Thursday, September 24, 2009

माझा श्वास्’ – २

लग्नानंतर आम्ही गेलो मालवणला. मालवणच्या आसपासचा परिसर फिरत होतो. धामापुरच देऊळ ओलांडून तिथून मग नेरूरपार कडे येऊन काळश्याला खाली उतरून वनलक्ष्मीच्या बोटीतून कर्ली नदीमधे फिरून आलो. फार मस्त होता तो भाग. मला आपलं नवीन लग्न झालेल्या मुलिला जसं वाटावं तसं छान छान वाटत होतं तिथे फिरताना आणि दिग्दर्शकाच्या डोक्यात वेगळीच चक्र चालू होती. सगळ्या परिसराची बैजवार माहिती घेऊन ठेवली. काळश्याचे केशव सावंत, वनलक्ष्मीची बोट चालवणारे कोरगावकर, त्या परीसरातली हिरवाई, उन्हाच्या दिशा इत्यादी इत्यादी. एकाच ठिकाणी २-३ वेळा जाऊन आलो आम्ही ६ दिवसांत आणि ही एवढी माहिती... परत ओळख झालेल्या रिक्षेवाल्याबरोबर त्याचे गाव, खोताचे जुवे, सुरुचे बन इत्यादी बघून येणे, तिथल्या परिसराचे फोटो काढणे, माणसांशी ओळखी करून घेणे.. इत्यादी इत्यादी इत्यादी. दिग्दर्शकाच्या उत्साहाची लागण मलाही झाली. त्या भरात तपशीलवार माहिती लिहून घेणे, हे गाव त्या’ मुलाचं म्हणून योग्य वाटेल की नाही इत्यादी चर्चा दिग्दर्शकाबरोबर करणे हे सर्व मीही केलं. पण मग अचानक मला आठवल आपण हनीमून ला आलोय आणि location hunting करतोय लग्नानंतरचे पहिले कडाक्याचे भांडण यावरून झाले. ते अजूनही अधून मधून वर येते पण आता location hunting नसलेला second HM दिग्दर्शकाने मला प्रॉमिस केलाय आणि मी वाट बघतेय!!

मुंबईत परत आलो आणि संदीपच्या पायाला परत भिंगरी लागली. डॉ. पुणतांबेकर व कॅन्सरशी संबंधित इतर व्यक्ती नी संस्थांना भेटणे. स्वतःच्या notes काढणे. पटकथेची बांधणी करणे. हे सगळं सुरू झालं. मुंबईत तो लिखाण करत होता तेव्हा रोज सकाळी आम्ही डबा घेऊन निघायचो आणि वडाळ्याला मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात जाऊन बसायचो. रात्री ८ वाजता ग्रंथालय बंद व्हायचे. मग तेव्हा तिथून निघायचे आणि शिवाजी पार्क किंवा अजून कुठेतरी जाऊन कथेवर चर्चा किंवा कधी कॅमेर्‍याच्या movement बद्दल किंवा कधी general filmmaking मधला एखादा कुठला तरी मुद्दा घेऊन चर्चा करत असू. अजून माझा सहभाग चर्चेपुरताच जरी मर्यादीत असला तरी जे काही त्याच्या डोक्यात आकार घेतंय त्याच्या treatment ची थोडी कल्पना यायला लागली होती.

संशोधन हा कुठल्याही पटकथेचा महत्वाचा भाग असतो. इथे कथेची पार्श्वभूमी वैद्यकीय असल्याने त्या जगाबद्दल आतून समजून घेणे गरजेचे होते. फक्त कथेच्या अनुषंगाने येणारीच माणसे नाहीत तर त्या त्या जगातली सगळीच माणसे, त्यांचे आपसातले व्यवहार, त्यांची मानसिकता इत्यादी गोष्टी महत्वाच्या ठरतात. कथेतील महत्वाच्या आणि कमी महत्वाच्याही व्यक्तिरेखा ह्या त्यांच्या बारीक बारीक कंगोर्‍यांसकट खर्‍या वाटल्या पहिजेत. त्यांची प्रत्येक कृती तर्काला धरून असायला हवी. खरोखरिच माणूस वागेल तसे ते वागायला हवेत लेखकाने लिहिलय म्हणून नव्हे. प्रत्येक घटना ही आधीच्या घटनेनंतर सहजतेने येणारी वाटायला हवी. ह्यासाठी व्यक्तिरेखांचा तपशीलात अभ्यास करायची गरज होती. त्यासाठी संदीप डॉक्टर पुणतांबेकरांच्या बरोबर अक्षरश दिवसरात्र फिरत होता. स्वत डॉक्टर, त्यांचे असिस्टंटस, त्यांना भेटायला येणारे कॅन्सरच्या वेगवेगळ्या अवस्थेतले रूग्ण, सपोर्ट ग्रुप्स चालवणारे काउन्सेलर्स इत्यादी सगळ्यांना बघणे, भेटणे, सपोर्ट ग्रुप्स च्या मिटींग्ज अटेण्ड करणे, सिप्ला सेंटरमधील रूग्ण (सिप्ला सेंटर हे कॅन्सरच्या शेवटच्या स्थितील रूग्णांची काळजी घेणारे केंद्र आहे), त्यांचे नातेवाईक, तिथले डॉक्टर्स, सोशल वर्कर्स यांना भेटणे, बघणे अश्या अनेक पद्धतींनी संशोधन चालू होते.

पटकथेचा कच्चा आराखडा तयार होत आला आणि आता तपशील भरण्यासाठी, दृश्य अधिक जिवंत व्हावे यासाठी चित्रीकरणाच्या जागा निश्चित करणे गरजेचे होते. प्रत्येकाची लिहायची विशिष्ठ पद्धत असते. संदीप पटकथा लिहीत असताना मुंबईत एका जागी बसून लिहू शकत नाही. संशोधनामधे सगळ्या गोष्टींची माहिती करून घेण्याबरोबरच, घटना घडण्याचे अवकाश(स्पेसेस) शोधत जाणे, त्यातून त्या त्या अवकाशाचे आणि पर्यायाने घटनेचे कॅरेक्टर निश्चित करत जाणे हि प्रक्रिया संदीपसाठी गरजेची असते. हॉस्पिटल म्हटले की कुठलेही हॉस्पिटल किंवा नुसते पांढरे पडदे लावून चालत नाही. प्रत्येक घटना कुठे घडते यावर ती कशी कशी घडते हे अवलंबून असते. हे सगळे काम साधारण सप्टेंबर ऑक्टोबर २००२ च्या दरम्यान सुरु झाले. आणि त्या त्या ठिकाणाची तपशीलवार माहिती जमवणेही. यावेळेला मग संदीपबरोबर मीही वेगवेगळ्या हॉस्पिटल्सच्या फेर्‍या मारू लागले. लोकेशनची तपशीलवार माहिती म्हणजे प्रत्येक भागाचा बारीक बारीक गोष्टींसकट नकाशा किंवा चित्र काढणे. आत असेल तर दारे, खिडक्या, वस्तू आणि बाहेरची जागा असेल तर झाडे, कुंड्या, रस्ता सर्व काही. नैसर्गिक (खिडकीतून वा परावर्तित होऊन येणारा सूर्यप्रकाश) व कृत्रिम(वेगवेगळ्या प्रकारचे दिवे) अश्या प्रकाशाच्या sources ची माहिती लिहून ठेवणे. दिशांसकट हे सगळं टिपून ठेवायचं. बरोबर संदर्भासाठी फोटो जोडायचे. असा सगळा कार्यक्रम असायचा. दिवसातल्या आणि वर्षातल्या कुठल्या वेळेला ती ती जागा कशी कशी दिसेल याचा अंदाज येण्यास यातून मदत होते कारण अर्थातच सप्टेंबर मधे असलेली परिस्थिती फेब्रुवारि मधे रहाणार नव्हती. अर्थात ऋतुबदलाने बदळणारी परिस्थिती हे outdoor locations च्या बाबतीत जास्त महत्वाचे ठरते.

चित्रपटाच्या आर्थिक आधारासाठीही धडपडणे चालू होते. सुरूवातीला मिळालेला आधार हा संपूर्ण नसणार हे माहित होते त्यामुळे बाकीचा बराच मोठा भाग उभा करण्यासाठी यत्न चालू होते. अनेकांशी अरूण आणि संदीप बोलत होते. काहीजण पुढे येत होते आणि एकदोन मिटींग्ज नंतर गळत होते. अरूणच्या ओळखीतल्या एका हितचिंतकाने interest दाखवला. अनेक मिटींग्ज संदीपने केल्या त्यांच्याबरोबर आणि त्यांना ह्या project चे महत्व पटले, संदीपची passion लक्षात आली आणि त्यांनी उरलेली सगळीच आर्थिक अडचण दूर केली. ही घटना ३-४ ओळीत सांगितली असली तरी हे सगळे साधारण २००२ च्या जूनपासून डिसेंबरपर्यंत चालू होते.

असा सगळा माहौल हळूहळू तयार होत होता. याच्याबरोबर पात्रयोजनेतला सगळ्यात crucial भाग म्हणजे लहान मुलगा, त्याचा शोध चालू होता. तो मिळत नव्हता. त्यावेळेला आजूबाजूला दिसत असलेल्या बालकलाकारांच्यात कोणीच योग्य वाटत नव्हता.

-नी

2 comments:

क्रांति said...

मस्त लिहिला आहेस हा लेखही. एखादा चित्रपट नुसता करमणूक म्हणून पहातो आम्ही, त्याच्यामागे केवढी धडपड, कसरत, तपश्चर्याच असते, हे तुझे लेख वाचून जाणवतंय. "श्वास" पुन्हा अगदी जवळून पहात असल्याचा अनुभव येतोय!

HAREKRISHNAJI said...

My feelings are same as Kranti.

Search This Blog