून सिनेमा बघावासा वाटतो. वैधानिक इशारा की हा चित्रपट फिक्शन फिचर नसून माहितीपट आहे. एक स्वीडनची मुलगी, साउथमधल्या एका काश्मिर एम्पोरियममधे गालिचे बिलिचे विकणार्‍या एका तरूणाच्या प्रेमात पडली आणि त्याच्या काश्मिरमधल्या घरी त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी गेली. बहिणीचे लग्न अ‍ॅरेंज्ड मॅरेज होते. तिथे गेल्यावर गोरी मेमचे आणि त्या तरूणाचे अफेअर अजूनतरी जाहिर केलेले नाही. ही पार्श्वभूमी. या गोर्‍या स्विडीश मुलीने लग्नाच्या सगळ्या विधींचे केलेले चित्रण ही आख्खी फिल्म. महान कंटाळा
४ - लव्ह यू टिल डेथ - एल वाय टि डी - रफिल एलियास या अ‍ॅडफिल्ममेकरने ही हिंदी फिल्म केलीये. सिनेमा चालू व्हायच्या आधी स्वतःच्याच चित्रपटाबद्दल नको इतके ग्रेट बोलून घेतले या सगळ्या टिमने. आणि चित्रपट रद्दी, सी ग्रेड, चीप, सॉफ्ट पोर्नो स्वरूपाची...

बघायचे राहून गेलेले बरेच पश्चात्ताप आहेत. कॅटलॉग वाचत गेले तर जेवढे बघितलेत त्याच्या दुप्पट राह्यलेले पश्चात्ताप होतील. पण हे काही अगदीच महत्वाचे...
१. पिना - पिना बॉश या नृत्यकर्मीवर असलेली ही डॉक्यु. डॉक्यु थ्रीडी आहे. आणि ज्यांना बघायला मिळाली ते बहुतेक सगळेच स्तुती करताना थकत नाहीयेत. माझं नशिब कधी उघडेल कुणास ठाऊक..
२. फाउस्ट - गोथ च्या फाउस्ट या ट्रॅजेडीचे अ‍ॅडप्टेशन. महोत्सवात डोक्याचे सॅच्युरेशन झाल्यावर शेवटी बघायला मिळाली. जड आहे आणि बरंच रक्त, आतडी असलं काय काय आहे. माझी कपॅसिटी संपली होती त्यामुळे १० मिनिटात उठून आले. फिल्म इंटरेस्टिंग असणार होती.

अशी आमची जत्रा संपन्न झाली. दर्शन तर घडले. देव पावण्याची वाट बघूच आता.
(समाप्त)

- नीरजा पटवर्धन

Search This Blog