RSS
Write some words about you and your blog here

आज हिंदुस्तानका हर नौजवान अ‍ॅक्टर बनना चाहता है!

हल्ली कधी कधी असे इमेल्स येतात की त्या वाचून मला जाम महत्वाची व्यक्ती झाल्यासारखं वाटतं. आणि नंतर त्यावर मी देणार असेन ते उत्तर आठवून मग मी महत्वाच्या जागी बसलेली सर्वात खडूस व्यक्ती आहे असंही वाटायला लागतं.

शीर्षक आणि सुरूवातीच्या दोन ओळी तुम्हाला गोंधळवायला आणि लेखाची सुरूवात म्हणून बर्या आहेत. तेव्हा आता डायरेक्ट मुद्द्यालाच हात...

गेले १० वर्षं माझा नेट संचार मुक्तपणे चालू आहे. मायबोलीसकट इतरही अनेक पोर्टल्स आणि आता स्वतःचा ब्लॉगही अश्या सर्व ठिकाणी माझा वावर असतो. या गेल्या १० वर्षात माझ्या आयुष्यात शिक्षण, करीअर इत्यादी संदर्भात अनेक उलथापालथी घडल्या. आणि गेल्या वर्षांपासून मला हा उपरीनिर्दिष्ट (म्हणजे वरती लिहिलेला..) प्रकार अनुभवास येऊ लागलाय.

त्याचं झालं असं. एका संकेतस्थळावर थोडीशी ओळख झालेला एक इसम मला मेल करून कामासंबंधात काही बोलायचं आहे असं तस्मात भेटूया असं म्हणू लागला. भर दुपारी अति गर्दीच्या लॉ कॉलेज रोडवर भरपूर गजबजलेल्या एका हाटीलात कॉफी प्यायचं ठरलं. भेटल्यावर बोलणं झालं त्याचा गोषवारा असा की सदरहू इसम हा वर्ष तांत्रिक क्षेत्रात नोकरी करून नुकतेच अमेरीकेतून परतला आहे. तो कालिजात असताना त्याने कधीतरी एकांकिकेत काम केलं होतं. त्यामुळे आपण उत्तम अभिनेता असल्याची त्याची खात्री आहे. या बळावर त्याने अभिनयक्षेत्रात पाय रोवायचं ठरवून अनेक नटोत्तमांना धक्का देण्याचे योजिले आहे. हे कार्य सिद्धिस जाण्यासाठी त्याला माझ्या मदतीची म्हणजे माझ्या ओळखींचा धागा पकडून संधी प्राप्त करून घेण्याची गरज आहे. माझ्या खिशात काही त्यावेळेला त्याला अपेक्षित असलेली संधी नव्हती. आणि त्याच्या अभिनयकर्तुत्वाबद्दल, गुणवत्तेबद्दल त्याने केलेली स्वस्तुती यापलिकडे काही माहीतीही नव्हती. मी पडले स्पष्टवक्ती. प्रांजळपणे ते सांगितलं. आणि वर हेही सांगितलं की मला लक्षात यावं आणि तुझं वर्कशॉप व्हावं या दृष्टीने तू माझ्या प्रायोगिक नाटकाच्या वर्कशॉपमधे सामील हो. बरं वाटलं तर काम कर. पुढचं पुढे. भवती भवती करत तो सामील झाला. पण इथे नुसतंच शिकायला लागतंय, अभिनयाची लुसलुशीत संधी मिळत नाहीये हे त्याच्या लक्षात आलं आणि मग त्याने मलाच अनेक विशेषणे देऊन येणे बंद केले. पण त्याची नाराजी मात्र सार्वजनिक संकेतस्थळावर ते दर्शवत राह्यला.

याच आसपास दुसर्या एका ताईंची पण श्येम टू श्येम केस झाली. एकेकाळी कालिजात किंवा तत्सम कुठेतरी केलेला अभिनय मग सॉफ्टवेअरमधली नोकरी मग अचानक आपल्या क्रिएटिव्ह बाजूचा साक्षात्कार आणि मग मला संधी द्या अशी मेल. कामांमुळे मला लगेच उत्तर द्यायला जमले नाही तर ज्या संकेतस्थळावरून माझ्याशी संपर्क साधला तिथेच चव्हाट्यावर 'काय हे अजून उत्तर पण दिले नाही?' असा जाब मागणे. मग कधीतरी नंतर मी त्यांना भेटायला बोलावणे. ताईंकडून काही वाचून घेणे. वाचल्यावर खूप वर्षं झालीयेत आणि गंज काढायला हवा याची मला खात्री पटणे. ते मी प्रांजळपणे सांगणे आणि गंज काढायला मदत करायची तयारी दाखवणे. मग ताईंचे गायब होणे. आणि संकेतस्थळांवर अधून मधून माझ्यावर राग काढणे इत्यादी ओघाने आलंच...

अश्या तर्हेने माझा महत्वाच्या जागी बसलेला व्हिलन होऊन गेला.

अजूनही विविध पद्धतीने अभिनयाचे काम मागणार्यांच्या मेल्स थडकत असतात. आणि दर वेळेला या लोकांचं कौतुक आणि आश्चर्य वाटत आलेलं आहे. अभिनयाचं प्रशिक्षण घेतलंय, कधी काळी थोडसं काम केलंय असं हे लोक म्हणतात. हे प्रशिक्षण वा अनुभव महिन्या दोन महिन्याचं नाट्यशिबीर किंवा एखाद्या व्यक्तीच्या हाताखाली एखादं नाटक इतपतच असतो. अशी कोणे एके काळी घातलेली अभिनयाची पाटी अचानक उठून अभिनयक्षेत्रात व्यावसायिक पातळीवर उतरण्यासाठी कशी काय पुरेशी वाटू शकते हा प्रश्न मला दर वेळेला पडतो. बर कुठलीतरी जेमतेम तोंडओळख पकडून असा इमेल करायचा आणि एवढ्याश्या ओळखीवर/ माहीतीवर मी अभिनयाचं काम द्यावं अशी अपेक्षा बाळगायची हेही अचाट आणि अतर्क्यच. नाही का?

या लोकांचा संकेतस्थळांवरचा आयडी मला माहीत असतो. त्यापलिकडे फारशी काही माहीती नसते. त्या व्यक्तीचा अभिनय कधी बघितलेला नसतो. त्या व्यक्तीचा चेहरा मला माहीत नसतो. हो इथे चेहराही महत्वाचा असतो. ठराविक प्रकारच्या व्यक्तिरेखेला ठराविक प्रकारचाच चेहरा उपयोगाचा ठरतो. तो मला माहीत नसतो. मग मी संधी द्यायची, शब्द टाकायचा तो तरी कुठल्या बळावर? आणि का?

बर कदाचित ह्यातले काही अजून प्रकाशात आलेले नटोत्तम असू शकतात पण ते मला कळण्यासाठी या सगळ्यांना मी भेटले पाहीजे आणि त्यांची अभिनयाची परिक्षा घेतली पाहीजे आणि मग संधीच्या दिशेने त्यांना वळवले पाहिजे. पण मी हे करत बसले तर माझं काम कधी करू? ही समाजसेवा करून पोट नाही भरत माझं. आणि काही उत्तम असू शकतात पण अनेक दगड निघणारच हे तर आहेच मग त्यांना नकार दिल्यावर त्यांना जो राग बिग येतो त्याचं काय? आणि तसंही संधी बिंधी देणारी मी कोण?मी अभिनयाचे क्लासेस काढलेले नाहीत. मी मॉडेल कॉऑर्डिनेटर नाही. मी कुठेही कास्टींग डिरेक्टर नाही. तेव्हा या विषयात म्हणजे अभिनयाची संधी या विषयात माझा उपयोग नाही.

प्रत्येक प्रकारचं काम मिळवण्याचा एक योग्य तो मार्ग असतो. अभिनयाच्या बाबतीत तो मार्ग आधी योग्य प्रशिक्षण आणि मग मॉडेल कॉऑर्डिनेटर्सच्या अल्बममधून जातो.

प्रशिक्षण हे कुठल्या ना कुठल्या पातळीवर गरजेचेच असते. मग ते राष्ट्रीय नाट्य विद्यालय, पुणे विद्यापीठाचे ललित कला केंद्र, मुंबई विद्यापीठाची अकादमी ऑफ थिएटर आर्टस, गोवा कला अकादमी असं काही असू शकतं किंवा याच संस्थांशी संलग्न अशी शिबीरे असू शकतात किंवा रोशन तनेजा, अनुपम खेर अश्यांच्या अभिनय शिकवणार्या संस्था असू शकतात किंवा दुबेजी नावाची एक संस्थेवत व्यक्ती असू शकते किंवा मग एकांकिका स्पर्धा, प्रायोगिक नाटक करत करत शिकत जाणे असू शकते. काही असले तरी शिकण्याला पर्याय नाहीच. हे शिकणं नुसतं शिकवलं ते गिरवलं स्वरूपाचं असून चालत नाही. आधी भरपूर गिरवणं, अगदी कंटाळा येईतो गिरवणं आणि मग आपल्या बुद्धीने गिरवण्यात भर घालत जाणं हे महत्वाचं असतं. वर यादी केलेल्या प्रत्येक संस्थांमधे चांगलंच प्रशिक्षण दिलं जातं. पण तरी प्रत्येक संस्थांमधून आलेल्या विद्यार्थ्यांच्यात उत्तम नट असतात तसेच दगडही असतातच की. जे काहीच घेत नाहीत, त्यांच्या आत काहीच पोचत नाही, झिरपत नाही. अर्थात असं असलं तरी प्रशिक्षण आणि प्रशिक्षणादरम्यान मेहनत हे गरजेचंच.

यानंतर मुद्दा येतो फोटोंचा. चेहरा बघूनच तुम्हाला स्क्रीनटेस्टला बोलवायचं का नाही हा विचार केला जातो. यात अपमानास्पद वाटून घेण्याचं काहीच कारण नाही. तुम्ही दृकश्राव्य माध्यमात काम करू बघत असता तेव्हा तुमचं दिसणंही महत्वाचं असतंच. चांगलं वाईट, सुंदर कुरूप यापेक्षा तुमचा चेहरा आणि तुमची शरीरयष्टी व्यक्तिरेखेला अनुरूप असणं नसणं हे महत्वाचं असतं. चेहरा आणि शरीर हेच नटाचं साधन किंवा माध्यम असल्यामुळे ते नीट राखणं, व्यसनांनी, चुकीच्या सवयींनी शरीराची वाट लावून घेणं हे नटासाठी महत्वाचं असतं. आणि मग त्या राखलेल्या चेहर्याचे फोटो काढून घेणं हे पण महत्वाचंच.

अनेक नवीन नटमंडळी वेगवेगळ्या गेटप्समधे, वेगवेगळ्या स्टाइल्समधे फोटो काढून घेत असतात. पण तुम्ही नवीन आहात, तुमचा चेहरा फारसा माहीत नाहीये आणि तुम्ही अमुक लुक तमुक लुक करत उत्तम फोटोग्राफरकडून भरपूर फोटो काढून घेतलेत तर ते फोटो म्हणून उत्तम होतीलच यात काही वाद नाही. पण ते तुमचा चेहरा, तुमचं व्यक्तिमत्व यांची ओळख करून द्यायला उणे पडायला नको हे महत्वाचे.

आता हे फोटो काढून घरी ठेवून द्यायचे नाहीत. चित्रपट, टिव्ही आणि जाहीराती इथल्या संधी शोधण्यासाठी मॉडेल कॉऑर्डिनेटरकडे जाऊन ते फोटो आणि रेझ्युमे देऊन स्वतःचे नाव नोंदवून यायचे. ते फोटो त्यांच्या अल्बममधे लागतात. विविध ठिकाणी कास्टिंग ( धातूचे नव्हे... पात्रनियोजन)च्या वेळेला हे अल्बम्स बघून त्यातून निवडून स्क्रीनटेस्टला बोलावलं जातं.

नाटकामधे रस असेल तर वेगवेगळ्या नाटकाच्या ग्रुप्समधे काम करत रहायचं. हौशी, समांतर आणि व्यावसायिक अश्या पातळ्या यात येतात. पहिल्या दोन पातळ्यांवर काम करत असताना तुमच्यातल्या मेहनत करायच्या क्षमतेचा कस लागतो. अभिनयाची संधी मिळाली तर अभिनयाचाही कस लागतो. व्यावसायिकमधे सततच्या फिरतीवर राहूनही आरोग्य सांभाळणे आणि सगळ्या परिस्थितींमधेही उत्तम परफॉर्मन्स देणे याची सवय होऊन जाते.

दुबेजींच्या वर्कशॉपच्या आधी दुबेजी काही उतारे साधे सरळ पाठ करून यायला सांगतात. त्यातल्या एका उतार्यात असतं 'आज हिंदुस्थानका हर नौजवान ॅक्टर बनना चाहता है. --------- ॅक्टर बननेके लिये सरींडर चाहीये.. ----- ॅक्टर बननेके लिये मेहनत करनी पडती है. --- प्रतिभाका होना भी बहोत जरूरी है --- लक, लक की भी जरूरत पडती है.... ' अश्या तर्हेचा हा पानभर उतारा घोकत दुबेजींनी सांगितल्याप्रमाणे पावलं मोजत, फोकस हलू देता सगळे हलत असतात. अधून मधून दुबेजी मस्त ओरडत असतात. प्रतिभा आणि नशीबाचं त्यांच्या त्यांच्यावर सोडून देऊन सरींडरचे, मेहनतीचे वळसे देत असतात. त्यातून तावून सुलाखून बाहेर पडलेला हळूहळू या अभिनयाच्या धंद्यात स्थिरावतोच.

सरींडर आणि मेहनत विसरलेले मात्र हे असे उगाच कोणालाही इमेल करून संधी मागत रहातात. इमेल करायचा त्याला आधी उगाचच मोठेपण आणि मग व्हिलनपण देऊन...

- नी

ब्लॉग, ब्लॉगर्स, ब्लॉगिंग....

दिनांक १७ जानेवारी २०१० रोजी दुपारी  ४ वाजता पुण्यातल्या पु.ल.देशपांडे उद्यानात मराठी ब्लॉगर्सचा स्नेहमेळावा पार पडला. ही कल्पना सुचलेल्यांचे आणि सुचल्यानंतर ती सत्यात उतरवणार्‍यांचे हार्दिक अभिनंदन. आभारसुद्धा!

मेळावा छान झाला अनेक अर्थाने. अनावश्यक औपचारीकता वगळलेली होती पण तरी उगाच अघळपघळ स्वरूप नव्हते. थोडक्यात, सुटसुटीत पण तरीही खूप काही महत्वाच्या गोष्टींची सुरूवात म्हणून मानला जाईल असा छान मेळावा.


मेळाव्यामधे काही छान मुद्दे मांडले गेले आयोजकांकडून आणि माध्यमाइटस वाल्यांकडून (योगेश जोशी आणि प्रसन्न जोशी). तसंच प्रत्येक जण स्वतःची थोडक्यात ओळख करून देत असताना त्यातूनही काही चांगले मुद्दे चर्चेत आले.


ते सगळे एकत्रित स्वरूपात असे...

१. एकूण साहित्यविश्वातलं आणि आयुष्यातलं ब्लॉगिंगचं स्थान, महत्व, कारण इत्यादी.

२. ब्लॉगवरील उस्फूर्त लेखन हा साहित्याचाच भाग असल्याने साहित्य संमेलनाध्यक्ष द.भि.कुलकर्णी यांना त्यांच्या अध्यक्षीय भाषणात ब्लॉगबद्दल बोलण्यासाठी निवेदन देणे

३. मराठी ब्लॉगर्सचे एकत्रित अस्तित्व म्हणून गूगल किंवा याहूग्रुपची सुरूवात करणे

४. ब्लॉगसंबंधी तांत्रिक माहीतीची देवाणघेवाण

५. ब्लॉगद्वारे किंवा ब्लॉगिंग चळवळीद्वारे काय काय घडवता येऊ शकते, साध्य करता येऊ शकते

६. ब्लॉग किंवा ऑनलाइन लिखाणातून होणारे वाङ्मयचौर्य आणि त्याबाबतीत काय करता येऊ शकते.

७. मराठी भाषेच्या उत्कर्षाविषयी केले जाणारे प्रयत्न.


हे सगळं चर्चून झाल्यावर वैयक्तिकरित्या ब्लॉगर्सनी एकमेकांची ओळख करून घेतली आणि मग हळूहळू सगळे पांगले.


यापुढे...

माझ्यासारख्या केवळ स्वान्त सुखाय ब्लॉग लिहिणारीला किंवा खरंतर कळ आल्यावर रहावत नाही म्हणून लिहिणारीला सगळी चर्चा, उद्दिष्टे पटली असली तरी पचतीलच, झेपतीलच असं नाही. उदाहरणार्थ मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी काही प्रयत्न करणे. मी मराठीत लिहित असले तरी ते मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी नव्हे. मला मराठीतंच व्यक्त होता येतं म्हणून मी मराठीत लिहिते. माझ्या लिखाणात बरेचसे शब्द मराठी येत असले तरी प्रत्येक विंग्रजी शब्दाला मराठी प्रतिशब्द असं मी करत नाही किंवा अश्या अट्टाहासाने मराठीचा उत्कर्ष होईल असा काही माझा गैरसमज नाही. यातला फोलपणा राजीव सरांनी कधीच समजावून दिलेला आहे. मग मी मराठी भाषेला तारक काम करते की मारक.. माहीत नाही..


ऑनलाइन किंवा ब्लॉगवरच्या वाङ्मयचौर्याच्या समस्येसाठी परिणामकारक कायदे/ नियम आणि यंत्रणा अजूनतरी अस्तित्वात नाहीत.  मराठी ब्लॉगर्सचं किंवा एकुणात सर्वच ब्लॉगर्सचं एकत्रित अस्तित्व या गोष्टी अस्तित्वात आणण्यासाठी प्रयत्न करू शकेल का? कुणी वकील ब्लॉगर किंवा इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राइटस संदर्भात काम करणारं कुणी मार्गदर्शन करू शकेलच. अचाट महत्वाकांक्षी कल्पना आहे पण याबाबतीत विचार करायला काय हरकत आहे नाही का?


मेळाव्याबद्दलचे बाकीचे वृत्तांत इथे बघू शकता..



- नी

अभंग, जथा, शहर आणि मी...

सकाळची कामं उरकणं चालू होतं. अचानक मोठ्या आवाजात पखवाज आणि पेटीच्या दमदार साथीने अभंग ऐकू आले. शब्द लांबून येत होते त्यामुळे कळले नाहीत पण सूर होता सच्चा आणि खणखणीत बंदा रूपया.
एकेक सूर पांडुरंगाच्या पायाकडे नेणारा. मधेच एक दुसरा आवाज आला. योग्य जागी, योग्य वेळी आणि योग्य सूर उचलून अप्रतिम ताना आल्या. परत पहिला आवाज मूळ अभंगावर आला. आता दोन्ही आवाज पांडुरंगाला आळवत होते.
अशी स्वर्गीय भक्ती.. का नाही पांडुरंग येणार भेटीला.
मला त्या आवाजातच पांडुरंग भेटून गेल्यासारखं वाटलं.
स्वैपाकातले हात थबकले. ते अप्रतिम स्वरब्रह्म शक्य तितकं पिऊन घ्यावं म्हणून मी क्षणभर स्तब्ध झाले. ऐकत राह्यले.
आता लक्षात आलं ही रेकॉर्ड नाहीये. कुणीतरी खरंच गातंय.
मी खिडकीकडे धावले.
खाली रस्त्यावर ५-६ वारकर्‍यांचा जथा चालला होता. पेटी किंवा पखवाज गळ्यात बांधलेला, एकिकडे वाद्य वाजवणं आणि एकिकडे गाणं असं ते रस्त्यावरून चालत होते.
जथा थोडा थबकला होता आणि जथ्यातला पुढचा माणूस पैसे मागत होता.
रस्त्यावर पैसे मागायला येणार्‍या विविध लोकांबद्दलचे सगळे संदर्भ माझ्या शहरी आणि बंद डोक्यात चमकून गेले.
मला पैसे द्यायचे नव्हते असं नाही पण खाली जाणं सुरक्षित वाटलं नाही. का कोण जाणे.
रस्त्यावर जाऊन पैसे देणं हे थोडं त्या स्वरब्रह्माचा अपमान केल्यासारखंही वाटणार होतं. कारण मी देऊन देऊन ५०-१०० रूपयापेक्षा जास्त थोडीच देणार होते.
सकाळच्या कामांच्या धांदलीत अजून अंघोळ उरकायची होती आणि अंगावरचा गाऊन हा काही रस्त्यावर खाली जाण्याच्या लायकीचा नव्हता.
५-१० मिनिटात पाणी जाणार होतं त्याच्या आत स्वैपाकाचं सगळं पाण्याचं काम उरकायचं होतं.
असा काय काय विचार होतोय जेमतेम दोन मिनिटात तोच जथा पुढे सरकला. पैसे मागायला ठाण मांडून बसणारे लोक नव्हते तर हे.

नवर्‍याचं ऑफिस पलिकडच्या गल्लीत. त्याला फोन करून सांगितलं असं असं आहे. तुझ्याइथे ते आले तर पाच मिनिट गाणं ऐक आणि त्यांना पैसे दे. नवरा अजून अतरंगी. आणि त्याच्याबरोबर कामाला बसलेला आमचा सीए व्यंकटेश त्याच्याहून जास्त गाण्याचा वेडा. २-५ मिनिटात तो जथा यांच्या गल्लीत पोचला नाही तर काम टाकून बाइकवरून त्यांना शोधायला निघाले. आजूबाजूच्या बर्‍याच गल्ल्या धुंडाळल्या शेवटी महिला संघकडून हनुमान रोड कडे येणार्‍या रस्त्यावर ते त्यांना सापडले. जथा वारकर्‍यांचाच होता. रोज थोडं थोडं चालत ते पंढरपूरला निघाले होते. जिथे असू तिथे सकाळी गात गात प्रभात फेरी करायची. त्यात मिळेल त्या पैशातून दिवसभराचा गुजारा करायचा. अशी त्यांची पद्धत.. असो...

एक मात्र झालं त्यांना बघितल्यानंतर ते दिसेनासे होईपर्यंत त्यांचं गाणं ऐकलंच नाही मी.

-नी

ब्लॉग माझा

आज सकाळी एक मेल येऊन थडकली मेलबॉक्समधे.
त्यात लिहिलं होतं की माझ्या आतल्यासहीत माणूस या ब्लॉगला म्हणजे तुम्ही आत्ता वाचताय त्या माझ्या ब्लॉगला स्टार माझाच्या मराठी ब्लॉगस्पर्धेत दुसरं बक्षिस मिळालं.
मलातरी आनंद झाला बुवा आणि तुम्हाला सगळ्यांना हे सांगण्याचा मोह काही आवरला नाही. स्वतःचं कौतुक करून घ्यायला कोणाला आवडत नाही. (तुम्हालाही आवडतंच की!)तर म्हणून हे पोस्ट..

हा पूर्ण रिझल्ट.
RESULT OF BLOG MAJHA 2009 COMPETITION

FIRST THREE WINNERS:
Aniket Samudra
http://manatale.wordpress.com

Neeraja Patwardhan
http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/

Dipak Shinde
http://bhunga.blogspot.com

REMARKABLE PARTICIPATION:
Hariprasad Bhalerao
www.chhota-don.blogspot.com

Devdatta Ganar
http://maajhianudini.blogspot.com/

Medha Sakpal
www.medhasakpal.wordpress.com

Salil Chaudhary
www.netbhet.com

Pramod Dev
http://purvaanubhava.blogspot.com/

Raj Kumar Jain
http://rajkiranjain.blogspot.com

Minanath Dhaske
http://minanath.blogspot.com

Vijaysinh Holam
http://policenama.blogspot.com

deepak kulkarni
http://aschkaahitri.blogspot.com/

Anand Ghare
http://anandghan.blogspot.com

-नी

परत एकदा 'स्वच्छतेच्या बैलाला..'

गेल्या वर्षी मायबोली दिवाळी अंकात लिहिलेल्या माझ्या
स्वच्छतेच्या बैलाला.. (http://vishesh.maayboli.com/node/26) या लेखाच्या संदर्भाने मायबोलीवरच
http://www.maayboli.com/node/4327 या ठिकाणी चर्चा सुरू झाली.
काय करता येऊ शकेल, कसे करता येऊ शकेल इत्यादी बाबींवर उहापोह सुरू झाला.
आणि मग थांबला.

सुरूवातीला धडाक्याने सुरू केलेली ही चर्चा आणि बरंच काही करू असं स्वतःलाच दिलेलं वचन बाजूला पडलं तरी विसरलं मात्र नव्हतं. अनुभवांची आणि चिडचिडीची भर पडतच होती.

या विषयावर एक डॉक्यु करून ती संबंधितांवर हॅमर केली पाहीजे असं काही वाटत होतंच.

मध्यंतरी याच विषयावर एक डॉक्यु ऑलरेडी केलेली आहे असं कळलं होतं. 'Que to Pee' असे त्या डॉक्यूचे नाव आहे. कॉपी अजून मिळालेली नाही त्यामुळे पाह्यलेली नाही.

मी बनवायच्या डॉक्युच्या दृष्टीने रिसर्च मटेरियल जमा होतच आहे. माझं त्या दृष्टीने काम चालूच आहे. मला गरज आहे तुम्हा सगळ्यांच्या मदतीची. आर्थिक मदत नव्हे तर संशोधनात प्रत्यक्ष सहभाग याअर्थी.

संशोधनात जे लोक मदत करू इच्छित असतील त्यांच्यासाठी मी काही प्रश्नावल्या तयार करणारे. त्यानुसार त्यांनी आपल्या आजूबाजूला जेजे लोक योग्य वाटतील त्यांना प्रश्न विचारून त्याची उत्तरे जमा करून माझ्याकडे पाठवावीत ही विनंती.

डॉक्यु करण्याच्या दृष्टीने तांत्रिक दृष्ट्या काही गोष्टी पुढे सरकल्या आहेत. मधे दुसर्‍या एका एनजीओ साठी मी एक डॉक्यु बनवून दिली त्यामुळे संपूर्णपणे आपण काही गोष्टी करण्याचा अनुभव पदरात आलाय. ती चांगली झालीये असा त्या एनजीओ आणि इतर काही लोकांकडून निर्वाळा मिळाल्याने आत्मविश्वास वाढलाय. अजून एका डॉक्युचं काम मिळाल्याने अजून थोडा अनुभव आणि आत्मविश्वास...
कॅमेरा आणि एडिट सेटप या बाबींचं प्रकरण लवकरंच हातात येणार आहे. अ‍ॅव्हिड सेटप हाताशी असल्याने एडिट शिकणंही सोपं जाणारे. अर्थात हे आमच्या फिचर फिल्मच्या शूट नंतर पण तरीही सेटप असणं महत्वाचं.

बाकी काय काय मुद्दे आणि कसे कसे यायला हवेत याबद्दल कोणालाही काही शेअर करायचे असल्यास मला toiletdocu@gmail.com इथे संपर्क करा.

धन्यवाद,
नीरजा पटवर्धन

उत्तेजनार्थ...!

'अभिनंदन साप्ताहिक सकाळ मधल्या बक्षिसाबद्दल!' मेसेज मोबाइलवर झळकला आणि मी चकीत झाले. मला बक्षिस मिळाल्याचं मलाच माहीत नाही? मी मित्राला फोन केला त्याने सांगितले की साप्ताहिक सकाळच्या कथास्पर्धेत तुझ्या एक होती वैदेही ला बक्षिस मिळालंय. मला तोवर माहीतीच नव्हतं.
मग मित्राने वाचून दाखवलं. बक्षिस उत्तेजनार्थ आहे हे ही कळलं.

दोन वर्षांपूर्वी माझ्या 'मी आणि नवा पाऊस' ला पहिल्या पाचात स्थान मिळालं होतं. त्यावेळेला सप्टेंबरच्या मध्यात मला साप्ताहिक सकाळच्या हपिसातून फोन आला होता. फोटो आणि माहीतीसाठी तसेच बक्षिस समारंभाचं आमंत्रण करण्यासाठी. तो काही यावर्षी आला नाही तेव्हा मी आपलं मला केळं मिळालं असं समजून चालले होते. आणि अचानक आज कळलं अगदीच केळं नाही तर निदान उत्तेजनार्थ बक्षिस मिळालं.

असो तर बातमी ही की माझ्या कथेला उत्तेजनार्थ का होईना बक्षिस मिळालंय. ब्लॉगवर पिडीएफ कशी चढवायची हे शिकले की त्या कथेची ही लिंक इथे टाकेन. साप्ताहिक सकाळच्या आज प्रसिद्ध झालेल्या कथा विशेषांकात माझी कथा छापलेली नाहीये पण पुढच्या एक दोन अंकांमधे ती छापली जाणार आहे.

उत्तेजनार्थ का होईना १२००-१५०० च्या गठ्ठ्यातून आपण १० मधे आलो हे काही छोटं प्रकरण नाही अशी स्वतःचीच पाठ थोपटत मी फेसबुकमधे स्टेटस अपडेट करायला गेले. उत्तेजनार्थ बक्षिसाचं भाषांतर Consolation Prize असं लिहिलं आणि मी थबकले.

हे Consolation Prize म्हणजे सांत्वनार्थ दिलेलं बक्षिस आहे? मला अचानक बिचारं वाटलं. बक्षिस न मिळाल्याने मी रडतेय असं चित्र आलं समोर. छोटीशी, मूर्तीमंत बावळटपणा असलेली, हुजूरपागेच्या पाचवी अ मधली, दोन वेण्या त्याही रिबिनीने वर बांधलेल्या अशी नीरजा बक्षिस न मिळाल्याने रडून रडून सुकलीये आणि मग तिचं सांत्वन करायचं म्हणून गोळी चॉकलेटासारखं 'घे बाळा तुला पण बक्षिस..' असं म्हणत Consolation Prize कुणी देतंय असं वाटलं. असं रडू रडू करून मला नकोच ते Consolation Prize असं वाटलं. राग आला साप्ताहिक सकाळ वाल्यांचा. मी काय रडायला नव्हते बसले ना बक्षिस दिलं नाहीत म्हणून मग? हे दया येऊन दिलेलं बक्षिस का? असे अचाट स्वाभिमानी डायलॉग्ज मी मनातल्या मनात मारले.

पण मग परत मायमराठीतला मजकुर आठवला. तिथे माझं बक्षिस उत्तेजनार्थ होतं. 'तू बरं लिहितेस गं पण काय करणार बाकीच्यांच्या कथा तुझ्या पेक्षा खूप चांगल्या होत्या. तुझी कथा पहिल्या पाचात नाही येऊ शकली. पण म्हणून निराश व्हायची गरज नाही. तू अजून चांगलं लिहावंस. अजून चांगला प्रयत्न करावास म्हणून तुला उत्तेजनार्थ बक्षिस देतोय आम्ही' असं म्हणणारं उत्तेजनार्थ बक्षिस. तेव्हा पहिल्या पाचात आलीस म्हणजे कायमच येशील असं नाही असा गर्वाचा फुगा फोडणारं, आता लिही परत पहिल्या पाचांपेक्षा जास्त चांगलं असं आवाहन करणारं उत्तेजनार्थ बक्षिस.

दहाच मिनिटात या बक्षिसाने केवढं शिक्षण केलं माझं. आणि माझं नशीब हे की हे समजायची अक्कल परमेश्वरानी माझ्या डोक्यात घातली.

तेव्हा आता त्या दिल्या अकलेला जागून तरी का होईना लिहिणे, लिहीत रहाणे क्रमप्राप्त आहे.
तेव्हा (भोगा आता आपल्या कर्माची फळं...) वाचा मी लिहिलेलं!!

-नी

माझा 'श्वास' - ४

आधीच्या एका प्रकरणात म्हणल्याप्रमाणे पटकथेच्या प्रक्रियेचा महत्वाचा भाग म्हणजे चित्रीकरण स्थळे शोधणे. त्याप्रमाणे संदीप पुणे परीसरात आणि कोकणातही फिरत होताच. सुरूवात कुठे झाली ते वर आलंच आहे. आत्तापर्यंत त्याने बघितलेल्या जागा पटकथेला आकार देत होत्या. व्यक्तिमत्व देत होत्या. पटकथा अधिक जिवंत व्हावी यासाठी मदत करत होत्या.

आता या अनेक जागांच्यातून प्रत्यक्ष चित्रीकरणाची स्थळे नक्की करायची होती. त्यांचे तपशील जमवायचे होते. त्यांच्या कानाकोपर्‍यासकट. पटकथेचा पोत, व्यक्तिरेखांचं अस्सलपण दिसण्यात अधोरेखित करणार्‍या जागा आता नक्की करायच्या होत्या.

आतापर्यंत पटकथेतील किंवा दिग्दर्शकाच्या डोक्यात असलेली चित्रपटाची दृश्य संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठीची प्रक्रिया आता सुरू होत होती. चित्रपटाची दृश्य संकल्पना म्हणजे संपूर्ण चित्रपट कसा दिसणार आहे, चित्राचे रंग, पोत, त्यातल्या रेषा कश्या कश्या असणार आहेत, त्यात कश्या कश्या तर्‍हेने काय स्वरूपाचे दृश्यबदल होणार आहेत याचा एक आराखडा. यातील बदल हा केवळ स्थळबदलापुरताच अपेक्षित नाही. सगळ्या दिसण्यातून येणारा, निर्माण होणारा अनुभव महत्वाचा आहे. त्यामुळे नदीचा तीर म्हणला की नदीच्या पाण्याचा रंग (सूर्योदय आणि सूर्यास्तावेळी), नदीचं वळण, तीरावरची झाडी, त्यांची हिरवाई, गवताचे रंग, मातीचा किंवा वाळूचा पोत हे सगळं सगळं बारकाईने समजून घेऊन आपल्या आत उतरवावं लागतं. इथे visual designer चं काम सुरू होतं. दिग्दर्शकाच्या डोक्यात या सगळ्या गोष्टींचा उत्तम अंदाज होता. आणि याबाबतीतला उरला हातभार द्यायला छायालेखक संजय मेमाणे होता आणि मीही होतेच.

दिग्दर्शकाची पटकथेची, व्यक्तिरेखांची व दृश्याची हाताळणी हे सगळं समजावून घेतल्याशिवाय दिग्दर्शकाच्या कल्पनेतलं दृश्य आमच्या कल्पनेशी मेळ खाणार नव्हतं त्यामुळे कोकण फिरताना दिग्दर्शकीय संकल्पना आपल्या आत उतरवणे हे महत्वाचंच. अर्थात माझ्या सुदैवाने बरेच आधिपासुन मी हे करतच होते. दिग्दर्शकाला सगळाच धुंडाळत होते तेव्हा हाताला लागलेल्या बर्‍याच गोष्टींबरोबर हे सगळे होतेच.

पहिली लोकेशन बघण्याची ट्रिप कधी झाली ते मी आधी सांगितलंच आहे. नंतर मात्र आम्ही खरोखरच लोकेशन शोधण्यासाठी, अभ्यासासाठीच कोकणात, सिंधुदुर्गात फिरलो.

प्रत्येक जागेचे तपशील गोळा करण्याची पद्धत तशीच. जाउ त्या प्रत्येक ठिकाणी होकायंत्र ठेवून सगळ्या दिशा, सुर्यप्रकाशाच्या दिशा, झाडे, डोंगरकडे, समुद्राचा किनारा इत्यादी इत्यादी लिहून किंवा चित्र काढून ठेवायचं. फेब्रुवारी मार्चच्या सुमारास शूट होणार त्यामुळे त्यावेळेला तीच जागा कशी असेल याचा अंदाज घ्यायचा. अश्या सगळ्या अगदी मूलभूत गोष्टी करतच होतो पण त्याआधी मुळात कोकणातली दृश्ये म्हणजे फोनच्या दृश्यातले कटस आणि शेवट सोडला तर सगळा आठवणीतला मामला आहे. तेव्हा आजोबा आणि परश्याच्या भावविश्वाशी निगडीत सगळ्या जागा हव्यात. आणि दृश्य त्या त्या वेळेच्या मनस्थितीत परश्या किंवा आजोबांना जे आठवू शकेल त्याच्याशी संबंधित हवे. कथेला, कथेतल्या परिस्थितीला, अनुभवाला अधोरेखित करणारे हवे. हा सगळा तोल सांभाळत सगळा भाग अभ्यासायला लागलो. एका ६ वर्षाच्या मुलासाठी कोकणातल्या छोट्या गावातलं खाउन पिउन सुखी आयुष्य कसं कसं असेल, त्याच्या जगात कोण कोण आणि काय काय असेल ह्याचा अंदाज घेणं हेही सुरू केलं. ही प्रक्रीया दोन बाजूंनी होत होती. संदीपने परश्याबद्दल त्याच्या कुटुंबाबद्दल मोजके संदर्भ दिले होते. त्या संदर्भाशी मिळणार्‍या व्यक्तिरेखा दिसतायत का शोधणं आणि संदीपने दिलेल्या संदर्भातून ती व्यक्तिरेखा आपल्या डोक्यात उभी करत जाणं. दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून होत्याही आणि नाहीही पण कोकणातली स्थळं(चित्रीकरणासाठीच!) शोधतानाच व्यक्तिरेखांचा अभ्यास चांगला होत होता.

परश्याच्या घरात आधुनिक वस्तुंची समृद्धी आणि चकचकाट नसणार होता पण अठरा विश्वे दारीद्र्यही नसणार होतं. अचानक चार माणसं आली तर आमटीभाताला घर महाग असणार नव्हतं. उन्हातून ताबडत आलेल्या अनोळखी पाहुण्याला पटकन झाडावरून उतरवून गार शहाळं देण्याची वृत्ती आणि सुबत्ता दोन्हीही परश्याच्या घरात असणार होती. अनोळखी पाहुण्याला आपलसं करेल असं प्रसन्न अंगण आणि उघडं दार असणार होतं. आणि अश्या घरात रहाणारे लोक हे परश्या, आजोबा, परश्याचे आईवडील असणार होते.

मुंबई गोवा महामार्गावर कुडाळच्या आधी काही किलोमीटर ओरोस म्हणून एक गाव लागतं तिथे राजधानी नावाचं हॉटेल आहे. राजधानीचे आनंद डिचोलकर हे संपुर्ण सिंधुदुर्ग फिरलेले आहेत. निवतीचा किल्ला, भोगव्याचा समुद्रकिनारा या काही गोष्टी त्यांच्याच पोतडीतून आम्हाला कळलेल्या.

सकाळी ८ पर्यंत ओरोसचं राजधानी सोडायचं आणि कुडाळ, मालवण व वेंगुर्ले या पट्ट्यातला एकेक भाग बघत बघत जायचा आणि रात्री ९ - १० पर्यंत कधीतरी परत यायचं असा या ट्रिप्सचा दिनक्रम असायचा. आधीच्या पाटीपासून पुढच्या पाटीपर्यंतचे किलोमीटर, कुठला फाटा कुठून कुठे किती अंतरावर आहे इत्यादी सगळं लिहून ठेवत परश्याचं घर शोधत जायचं. परश्याचं शेत, परश्या मुंबईहून परत येईल तो नदीकाठ सगळं सगळं शोधत फिरायचं. आपल्या संकल्पनेच्या जवळचं काही दिसलं की गाडीतून उतरायचं आणि कुण्या अनोळख्याच्या अंगणात जाऊन त्यांच्याच घराची पहाणी करायची. कुणी विचारलं तर सगळा पाढा वाचायचा.... का, कशासाठी इत्यादी इत्यादी. मग कुणी अगत्याने गुळपाणी देत नाहीतर कंटाळल्या चेहर्‍याने माना डोलावूनच हो नाही म्हणत. एखाद्याचं घर लांबून छान वाटे पण अंगणात गेल्यावर संदीपचा चेहरा नकार देताना दिसे. असं करत करत सगळा परीसर पिंजून काढत होतो.

असं करता करता सिंधुदुर्गातला एकेक खजिना समोर येत होता. कोकण समजत होतं. तिथला माणूस, त्याच्या जिव्हाळ्याच्या जागा त्याही समजत होत्या.

फिरता फिरता एक दिवस गाडीने पाट(हे गावाचे नाव आहे!) सोडले आणि थोड्यावेळाने परुळ्यामधे प्रवेश केला. आज पाट परुळे हाच पट्टा होता. उजव्या बाजुला डोंगर असल्याने तिकडे काही घरं सापडणार नव्हतीच. डाव्या बाजुला दरी होती त्यामुळे इथे काय असणार अश्या विचारात होतो तेवढ्यात डावीकडे रस्त्यापासुन थोडं खोल काहीतरी सुंदर दिसलं. खरंच दिसलं की भास म्हणून ड्रायव्हर ला गाडी मागे घ्यायला सांगितली आणि गाडी थांबवून पाह्यलं. एक हसरं अंगण, कौलारू घर आणि पांढरा चाफा आमच्याकडे बघून खुदखुदत होता.

हेच ते घर आणि चाफा. पण ही फ्रेम चित्रपटातली आहे. त्यामुळे आस्पेक्ट रेश्यो सिनेमास्कोप आहे. १:२.३५ असा.

गणपतिबाप्पा मोरया!




गणपति विसर्जनानंतर ४-५ दिवसांनी ४ गणपति आपल्या विरघळण्याची वाट बघताना दिसले. पैकी एकाने आडवे होण्यापर्यंत मजल गाठली होती. अंगावरचे सोनेरी सोडून सगळे रंग सोडून गेले होते. एकाच्या हातांचे तपशील संपले होते.
स्थळः आरोंदा गावातील एक वहाळ.
कॅमेरा तपशील - निकॉन कूलपिक्स L 15, ऑटोवर काढलाय.

स्कार्लेट

मार्गारेट मिशेल च्या Gone with the wind ची नायिक Scarlet o’Hara. काल्पनिक असली तरी कुठल्याही खर्‍या माणसाइतकीच किंबहुना जास्तच माणूस वाटणारी हे स्कार्लेट.

मला मात्र ही सुरुवातीला भेटली लिंडा गुडमनच्या 'सन साइन्स' मधून. हसू नका प्रत्येकाने हे पुस्तक एकदा तरी वाचलेय नक्कीच आपापल्या टिनेज इयर्स मधे. तर ह्या पुस्तकात लिंडा बाई म्हणतात ”Scarlett O’Hara is the very epitome of the Mars-ruled Aries female.” आणि हे पटवून देण्यासाठी अनेक उदाहरणे देतात. सन साइन्स प्रमाणे मी ही एरिस असल्याने कोण ही स्कार्लेट असे कुतुहल निर्माण झाले. Gone with the wind ठरवून पाह्यला न कंटाळता. तरीही स्कार्लेट तितकिशी समजली नाही पण ’I will never be hungry again!’ हे स्वतःच स्वतःला दिलेले वचन मात्र लक्षात राह्यले. मग एक चाळाच लागला अयुष्यातल्या प्रत्येक गोष्टी स्कार्लेट शी ताडून बघायचा जो आजतागायत चालू आहे. साम्य किती नी कुठे हा मुद्दा दुय्यम पण यातून झाले मात्र एक की स्कार्लेट उलगडत गेली. मैत्रिण बनली.

ही स्कार्लेट मुळात अमेरीकेच्या जुन्या गर्भश्रीमंत अश्या दक्षिणेतली southern belle. अतिशय मनस्वी आणि हट्टी मुलगी. वयाच्या १६व्या वर्षापर्यंत 'lady like' वागण्यासाठी असलेली बंधने हे एकमेव दु:ख असलेली, एका मुलाच्या प्रेमातही पडलेली, त्याला मिळवण्यासाठी काहीही करू शकणारी, अगदी 'reputation' ही त्याच्यापुढे महत्वाचे न समजणारी. पण काय करता त्याने, म्हणजे अ‍ॅशली ने तर मेलनीशी लग्न ठरवलेले असते. निराश स्कार्लेट रागाच्या भरात एका वेगळ्याच तरूणाला लग्नाला होकार देते. लग्न होतं. हा काळ अमेरीकेतील उत्तर व दक्षिणेत झालेल्या Civil war चा आहे. सगळेच तरूण Confederate Army मधे गेले आहेत. त्यात तिचा नवराही. तो युद्धावर कामी येतो. त्याच्या शोकाचे काळे कपडे घालताना तिला एवढेच वाटत असते 'I am too young to be a widow!' लवकरच तिला ज्याच्यावर कधीच प्रेम केले नाही अश्या नवर्‍याच्या मृत्युप्रित्यर्थ कराव्या लागणार्‍या शोकाचा किंवा त्या देखाव्याचा कंटाळा येतो. Charity Ball च्या वेळेस काळा स्कर्ट आणि सफ़ेद क्रिनोलाइन नि त्याच्या खाली नुसतेच नाचणारे पाय हे दृश्य सगळ्यांना आठवतच असेल. ती काळे कपडे टाकून देते. र्‍हेट बटलर तिला समजावतो की तिने लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. इथे तिचा कणखर आणि मनस्वी स्वभाव जास्त ठळकपणे जाणवायला लागतो

युद्धाची तीव्रता वाढत जाते. Old south चा सगळा डोलारा कोलमडून पडायची वेळ येते. स्कार्लेट या ठिकाणी युद्धातील जखमींची शुश्रुषा करणार्‍या नर्सच्या रूपात दिसते. केवळ अ‍ॅशली ला दिलेले वचन पाळण्यासाठी ती मेलनीचे बाळंतपणही करते अगदी एकटीने. युद्धात Confederate Army चा पराजय होतो. स्वतःच्या नि उरलेल्या सगळ्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी स्कार्लेट आपल्या शिरावर घेते एखाद्या कर्त्या पुरुषाप्रमणे. ह्याच वेळी ती स्वत:ला ते वचन देते

”As God is my witness, as God is my witness, they're not going to lick me! I'm going to live through this, and when it's all over, I'll never be hungry again - no, nor any of my folks! If I have to lie, steal, cheat, or kill! As God is my witness, I'll never be hungry again.”
(देवाला साक्षी मानून मी स्वतःलाच वचन देते की मी यातून तावून सुलाखून बाहेर पडेन आणि मग सगळा गोंधळ संपल्यावर मात्र मी कधीच उपाशी रहाणार नाही, मी नाही आणि माझी माणसंही कधी उपाशी रहाणार नाहीत. मला मग त्यासाठी खोटं बोलावं लागलं, फसवावं लागलं, कुणाला मारावं लागलं तरी चालेल पण देवाशपथ मी कधीही उपाशी रहाणार नाही!)
जगण्याची दुर्दम्य इच्छा आणि आशा याचे याहून मोठे उदाहरण कुठले? मला खात्री आहे की प्रत्येक झोपडीतल्या बाई मधे हेच म्हणणारी स्कार्लेट असते. खरेतर प्रत्येक जणातच ही अशी स्कार्लेट दडलेली असते का?

ह्यानंतर आपली जमीन वाचवण्यासाठी फ्रँक केनेडीशी स्कार्लेट लग्न करते. जो खरंतर तिच्या धाकट्या बहिणीचा प्रियकर असतो. हे स्कार्लेटला माहित असते पण हेही माहित असते की जर सगळ्यांचेच देशोधडीला लागणे टाळायचे असेल तर हे करणे जरूरीचे आहे. हळूहळू त्यांना बरे दिवस येऊ लागतात. पण युद्धामुळे ढवळून निघालेला समाज अजून स्थिर नाहीये. अराजकाची स्थिती, लूटमार चालू आहे. अश्यातच स्कार्लेटवर हल्ला होतो. स्कार्लेट वर झालेल्या हल्ल्याचा सूड घ्यायला म्हणून अ‍ॅशली आणि फ्रँक जातात आणि त्या धामधुमीत फ्रँक मारला जातो. ती परत एकदा विधवा होते. याच वेळेला तिला तिच्या आईची तीव्रतेने आठवण येते आणि ती हेही कबूल करते की तिला तिच्या आइसारखेच व्हायचे होते. मृदु आणि दयाळू. पण ती कबूल करते की ती जे काही आहे ती मृदु नि दयाळू यापासून शेकडो योजने दूर आहे.
र्‍हेट तिच्यावरच्या आपल्या प्रेमाचा पुनरुच्चार करतो. पूर्णपणे प्रेमासाठी नाही तरी पैशासाठी ति त्याच्याशी लग्न करते. एव्हाना तिला अ‍ॅशली आपला होणे नाही हे मात्र पटलेले असते. र्‍हेट आणि स्कार्लेटला एक मुलगी होते पण तीही त्या दोघांना जवळ आणण्यात अयशस्वी होते. र्‍हेटचा संयम संपत जातो. अश्यातच बॉनीचा त्यांच्या मुलिचा अपघाती मृत्यू होतो आणि र्‍हेटच्या दृष्टीने तुकडा पडतो.
मेलनीचाही मृत्यू होतो आणि त्यावेळेला अ‍ॅशली चा विलाप पाहून स्कार्लेटला हे वास्तव लक्षात येते की ह्याचे आपल्यावर कधीही प्रेम नव्हते आणि तिला हेही जाणवते की ते तसे नव्हते याचे आपल्याला काहीच वाटत नाहीये.
तिला र्‍हेटची आठवण येते. त्याच्याबद्दल प्रचंड ओढ दाटून येते आणि याच वेळेला तो तिला सोडून निघालेला असतो. त्याचे मन तिच्या प्रेमाची वाट बघायला विटलेले असते त्यामुळे तिच्या कुठल्याच विनवणीचा त्याच्यावर परिणाम होत नाही. ”Frankly, my dear! I dont give a damn!”(खरं सांगायचं तर मला काहीही फरक पडत नाही!) असा घाव घालून तो निघून जातो.
पण स्कार्लेट ला हरणे मान्य नाहीये. तिने ज्याच्यावर आयुष्यभर प्रेम केले ते खोटे ठरलेले आहे, ज्याच्यावर तिचे खरे प्रेम आहे असा तिचा नवरा तिला सोडून गेलेला आहे, तिची मुलगी ही गेलेली आहे. अश्या अवस्थेलाही ती पराजय मानत नाही. ती आपल्या पहिल्या घरी जाण्याचे ठरवते.
”...Tara!...Home. I'll go home, and I'll think of some way to get him back! After all, tomorrow is another day!” (टेरा.. माझं घर.. मी घरी जाइन आणि त्याला [र्‍हेटला] परत मिळवण्यासाठी प्रयत्न करीन. शेवटी उद्याचा दिवस वेगळाच असणारे ना!)
स्कार्लेट स्वार्थी, मानी पण कुठल्याही गोष्टीच्या डोळ्याला डोळा भिडवून जे आहे ते आहे, नाही ते नाही असं सांगू शकणारी अशी, एक खरिखुरी माणूस. प्रत्येक चांगल्या वाइट गोष्टींसकट. प्रत्येक संकटाला, दुर्दैवाला '|Tomorrow is another day!’ म्हणून ठेंगा दाखवणारी प्रचंड आशावादी. तापट आणि कणखर पण त्याच वेळेला एखाद्या निरागस बाळाप्रमणे वाटणारी . प्रेमासाठी सगळे ओवाळून टाकले तरी प्रेमापेक्षाही इतर अनेक महत्वाच्या गोष्टी जगात असतात यावर विश्वास ठेवणारी. र्‍हेटशी लग्न करून आपण आपल्याहून वरचढ माणसाला स्थैर्यासाठी विकले, बांधले गेलो आहोत कि काय अशी भिती बाळगणारी एक मुक्त आणि स्वच्छंदी जीव, Free spirit.
आजही ही स्कार्लेट माझ्या मनात प्रत्येक वेळी Tomorrow is another day म्हणत रहते. सतत भेटत राहते. नि आजही तिच्याशी मला ताडून बघण्याचा माझा चाळा सुटलेला नाही.

-नी

माझा 'श्वास' - ३

आजूबाजूला बर्‍याच मालिकांमधून किंवा काही चित्रपटांच्यात बरीच लहान मुले होती पण कोकणातल्या खेड्यातला मुलगा काही सापडत नव्हता. सगळी मुलं एकजात शहरी वळणाची. आणि वर इंग्रजी माध्यमातली होती.

आम्ही शोधत होतो. चारी दिशांना दूत पाठवले होते म्हणजे सगळ्यांना सांगून ठेवलं होतं. मुलगा ६-७ वर्षांचच हवाय हे स्पष्ट कळवूनही चित्रपटाच्या मोहाने आपल्या १०-१२ वर्षाच्या बाब्यालाही "लहानच दिसतो हो तो" म्हणत आम्हाला भेटायला येणार्‍या आया पाहिल्यावर त्या मुलाची दयाच येत असे.

अश्यात एकदा माझ्या आईने एक फोटो दिला आम्हाला बघायला. ती एका मंगळागौरीच्या कार्यक्रमाला गेली होती तिथे एका चुणचुणीत छोट्याने एक नाट्यछटा केली होती. त्याचा फोटो आईने मागून घेतला होता. तो हा फोटो होता. फोटोतल्या cartoon चे गमतीशीर डोळे, त्याचा सावळा रंग आणि कपाळावरचे केसांचे मजेशीर छप्पर हे पाहून आम्ही दोघेही खुश झालो.



त्याच्या घरी पोचलो. लाल शर्ट आणि काळी चड्डी अश्याच वेषात साहेब आमच्यासमोर हजर झाले. समोरच्या दिवाणावर तो आणि त्याची आई बसली होती. इकडे खुर्च्यांवर आम्ही दोघं. संदीपने त्याच्याशी गप्पा मारायला सुरूवात केली. संदीपच्या हातात व्हिडीओ कॅमेरा होता. तो हळूच त्याने चालूही केला. ज्यूनियर चितळे आपल्याला भेटायला कुणीतरी आलंय म्हणून जाम खुश होते आणि किंचित लाजतही होते. संदीपच्या हातातल्या कॅमेर्‍याकडे त्याचं वारंवार लक्ष जात होतं. संदीप त्याला, "इकडे ये!" म्हणाला, समोरचा दिवाण ते संदीप बसला होता ती खुर्ची यातलं अंतर ५ - ६ पावलं असेल नसेल पण जवळजवळ मॅरेथॉन मधे धावावं एवढ्या वेगात त्याने धाव घेतली आणि पटकन संदीपच्या जवळ आला. आजही माझ्या डोळ्यासमोरून त्याची ती धाव हटत नाही. संदीपला आणि मला जाम हसायला आलं. साधारण दीड मिनिटात त्याचा बुजरेपणा संपला होता आणि तो आमच्याशी गप्पा मारायला लागला होता. नंतर त्याला त्याचं नाव आणि त्याच्याबद्दल २ ओळी बोलायला सांगितल्या कॅमेर्‍यात बघून. "माझे नाव अश्विन मिलिंद चितळे आहे. माझे वय ६ वर्ष आहे. नुकतीच माझी मुंज झाली. तेव्हा मला खूप मजा आली." अशी वाक्य म्हणताना हळूच एकीकडे हसू न आवरणं, हसण्याच्या नादात शब्दांची गडबड करणं, त्यावरून जीभ बाहेर काढून किंवा मानेनेच 'नाही' म्हणून वाक्याची परत सुरूवात करणं, आणि यामुळे त्याला अजूनच हसायला येणं असं त्याचं चालू होतं. 'तू टीव्ही बघतोस का? काय आवडतं? मारामारी करायला आवडते का?' असं काय काय संदीपने त्याला विचारलं. मारामारीचं नाव काढल्यावर स्वारी खूशच. संदीपने त्याला माझ्याशी मारामारी करायला सांगितली. हे सगळं संदीपच्याकडे टेप होत होतं आणि हे त्या पिल्लाला विसरायला झालं होतं एव्हाना. मी तर तेव्हाच खुश झाले होते. हाच 'तो' अशी माझी खात्री पटली होती. आणि संदीप अर्थातच इतक्या पटकन खुश होणार्‍यातला नसल्याने "चांगला आहे. शक्यता आहे हाच ठरण्याची. पण अजून screentests कराव्या लागतील" असं म्हणून आम्ही चितळ्यांच्या घरून बाहेर पडलो.

यानंतर संदीपने अश्विनशी छान मैत्री वाढवली. त्याला घरी जाऊन भेटणे, त्याला बाहेर खेळायला घेऊन जाणे इत्यादी सुरू झाले. त्याच्याशी संदीपने खूप गप्पा मारल्या. अगदी आज शाळेत काय झालं पासून काल आईने फटका दिला होता इथपर्यंत सगळं तो संदीपला सांगू लागला. अश्विन संदीपच्याबरोबर खूपच रूळला, comfortable झाला. हळू हळू संदीपलाही १००% खात्री पटली की हाच 'परश्या' आणि मग त्याचे ट्रेनिंग चालू झाले. साधारण चारपाच महिने हे ट्रेनिंग चालू होते.

ह्यातच मग हळूहळू 'परश्या' साकारण्यासाठी म्हणून विशिष्ठ inputs द्यायला संदीपने सुरूवात केली. 'तुला काय वाटतं काय करायला हवं आता परश्यानं? किंवा असं झालं तर तुला कसं वाटेल?' अश्या साध्या साध्या संवादांच्यातून संपूर्ण पटकथा गप्पा मारत मारत, चर्चा करत, हळू हळू संदीपने अश्विनपर्यंत पोचवली.

पटकथेच्या अनुषंगाने येणार्‍या ठिकाणी विशेषतः हॉस्पिटलमधे, डॉक्टरांच्या क्लिनिकमधे त्याला फिरवूनही आणले होते. अगदी मेल सर्जिकल वॉर्ड पासून ऑपरेशन थिएटर पर्यंत. हेतू हा की त्याला या सगळ्या वातावरणाची सवय व्हावी. पहिल्यांदा त्याला तिथे घेऊन गेलो होतो तेव्हा आम्हालाच तो घाबरेल का? रडेल का अशी थोडी भिती होती. पण एव्हाना आमच्या दोघांची विशेषतः संदीपकाकाची त्याला इतकी सवय झाली होती की तो कणभरही घाबरला नाही. मजेत होता. अगदी हॉस्पिटलमधे स्ट्रेचर वर झोपवून त्याला OT मधे नेऊन आणले तेव्हाही. वर स्पिरिटचा वास मला खूप आवडतो असंही सांगितलं त्याने.

अस सर्वच दृष्टीने त्याला 'परश्या' करण्यासाठी तयार करणं चालू होतं. पण सगळ्यात महत्वाचं होतं ते म्हणजे अश्विनला या सगळ्याचा त्रास न होणं. वय लहान आणि कर्करोग, आंधळं होणं या गोष्टी नट म्हणून अंगावर घेताना त्याच्या मनावर आयुष्यभरासाठी 'स्कार' होणं ही शक्यता खूपच होती. आणि त्याचा परिणाम film मधल्या performance वर होण्याची शक्यताही होती. त्यामुळे पहिल्यापासून त्याला हे सगळं खोटं आहे. ही एक गोष्ट आहे आणि ती एकदम खरी वाटेल अशी आपल्याला दाखवायचीये हे त्याला वेगवेगळ्या पद्धतीने संदीपने समजावून दिलं. म्हणजे कसं की..

"आजारी कोण आहे?"
"परश्या"
"लोकांना कळलं पाहीजे तो आजारी आहे. परश्या कोण करतंय?"
"अश्विन"
"मग अश्विन बरं नाहीये असा दिसला तर लोकांना कळेल ना परश्या आजारी आहे ते.."

अश्या गप्पांच्यातून परश्या आणि अश्विन हि सीमारेखा संदीपने कायम ठेवली. त्यामुळे पुढे शूटींगच्यावेळेला अत्यंत intense scenes च्या वेळेलासुद्धा अश्विन एकदम relax असायचा.

नेहमी भेट झाल्यावर काय काय झालं, संदीपकाका काय काय बोलला असं सगळं त्याला लिहून ठेवायला संदीपने सांगितलं होतं. कधी कधी संदीप त्याला प्रश्नही द्यायचा ज्याच्याबद्दल पुढच्या वेळेपर्यंत त्याने लिहून आणणं अपेक्षित असायचं. हे प्रश्न म्हणजे 'मग आता परश्यचं काय झालं? आजचा गोष्टीतला जो भाग होता त्याबद्दल तुला काय वाटतं? आज आपण अमुक अमुक ठिकाणी गेलो होतो तिथे तुला कसं वाटलं?' विविध स्वरूपाचे असायचे. वय वर्ष सहा, इयत्ता दुसरी या वयाला साजेसं, जमेलसं तो त्यात लिहायचा. अर्थात तो काही अभ्यासू विद्यार्थी नव्हता ( thank god! ). कधी कधी कंटाळाही करायचा. कधी कधी वात्रटासारखं "मला झोप आली म्हणून आईला लिहायला सांगितलं." असं उत्तरही यायचं त्याच्याकडून किंवा एकदा वहीची दोन पानं मोठ्ठ्या अक्षरात 'काही नाही' असं लिहिलं होतं त्याने. मग संदीपकडून एखादी खरीखुरी किंवा शाब्दिक चापटही खायचा तो तेव्हा पण एकुणात त्याने पटकथा, परश्या हे सगळं पचवायला सुरूवात केली होती हे नक्की.